
यवतमाळ, दि. २० – सुप्रिम कोर्टाने मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीसाठी पेपर ट्रेल अनिवार्य केले होते. मात्र २०१४ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत इव्हीएम मशीनमध्ये पेपर ट्रेल लावण्यात आले नाही. त्यामुळे इव्हीएमच्या माध्यमातून घोटाळा करण्यात आला. असा आरोप करीत बहुजन मुक्मी पार्टीच्यावतीने आज शहरातून इव्हीएमची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर स्थानिक बसस्थानक चौकात त्याचे दहन करण्यात आले.
सुप्रिम कोर्टाने निवडणूक आयोगाला इव्हीएम मशीनमध्ये पेपरट्रेल अनिवार्य केले होते. त्यानुसार राज्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्याचा वापर होणे गरजेचे होते. व याबाबत भारत मुक्ती मोर्चाने इव्हीएमबद्दल राज्यभर जनजागरण केले होते. मात्र निवडणूक आयोगाने पेपरट्रेलचा वापर न करता निवडणूक प्रक्रीया पार पडली. त्या निषेधार्थ आज महात्मा फुले चौक, पाच कंदील चौक, हनुमान आखाडा चौक, तहसील चौक, आंबेडकर चौक, शारदा चौक, मार्इंदे चौक, वीर वामनराव चौक, दत्त चौक या मार्गाने भ्रमण करून बसस्थानक चौकात इव्हीएमचे दहन करण्यात आले. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Archive for January 20th, 2015
0
बहुजन मुक्ती पार्टी : ‘इव्हीएम’ची अंत्ययात्रा
0
दारव्हा तालुक्यात बिबट्याचा मृत्यू

यवतमाळ,दि. २० (पवन लताड) – यवतमाळ वनवृत्तात बिबट मृत्यूची मालिकाच सुरू आहे. गत आठवड्यात दारव्हा वनपरीक्षेत्रात बिबटाचा मृत्यू झाल्याची घटना ताजीच असताना, हातणी-माळेगाव शिवारात आज मंगळवारी पाच वर्षीय बिबट मृतावस्थेत आढळल्याने वनविभागाविरोधात वन्यप्रेमीतून संताप व्यक्त होत आहे.
वनसंपदेने नटलेल्या यवतमाळ वनवृत्तातील आठही वनपरीक्षेत्रात बिबटांचा वास्तव असल्याचे वनविभागाच्या प्राणी गणनेतून स्पष्ट झाले आहे. मात्र वन्य प्राण्यांचे जतन करण्याच्या दृष्टीने वनअधिकारी ठोस पाऊले उचलत नसल्याचे अनेकदा उघड झाले आहे. त्यामुळेच गेल्या काही महिन्यात यवतमाळसह अन्य वनपरीक्षेत्रात बिबटांचा मृत्यू झाला आहे. मात्र यातून अधिकाºयांनी बोध घेतला नसून उपाययोजना केल्या नसल्याने गत आठवड्यात दारव्हा वनपरीक्षेत्रातील ब्रम्हणाथ शिवारात बिबटाचा मृत्यू झाला. ही घटना ताजीच असताना, याच वनपरीक्षेत्रातील माळेगाव शिवारात आज मंगळवारी सकाळी एका गुराख्याला पाच वर्षीय बिबट मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय वनअधिकारी गवई, वनपरीक्षेत्र अधिकारी नाल्हे, क्षेत्रसाहाय्यक धोतरे घटनास्थळी दाखल झाले. पाच दिवसापूर्वीच या बिबटचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. जंगलात बिबटचा वास्तव असल्याची साधी माहिती देखील वनपरीक्षेत्र अधिकाºयाकडे नसल्यामुळे आठवड्यात दोन बिबटचा मृत्यू झाल्याचा आरोप वन्यप्रमींनी केला आहे. यापूर्वी आढळलेल्या मृत बिबटाचे दोन दात व एक पंजा गायब असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी पाहिले होते. आज आढळलेल्या बिबटाचे अवयव मात्र शाबूत दिसून आले. बिबटचा मृत्यू नेमका कशामूळे झाला याचा उलगडा शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र शवविच्छेदन अहवालच वनविभागाकडून दडपण्यात येतो. कारण यापूर्वी वनवृत्तात मृतावस्थेत आढळलेल्या एकाही बिबटच्या मृत्यूचे कारण अधिकारी सांगू शकलेले नाही.
0
आर्णीत शेतकºयांचा रास्ता रोको , कापूस खरेदी बंद ठेवल्याने उद्रेक

