
यवतमाळ – जिल्ह्यातील शिरपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाºया कृष्णापूर येथे पतीचा खून करणाºया पत्नीसह तीच्या प्रियकराला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. पांढरकवडा येथील सत्र न्यायालयाचे तदर्थ अतिरीक्त सत्र न्यायालयाधिश एस.पी. डोरले यांनी आज शनिवारी हा निकाल दिला. शिला रविंद्र निब्रड, राजू मारोती वासेकर रा. कृष्णापूर ता. वणी अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहे.
२२ फेबु्रवारी २०१३ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास पती रविंद्र उर्फ लघु निब्रड हा झोपून होता. यावेळी आरोपी पत्नी शिलाने त्याच्या तोंडावर उशी दाबुण धरली. तर तीचा प्रियकर राजूने त्याचे जवळील सुरीने छाती व पोटावर वार करून खून केला होता. त्यानंतर मृतदेह अंगणातील फाटकाजवळ नेऊन टाकला व रक्ताने माखलेली सुरी त्याच्या हातात ठेवून कोणीतरी मारून फेकल्याचा देखावा निर्माण केला. मात्र शिलाने शिरपूर पोलीस ठाणे गाठून माझ्या पत्नीचा खून केल्याचा जबानी रिपाट दिला. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३०२, २०१,२०३ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. दरम्यान पत्नी व तीच्या प्रियकराने रविंद्रचा खून केल्याची माहीती समोर आली. त्यावरून दोघांनाही अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी येथील सत्र न्यायालयाचे तदर्थ अतिरीक्त सत्र न्यायालयाधिश एस.पी. डोरले याच्या न्यायालयात पार पडली. यावेळी सरकारी पक्षातर्फे नऊ जणांच्या साक्ष तपासण्यात आल्या. त्यामध्ये मृतकचा मुलगा विशाल याची साक्ष महत्वाची ठरली. दोष सिद्घ झाल्याने भादंवि कलम ३०२ अंतर्गत आरोपी शिला व राजू या दोघानाही आजन्म कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास सहा महीने सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे. तर २०१, ३४ अंतर्गत तीन वर्ष सक्तमजुरी एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महीने सक्तमजुरी आणि भादंवि २०३, ३४ अंतर्गत १ वर्ष सक्तमजुरी व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता प्रशांत मानकर यांनी काम पाहीले.
Archive for November 29th, 2014
0
पतीच्या खून प्रकरणी पत्नी व प्रियकराला आजन्म कारावास
0
जिल्हा रुग्णालयाच्या अधिष्ठातांवर खडणीचा गुन्हा

डॉक्टरला खंडणी मागणे भोवले
यवतमाळ – येथील कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या डॉक्टरला खंडणी मागितल्याप्रकरणी अधिष्ठातासह एका व्यक्तीविरूद्घ शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
येथील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालात डॉ. आनंद डोंगरे हे अधिष्ठाता पदावर कार्यरत आहे. तर याच महाविद्यालयात डॉ. प्रशांत चक्करवार (३४) रा. यवतमाळ हे मनोरुग विशेषतज्ञ या पदावर १३ आॅगस्ट रोजी रुजू झाले. ते कर्तव्य बजावित असताना अधिष्ठाता डोंगरे हे त्यांना नाहक त्रास देत होते. चक्करवार यांची पत्नी सुध्दा रुग्णालयातच कार्यरत असून त्यांनाही त्रास दिला. दरम्यान डोंगरे यांनी डॉ. चक्करवार यांची ड्यूटी बाह्यरुग्ण विभागात लावून खोटे आरोप करुन पुन्हा वेठीस धरले. यावेळी डॉ. डोंगरे यांनी चक्करवार यांच्या सह्या घेऊन तुला व तुझ्या पत्नीला नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी दिली. अधिष्ठाता कडून रुजू झाल्यापासूनच त्रास देण्यात येत असल्याने चक्करवार त्रस्त झाले होते. दरम्यान डोंगरे यांच्या सांगण्यावरून गिरमे नामक व्यक्तीने चक्करवार यांना पैशाची मागणी करून प्रकरण दडपण्याची हमी दिली. अधिष्ठाताकडून चक्क खंडणी मागण्यात येत असल्याची तक्रार चक्करवार यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून डोंगरे याचे विरुध्द तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी दोघाविरुध्द खंडणीचा गुन्हा नोंद केला आहे.
0
कमी दाबाच्या ठिकाणी नवीन विज उपकेंद्राचे काम हाती घ्या – केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर

