
औरंगाबाद – येथील सातारा बीड बायपासवर रविवारी भरदुपारी हॉटेल ‘एमएच-२०’मध्ये पोलिसांनी बेधुंद पार्टी उधळून लावली. संगीत कला प्रदर्शनाच्या नावाखाली नशेत तर्र असलेल्या १०० तरुण-तरुणींचा पाश्चात्त्य संगीतावर नाच सुरू असतानाच पोलिसांनी धाड टाकली. चौघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
दुपारी १२ वाजता सुरू झालेली पार्टी रंगात आली. नशेत तर्र असलेल्या तरुणांनी गाण्यांचा आवाजही वाढविला. हॉटेलच्या बाजूलाच रुग्णालय आणि वसाहत असल्याने नागरिकांना या धांगडधिंग्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे काही नागरिकांनी सातारा पोलिसांना फोन करून पार्टीची माहिती दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक एम.बी. टाक, के.डी. महांडुळे, पोलीस न्स्टेबल कल्याण चाबूकस्वार यांच्यासह पोलिसांचे पथक हॉटेलवर धडकले.
आमच्याकडे रीतसर परवानगी आहे, आम्ही नियमाचा भंग करीत नाही, असे सांगत संयोजक सनी चहल याने पोलिसांना अडविले. संगीत कला प्रदर्शनासाठी दुपारी १२ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत परवानगी असल्याचे पाहताच पोलिसांनी पाश्चात्त्य संगीत आणि दारू पिऊन थिरकण्याची परवानगी आहे का, असा सवाल केला. काही वेळ दोघांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. संगीत बंद केल्यानंतर तणाव निवळला. पोलिसांनी सनी चहल याच्यासह इतर चौघांविरुद्ध कलम ११०/११७ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई केली. हे हॉटेल लघाने पाटील यांचे असून, त्यांनी मुंबई येथील किशोर कोटियान यांना चालविण्यासाठी दिले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी दिली.
फेसबुकवर पेज
‘आफ्टरनून म्युझिकल हँगआऊट’ या नावाने फेसबुकवर पेज करून या पार्टीची जाहिरात करण्यात आली. त्यासाठी तीन मोबाईल नंबर देण्यात आले. या तिन्ही नंबरवर लोकमतच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता यातील सुरुवातीचे दोन नंबर नॉट रिचेबल आले. शेवटच्या नंबरवरून कॉल घेण्यात आला. मात्र, त्याने नाव सांगितले नाही. आमची चूक झाली. पोलिसांनी सांगताच आम्ही पार्टी बंद केली. यामुळे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. पोलिसांनी बोलाविल्यानंतर आम्ही ठाण्यातही जाऊन आलो, अशी माहिती या नंबरवरून देण्यात आली. पुन्हा हा नंबरदेखील स्वीच आॅफ झाला.
Archive for November 24th, 2014
0
औरंगाबादमध्ये बेधुंद पार्टी उधळली
0
रेडिओच्या माध्यमातून निवडणुकीचा प्रचार

श्रीनगर – निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रभावित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून विविध माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. सोशल मिडीयाचा वाढता वापर पाहता सध्या निवडणुकीदरम्यान सोशल मिडीयावरुन प्रचार करण्याचे प्रमाणही वाढले आहे. मात्र त्यासोबतच रेडिओदेखील निवडणुकीत प्रचाराचे महत्त्वाचे माध्यम बनत आहे. जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांना प्रभावित करण्यासाठी राज्यातील काँग्रेस, भाजपा यांसारख्या बड्या पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर रेडिओचा वापर केला जात आहे.
भाजपाकडून रेडिओवरील चॅनेल्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारगिल येथे केलेले भाषण प्रसारित केले जात आहे. जम्मू-काश्मीर देशासाठी एक विकास मॉडेल बनले पाहिजे असे मोदींनी या भाषणात म्हटले होते. तसेच वृत्तपत्रातूनही मोठ्या प्रमाणात जाहिरात केली जात आहे. भाजपासोबतच काँग्रेसनेही रेडिओच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. नॅशनल कॉन्फरन्स पक्षासोबतच्या युतीसोबत गेल्या सहा वर्षांत केलेल्या कामांचा प्रसार काँग्रेस रेडिओच्या माध्यमातून करत आहे.
लखनपूर ते लडाख हा चौपदरी रस्ता कोणी बांधला? काँग्रेसने. राज्याला रस्तेमार्गाने जोडण्यासाठी चेनानी आणि झोजिला येथे भुयारी मार्ग कोणी बांधले? काँग्रेसने. माझे मत फक्त काँग्रेसला अशा प्रकारची जाहिरात रेडिओद्वारे केली जात आहे. त्यासोबतच जम्मू-काश्मीरमधील शहरी भागातील उमेदवारही रेडिओच्या माध्यमातून निवडणुकीचा प्रचार करत आहेत.
0
संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित

नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य मुरली देवरा यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. मुरली देवरा यांच्यासह निधन झालेल्या इतर सदस्यांनाही यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
अधिवेशनाच्या सुरुवातीस नव्या खासदारांनी यावेळी शपथ घेतली. बीड लोकसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या प्रितम मुंडे यांनीही मराठीत शपथ घेतली. त्यानंतर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केल्याचे जाहीर केले. महिनाभर चालाणा-या या अधिवेशनात अनेक महत्वाची विधेयके मांडली जाणार आहेत. वस्तू आणि सेवा कर विधेयक, जमिन अधिग्रहण विधेयक तसेच जीएसटी कर विधेयक मांडली जाण्याची शक्यता आहे. या अधिवेशनाध्ये मांडल्या जाणा-या विमा विधेयक तसेच काळ्या पैशाच्या मुद्दयावरुन सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक करणार आहेत. दरम्यान, संसदेचे कामकाज सुरळीतपणे पार पडेल. विरोधकांचेही सरकारला सहकार्य मिळेल अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी व्यक्त केली. २३ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन सुरु राहणार आहे.
0
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांचे निधन

मुंबई – माजी पेट्रोलियम मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांचे सोमवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.
मुरली देवरा यांचे पार्थिव आज दुपारी १२ ते दोन वाजेपर्यंत मुंबई काँग्रेस कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर चार वाजता गिरगावमधील चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांचे गांधी कुटुंबाशी तसेच उद्योगपती मुकेश अंबानीसोबत त्यांचे जवळचे संबंध होते. काँग्रेसचे निष्ठावान नेते अशी त्यांची ओळख होती. १९६८ पासून काँग्रेसचे नगरसेवक म्हणून त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. त्यानंतर १९७७ ते १९७८ दरम्यान ते मुंबईचे महापौर होते. दक्षिण मुंबईतून ते चार वेळा ते संसदेचे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्यामुळेच दक्षिण मुंबई हा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जातो. २००४ मध्ये राज्यसभेत खासदार होते. यूपीए सरकारच्या कार्यकाळात देवरा यांनी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रिपद भूषवले होते. तसेच जुलै २०११ मध्ये त्यांनी दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रीपदाचा कार्यभारही सांभाळला होता. दोन दशकाहून अधिक काळ त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले होते.मुरली देवरा यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली. मुरली देवरा हे त्यांच्या शांत स्वभावामुळे पक्षात लोकप्रिय होते. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. कालच मी देवरा यांच्या कुटुंबीयांकडे त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. आज या बातमीमुळे खूप दु:ख होत आहे. असे मोदी म्हणाले.









