
नेर, दि. १५ – मुलाला मारहाण करून महीलेचा विनयभंग करणाºया वटफळी येथील आरोपीस एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्या. एस. डी. सरोदे यांनी आज गुरुवारी हा निकाल दिला.
भगवान परसराम चव्हाण (४०) रा. वटफळी असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. ३ जुलै २०१३ रोजी दुपारी गावातीलच एका मुलाला मारहाण करून महीलेचा विनयभंग केला होता. याप्रकरणी नेर पोलिसांनी आरोपीविरुद्घ भादंवि कलम ३२३, ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. जमादार शंकर आडे यांनी या प्रकरणाचा तपास पुर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्या. एस.डी. सरोदे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुणावनी पार पडली. फिर्यादी महीलेसह अन्य साक्षदारांच्या साक्ष नोंदविल्यानंतर दोष सिद्घ झाल्याने आरोपी भगवान चव्हाण यास भादंवि कलम ३२३ अंतर्गत एक महीना शिक्षा व ३४५ मध्ये एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. आर.बि. भेंडे यांनी काम पाहीले.
Archive for January 15th, 2015
0
विनयभंग करणाºया आरोपीस एक वर्ष कारावास
0
बाळासाहेब ठाकरे जयंती शिवसेना राबविणार विविध उपक्रम

यवतमाळ ,दि. १५ – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त १७ ते २५ जानेवारी पर्यंत शिवसेना जिल्हाभर विविध उपक्रम राबविणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेना नेते तथा परिवहनमंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री तथा महसुलमंत्री संजय राठोड, खा. भावना गवळी उपस्थित होते.
सामाजिक उपक्रमामध्ये रुग्णांमध्ये रुग्णांकरिता शिबिरे, रक्तदान शिबिरे, थोर पुरूष पुतळे स्वच्छता, आदी कार्यक्रम जिल्हाभर होणार आहे. १७ ते २२ जानेवारी पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज व मराठ्यांनी युध्दात वापरलेला विविध शस्त्र, अस्त्रांची प्रदर्शनी स्थानिक गुरूदेव मंगल कार्यलय दारव्हा रोड येथे आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये चिलखते, विविध प्रकारच्या तलवारी, ढाली, दांडपट्टे, वाघनखे, भाले, शिरस्त्राणे आदींचे माहितीपूर्ण प्रदर्शन होणार आहे.
२३ जानेवारील अस्सल मराठमोळ््या संस्कृतीचे प्रदर्शन घडविणारा ‘मी मराठी’ हा कार्यक्रम सायंकाळी ६ वा. अभ्यंकर कन्या शाळाच्या प्रांगणावर होणार आहे. विठ्ठल उमप थिएटर्स मुंबई प्रस्तूत हा कार्यक्रम सुमारे २५० कलाकारांच्या संचासह लोकहीत बहु. संस्था यांच्या सहकार्याने होत असून, विविध सिने व टिव्ही कलावंतांचा या कार्यक्रमात समावेश राहणार आहे. याकरिता प्रवेशीका शिवसेनेच्या निवड शाखांवर उपलब्ध राहणार आहे. हाय कार्यक्रम २२ जानेवारी सायंकाळी ६ वा. शिवाजी स्टेडीयम, दारव्हा येथे २४ जानेवारी ला ६ वा. स्व. चंद्रशेखर पाटील जिनचे मैदान, दिग्रस व २५ जानेवारीला काळे स्टेडीयम मैदान अजंती रोड, नेर येथे आयोजित करण्यात येणार आहे.
तसेच २३ जानेवारीवा ‘हिदुत्व रॅली’ हा पे्रक्षणीय तसेच शिवसेना व हिंदूत्वाचे प्रदर्शन करणारा सोळा होणार आहे. २३ जानेवारीला दुपारी १२ वा. पोस्टल मैदान येथे १० हजार शिवसैनिक शिस्तबध्द रितीने ड्रेसकोड मध्ये जमणार आहेत. पांढरा शर्ट, पांढरा पँट व भगवा शेला ह्या वेशात जिल्हा भरातील शाखांमधील शिवसैनिक हिंदुत्व रॅलीचा बिगुल यवतमाळ शहरात फुंकणार आहे. या रॅलीमध्ये भगव्य साडीमध्ये महिला रणरागिणीचाही सहभाग असणार आहे. या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आ. श्रीकांत मुनगिनवार, निवासी उपजिल्हाप्रमुख प्रवीण पांडे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, शहरप्रमुख पराग पिंगळे यांनी केले आहे.
0
टीव्ही पाहू न दिल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