यवतमाळ , दि. २० – कापूस पणन महासंघाने कापूस खरेदी बंद ठेवल्याने शेतकºयांच्या संतापाचा उद्रेक झाला. कापूस खरेदी सुरू करा या मागणीसाठी संतप्त शेतकºयांनी आर्णी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डसमोर आर्णी-यवतमाळ मार्गावर रास्ता रोको केला. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक खोळंबली होती.
कापूस पणन महासंघाने १ जानेवारीपासून संपूर्ण कापूस खरेदी बंद केली होती.दरम्यान सोमवार १९ जानेवारीपासून आर्णी येथील महालक्ष्मी जिनींगमध्ये कापूस खरेदी सुरु केली. पहिल्याच दिवशी ४०० शेतकºयांनी भाड्याने वाहन घेऊन कापूस विक्रीसाठी आणला होता. त्यापैकी १०० वाहनातील कापसाची खरेदी करण्यात आली. उर्वरीत वाहनाचे मोजनमाप न झाल्याने यार्डात उभी होती. त्यामुळे संतप्त शेतकºयांनी कापूस खरेदी सुरू करावी या मागणी करीता बाजार समितीच्या यार्ड समोर आर्णी- यवतमाळ मार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य प्रविण शिंदे, बाजार समितीचे सभापती जिवन जाधव यांनी केले. या मोर्चाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून शेतकºयांसोबत चर्चा केली. यावेळी शेतकºयांनी कापूस खरेदी सुरू करावी अशी मागणी केली. तसेच कापसाला ४ हजार ५० रुपये भाव जाहीर केल्यानंतर जीनींगने ३हजार ९५० रुपये भाव देण्यात आल्याने रोष व्यक्त केला. यावेळी शिंदे यांनी कापूस पणन महासंघाच्या अधिकाºयांसोबत चर्चा केली. त्यानंतर आर्णी येथील उर्वरीत तीन्ही जिनींग सुरू केले असून सर्व शेतकºयांच्या कापूस खरेदी करण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनाने आर्णी- यवतमाळ मार्गावरील वाहतुक एक तास ठप्प होती. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
0
माझगाव डॉकमध्ये विविध पदांच्या 9 जागा

माझगाव डॉक मुंबई मध्ये मुख्य व्यवस्थापक (5 जागा), मुख्य व्यवस्थापक (सुरक्षा) (1 जागा), सहाय्यक कंपनी सेक्रटरी (1 जागा), वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (1 जागा),भाषांतरकार (रशियन) (1 जागा) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जानेवारी 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 10-16 जानेवारी 2015 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
0
बँक ऑफ बडोदा बृहन्मुंबई विभाग, मुंबई येथे शिपाई/सफाईवाला पदाच्या 86 जागा

बँक ऑफ बडोदा बृहन्मुंबई विभाग, मुंबई येथील शाखा व कार्यालयात शिपाई/सफाईवाला (86 जागा) या पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 फेब्रुवारी 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 16 जानेवारी 2015 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.bankofbaroda.com/recruitment_new_1.asp या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
0
केजरीवालांना निवडणूक आयोगाची नोटीस

नवी दिल्ली – भाजपाकडून पैसे घ्या आणि मत ‘आप’लाच द्या असे विधान करुन आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गेल्या तीन दिवसांत केजरीवाल यांना दुस-यांदा नोटीस हजावण्यात आली आहे.
१८ जानेवारी रोजी उत्तम नगर येथील सभेत भाषणादरम्यान केजरीवाल यांनी निवडणुकीच्या काळात भाजपावाले तुम्हाला पैसे देऊ करतील. त्यासाठी नाही म्हणू नका ते पैसे घ्या आणि तुमचे मत मात्र ‘आप’लाच द्या असे विधान केले होते.
याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे केजरीवालांविरोधात विविध राजकीय पक्षांकडून तकारी आल्या आहेत. याप्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली असून गुरुवारी चार वाजेपर्यंत या नोटीशीवर उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.
यापूर्वी १७ जानेवारी रोजी निवडणूक आयोगाने निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकऱणी केजरीवालांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी आजपर्यंत मुदत देण्यात आली होती.
0
भारतातील वाघांच्या संख्येत ३० टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली – गेल्या काही वर्षांपासून देशातील वाघांची संख्या रोडावत चालली आहे अशी ओरड सुरु असतानाच वन्यप्रेमी आणि व्याघ्रप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या चार वर्षात भारतात वाघांच्या संख्येत तब्बल तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१० नंतर भारतातील विविध अभयारण्यातील वाघांची संख्या सुमारे दोन हजार २२६ वर पोहोचली आहे.
२०१४मध्ये करण्यात आलेल्या वाघ्रगणनेचा अहवाल मंगळवारी सादर करण्यात आला. २०१०मध्ये भारतात वाघांची संख्या एक हजार ७०६ इतकी होती. तर २००६ मध्ये भारतात केवळ एक हजार ४११ वाघ होते. वाघांची घटती संख्या लक्षात घेता देशभरात गेल्या काही वर्षात वन्यजीव प्रेमींनी मोठ्या प्रमाणावर वाघ वाचवा मोहीमा हाती घेतल्या होत्या. या मोहीमांना मोठे यश मिळाल्याचे या आकडेवारीवरुन दिसून येत आहे.
‘जगात वाघांची संख्या कमी होत आहे मात्र भारतात ही संख्या वाढत आहे. ही खरंच आनंददायी बाब असल्याचे पर्यावरण मंत्री प्रकाश जवडेकर यांनी सांगितले. जगातील एकूण वाघांच्या संख्येपैकी तब्बल ७० टक्के वाघ भारतात आहे. जेव्हा वाघांची शेवटची गणना करण्यात आली होती त्यावेळी ही संख्या एक हजार ७०६ इतकी होती. नुकत्याच करण्यात आलेल्या वाघ्रगणनेनुसार ही संख्या दोन हजार २२६ पर्यंत पोहोचली आहे. याबाबत आपण अभिमान बाळगला पाहिजे. तब्बल तीस टक्क्यांनी वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. ही खरंच भारतासाठी मोठी आनंदाची बाब आहे, असे जावडेकर म्हणाले. कर्नाटक, उत्तराखंड, मध्यप्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये वाघांची संख्या वाढत आहे.
0
केजरीवालांचे बेदींना खुल्या चर्चेचे आव्हान

