
मुंबई – वॉट्स अॅपवर आलेला मेसेज वाचलाच नाही असं यापुढे सांगता येणार नाही. वॉट्स अॅपमधील नवीन फिचरनुसार एखाद्या व्यक्तीने मेसेज पाठवल्यास आपण तो वाचला की नाही हे त्या व्यक्तीला समजणार आहे. काही वॉट्स अॅप युजर्सच्या मोबाईलवर ही सुविधा सुरुदेखील झाली आहे.
अवघ्या काही वर्षांमध्येच लोकप्रिय मेसेजिंग अॅपचे बिरुद मिरवणा-या वॉट्स अॅपने आता नवनवीन फिचर्स द्यायला सुरुवात केली आहे. यापूर्वी वॉट्स अॅपवर एखाद्या व्यक्तीने मेसेज केला व तो मेसेज संबंधीत व्यक्तीला मिळाला हे दर्शवण्यासाठी राखाडी रंगातील दोन टीक मार्क यायचे. मात्र तो मेसेज संबंधीत व्यक्तीने वाचला की नाही हे समजू शकत नव्हते. त्यामुळे अनेकदा गोंधळ उडायचा. यावर वॉट्स अॅपने तोडगा काढला आहे. आता वॉट्स अॅपवर मेसेज रिड केल्यास राखाडी रंगातील दोन टीक मार्क निळ्या रंगात बदलणार आहे. तसेच पाठवलेल्या मेसेजवर दीर्घ काळ प्रेस करुन ठेवल्यास मेसेज इन्फोद्वारेही मेसेज रिड झाल्याची माहिती मिळेल. अद्याप ही सुविधा सर्व युजर्सना मिळालेली नाही. लवकरच वॉट्स अॅपकडून अपडेट दिली जाणार असल्याचे समजते. भारतात वॉट्स अॅपचे सात कोटी युजर्स असून या नवीन फिचरमुळे वॉट्स अॅपवर ‘उल्लू’ बनवणे कठीण होणार ऐवढे मात्र नक्की.
Archive for November 6th, 2014
0
वॉट्स अॅपवर नो उल्लू बनाविंग, मेसेज वाचल्याचे कळणार
0
उपमुख्यमंत्रीपदाच्या मोबदल्यात केंद्रात मंत्रिपद द्या – शिवसेना

मुंबई – राज्यात उपमुख्यमंत्रीपद मिळत नसेल तर भाजपाने केंद्रात आणखी एक मंत्रिपद द्यावे अशी मागणी शिवसेनेने केल्याचे समजते. शिवसेनेच्या या मागणीमुळे भाजपाचीही कोंडी झाली असून आता यावर भाजपा शिवसेनेपुढे नमते घेते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपा आणि शिवसेनेमधील चर्चेचे गु-हाळ अद्यापही सुरुच असून युतीबाबत दोन्ही पक्षांमध्ये अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. शिवसेनेला राज्यात उपमुख्यमंत्रीपद व ९ ते १० मंत्रिपद हवे आहे. तर भाजपाने ही मागणी फेटाळून लावली आहे. सध्या शिवसेनेची दिल्लीतील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरु आहे. यामध्ये शिवसेना नेत्यांनी राज्यात उपमुख्यमंत्रीपद देत नसाल तर केंद्रात आणखी एक मंत्रिपद देण्याची मागणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून रविवारी नवीन मंत्र्यांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विस्तारामध्ये आपल्या पदरात एखादे मंत्रिपद पाडून घ्यावे अशी रणनिती शिवसेनेने आखल्याचे सूत्रांनी सांगितले. तर भाजपाने याविषयावर शिवसेनेला अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. शिवसेनेेची मागणी मान्य केल्यास तेलगू देसम, अकाली दल हे पक्षही भविष्यात अशी मागणी करु शकतील अशी भिती भाजपा नेत्यांना वाटत आहे.
0
काँग्रेसचा विधिमंडळ नेता हायकमांड निवडणार

मुंबई- काँग्रेसचा विधिमंडळ नेता निवडीसाठी झालेल्या बैठकीत अखेर विधिमंडळ नेता निवडण्याचे सर्वाधिकार काँग्रेसच्या हायकमांडना देण्यात आले. राज्यातील विधिमंडळ नेता निवडीसाठी काँग्रेसच्या आमदारांची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत विधिमंडळ नेता पदाच्या शर्यतीत अनेक जेष्ठ नेते आणि मंत्री असल्याने अखेर विधिमंडळ नेता निवड करण्याचा सर्वाधिकार काँग्रेसचे हायकमांड घेतील असा निर्णय घेण्यात आला. लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खर्गे आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मोहन प्रकाश यांच्या निरीक्षणाखाली ही बैठक झाली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपण विधिमंडळ नेते पदाच्या शर्यतीत नसल्याचे गुरुवारी सकाळी सांगितले. मात्र काँग्रेस पक्षातील अनेक जेष्ठ नेते आणि मंत्री पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील हे या शर्यतीत आहेत. त्यामुळे गुरुवारी झालेल्या विधिमंडळ नेता निवडीसाठी काँग्रेस आमदारांच्या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही.