जळगाव : टीव्ही बघताना वडील रागावल्याने बहिणाबाई कॉलनी भागातील एका अल्पवयीन लेकीने बुधवारी संध्याकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. चार दिवसातील ही चौथी घटना आहे. आसोदा रस्ता भागात मजूर कुटुंबातील मुलगी टीव्ही पाहात बसली होती. वडील रागावल्याने दोघांमध्ये वाद झाला. संतप्त मुलीने मागच्या खोलीत पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार काही वेळानंतर लक्षात आला. सोमवारी मोहाडी येथील विद्यार्थिनीने, तर नवृत्तीनगरातील तरुणाने आत्महत्या, मंगळवारी दीक्षितवाडीतील आठवीच्या विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
0
एव्हरेस्ट सर करणा-या राहुलला गावक-यांनी टाकले वाळीत

पोलादपूर – परजातीतील मुलीशी विवाह केल्याच्या रागातून तालुक्याच्या येलंगे गावातील राहुल येलंगे या एव्हरेस्ट शिखर सर करणा-या तरुणाला गावक-यांनी वाळीत टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याची पत्नी कुंकू लावत नाही. जीन्स पँट घालते, अशी कारणे पुढे करत येथील गावकरी व राहुलच्या नातेवाईकांनी त्याला मागील वर्षभरापासून वाळीत ठेवल्याची माहिती त्याने उघड केली आहे.
वाळीत प्रकरण समन्वय समितीतर्फे आयोजित बैठकीत स्थानिक पत्रकार बबन शेलार यांनी या प्रकरणाला वाचा फोडली. राहुलवर मागील वर्षभरापासून गावकरी कशाप्रकारे अन्याय करत आहेत, याची व्यथा शेलार यांनी यावेळी मांडली. तहसीलदार काशीनाथ नाडेकर, पोलीस निरीक्षक सुरेश अंधारे यांच्या उपस्थितीत तांबडभुवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे, सरपंच उमेश पवार, लोहारेचे सरपंच प्रदीप नरे, कापडे बुद्रुकचे सरपंच अजय सलागरे, देवळेचे सरपंच प्रकाश कदम, उद्योजक रामचंद्र कदम शेठ आदी मान्यवर उपस्थित होते.
0
टीम इंडियाच्या नव्या पोषाखाचे अनावरण

