

नवी दिल्ली, दि. २३ – भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, अभिनेते अमिताभ बच्चन, योगगुरू रामदेव बाबा आणि अध्यात्मिक गुरू श्री. श्री. रविशंकर यांचा ‘पद्म’ पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ सन्मान जाहीर केल्यानंतर आता मोदी सरकार भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी ‘पद्मविभूषण’ पुरस्कार देऊन सन्मान करणार आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘पद्म’ पुस्कारांची घोषणा करण्यात येते. यावेळी या यादीत एकूण १४८ जणांची नावे आहेत. लालकृष्ण आडवाणी व पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल या दोन राजकीय नेत्यांचा या यादीत समावेश आहे. तर अभिनेता अमिताभ बच्चन, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, अभिनेता सलमान खानचे वडील व लेखक सलीम खान तसेच गीतकार प्रसून जोशी यांचेही यादीत नाव आहे.
बॅटमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, हॉकी टीम कप्तान सरदारा सिंग, चेस ग्रँडमास्टर शशीकिरण कृष्णन, कुस्तीपटू सुशीलकुमार व त्याचे प्रशिक्षक सत्पाल आणि माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करणा-या अरुणिमा सिन्हा या क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनाही पुरस्काराने गौरवण्यात येईल.अर्थतज्ज्ञ विवेक देब्रॉय, पत्रकार रजत शर्मा, स्वप्न दासगुप्ता, हरीशंकर व्यास आणि अभिनेते प्राण ( मरणोत्तर) यांचाही पुरस्काराच्या यादीत समावेश आहे.
Archive for January 23rd, 2015
0
लालकृष्ण आडवाणी, बाबा रामदेव, अमिताभ बच्चनना मिळणार ‘पद्म’ पुरस्कार
0
गृहकर्ज ८ टक्क्यांपर्यंत कमी

नवी दिल्ली – गृह उद्योगाला प्राधान्य क्षेत्राचा दर्जा देऊन गृहकर्जाचे व्याजदर ७ ते ८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकार आखत आहे. देशभरात स्मार्ट सिटी उभारण्याच्या पंतप्रधानांच्या ध्येयपूर्तीतील हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
देशभरात पायाभूत सुविधांनी सुसज्ज अशा १०० स्मार्ट सिटी उभारण्याचे उद्दीष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. २४ तास पाणी व वीज, दर्जेदार शिक्षण, शुद्ध वातावरण आणि कार्यक्षम शहरी वाहतूकसेवा ही या शहरांची वैशिष्ट्ये असतील. या शहरांच्या उभारणीसाठी बांधकाम क्षेत्राला उभारणी देण्याची आवश्यकता असल्याने तसेच नागरिकांना स्वस्त घरांचा पर्याय मिळवून देण्यासाठीच कर्जाची फेररचना करण्याचा सरकारचा मानस आहे.
केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनीच गुरुवारी सरकारच्या या प्रयत्नांची माहिती दिली. संपूर्ण गृहबांधणी क्षेत्रालाच प्राधान्य क्षेत्राचा दर्जा देण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. त्यासाठी बँकिंग आणि गृह विभागाच्या सचिवांशी पंतप्रधान लवकरच चर्चा करणार आहेत. सध्या दोनआकडी असणारे गृहकर्ज सात ते आठ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असेही नायडू यांनी स्पष्ट केले. ३० जानेवारीपासून नायडू सर्व राज्य सरकारांशी यासंदर्भात चर्चा करणार आहेत. स्मार्ट सिटी उभारणीच्या कामात अनुभव असलेल्या तसेच भारतात गुंतवणुकीसाठी इच्छुक असलेल्या काही देशांशीही चर्चा होणार आहे.
४० लाख कोटींचा खर्च
सरकारी-खासगी सहकार्य तत्त्वावर स्मार्ट सिटी उभारण्याचा सरकारचा मानस आहे. १०० शहरांच्या उभारणीसाठी प्राथमिक स्तरावरच ४० लाख कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. तर या शहरांच्या व्यवस्थापनासाठी आणखी १ कोटी ६० हजार कोटी मोजावे लागतील.
0
ताडोबाच्या जंगलात १०५ वाघ

नागपूर – देशात वाघांच्या संख्येत ५२० ने वाढ झाली असली तरी वाघांची कथित राजधानी म्हणून ओळखल्या जाणा-या विदर्भात वाघ विशेष वाढलेले नाहीत.
महाराष्ट्रात फक्त २१ वाघ वाढले आहेत. वन खात्याने व्याघ्र गणनेच्या जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात १९० वाघ आहेत. त्यातील १७० ते १७५ वाघ विदर्भात असतील. ताडोबा, पेंच आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पांमध्ये हे वाघ आहेत.
यातील सर्वाधिक १०५ वाघ ताडोबाच्या जंगलात आहेत. महाराष्ट्रातील वाघांच्या संख्येत इतर राज्यांच्या संख्येत फार कमी वाढ आणि टक्केवारीत सांगायचे तर फक्त १२ टक्के वाढ आहे. विदर्भातील वन्यप्रेमींनी चिंता करावी, अशी परिस्थिती विदर्भात आहे.
जंगल आणि वाघांच्या रक्षणावर कोटय़वधी रुपये खर्च झाले असताना ही कामगिरी निराशाजनक आहे, असे वन्यप्रेमींचे मत पडले. विदर्भात वाघांच्या शिकारीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या चार वर्षात २२ वाघांची शिकार झाली.
कर्नाटकात वाघ वाढले. विदर्भात वाढू शकले नाहीत याला हे बेकायदा शिकारी कारण असल्याचे सांगितले जाते. कर्नाटकात ४०८ वाघ आहेत. आठ वर्षापूर्वी तिथे २९० वाघ होते. मध्य प्रदेशात ३०८ वाघ झाले आहेत. चार वर्षापूर्वी २५७ वाघ होते.
0
बिहार न्यायालया परिसरात स्फोट, दोन ठार

आरा -बिहारमधील आरा जिल्ह्यातील सत्र न्यायालयाच्या परिसरात शुक्रवारी बॉम्बस्फोट झाला. यामध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल आणि महिला ठार झाली आहे तर १६ हून अधिक जण जखमी झाले आहेत.
आरोपींना न्यायालयात हजर केले जात असताना बॉम्बस्फोटाची घटना घडल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले.
न्यायालयात झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला होता का? याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झाले नसून याचा तपास सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक अमरेंद्र कुमार आंबेडकर यांनी सांगितले.
बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे.