यवतमाळ: विजेच्या कमी दाबामुळे शेतकरी तथा सर्वसामान्य नागरिकांना विविध अडचणींना समोर जावे लागते. ही समस्या सोडविण्यासाठी ज्या ठिकाणी कमी दाबाचा विज पुरवठा होतो. तेथे नवीन विज उपकेंद्र उभारणीचे काम तातडीणे हाती घ्या, अशी सूचना केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केल्या. अहिर यांनी विश्रमभवन येथे जिल्ह्यातील विज वितरणच्या प्रश्नांवर विद्युत विज वितरण व पारेषण अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला आ. मदन येरावार, आ. राजू तोडसाम, आ. संजीव रेड्डी बोदकुरवार, आ. राजेंद्र नजरधने, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, विज वितरणचे अधिक्षक अभियंता बाबासाहेब जाधव, कार्यकारी अभियंता तगडपल्लीवार, नगराळे, कांबळे, पुरकर, हितेश शेट, राजू डांगे आदी उपस्थित होते. यावेळी अहिर यांनी नवीन बांधकामाधीन उपकेंद्राचा आढावा घेतला. कृषी पंपांची प्रलंबित जोडणे तातडीणे करण्याबाबत त्यांनी सूचविले. अवैद्य विज पुरवठ्याचे कनेक्शन नियमित करुण ग्राहकांना विज पुरवठा करण्यात यावा. अनेक ग्राहकांना अवास्तव बिल दिले जाते, अशा ग्राहकांच्या तक्रारींचे ताबडतोब निवारण केले जावे, पारेषण व वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपसात समन्वय ठेवून काम करावे, काही केंद्र उपकेंद्र पूर्ण झाले असल्यास ते तात्काळ सुरु करण्याच्या सूचनाही अहिर यांनी केल्या.विज पुरवठ्याच्या संदर्भात कंपणीकडून वारंवार निवीदा कढल्या जाते. मोठ्या रकमेच्या निविदा काढण्याऐवजी कमी किमतीच्या निविदा अधिक्षक अभियंता स्तरावर काढण्याकरीता संबंधितांना अधिकार बहाल करण्याबाबत त्यांनी सूचना केली. कंत्राटदार वेळेत कामे पूर्ण करत नसतील तर त्यांच्यावर कार्यवाही करा, असे त्यांनी सूचविले. जिल्ह्यातील विज वितरण व्यवस्था, देखभाल व दुरुस्ती, प्रलंबित कृषी पंपांची जोडणी आदीबाबत त्यांनी चर्चा केली. बैठकीला विद्युत निरिक्षक राजू महालक्ष्मे, सहाय्यक विद्युत निरिक्षक प्रदिप तंबाखे, शाखा अभियंता पानतावणे तसेच प्र.मा. मुळे, एस.पी.राठोड, मनोज बोद्रे आदी उपस्थित होते.
0
भारतात प्रत्येक चौथा माणूस पाळतो अस्पृश्यता