नवनिर्वाचित ४२ आमदारांपैकी ३९ आमदार आणि २२ विधान परिषदेत असलेले आमदार या बैठकीला उपस्थित होते. कालिदास कोळंबकर, सुरुपसिंह नाईक आणि आरिफ मोहम्मद नसीम खान काही कारणास्तव बैठकीला हजर राहू शकले नाहीत.
0
केंद्रीय मंत्रीमंडळाचा रविवारी विस्तार

नवी दिल्ली- केंद्रीय मंत्रीमंडळाचा येत्या रविवारपर्यंत विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारात गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह सहा नव्या चेह-यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुस्लिमांना खूष करण्यासाठी मुख्तार अब्बास नक्वी यांचा मंत्रीमंडळात समावेश होण्याची दाट शक्यता आहे. भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्यासह मनोहर पर्रिकर यांना मंत्रीपद मिळणारच अशी जोरदार चर्चा आहे.
पर्रिकर यांनी बुधवारी दिल्लीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. तर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यापेक्षा देश मोठा असल्याची प्रतिक्रिया पर्रिकर यांनी मोदींची भेट घेतल्यानंतर दिली. पर्रिकर यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्याची दाट शक्यता आहे.
याचबरोबर आंध्र प्रदेशात तेलगु देसम पार्टीशी युती असल्याने मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचेही नाव चर्चेत आहे. येत्या दोन दिवसात तुम्हाला मंत्रीमंडळ विस्ताराची बातमी ऐकायला मिळेल, असे नायडू म्हणाले. तर बिहार, राजस्थान मधील भाजपचे काही नविन चेहरे आणि टीडीपी व शिवसेनेलाही मंत्रीमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रपती भवनात भेट दिली. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारासाठीच मोदी तेथे गेले होते, अशी दिल्लीत चर्चा आहे. मात्र गुरु नानक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ते राष्ट्रपती भवनात गेले होते, असे कारण पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले.
सध्या २२ कॅबिनेट आणि २२ राज्य मंत्री यात १० स्वतंत्र पदभार असलेल्या मंत्र्यांचाही समावेश आहे. यातील नितिन गडकरी, अरुण जेटली, प्रकाश जावडेकर, निर्मला सिथारमण आणि पियुष गोयल या भाजप नेत्यांकडे अनेक विभागांचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
अरूण जेटली यांच्याकडे वित्त आणि संरक्षण तसेच नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक मंत्रालयाबरोबच गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर ग्राम विकास मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार आहे.
तर रविशंकर प्रसाद यांच्याकडे कायदा आणि न्याय मंत्रालयाबरोबरच दळवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचाही कारभार आहे. तसेच माहिती-प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी आहे.
अतिरिक्त पदभार असल्याने संबंधित मंत्रालयांच्या कामकाजावर पूर्ण लक्ष केंद्रीत करणे या मंत्र्यांना अशक्य झाले आहे. यामुळे पंतप्रधानांना मंत्र्यांची संख्या वाढवणे गरजेचे आहे.
0
ऑनर किलिंगचा प्रकार, माहूरात घडलेले दुहेरी हत्याकांड
निलोफरचे वडील, काका आणि चुलत भाऊ अटकेत
यवतमाळ – माहुर येथे घडलेले दुहेरी खून प्रकरण हा ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचा पर्दाफाश स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी केला आणि या ऑनर किलिंग साठी सुपारी देणाऱ्या मयत निलोफर च्या नातलगांसह ५ जणांना अटक केली आहे. या दुहेरी खून प्रकरणी आता अटक आरोपीतांची संख्या ११ झाली आहे.
१० सप्टेम्बर २०१४ रोजी माहूर च्या रामगढ किल्ल्यात २२ वर्षीय निलोफर बेग या पुसद येथील युवती सह तिचा प्रियकर शाहरुख फेरोज खान पठाण वय २३ या युवकाचा असे दोन मृतदेह मिळाले. जिल्ह्यात आणि राज्यात एकच खळबळ उडाली. या दुहेरी हत्याकांडा मुले पोलीसान समोर मोठे आव्हान होते. सुता वरून स्वर्ग गाठण्यात ख्याती असलेल्या पोलिसांनी या प्रकरणी जोरदार प्रयत्न सुरु ठेवले. पोलिस अधीक्षक परमजीतसिंह दहिया, अपर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीधर पवार यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक अण्णा डोईफोडे पोलिस कर्मचारी बळीराम दासरे, सय्यद फहीम, दत्तराम चव्हाण, सुधाकर कदम, पिराजी गायकवाड, शिंदे, दत्ता जाधव या टीम ने परिश्रम घेऊन अगोदर ५ जणांना पकडले त्यांची नावे राजू उर्फ राजा रघुनाथ गाडेकर वय 20, शेख जावेद उर्फ पेंटर शेख हुसेन व 38,रंगराव शामराव बाबटकर वय 25, शेषराव उर्फ पिंटू शामराव बाबटकर वय 19 आणि कृष्णा उर्फ बाबू मारोतराव शिंदे वय 25 अशी आहेत. या प्रकरणातील रघू रोकडा उर्फ डॉन रघू नाना पळसकर यास माहूर पोलिसांनी पकडले.
