
काबूल – तालिबानी दहशतवादाने पोळलेल्या अफगाणिस्तानला रविवारी आणखी एक जबरदस्त हादरा बसला. व्हॉलीबॉल सामना सुरू असताना दहशतवाद्यांनी एका स्टेडियममध्ये घुसून केलेल्या आत्मघाती बॉम्बहल्ल्यात तब्बल ४५ लोक ठार झाले आहेत. तर ५०हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील पकतिका प्रांतातील एका स्टेडियममध्ये हा हल्ला झाला. व्हॉलीबॉल स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी शेकडो व्हॉलीबॉल रसिकांनी स्टेडियममध्ये गर्दी केली होती. या गर्दीचा फायदा घेऊन एक आत्मघाती बॉम्बर प्रेक्षकांमध्ये घुसला आणि त्याने स्वत:जवळच्या स्फोटकांचा स्फोट घडवून आणला. मृतांमध्ये सर्वसामान्य नागरिकांचा समावेश आहे, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Archive for November 23rd, 2014
0
अफगाणिस्तानात आत्मघाती हल्ला
0
‘ताज’वर शिया मुसलमानांचा दावा

आग्रा – बादशहा शहाजहानने जिच्यासाठी ताज महाल बांधला ती मुमताज शिया मुसलमान होती, असे सांगत उत्तर प्रदेशातील शिया पंथाच्या मुसलमानांनी ताज महालावर आपला हक्क सांगितला आहे. त्यामुळं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशचे औकाफ मंत्री आझम खान यांच्या वक्तव्यानंतर हा वाद सुरू झाला आहे. ‘केंद्र सरकारने ताज महालाचा ताबा सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाला द्यावा, अशी मागणी खान यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिया वक्फ बोर्डही सरसावले असून मुमताज महल ही शिया मुसलमान होती. त्यामुळे ताज ही शिया इमारत असल्याचा दावा शिया बोर्डाने केला आहे. शियांच्या मागणीच्या समर्थनार्थ लखनऊ येथील इमाम-ए-रझा कमिटीचे अध्यक्ष फय्यर हैदर यांनी काही मुद्दे मांडले आहेत.
हैदर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, यूपीचे मुख्यमंत्री अखिलेशसिंह यादव यांना पत्र लिहिले आहे. शिया धर्मगुरूंनीही कमिटीच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. ‘मुमताजचा पती बादशहा शहाजहाँ सुन्नी होता. त्याची कबर ताजमध्येच आहे, याचीही आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे किमान ताजचा अर्धा हिस्सा तरी शियांना मिळावा, असा मध्यममार्गही शिया धर्मगुरूंनी सुचविला आहे. ताजची जबाबदारी सध्या केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याकडे आहे.
0
स्वतंत्र विदर्भावर ठाम!: गडकरी


नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेगळ्या विदर्भाला कधीही विरोध केलेला नाही. विदर्भाविषयी भाजपची भूमिका ठाम असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साथीनं विदर्भ वेगळा करण्याचा प्रयत्न करू,’ असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे.
‘विकासाचं राजकारण’ या विषयावरील चर्चासत्रात गडकरी बोलत होते. ‘स्वतंत्र विदर्भाविषयी भाजपने आपली भूमिका कधीही बदललेली नाही. आमची भूमिका कालही तीच होती आणि आजही तीच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही तीच भूमिका आहे. निवडणूक प्रचारादरम्यान मोदी यांनी महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, हे विधान मुंबईच्या संदर्भात केलं होतं. विदर्भाशी त्या वक्तव्याचा काहीही संबंध नव्हतं. मोदींशी याबाबत माझं बोलणंही झालं आहे,’ असंही गडकरी यावेळी म्हणाले. स्वतंत्र विदर्भाप्रतीची बांधिलकी व्यक्त करतानाच महाराष्ट्रात शिवसेना व भाजपमधली मैत्री कायम राहावी अशी इच्छाही गडकरी यांनी बोलून दाखवली. तसंच एलबीटी महिन्याभरात बंद करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
0
काँग्रेसचा नागपूर विधानभवनावर 8 डिसेंबरला मोर्चा – प्रदेशाध्यक्ष आ.माणिकराव ठाकरे