नवी दिल्ली, – संविधानातील तरतुदीमुळे समाजातील जातीपातीतील अस्पृश्यता ६४ वर्षांपूर्वी संपुष्टात आली असली तरीही ती खरच संपली आहे का हा एक प्रश्नच आहे. भारतात आजही प्रत्येक चौथा माणूस अस्पृश्यता पाळतो, असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. या सर्वेक्षणानुसार जवळपास प्रत्येक धर्मातील आणि जातीतील लोकांनी आपण अस्पृश्यता पाळत असल्याचे मान्य केले असून त्यामध्ये मुसलमान, अनुसूचित जाती व जमातीतील नागरिकांचाही समावेश आहे.
ब्राह्मणांमध्ये अस्पृश्यता पाळण्याचे सर्वाधिक प्रमाण असून त्यापाठोपाठ ओबीसींचा क्रमांक लागतो. तर धर्मानुसार हिंदू, शिख आणि जैन धर्मपंथीय नागरिक सर्वाधिक अस्पृश्यता पाळतात. इंडियन नॅशनल काऊन्सिल ऑफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्च (एनसीएईआर) ही संस्था व युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड, अमेरिका यांनी सुमारे ४२ हजार घरात जाऊन केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. १९५६ साली स्थापन झालेली एनसीएईआर ही देशातील सर्वात जुनी व मोठी नॉन-प्रॉफिट इकॉनॉमिक पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्युट आहे. २०१५ साली या सर्वेक्षणातील संपूर्ण माहिती समोर येऊ शकेल.
या सर्वेक्षणादरम्यान लोकांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्यातील पहिला प्रश्न होता, तुमच्या कुटुंबात कोणी अस्पृश्यता पाळतं का? याचे उत्तर ‘नाही’ असे मिळाल्यास त्यांना दुसरा प्रश्न विचारण्यात आला, आणि तो होतास अनुसूचित जातीतील एखाद्या इसमाने तुमच्या स्वयंपाकघरात शिरलेले किंव्या तुमची भांडी वापरलेले तुम्हाला चालेल का? संपूर्ण भारतभरात केल्या गेलेल्या या सर्वेक्षणादरम्यान २७ टक्के लोकांनी आपण अस्पृश्यता पाळत असल्याचे मान्य केले. आणि हा प्रकार ब्राह्मणांमध्ये सर्वाधिक (५२ टक्के) दिसला तर ब्राह्मणेतर लोकांपैकी २४ टक्के लोकांनीही आपण या ना त्या प्रकारे अस्पृश्यता पाळत असल्याचे मान्य केले.
विशेष बाब म्हणजे, ओबीसी नागरिकांनीही याला होकारार्थी उत्तर (३३ टक्के) देत आपल्या घरात अस्पृश्यता पाळण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे सांगितले. तर अनुसूचित जाती व जमातीतील अनुक्रमे १५ व २२ टक्के नागरिकांनीही अस्पृश्यता पाळत असल्याचे मान्य केले.
तर विविध धर्मातील नागरिकांनी दिलेल्या उत्तरानुसार प्रत्येक तिसरा हिंदू नागरिक (३० टक्के) अस्पृश्यता पाळत असून, शिख (२३ टक्के), मुस्लिम (१८ टक्के) आणि ख्रिश्चन नागरिकही (५ टक्के) अस्पृश्यता पाळतात. या यादीत जैनांचा सर्वात वरचा (३५ टक्के) क्रमांक लागतो.
समाजात राहताना ‘जातीचे जोखड फेकून देणे’ हे अवघड असते, असेच या सर्वेक्षणातून समोर आल्याचे मत एनसीएईआरमधील सर्वेक्षण प्रमुख डॉ. अमित थोरात यांन व्यक्त केले.
अस्पृश्यता पाळण्यात मध्यप्रदेश राज्याचा सर्वात वरचा क्रमांक (५३ टक्के) लागतो, त्यापाठोपाठ हिमाचल प्रदेश (५० टक्के), छत्तीसगड (४८ टक्के), राजस्थान व बिहार (४७ टक्के), उत्तर प्रदेश(४३ टक्के) आणि उत्तराखंड(४० टक्के) यांचा क्रमांक लागतो. याबाबतीत पश्चिम बंगाल हे भारतातील सर्वात प्रगत राज्य असून या राज्यातील अवघ्या १ टक्के नागरिकांनी आपण अस्पृश्यता पाळत असल्याचे सांगितले, तर २ टक्के लोकांसह केरळचा याबाबतीत दुसरा क्रमांक, ४ टक्के लोकांसह महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे. उत्तरपूर्व राज्यातील ७ टक्के आणि आंध्र प्रदेशमध्ये फक्त १० टक्के नागरिक अस्पृश्यता पाळतात.
0
उल्हासनगरमध्ये १०० जणांना विषारी वायूची बाधा

ठाणे – अंबरनाथ एमआयडीसीमधील एका रासायनिक कंपनीच्या टॅंकरने शनिवारी रात्री उशिरा उल्हास नदीमध्ये विषारी रसायन सोडले. हे रसायन पाण्यात मिसळल्याने विषारी वायू तयार झाला.
या विषारी वायूची बाधा होऊन उल्हासनगरमध्ये शंभरपेक्षा अधिक नागरीक आजारी पडले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास नागरीकांना अचानक श्वासो श्वासाचा त्रास सुरु झाला. पोटात मळमळणे, उलटया, डोळयांची आग असे त्रास सुरु झाल्याने परिसरात एकच घबराट पसरली होती.
लगेचच या सर्व नागरीकांना उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
विषारी रसायन नदीमध्ये सोडण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही बदलापूर, अंबरनाथ एमआयडीसीमधून अशा प्रकारे कायदा आणि पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून विषारी रसायने नदीमध्ये सोडली गेली आहेत. मात्र पोलिस आणि अन्य यंत्रणांकडून अशा घटनांकडे डोळेझाक केली जाते.
0
नायजेरीयात दहशतवादी हल्ल्यात १२० ठार

कानो – नायजेरीयातील कानो शहरातील एका मशिदीवर शुक्रवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १२० नागरीक ठार झाले असून, २७० जण जखमी झाले आहेत.
शुक्रवारच्या नमाज पठणासाठी नागरीक मोठया संख्येने मशिदीत एकत्र जमले असताना, दोन आत्मघातकी दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोटामध्ये स्वत:ला उडवून घेतले त्याचवेळी तिथे आलेल्या अन्य दहशतवाद्यांनी नागरीकांवर अंदाधुंद गोळीबार केला.
नायजेरीयातील वरिष्ठ धार्मिक नेते मोहोम्मद सानूसी दुसरे यांच्या राजवाडयाला लागून ही मशिद होती. मागच्या आठवडयात सानूसी यांनी नायजेरीयातील जनतेला बोको हरम या दहशतवादी संघटने विरोधात हातात शस्त्र उचलण्याचे आव्हान केले होते.
शुक्रवारी सकाळीच मैदगुरी शहरातील एका मशिदीमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवाद्याचा प्रयत्न उधळून लावला होता. आठवडयाच्या सुरुवातील नायजेरीयात दोन आत्मघातकी महिला दहशतवाद्यांनी स्वत:ला स्फोटामध्ये उडवून घेतले होते. यात ४५ नागरीकांचा मृत्यू झाला होता. कानोमध्ये बहुसंख्य मुस्लिम लोकवस्ती असून, नायजेरीयातील हे मोठे शहर आहे.
0
‘इंग्रजी बंदी’ला राज यांचा विरोध