५ नोहेंबर रोजी रात्री अण्णा डोईफोडे आणि त्यांच्या टीमने पुसद येथील सयद अन्वरअली सयद अथरअली, माहूर येथील खैसर मिर्झा बहादूर मिर्झा, फुल सांगवी ता. महागाव येथील मिर्झा खालेद बेग मिर्झा कमर बेग, विकार अहमद नवाब अहमद, नवाबजानी कमर बेग या पाच लोकांना पकडले. आज या पाच जणांना माहूर न्यायालयात हजर केले जाणार आहे. आता या निलोफर आणि शाहरुख या प्रेमी युगल हत्याकांडात अटक आरोपींची संख्या ११ झाली आहे.
प्राप्त माहिती नुसार मोठे खलबत रचून, अत्यंत सुनियोजीत कट रचून हे हत्याकांड घडवण्यात आले होते. आपल्या खानदानीच्या तोडीचे खानदान (कुटुंब) शाहरुखचे नाही या साठी आपल्या मुलगी निलोफर सह शाहरुख चा काटा काढण्यात आला. निलोफर आणि शाहरुख दोघे तंत्निकेतन पुसद येथे पदविका अभ्यासक्रमाला सोबत होते. अगोदर एकदा निलोफरने शाहरुख ची तक्रार सुद्धा केली होती. तेव्हा शाहरुख च्या काकाने हे प्रकरण मिटवले होते. तंत्निकेतन पदविका अभ्यासक्रमत निलोफर उत्तीर्ण झाली आणि शाहरुख नापास झाला. निलोफर पुसदच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकत होती. शाहरुख च्या काकाने निलोफरच्या घरा समोर पुसद मध्ये घर घेतले होते. शाहरुख तेथेच राहत होता.
निलोफरने एकदा तक्रार केल्या नंतर सुद्धा शाहरुखने तिच्या सोबत सुत जमवलेच आणि दोघांचे प्रेम प्रकरण हळू हळू आकार घेत होते. निलोफर च्या कुटुंबियांना हि प्रेम कहाणी पसंद नव्हती. या दोघांचा काटा काढण्यासाठी एक शाश्वत खलबत रचले गेले. त्यात निलोफर च्या कुटुंबाने कोठेच भ्रमणध्वनी चा वापर केला नाही. प्रत्यक्ष भेटी गाठी घेऊन हा कट रचण्यात आला. दरम्यान शाहरुखला यवतमाळ येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात पहिल्या वर्षात प्रवेश मिळाला.
९ सप्टेम्बर २०१४ शाहरुख यवतमाळ येथुन आपल्या चारचाकी गाडीत आला आणि नेहमी प्रमाणे सोयीस्कर माहूर गडावर प्रेमाच्या आण भाका घेण्यासाठी गेला. अगोदरच नियोजन असल्याने निलोफरचे काही नातलग नांदेडला आले. आणि ९ सप्टेम्बरला सायंकाळी पुसद पोलिस ठाण्यात निलोफारची मिसिंग (हरवल्याची) तक्रार दाखल झाली. दुसऱ्या दिवशी निलोफर आणि शाहरुखचे मुडदे सापडले. असा सुनियोजित कट रचून प्रेमी युगला चे खून.
स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी हे दुहेरी खून प्रकरण उगडकीस आणले. या खुना साठी अगोदर अटक केलेल्या ५ जणांना माहूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्र. ती. खराटे यांनी ७ नोहेंबर पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. काळ पकडलेल्या ५ जणांना आज माहूर न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती सांगण्यात आली. पकडण्यात आलेला विकार अहमद हा या दुहेरी खून प्रकरणाचा फिर्यादी आणि निलोफर चा चुलत भाऊ आहे. मिर्झा खालेद बेग हे निलोफरचे वडील आहेत. नवाब अली हे तिचे काका आहेत. सय्यद अन्वरअली हा सरकारी कंत्राटदार आहे. यानेच माहूर पोलिस ठाण्याची इमारत बांधली असल्याचे सांगण्यात आले. तर खैसर मिर्झा हा अन्वरअली चा सहकारी कंत्राटदार आहे अशी माहिती जाणकार सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रा सारख्या प्रगत राज्यात सुद्धा ऑनर किलीग घडते हे या प्रेमी युगलाच्या दुहेरी हत्याकांडातून दिसले, हेच खरे.