नागपूर – अवकाळी पाऊस, कोरडा दुष्काळ, अतिवृष्टी व इतर आस्मानी संकटांमुळे राज्याच्या सर्वच भागातील शेतकरी भरडून निघाला आहे. पिकांचे मोठे नुकसान त्याला सोसावे लागले आहे. प्रचंड अडचणीत सापडलेल्या राज्यातील शेतक-यांना दिलासा देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. शेतक-यांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 8 डिसेंबरला काँग्रेस पक्षाच्या वतीने मोर्चा काढणार असल्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.माणिकराव ठाकरे यांनी केली आहे.
रविवारी, दि. 23 नोव्हेंबर 2014 रोजी नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नितीन राऊत, आ. विजय वडेट्टीवार, आ. राजेंद्र मुळक, आ. अब्दुल सत्तार, आ. विरेंद्र जगताप, आ. राहुल बोंद्रे, आ. अमर काळे यांच्यासह प्रदेश काँग्रेस व नागपूर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
आ. माणिकराव ठाकरे पुढे म्हणाले की, भाजप सरकारचे केवळ शेतक-यांकडेच नव्हे तर अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा येथे घडलेल्या दलित समाजातील तिहेरी हत्याकांडाकडेही दुर्लक्ष असल्याचे दिसते आहे. जवखेडा येथील हत्याकांडाचे मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत. या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रत्येक जिल्ह्यात निदर्शने होत आहेत. परंतु, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अद्याप जवखेडा येथील पीडित दलित कुटुंबाला भेटण्यासाठी वेळ मिळालेला नाही.
भारतीय जनता पक्षाच्या राज्य सरकारने विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी घटनेतील तरतुदींचा भंग केल्याचा आरोपही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला. राज्यपालांनी भारतीय जनता पक्षाला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. परंतु, भाजपने ज्या पद्धतीने विश्वासदर्शक ठराव मांडला, त्यातून त्यांचे बहुमत असल्याचे अजिबात स्पष्ट होत नाही. नवनियुक्त सरकारचा विश्वासदर्शक ठराव मतविभाजन न करता ध्वनीमताने मंजूर करणे असंयुक्तिक असल्याचे ते म्हणाले. या घटनेकडे राज्यपालांचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पक्षाचे आमदार विधीमंडळाच्या प्रवेशद्वारावर आले असता त्यांनी मारहाण केल्याचा खोटा आरोप करून विधानसभेतील 5 आमदारांना निलंबित करण्यात आले. परंतु, हे आमदार निर्दोष असून, काँग्रेसच्या कोणत्याही आमदाराने हा प्रकार केलेला नाही. चौकशीत काँग्रेस आमदारांचे निर्दोषत्व सिद्ध होईल, असा विश्वासही आ. माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला.
0
जिल्हा परिषदची परीक्षा रद्द, विस्तार अधिकारी निलंबित

यवतमाळ (सूरज एम.पी.)- यवतमाळ जिल्हा परिषदेच्या परिचर पदाची भरती घेण्यात आली. परिक्षा सुरू होण्यापूर्वीच पेपर फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी आरोग्य विभागाच्या विस्तार अधिकारी विक्रम रापत याना अटक केली. दरम्यान आज जिल्हा परिषद प्रशासनाने सदर विस्तार अधिकाºयाला निलंबीत केले आहे.
जिल्हा परिषदच्या वतीने शनिवारी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सत्रात परिचर पदाच्या लेखी परीक्षेचा पेपर आयोजित करण्यात आला होता. काटेबाई जि.प.शाळेच्या परीक्षा केंद्रावर कर्तव्यावर असलेल्या विस्तार अधिकारी विक्रम राऊत याने पेपर सुरू होण्यापूर्वीच दुपारी २ वाजता पेपर एका युवकाच्या मार्फत कोचिंग क्लास संचालकाकडे सोडविण्यासाठी पाठविला. जगदिश पांडे हे विक्रीकर अधिकारी असून , पूर्वी कोचिंग क्लास चालवित होते. त्यामुळे राऊत याची त्यांच्यासोबत ओळख असल्याचे बोलल्या जात आहे. १ नोव्हेंबर रोजी यवतमाळ जि.प.च्या लेखी परीक्षेची उत्तरतालिका औरंगाबादमध्ये जप्त करण्यात आली होती. विक्रीकर अधिकारी, कोचिंगक्लास संचालकासह अकरा जणांना अटक करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली होती. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच परीक्षेचा पेपर बाहेर आल्याने पांडेही चकीत झाले. त्यांनी घटनेचे गांभिर्य ओळखून लगेच पेपर घेवूनच वडगाव रोड पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून काटेबाई परीक्षा केंद्र गाठले व विस्तार अधिकाºयास चौकशीसाठी ताब्यात घेतले. या घटनेची माहिती उमेदवारांना मिळताच सर्वत्र खळबळ उडाली. रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी विस्तार अधिकाºयाची चौकशी केली. काटेबाई परीक्षा केंद्रावर विस्तार अधिकाºयाचा भाऊ परीक्षा देत होता. तो उत्तीर्ण झाला पाहिजे, या उद्देशाने हा पेपर बाहेर पाठविल्याची कबुली विक्रम राऊत याने पोलिसात दिली. त्यावरून पोलिसांनी पेपर फोडल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला. जिल्हा परिषद प्रशासनाने सदर परिक्षा रद्द केली असून विस्तार अधिकाºयावर निलंबनाची कार्यवाही केली आहे. या पेपटफुटीमध्ये आणखी कीती मासे गळाला लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
शिवसेना सत्तेसाठी लाचार!- राणे

