
यवतमाळ, दि. ३१- बहिणीसोबत शेतात खेळत असलेला चिमुकला बोअरवेलच्या खड्डयात पडल्याची घटना उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे आज दुपारी ३ वाजता दरम्यान घडली. सूरज शंकर आखरे (२) या चिमुकल्याला सुखरुप बाहेर काढण्यासाठी टार्गेट डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स (टीडीआरएस) युद्धस्तरावर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. सूरजची जिवन जगण्यासाठी झुंज सुरू असून, रात्री ९ वाजेपर्यंत बचावकार्य सुरूच होते. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, चिमुरडा सुखरुप बाहेर निघावा म्हणून प्रत्येक जण आराधना करीत आहे.
शनिवारी दुपारच्या सुमारास निंगणूर येथील नईम अली यांच्या शेतात काही महिला कापूस वेचन्याचे काम करीत होत्या. शेतातच असलेल्या बोअरवेलनजीव सूरज हा पाच वर्षीय बहीण पूजा सोबत खेळत होता. शेतातील बोअरवेलला पोत्याने झाकून ठेवण्यात आले होते. बोअरवेलजवळ खेळत असलेला सूरज अचानक बोअरवेमध्ये पडला. सूरज आत पडताच पूजाने आरडा-ओरड सुरू केली. शेतातील महिलांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. ही वार्ता गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाला ही माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी दिपक सिंगला, तहसिलदार सचिन शेजाळ, फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पठान, बिटरगावचे ठानेदार एम.बी. मानकर, महागाचे ठाणेदार पी.बी. शेळके आपल्या ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाले.
घटनेचे गांभीर्य ओळखून सूरजला बाहेर काढण्यासाठी अवघे प्रशासन कामी लागले. दोन जेसीबी यंत्राच्या सहाय्याने बोअरवेलला समांतर खड्डा खोदण्याला सुरूवात करण्यात आली. ४० फूट खोल खड्यात पडलेल्या सूरजला आॅक्सीजनची कमतरता भासू नये म्हणून डॉक्टरांच्या देखरेखीत आॅक्सीजनच्या सिंलेडरने खड्यात आॅक्सीजनचा पुरवठा सुरू करण्यात आला. दोरीच्या मदतीने बिस्कीट आणि पाणी आत सोडण्यात आले. मोठ्या टॉर्चने नियमीत बालकाच्या हातचालीवर लक्ष दिल्या जात आहे. सूरजची आई तिथेच चिमुकला सुखरुप बाहेर निघावा म्हणून बसून आहे. हे दृश्य उपस्थितांचे हृदय हेलावून सोडत आहे.
घटनेची माहिती तत्काळ जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. जिल्हा मुख्यालयातून टीडीआरएस पथक सायंकाळी ६ वाजता घटनास्थळावर दाखल झाले. हे पथक दाखल होताच उपविभागीय अधिकाºयांनी बचावकार्याची सुत्रे पथकाकडे सोपविली. घटनेचे गांभीर्य बघून आ. राजेंद्र नजरधने, माजी आ. उत्तमराव इंगळे घटनास्थळावर पोहाचले. बघ्यांच्या गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी बिटरगाव, महागाव आणि उमरखेडवरून अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्यात आले. अंधार पडताच वीज वितरण कंपनीच्या वतीने घटनास्थळावर मोठे लाईट लावण्यात आले. वृत्त लिहीपर्यंत बचाव कार्य सुरूच होते.
Archive for January 31st, 2015
0
चिमुकला बोअरवेलच्या खड्यात पडल्याने खळबळ , उमरखेड तालुक्यातील घटना
0
अपघातात दोन ठार

यवतमाळ , दि. ३१ – जिल्ह्यात राळेगाव घाटंजी तालुक्यात झालेल्या दोन विविध अपघातात महिलेसह पोलीस पाटील ठार झाल्याची घटना घडली.
युवकाने आपले वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून महिलेला धडक दिली. यात गया भोयर ही गंभीररित्या जखमी झाली. ही घटना राळेगाव तालुक्यातील अंतरगाव येथे घडली. अपघातात गया भोयर ही अपघातात जखमी झाल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी रामू कृष्णाजी भोयर (४०) रा. धानोरा याने राळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून किशोर संजय जिरे (२१) रा. राळेगाव याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. तसेच उभ्या असलेल्या ट्रक्टरवर दुचाकी आदळल्याने झालेल्या अपघातात कोटी येथील पोलीस पाटील यांचा मृत्यू झाला. ही घटना घाटंजी-रंझा मार्गावर घडली. अनंत वासुदेव अक्कलवार (४५) असे मृताचे नाव आहे. विजय शिवराम अक्कलवार हा जखमी झाला. काल रात्री दोघेही दुचाकीने घाटंजी येथून कोचीकडे जात होते. दरम्यान ट्रक्टर क्रमांक एमएच २९ / ३५०१ हा रस्त्यावर उभा होता. त्यामुळे ट्रक्टर न दिसल्यामुळे दुचाकी आदळली. यात अनंत अक्कलवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर विजय जखमी झाला. त्याला उपचारासाठी यवतमाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात झाल्याचे लक्षात येताच चालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी रोशन अक्कलवार याने घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
0
विनयभंग केल्याने युवतीने घेतले विष

