
अहमदनगर – पोलिसांनी जवखेडा हत्याकांडाचा तपास वेळेत पूर्ण केला नाही तर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवू असा इशाराच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलिसांना दिला आहे. याप्रकरणी कोणतीही चुकीची कारवाई होऊ देणार नाही असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी पिडीत कुटुंबियांना दिले आहे.
जवखेडा येथील जाधव कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाला ४० दिवसांचा कालावधी लोटला असला तरी अद्याप मारेक-यांना अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी चार जणांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली असली तरी या चौघांनी कोर्टात धाव घेत नार्को टेस्टला विरोध केला आहे. कोर्टानेही या चौघांची नार्को टेस्ट करण्याची परवानगी नाकारली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सकाळी जाधव कुटुंबियांची भेट घेतली. मारेक-यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी पिडीत कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. दोषींवर कायदेशीर कारवाई होईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी कुटुंबियांना दिले आहे.
Archive for November 30th, 2014
0
जवखेडा हत्याकांडाचा तपास सीबीआय कडे – मुख्यमंत्री
0
पूर्ववैमनस्यातून कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

कोल्हापूर – पूर्ववैमनस्यातून एका कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. रंकाळा परिसरातील पानारी मळा या भागात राहाणा-या किशोर भोसले यांच्यासोबतच त्यांच्या कुटुंबियांना जिवंत जाळण्याच प्रयत्न करण्यात आला.
किशोर भोसले आणि रणजीत पांडूरंग मोरस्कर यांच्यात वारंवार हाणामा-या होत असत. या वैमनस्यातून हा प्रकार घडला. मोरस्कर यांच्या गुंडानी मध्यरात्री दोन वाजता भोसले यांच्यासह त्यांच्या गरोदर पत्नी आणि इतर तीन जण गाढ झोपेत असताना घरात रॉकेलचे बोळे फेकले आणि घराला आग लावून दिली.
तसेच भोसले यांच्या कुटुंबियांना घराबाहेर पडता येऊ नये यासाठी घराच्या कड्याही लावून घेतल्या. यावेळी घराच्या पाठीमागे दरवाजा असल्याने भोसले आणि त्यांच्य़ा कुटुंबियांना घरातून बाहेर प़डणे शक्य झाले यामुळे मोठी जिवितहानी टळली.
या घटनेमुळे रंकाळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नसली तरी मात्र या आगीत त्यांच्या घरातील संपूर्ण सामान जळून खाक झाले आहे. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना अटक करण्यात आली आहे.
0
रेल्वे अपघातात १८ हजार ७३५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली – गेल्या काही वर्षांपासून रेल्वे ट्रॅकवरील अपघातांतील मृतांचे प्रमाण वाढतच चालले आहे. रेल्वे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर अपघातांबाबत उपाययोजना करुनही अपघातातील मृतांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०११ मध्ये रेल्वे ट्रॅकवर सुमारे १४ हजार ९७३ अपघाती मृत्यूची नोंद झाली होती. तर २०१२ मध्ये हेच प्रमाण १६ हजार ३३६ वर पोहोचले. त्यापाठोपाठ २०१३ मध्ये १९ हजार ९९७ अपघाती मृत्यू झाले होते. या वर्षी ऑक्टोबरपर्यंत रेल्वे ट्रॅकवरील अपघातात सुमारे १८ हजार ७३५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
बहुतांशी रेल्वे अपघात हे रेल्वे रुळ ओलांडणे, रेल्वेतून खाली पडल्याने, अपघात तसेच आत्महत्या यामुळे होतात. यांसारखे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडूनही गंभीर पावले उचलली जात आहे. रेल्वे रुळ न ओलांडता जिन्यांचा वापर करा यांसारख्या सूचना वारंवार प्रवाशांना केल्या जातात. तसेच विविध प्रवासी जनजागृती कार्यक्रमही रेल्वेकड़ून राबवले जात असल्याची माहिती रेल्वे अधिका-यांनी यावेळी दिली.
Comments Off on क्रिकेट मॅच दरम्यान बॉल लागून अंपायरचा मृत्यू
क्रिकेट मॅच दरम्यान बॉल लागून अंपायरचा मृत्यू