कणकवली -राजकारण हे उद्धव ठाकरे यांच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे. शिवसेना सत्तेत सहभागी न झाल्यास त्यांचे आमदार फुटतील, अशी भीती त्यांच्या मनात आहे. म्हणूनच, बाळासाहेबांनी शिकवलेला स्वाभिमान सोडून शिवसेनेनं सत्तेसाठी लाचारी पत्करली आहे, अशी बोचरी टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी आज केली आहे.
शिवसेनेला मंत्रिपदं हवी आहेत खरी, पण त्यांच्यापैकी कुणातही मंत्रिपदासाठी लागणारी गुणवत्ता नाही, अशी चपराकही राणेंनी लगावली आहे. शिवसेनेनं कोकणी जनतेची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कालपासून दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. आज ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. हा दौरा सुरू असतानाच, भाजप-शिवसेनेत पॅच-अप झाल्याचीही चर्चा आहे. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना महत्त्वाची खाती मिळणार असल्याचं बोललं जातंय. या पार्श्वभूमीवरच, नारायण राणेंनी उद्धव यांच्यावर धारदार ‘प्रहार’ केला.
उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा म्हणजे पर्यटनच असल्याची खिल्ली उडवून राणे म्हणाले की, कोकणात येणाऱ्या उद्योगांना शिवसेनेचा विरोध आहे. कोकणी माणसानं सेनेला ताकद दिली, पण सेनेनं कोकणी माणसाची फसवणूकच केली आहे. स्वाभिमानाच्या गप्पा मारणारी शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे. ती कुणाचं काय भलं करणार? राज्यात विरोधात बसणारी शिवसेना केंद्रात भाजपसोबत सत्तेत आहे. कारण, राजकारण हे उद्धव ठाकरेंच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे, अशी जळजळीत टिप्पणी त्यांनी केली. शिवसेनेचे आमदार फुटतील, या भीतीनेच ते सत्तेसाठी लाचार झाल्याचंही राणेंनी सुनावलं.त्यामुळे आता संध्याकाळी उद्धव ठाकरे कसा पलटवार करतात आणि ‘सामना’ जिंकतात का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.
0
चीनला भूकंपाचा जोरदार धक्का, चार ठार
बिजींग – चीनच्या सिचुआन प्रांताला रविवारी ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा जोरदार धक्का बसला यामध्ये चार जण ठार झाले तर ७९ हजार ५०० जणांना याचा फटका बसला आहे.
यामध्ये ५४ नागरिक जखमी झाले आहेत. तर सहा इतर जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान भूकंपामुळे फटका बसलेल्या प्रदेशांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुमारे ७९ हजार ५००हून अधिकांना याचा फटका बसला आहे. तर २५ हजाराहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत.
सहा हजार २०० नागरिकांचे आतापर्यंत स्थलांतर करण्यास आल्याचे अधिका-यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरु आहे. बचावपथकासोबतच सहा लष्करी विमाने, २० वैदयकीय अधिकारी आणि एक हजाराहून अधिक सैन्याला पाचारण करण्यात आले आहे.याआधी १२ मे २००८ रोजी चीनमधील वेंचुआन भागात ८.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. यामध्ये सुमारे ८० हजाराहून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडले होते. तर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लुसानमध्ये झालेल्या ७.० रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपात १९६ नागरिकांचा बळी गेला होता.
0
काळी (दौ.) पंचायत समिती गण पोटनिवडणूकीचा निकाल सोमवारी