यवतमाळ : दोन युवकांनी विनयभंग केला. यामुळे अपमानित झालेल्या युवतीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना राळेगाव तालुक्यातील कळंबनेर येथे घडली.
अमर विलास जुनघरे (२४) याच्यासह अन्य एकाने गावातील युवतीचा हात पकडून विनयभंग केला. तसेच तिच्या वडीलांना जिवे मारण्याची धमकी दिली. यामुळे युवतीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी राळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावरून अमर जुनघरे याच्यासह अन्य एकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
0
नोकरीच्या नावाखाली ११ लाखाने फसवणूक, संस्थाध्यक्ष विजय डांगे विरुद्ध गुन्हा

यवतमाळ , दि. ३१ – शिक्षण संस्थेत शिपाई व शिक्षण पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ११ लाख रुपयाने फसवणूक केली. याप्रकरणी कोटंबा येथील शिक्षण संस्था अध्यक्ष विजय डांगे विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कोटंबा येथे तथागत विद्यालय असून, या शाळेत शिपाई व शिक्षक पदावर नोकरी देण्याचे आमिष बालाजी खताळ यास दाखविले. नोकरीसाठी म्हणून ११ लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर ११ महिन्यांची आॅर्डर दिली. मात्र कालावधी संपल्यानंतर वाढीव मुदत न देता नोकरीवरून काढून टाकले. यापूर्वी देखील विजय डांगे याने नोकरीच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याचे सांगितल्या जाते. नोकरी न मिळता ११ लाखाने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फकीरराव नानासाहेब दहिभाते रा. सायखेडा याने बाभूळगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी विजय डांगे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. फसवणुकीची पुन्हा एक घटना बाभूळगाव तालुक्यात उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
0
शारिरीक सुखाची मागणी करणाºया आरोपीस कारावास

यवतमाळ, दि. ३१ – तालुक्यातील किन्ही येथील युवतीला शारीरीक सुखाची मागणी करून विनयभंग करणाºया आरोपीस एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली. येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी (तीसरे) एस.के. शाहु यांनी हा निकाल दिला. उत्तम दत्ता खडके (२३) रा. किन्ही असे आरोपीचे नाव आहे.
किन्ही येथील युवती किराणा दुकानात गेली असता. आरोपी उत्तम खडके याने मुलीला ५० रुपयाची आमिष दाखऊन शारीरीक सुखाची मागणी केली. यावेळी युवतीने या प्रकारास नकार देऊन तेथून काढता पाय घेतला. यावेळी उत्तमने युवतीला ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. घरी गेल्यानंतर तीने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. १९ जून २०११ रोजी घडलेल्या घटनेचा जाब विचारण्यासाठी युवतीची आई आरोपीच्या घरी गेली. यावेळी आरोपी व त्याच्या अन्य तीन साथीदारांनी महिलेला मारहाण केली. याप्रकरणी युवतीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी चारही आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३५४, ३२४, ५०६, ५०४, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. जमादार उद्देशन पाटील यांनी तपास करून आरोपींना अटक करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी (तीसरे) एस.के. शाहु यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने पाच साक्ष तपासण्यात आल्या. यामध्ये दोष सिद्घ झाल्याने आरोपीस एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सात दिवस अतिरीक्त शिक्षा होणार आहे. सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता अमित भेंडे यांनी काम पाहिले.
0
विनयभंग करणाºया आरोपीस शिक्षा

यवतमाळ , दि. ३१ – माहेरी राहत असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस एक महिना कारावासाची शिक्षा येथील प्रश्रम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस.के. शाहु यांनी सुनावली. विष्णू बाबाराव चव्हाण (३०) रा. आसोला असे आरोपीचे नाव आहे.
पतीसोबत घरगुती कारणावरून वाद होत असल्याने एक महिला माहेरी आसोला येथे राहत होती. गावातीलच विष्णू चव्हाण या युवकाची वाईट नजर सदर महिलेवर पडली होती. या महिलेने आरोपीला समज देऊन समजुत काढली होती. अशातच १९ आॅक्टोंबर २०१३ रोजी महिलेचे आई वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेऊन दारू पिऊन आरोपीने घरात प्रवेश करून महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३५४ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला. जमादार माणिक भगत यांनी तपासाअंती आरोपीस अटक करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी (तीसरे) एस.के. शाहु यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने चार साक्ष तपासण्यात आल्या. यामध्ये दोष सिद्घ झाल्याने आरोपीस एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता अमित भेंडे यांनी काम पाहिले.
0
घोनसरा येथील युवकाचा खून