मेलबर्न – भारतीय क्रिकेट संघाला पोषाख पुरस्कृत करणा-या नाईकेने गुरुवारी टीम इंडियाच्या एकदिवसीय सामन्यांच्या नव्या गणवेशाचे अनावरण केले.
नाईकेने खास पूर्नप्रक्रिया केलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून टी-शर्ट आणि पायजम्याचा प्रत्येक संच बनवला आहे. प्रत्येक संच बनवण्यासाठी सरासरी ३३ प्लास्टिक बाटल्यांचा वापर करण्यात आला आहे.
खेळाडूंना मैदानावर जास्तीत जास्त मदत होईल अशा पध्दतीने टीम इंडियाचा नवा पोषाख तयार करण्यात आला आहे. टीम इंडियाचा नवा गणवेश वजनाने हलका, आरामदायक आणि मैदानावर खेळाडूंचे कमीत कमी लक्ष विचलित होईल अशा पध्दतीने बनवण्यात आला आहे असे भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सांगितले.
२०१५ हे टीम इंडियासाठी महत्वाचे वर्ष आहे. क्रिकेटमधील सर्वोच्च शिखर समजल्या जाणा-या विश्वचषकाचे जेतेपद मिळवण्यासाठी जगातले सर्वोत्तम संघ परस्परा विरुध्द मैदानात उभे ठाकणार आहेत. टीम इंडियाचा गणवेश हा नुसता पोषाख नाही त्यापेक्षा भरपूर काही आहे.
या पोषाखामध्ये कोटयावधी लोकांच्या इच्छा, अपेक्षा सामावल्या आहेत. हा रंग संपूर्ण देशाला एकासूत्रात बांधतो असे बीसीसीआयचे सचिव संजय़ पटेल म्हणाले. टीम इंडियाची गरज लक्षात घेऊन नाईकेने हा पोषाख बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा जो वापर केला त्याने आम्ही समाधानी आहोत असे पटेल म्हणाले.
0
गुजरातमध्ये दंगल, तीन ठार

सूरत/भरूच- गुजरातमध्ये मकर संक्रांतीच्या सणानिमित्त पतंग उडवताना झालेल्या वादाचे पर्यावसन दंगलीत झाले. या दंगलीत तीन जणांचा मृत्यू झाला. तर अन्य ३० जण जखमी झाले आहेत. यात पोलिस अधिक्षकांसह दोन पोलीसही जखमी झाले आहेत. यामुळे येथील वातावरण तणावग्रस्त असून संपूर्ण हांसोट तालुक्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
भरुच जिल्ह्यातील हांसोट तालुक्यातील अंभेठा गावात दोन समुदायांमध्ये पतंग उडवण्यावरुन बुधवारी वाद झाला. मकर संक्रांतीच्या सणानिमित्त काहीजण पतंग उडवत असताना यातील पतंग पकडण्यावरुन एका मुलाने अल्पसंख्यांक समाजातील मुलाला मारहाण केली. त्याचा राग मनात ठेऊन पुन्हा हल्ला केल्याने हा वाद पेटला. हा संघर्ष संपूर्ण तालुक्यात पसरला असून येथील धार्मिक स्थळे आणि दुकानांवर हल्ला करणा-या समुदायाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सुरुवातीला हवेत गोळीबार केला. मात्र कोणीही जुमानत नसल्याने अखेर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
या संघर्षात जखमी झालेल्या ३० जणांना उपचारासाठी हांसोट, भरुच आणि सुरत येथील रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाच्या सशस्त्र जवानांना हांसोट येथे तैनात केले आहे.
या भागात लोकांनी दगडफेक केली. तर काही ठिकाणी दुकाने जाळण्यात आल्याचीही माहिती आम्हाला मिळाली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वाढीव सुरक्षा मागवण्यात आली असून आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे भरुचचे पोलीस अधिक्षक बिपिन अहिरे यांनी सांगितले.
0
पाकिस्तान दहशतवादी संघटनांवर बंदी घालणार

इस्लामाबाद- पाकिस्तान सरकारने मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदच्या जमात उद दावा आणि हक्कानी नेटवर्कसह १२ दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी पाकिस्तानवर दबाव आणल्याने पाकिस्तानने हा निर्णय घेतल्याचे समजते.
लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या २६/११ च्या मुंबई हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला. तर २००८ मध्ये काबूल येथील भारतीय दुतावासावरील हल्ल्यामागे जलालुद्दीन हक्कानी नेटवर्कचा हात होता. या हल्ल्यात ५८ जणांचा मृत्यू झाला. २०११ मध्ये काबूलमधील अमेरिकेच्या दुतावासावरील हल्ला आणि अफगाणमधील बाँबस्फोटांमध्येही हक्कानी नेटवर्कचा सहभाग होता. सप्टेंबर २०१२ मध्ये अमेरिकेने हक्कानी नेटवर्कवर बंदी घातली होती.
Jamaat-ud-Dawaकेरी यांनी शरीफ यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय चर्चेत पाकिस्तानला दहशतवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी खडे बोल सुनावल्याचे वृत्त वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे अमेरिकेचा दबाव आणि नुकताच झालेला पेशावर हल्ला यामुळेच पाकिस्तानने दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलून तेथील १२ दहशतवादी संघटनांवर बंदी लादण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. येत्या काही दिवसांमध्ये बंदीची अधिकृत घोषणा होईल, असे पाकिस्तानमधील वृत्तपत्रांनी म्हटले आहे.
0
किरण बेदी भाजपमध्ये