यवतमाळ – महागाव तालुक्यातील काळी दौ. पंचायत समिती गणाच्या पंचायत समितीच्या सदस्यपदाची निवडणूक आज रविवारी पार पडली. उद्या सोमवारी २४ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
काळी दौ पंचायत समिती गण हा भाजप पक्षाचा बालेकिल्ला राहीला आहे. सुनिल टेमकर हे प्रचंड मताने निवडुन आले होते. त्यानंतर हा गण अनुसुचीत जातीच्या प्रर्वगासाठी सुटल्याने व पंचायत समिती सभापती पद महीलेसाठी राखीव झाल्यामुळे भाजपाच्या मालता झिंगरे ह्या विजयी झाल्या. त्याना आडीच वर्षाचा सभापतीचा कार्यकाळ पुर्ण करता आला नाही. वयाच्या कारनावरून पुसद जिल्हा सत्र न्यालयाने झिंगरे यांचे पद रद्द केले. त्यामुळे आज रविवारी पोटनिवडणूकीसाठी मतदान घेण्यात आले. सात गावातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादीचे नथ्थु आढाव, भाजपचे संतोष झिंगरे या दोघात चुरशीची लडत झाली. सोमवारी सकाळी आठ वाजता पासुन तहसील कार्यलयात मतमोजणीला सुरूवात होणार असुन दोन तासात निकाल हाती येणार आहे.
0
बंदुकीच्या धाकावर माळेगाव येथे वनजमिनीवरील अतिक्रमण हटविले

यवतमाळ – महागांव तालुक्यात मोठयाप्रमाणावर शेतकºयांनी वन जमिनीवर अतिक्रमण करून बंजर जमिनीवर पिके काढुन शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून शेती वहीती करत आहेत. आज शनिवारी वनविभागाने वन जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. वनविभाग व पोलिसांच्या सयुक्त कार्यवाहीत माळेगाव येथील वन जमिनीवर असलेले शेतकºयांचे अतिक्रमण बंदुकीच्या फैरी झाडून मोकळे करण्यात आले.
तालुक्यातील माळेगाव येथे सन १९७९ पासून वन जमिनीवर अमर मोतीराम राठोड व गोकुळ दरूसिंग राठोड या शेतकºयांनी जमिनीवर वहीती सुरू केली. दोन्ही शेतकºयांनी पाच-पाच एक्कर जमीन सुपीक केली होती. या जमिनीवर शेतकºयांनी वनविभागाने आकारलेला दंड भरला होता. आता आपण जमिनीचे खरे मालक झाले आहे. या अनंदात शेतकरी वावरत असतांना जवळ पास २०० च्यावर वन अधिकारी व कर्मचारी पोलीस यांनी शेतात जावून जमिन वहीती करता येत नाही, असे सांगून ताबडतोब शेतातून निघून जा अन्यथा आम्हाला जबरदस्ती ने काढावे लागेल, असे सांगत बंदुकीच्या फैरी आकाशात झाडून दहशत निर्माण केली. त्यामुळे भयभित होऊन शेतकºयांनी शेतातून परत जाने पसंद केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळलानतंर वनविभागाच्या कर्मचाºयांनी उभ्यापिकात शेकडो जनावरे सोडून पीक उध्दस्त केले. त्यामुळे शेतºयात चितेंचे सावठ असून, जगावे की मरावे असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा टाकला आहे. लोकप्रतिनिधी नी शेतकºयांचे हित पाहता काही तरी करावे. असी आपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली आहे. ही मोहीम यशस्वीकरण्यासाठी महागाव, उमरखेड, पुसद, काळी दौ, येथील वन अधिकारी कर्मचारी व पोलिसांना पाचारन करण्यात आले होते.