नवी दिल्ली – फिलिप ह्युजच्या मृत्यूनंतर जेमतेम दोन दिवसांनीच क्रिकेट मॅच सुरू असताना बॉल लागल्यामुळे गंभीर इजा होऊन मृत्यू होण्याची आणखी एक घटना घडली. यावेळी ही घटना इस्रायलमध्ये अॅसडोड शहरात घडली.
इस्रायलच्या क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन एका स्थानिक स्पर्धेत अंपायर (पंच) म्हणून बॉलरच्या दिशेला उभा होता. मॅच सुरू असताना फिल्डरने प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूला रनआऊट करण्याच्या उद्देशाने स्टम्पच्या दिशेने फेकलेला बॉल एका स्टम्पला आपटून थेट अंपायर हिलेल ऑस्कर (५५) यांना लागला. बॉल इतक्या जोरात लागला की, अंपायर ऑस्कर मैदानातच कोसळले, थोड्याच वेळात त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण ब्रेन हॅमरेज की मॅसिव्ह हार्टअॅटॅक (ह्रदयविकाराचा तीव्र धक्का) हे वैद्यकीय अहवाल आल्यानंतर कळेल. याआधी पाच वर्षापूर्वी इंग्लंडमध्ये वेल्स येथे एका मॅचदरम्यान फिल्डरने फेकलेला बॉल चुकून अंपायरलाच लागला आणि त्यांचा मृत्यू झाला होता.
मागच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियात एका महत्त्वाच्या स्थानिक स्पर्धेत फलंदाजी करताना बॉल लागल्यामुळे फिलिप ह्युज हा २५ वर्षाचा गुणी फलंदाज मैदानातच कोसळला आणि कोमात गेला होता. कोमात गेलेल्या ह्युजचा दोन दिवसांनी मृत्यू झाला, शेवटपर्यंत तो कोमातून किंचितही बाहेर पडू शकला नव्हता. ह्युजच्या अकाली मृत्यू आधी १९९८ मध्ये एका मॅच दरम्यान हेल्मेट न घालता फॉरवर्ड शॉर्ट लेगला फिल्डिंग करत असलेल्या रमण लांबाचा डोक्याला बॉल लागल्यामुळे मृत्यू झाला होता.
0
मुलीच्या लग्नासाठी ३७ लाख रुपये द्या; पित्याला दिल्ली हायकोर्टाचा आदेश

नवी दिल्ली -आपल्या आर्थिक क्षमतेनुसार मुलीच्या लग्नाचा खर्च उचलणे हे वडिलांचे कर्तव्य आहे, असे सांगत दिल्ली हायकोर्टाचे न्या. जी. पी. मित्तल यांनी सैनिक फार्म परिसरात राहणा-या एका व्यक्तीला स्वतःच्या मुलीच्या लग्नासाठी ३७ लाख रुपये आईकडे देण्यास सांगितले.
लग्नानंतर अवघ्या काही वर्षातच पती-पत्नी वेगवेगळे राहू लागल्यामुळे आईनेच मुलीचा सांभाळ केला होता. या पार्श्वभूमीवर आईने मुलीच्या लग्नासाठी तिच्या वडिलांकडे मोठ्या रकमेची मागणी केली. सैनिक फार्ममधील पॉश बंगला, मनालीत रिसॉर्ट तसेच आणखी बरीच मौल्यवान संपत्ती स्वतःजवळ बाळगणा-या मुलीच्या वडिलांना तिच्या आईने लग्नासाठी जास्त पैसे देण्यास सागितले. वडिलांनी मुलीच्या लग्नासाठी पाच लाख रुपये आणि जेवणाचा खर्च करण्याची तयारी दाखवली होती. अखेर आईने कोर्टात दाद मागितली.
कोर्टाने वडिलांना लग्नाचा खर्च करण्यासाठी आईकडे ३७ लाख रुपये देण्यास सांगितले. यावेळी बचावासाठी बोलताना वडिलांनी लग्नात लाखो रुपये खर्च करणे, महागड्या भेटी देणे म्हणजे हुंडा देण्यासारखेच आहे आणि हा गुन्हा असल्याचे सांगितले. यावर उत्तर देत कोर्टाने लग्नात मुलीला आपल्या आर्थिक कुवतीनुसार स्वच्छेने एखादी वस्तू अथवा सेवा दिल्यास ती भेट ठरेल, मात्र विशिष्ट मागणी पूर्ण करण्यासाठी मुद्दाम एखादी वस्तू अथवा सेवा देणे म्हणजे हुंडा देणेच आहे, असे सांगितले. कायद्यानुसार हुंडा देणे आणि घेणे हा गुन्हा आहे पण स्वेच्छेने झालेले देणे-घेणे हे गुन्हा नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.
0
खरे सोने दाखवून डुप्लिकेटची विक्री