नवी दिल्ली -माजी आयपीएस अधिकारी आणि अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातील एक बिनीच्या शिलेदार किरण बेदी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. बेदी या आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
भाजपच्या ऑनलाइन सदस्य नोंदणी प्रक्रियेनुसार फोनवरून ‘मिस्ड कॉल’ दिल्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी बेदींना पक्षात औपचारिक प्रवेश दिला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हेही यावेळी उपस्थित होते. किरण बेदी या दिल्ली विधानसभेची निवडणूक निश्चितच लढतील, असे अमित शहा यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र, त्यांचा मतदारसंघ कोणता असेल हे सांगण्याचे शहा यांनी टाळले.
दिल्ली भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल असे विचारले असता, ‘भाजपमध्ये मुख्यमंत्री बनण्याच्या क्षमतेचे अनेक नेते आहेत. पण सध्या आम्ही निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचा निर्णय पक्षाचे संसदीय बोर्ड करेल,’ असे शहा म्हणाले.
भाजपच्या केजरीविरोधी प्रचाराला बळ
अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात किरण बेदी व केजरीवाल यांनी एकत्र काम केले होते. केजरीवाल यांनी राजकीय पक्ष काढल्यानंतर बेदी त्यांच्यापासून दूर झाल्या होत्या. केजरीवालांची कामाची पद्धत कशी आहे? त्यांचे कच्चे दुवे कोणते आहेत? याची बेदी यांना पूर्ण माहिती आहे. बेदी यांच्या प्रवेशामुळं भाजपच्या केजरीविरोधी प्रचाराला मोठे बळ मिळणार आहे.
0
प्रजासत्ताकदिनी हल्ल्याची शक्यता

नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यादरम्यान येत्या प्रजासत्ताकदिनी भारतात दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असून शाळा, लष्करी छावण्या, हायवे आणि नागरी वस्त्या हे दहशतवाद्यांचे प्रमुख लक्ष्य असू शकते,’ असा गंभीर इशारा लष्कराने दिला आहे.
लष्कराच्या १६ कॉर्प्स विभागाचे लेफ्टनंट जनरल के. एच. सिंग यांनी दहशतवाद्यांच्या संभाव्य घुसखोरीची माहिती दिली. ‘पाकव्याप्त काश्मिरात दहशतवाद्यांचा वावर आणि प्रशिक्षण अद्याप सुरूच असल्याचे हे लष्करप्रमुखांनी सांगितलेच आहे. आता तर तब्बल २०० दहशतवादी पीर पंजालच्या डोंगर भागातून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, पाकिस्तानी घुसखोरी हाणून पाडण्यासाठी लष्कर पूर्ण तयार असून असा कोणताही प्रयत्न हाणून पाडला जाईल,’ असा विश्वास सिंग यांनी व्यक्त केला.
ओबामा यांच्या भेटीदरम्यान भारतीय सीमेवर व देशांतर्गत सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडेकोट ठेवण्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. दरम्यान, काश्मीरमध्ये घुसलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या तीन आत्मघाती दहशतवाद्यांचा गुप्तचर संस्थांकडून शोध सुरू आहे.