नाशिक – महाराष्ट्रातील इंग्रजी शाळा पूर्ण बंद करण्याच्या ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या भूमिकेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध दर्शवला आहे. ‘मराठी शाळा टिकवण्यासाठी इंग्रजी शाळा बंद करणं हा पर्याय होऊ शकत नाही. त्यापेक्षा मराठी शाळांतच उत्तम इंग्रजी शिकवण्याची सोय असावी,’ असं मत राज यांनी व्यक्त केलंय.
पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात शुक्रवारी नेमाडे यांनी महाराष्ट्रात मराठी भाषेतूनच मुलांचं शिक्षण व्हायला हवं. येथील इंग्रजी शाळा पूर्ण बंद करायला हव्यात, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना नाशिक येथील पत्रकार परिषदेत राज यांनी काहीशी संयमी भूमिका मांडली. ‘उत्कृष्ट मराठी शाळा आणि त्यात उत्कृष्ट इंग्रजी शिक्षण ही महाराष्ट्राची खरी गरज आहे. मराठी शाळांमध्ये इंग्रजीचं चांगलं शिक्षण दिल्यास इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद करण्याची गरजच लागणार नाही. मराठी माणसं स्वत:च मुलांना त्या शाळांमध्ये घालणार नाहीत,’ असं राज म्हणाले. याशिवाय महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षक मिळणंही गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.
0
सहाराचा प्लॉट १,११५ कोटींना

मुंबई – सुब्रतो रॉय यांच्या सहारा समूहाचा मुंबईजवळील नायगावमधला २६५ एकरचा प्लॉट तब्बल १ हजार ११५ कोटींना विकला गेलाय. नालासोपारातील रिअल इस्टेट कंपनी साई रिदम आणि हिरे व्यापारी भरत शाह यांनी मिळून हा प्लॉट खरेदी केला आहे. सहारा समूहाने या व्यवहाराबाबत माहिती देण्यास नकार दिला. मात्र, खरेदीदार असलेल्या साई रिदम कंपनीच्या प्रवक्त्याने हा व्यवहार झाला असल्याचं अधिकृतरित्या सांगितलं.
नालासोपारातील साई रिदम ही कंपनी गेल्या १५ वर्षापासून रिअल इस्टेटमध्ये आहे. तर भरत शाह हे हिरे व्यापारी आणि चित्रपट निर्माते आहेत. ‘साई रिदम कंपनी, भरत शाह आणि सहारा समूहाचे संचालक असे मिळून सहाराच्या मुंबईच्या कार्यालयात ५ नोव्हेंबरला हा व्यवहार झाला’, अशी माहिती साई रिदमचे प्रवक्ते प्रशांत करूलकर यांनी दिली. भरत शाह यांनीही याला दुजोरा दिला पण अधिक माहिती देण्यास इन्कार केला.
गुंतवणूकदारांचे २४ हजार कोटी न परतवल्याप्रकरणी सुब्रतो रॉय हे ४ मार्चपासून तिहार तुरुंगात आहेत. १० हजार कोटी रूपयांच्या जामीनावर सोडण्याची अट सुप्रीम कोर्टाने त्यांना घातली आहे. त्यापैकी ५ हजार कोटी रोख आणि ५ हजार कोटींची बँक गॅरंटी रॉय यांनी द्यावी, असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे रॉय यांच्या जामीनासाठी सहारा समूहाची धावपळ सुरू आहे. सहारा समूहाने आपल्या अतिशय महत्त्वाच्या मालमत्ता, ठेवी आणि बॉण्ड विकून आतापर्यंत ३ हजार ११७ कोटी रूपये सुप्रीम कोर्टात जमा केलेत. आता नायगावच्या जमीन विक्रीतून आलेले १,११५ कोटी रूपये धरून सहाराचे ४ हजार २३२ कोटी रूपये होत आहेत. उर्वरित रक्कम ही गुडगावमधील ९०० कोटींच्या प्लॉटच्या विक्रीचा चेक कागदपत्रासह कोर्टात कंपनी सादर करेल, असं सहाराच्या सुत्रांनी सांगितलं. त्यामुळे रॉय यांना जामीन मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.