नाशिकरोड – खरे सोने दाखवून नंतर बनावट सोने गळ्यात मारणाऱ्या महिलेसह तीन जणांना गुन्हे शाखा क्रमांक तीनच्या पथकाने नारायणबापू चौकाजवळ शुक्रवारी अटक केली. त्यांच्याकडून साडेआठ हजाराचा ऐवज जप्त केला.
जेलरोड-सायखेडा रोडवरील नारायणबापू चौकातील अभिनव शाळेजवळ गणेश गंगाराम प्रजापती (४२, व्यापारी, रा. अबलापूर रेल्वे स्टेशनजवळ लखनऊ), बालचंद धनीराम गुजराती (वय २५) आणि राधा राजू राय (३५, मजुरी, दोघे रा. मैहेबुलापूर, लखनऊ) हे निम्म्या दरात सोने विकत असल्याचे पोलिस निरीक्षक सानप यांना समजले. हे तिघे व्यवहारावेळी खऱ्या सोन्याचे दागिने दाखवून नंतर तसेच दिसणारे पितळाचे दागिने गळ्यात मारत होते. गणपतीच्या मुखवट्याचे दागिने व पितळी नाणी ते पंधरा हजार रुपये तोळा या दराने ग्राहकांना विकायचे. सोने निम्म्या दरात मिळत असल्याच्या लालचेने ग्राहक जाळ्यात अडकायचे. पोलिसांनी पंचक येथील संतोष रामनाथ नागरे यांना बनावट ग्राहक करून दोन पंचासमेवत त्यांना अभिनव शाळेजवळ पाठवले. पोलिस निरीक्षक सानप व त्यांचे सहकारी इंदिरा गांधी पुतळ्याजवळ दबा धरून बसले. नजीकच असलेल्या युनियन बँकेच्या एटीएमजवळ प्रजापती व त्यांच्या साथीदारांशी रामनाथ नागरे यांची गाठ पडली. बनावट सोने विकत असतानाच पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्याकडून साडेतीन किलो गणपतीच्या मुखवट्याचे पितळी दागिने, साडेतीन किलो पितळी नाणी, खऱ्या सोन्याचे १. ४०० ग्रॅमचे चार हजाराचे दागिने, पावणेतीन हजाराची रोकड, मोबाइल जप्त केले. पोलिस निरीक्षक संजय सानप, सहाय्यक निरीक्षक जी. डी. देवडे, सहाय्यक उपनिरीक्षक सुभाष गुंजाळ, विलास गांगुर्डे, गंगाधर केदार, शंकर गडदे, ललिता आहेर, राजेंद्र जाधव आदींनी ही कारवाई केली.
0
चित्रपटांनी केली पोलिसांची प्रतिमा मलीन – मोदी

गुवाहाटी -‘गुप्तचर यंत्रणा आणखी बळकट करून पोलिसांचं मनोधैर्य वाढवण्याची गरज आहे. पोलिस दल अत्याधुनिक आणि पोलिसांनी ‘स्मार्ट’ असायला हवं. पण चित्रपटांनी पोलिसांची प्रतिमा मलीन केली आहे’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. गुवाहाटीत आयोजित केलेल्या सुरक्षा यंत्रणा आणि पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परिषदेत मोदींनी सुरक्षेवर भर दिला.
‘आता बदलण्याची वेळ आली असून पोलिस दलाने ‘स्मार्ट’ झालं पाहिजे. SMART चा अर्थ आहे S म्हणजे Strict आणि Sensitive, M म्हणजे Mobile, A म्हणजे Alert, Accountable, R म्हणजे Reliable, Responsible, T म्हणजे Tech savvy किंवा Trendy.’ ‘देशाच्या सुरक्षेसाठी गुप्तचर यंत्रणा आणखी बळकट आणि सक्षम झाल्या पाहिजेत. ज्या देशाकडे बळकट गुप्तचर यंत्रणा आहे. त्या देशाला शस्त्रास्त्रांवर अवलंबून राहण्याची वेळ येत नाही’, असं मोदींनी सांगितलं.
‘जनतेच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावून अनेक पोलिस शहीद झालेत, हे लोकांना कळलं पाहिजे. आतापर्यंत ३३ हजार पोलिस ड्युटीवर कर्तव्य पालन करताना शहीद झाले. त्यांचं बलिदान व्यर्थ जायला नको. शिवाय चित्रपटांमधूनही पोलिसांची प्रतिमा मलिन करण्यात आली आहे’, असं मोदी म्हणाले. ‘जनतेपर्यंत शहीदांची गाथा पोहचवण्याचं काम करण्यासाठी शहीद पोलिसांच्या सन्मानासाठी स्पेशल टास्क फोर्स असायला हवा. नव्या पिढीला प्रेरणा मिळेल असं एक पुस्तक प्रत्येक राज्याने शहीद जवानांसाठी बनवलं पाहिजे. एवढचं काय तर प्रत्येक पोलिस ठाण्याची वेगळी वेबसाईट झाली तरी काही हरकत नाही’, असं मोदींनी सांगितलं.