आर्णी , दि ३१ – तालुक्यातील घोनसरा येथील युवकाचा ईवळेश्वर शिवारात अनैतिक संबधातून खून करण्यात आल्याची घटना सकाळी आठ वाजता दरम्यान उघडकीस आली. उबेद खान (२२) रा. घोनसरा असे मृताचे नाव आहे. उबेदचे ईवळेश्वर येथील विवाहीत महिलेसोबत एक वर्षापासुन अनैतिक संबंध होते. तिला भेटण्यासाठी उबेद रात्री दरम्यान जात होता. काल रात्री ८ वाजता दरम्यान घोनसरा येथून जेवन न करता तो घरून गेला होता. रात्रभर घरी न आल्याने घरातील सर्वजन त्याची काळजी करत होते. ईवळेश्वर येथील नारायण कुडमथे यांनी मृतकाचा मोठा भाऊ फयाज खान यास सकाळ दरम्यान फोन करून ईवळेश्वर शिवारातील भाऊराव मडपाजी यांच्या शेताजवळ असलेल्या नालीत उबेदचा मृतदेह पडून असल्याची माहीती दिली. लगेच मृतकाच्या नातेवाईकांनी घटनास्थळ गाठले. त्यावेळी उबेदच्या डाव्या पायाला मार आणि गळा दाबलेल्या अवस्थेत आढळुन आला. याप्रकरणी उबेदचे वडील अमानुल्ला खान अमिर खान (५५ ) यांनी आर्णी पोलीसात तक्रार दिली. त्यावरून उज्वला मडावी, शारदा आडे, चंदू कुडमथे, शंशीकांत कुडमथे, लवकुश कुडमथे, गजानन ठवकर सर्व रा. ईवळेश्वर यांच्या विरुद्ध कलम ३०२, २०१, ३४ नुसार गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास ठाणेदार हनुमंतराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश जाधव करित आहे.
0
विविध प्रकारच्या ग्रंथवाचनानेच संस्कृतीचे दर्शन होते – संजय राठोड
यवतमाळ ग्रंथोत्सवाचे पालकमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन
यवतमाळ, दि. 31 : ग्रंथ हेच मानवाचा खरा गुरु आणि मित्र आहे. प्रत्येकाने ग्रंथांच्याबाबतीत हे तत्व आत्मसात केल्यास कोणीही जिवनाच्या कोणत्याही स्तरावर अपयशी होवू शकणार नाही. ग्रंथांमुळेच आपल्याला विविध प्रकारच्या संस्कृतीचे दर्शन होत असते. त्यामुळे प्रत्येकाने ग्रंथवाचनाचा छंद जोपासला पाहिजे, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. पालकमंत्र्यांच्याहस्ते यवतमाळ ग्रंथोत्सवाचे थाटात उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.आरती फुफाटे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, नांदेड येथील जेष्ठ बालसाहित्यिक मालध चुकेवाड, मुख्याधिकारी रविंद्र पांढरे, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, उपशिक्षणाधिकारी एस.आर.चव्हाण, ग्रंथालय संघटनेचे कार्यवाह विनोद देशपांडे, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जिल्हा ग्रंथपाल नितीन सोनोने, नितीन खर्चे आदी उपस्थित होते. सुरुवातीस दिप प्रज्वलीत करून तसेच ग्रंथदालनाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. वाचनानेच माणूस समृध्द होत असतो. त्यामुळे प्रत्येकाने वाचन केले पाहिजे. हाच उद्देश समोर ठेवून ग्रंथोत्सवाचे आयोजन केले जाते. एकाच ठिकाणी विविध पुस्तके उपलब्ध व्हावी. या पुस्तकांमधून साहित्य, संस्कृती व सांस्कृतिक ओळख निर्माण व्हावी हा यामागचा उद्देश आहे. त्यामुळे पुढीलवर्षी मोठ्याप्रमाणावर ग्रंथ व सांस्कृतिक महोत्सव घेता येईल का यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. यावेळी सर्वानी ग्रंथमहोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.फुफाटे यांनी चांगली पुस्तके चांगले विचार देत असतात. त्यामुळे प्रत्येकाने पुस्तके वाचलीच पाहिजे. पुस्तके जिवनात बदल घडवून आणू शकतातत. चांगली दिशा व शिस्त लावण्यासाठी पुस्तकेही मार्गदर्शकाची भुमिका बजावते, असे त्यांनी पुढे बोलतांना सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांचे आवड निर्माण करण्यासाठी ग्रंथोत्सव असल्याचे सांगुन या ग्रंथोत्सवाचा प्रत्येकानी लाभ घ्यावा, असे ते म्हणाले. प्रास्ताविक माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी केले. यावेळी त्यांनी ग्रंथोत्सवामागची भुमिका विशद केली. कार्यक्रमाचे संचलन जेष्ठ साहित्यिक सुरेश गांजरे यांनी केले तर आभार शिक्षण विस्तार अधिकारी श्री.शेंडगे यांनी मानले.कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी, साहित्यिक, कवी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. सदर ग्रंथमहोत्सव दिनांक 2 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. या ग्रंथमहोत्सवात पुणे, मुंबई, औरंगाबाद यासह विविध ठिकाणच्या नामवंत प्रकाशनांचे पुस्तकांचे 34 स्टॉल असून वाचकांना पुस्तके पाहण्यासाठी उपलब्ध आहे.