नवी दिल्ली – भाजपाकडून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून किरण बेदी यांचे नाव जाहीर होताच दिल्लीमध्ये भाजपा आणि आपमध्ये वाकयुध्दाला सुरुवात झाली आहे.
मंगळवारी सकाळी किरण बेदी यांचे मुख्य स्पर्धक अरविंद केजरीवाल यांनी टि्वटरवरुन बेदींना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीबद्दल शुभेच्छा दिल्या आणि लगेचच खुल्या चर्चेचे आव्हान दिले. मी किरण बेदींना खुल्या चर्चेचे आव्हान देतो. लोक धर्म-जात या आधारावर मतदान करतात. त्यांना मुद्यांची कल्पना नसते. जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांवर एक ते दोन तास वादविवाद झाला पाहिजे. यानिमित्ताने लोकशाहीमध्ये चांगला पायंडा पडेल असे केजरीवाल म्हणाले.
केजरीवालांनी बेदींना टि्वटरवरील त्यांचे बंद केलेले खाते सुरु करण्याची विनंती केली. बेदींनी आपल्या टि्वटर अकाऊंटवरील केजरीवालांचे खाते ब्लॉक केले आहे. केजरीवालांचे टि्वटर अकाऊंट वातावरण दूषित करते. त्यांच्या संदेशातून नकारात्मकता निर्माण होते. त्यामुळे पंधरा महिन्यांपूर्वी मी माझ्या टि्वटर अकाऊंटवरील केजरीवालांचे खाते बंद केले असे बेदी म्हणाल्या.
बेदी यांनी केजरीवालांचे खुल्या चर्चेचे आव्हान स्विकारले असले तरी, ही चर्चा विधानसभेत होऊं द्या असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे निवडणूक काळातील खुल्या चर्चेचे आव्हान फेटाळून लावले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे प्रचार समितीचे प्रमुख अजय माकन यांनी केजरीवालांचे खुल्या चर्चेचे आव्हान स्विकारण्याची तयारी दाखवली. या निमित्ताने एक चांगाल पायंडा पडेल. परस्पर सहमतीने एखाद्या वृत्तवाहिनीची निवड करुन, त्यावर वादविवाद झाला पाहिजे. जेणेकरुन जनतेसमोर आपल्या योजना, विचार मांडता येतील असे माकन म्हणाले.
0
शपथविधीसाठी भाजपाने उधळले ९८.३३ लाख

मुंबई – यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला राज्यात मोठे यश मिळाले. सत्तेत आलेल्या भाजपाचा ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भव्यदिव्य स्वरुपात शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी भाजपाने तब्बल ९८.३३ लाख रुपयांचा खर्च केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारातून पुढे आणली आहे.
एकीकडे राज्यातील अनेक जिल्हे दुष्काळाने होरपळत होते. मात्र असे असतानाही भाजपाने सत्ता स्थापनेच्या सोहळ्यासाठी लाखो रुपयांचा चुराडा केला. या रंगतदार सोहळ्यासाठी भाजपाकडून ९८.३३ लाख रुपये खर्च करण्यात आले.
माहिती अधिकार कायद्याचे कार्यकर्ते अनिल गलगली यांनी वानखेडे स्टेडियमवर भाजपा सरकारच्या शपथविधी सोहळ्यात किती खर्च झाला याची माहिती महाराष्ट्र सरकार आणि भाजपाच्या मुंबई विभागाकडे माहिती मागितली होती. यावेळी भाजपाच्या खर्चाची माहिती देण्यात आली. दरम्यान, या खर्चाबाबत भाजपाच्या मुंबई विभागाकडे विचारणा केली असता तेथून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नसल्याचे गलगली म्हणाले.
0
गोदान एक्स.ने ४ महिलांना उडवले

आसनगाव – ठाणे जिल्ह्यात आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ गोदान एक्स्प्रेसच्या धडकेत चार जण ठार झाले. दुपारी अडीच वजेच्या दरम्यान ही घटना घडली. गोदान एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना हा अपघात घडला.
शहापूर येथील गुरुद्वारात एका कार्यक्रमासाठी आलेल्या चार महिला आसनगाव स्टेशनवर उतरल्या. चौघीजणी प्लॅटफॉर्म क्रमांक दोन येथील ट्रॅकवरुन चालत असताना त्यांना गोदान एक्स्प्रेसची धडक बसली. यात चारही महिलांचा जागीच मृत्यू झाला.









