
मुंबई- राज्यातील सर्व पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला चार आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
पोलीस ठाण्यात होणा-या कैद्यांच्या मृत्यूसंदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर न्यायालयाने गेल्या वर्षी १३ ऑगस्ट रोजी सर्व पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भात सरकारी वकीलांनी राज्यातील काही पोलीस ठाण्यात कॅमेरे बसवले असून सर्व ठाण्यात कॅमेरे बसवण्यासाठी आणखी काही काळ जाईल असे सांगितले होते.
मात्र यासंदर्भात न्याययालयाने १३ ऑगस्ट रोजी आदेश देऊन सुद्धा अद्याप सर्व पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे युग चौधरी यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. चौधरी यांनी कैद्यांच्या होणा-या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.
यावर न्यायालयाने कॅमेरे बसवण्यासाठी सरकारला प्रशासकीय अथवा आर्थिक अडचणी आहेत का असा सवाल विचारला. सर्व पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासंदर्भात कालावधी निश्चित करण्यात यावा आणि त्याचे प्रतिज्ञापत्र एका महिन्यात सादर करण्याचे आदेश न्यायालयाने मंगळवारी दिले.
पोलीस ठाण्यात होणा-या कैद्यांच्या मृत्यू संदर्भातील अन्य एका याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. कैद्यांचे मृत्यू रोखण्यासंदर्भात सरकारने काय पावले उचलली आहेत, त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने २००८मध्ये दिले होते. तो अहवाल सरकारने अद्याप सादर केलेला नाही. न्यायालयाने हा अहवाल पुढील सुनावणीत सादर करावे असे आदेश दिले आहेत.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणीच्या अहवालानुसार देशभरात पोलीस ठाण्यात गेल्या १५ वर्षात झालेल्या कैद्यांच्या मृत्यूपैकी २३.४८ टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाल्याचे न्यायालयाने गेल्या सुनावणीत म्हटले होते.
Archive for January 6th, 2015
0
पोलीस ठाण्यातील कैद्यांचे मृत्यू, प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश
0
विश्वचषकासाठी टीम इंडिया जाहीर

मुंबई – वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारताच्या संघात दुखापतग्रस्त अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि इशांत शर्माच्या समावेशाने भुवया उंचावल्या आहेत. मात्र प्रत्यक्ष स्पर्धेपूर्वी दोघेही तंदुरुस्त होतील, असा विश्वास बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी मंगळवारी संघ निवडीनंतर व्यक्त केला.
‘‘खांद्याच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या जडेजावर सध्या पुनर्वसन कार्यक्रमांतर्गत उपचार सुरू आहेत. त्याच्या दुखापतीत सुधारणा आहे. निवडीपूर्वी जडेजाच्या दुखापतीबाबत आम्ही बीसीसीआयच्या फिजियोकडून संपूर्ण माहिती मागवली. पुढील १० दिवसांत तो सरावाला सुरुवात करेल, असे फिजियोंनी सांगितले. इशांतला गुडघ्याच्या दुखापतीचा त्रास जाणवत आहे. त्याची दुखापत गंभीर नाही. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत (सिडनी) खेळू नको, असा सल्ला फिजियोंनी दिल्याने त्याला विश्रांती देण्यात आली,’’ असे पटेल यांनी म्हटले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी जडेजाची निवड झाली होती. मात्र एकही कसोटी तो खेळू शकला नाही. शेवटी त्याच्या जागी डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलची निवड करण्यात आली. इशांतला तीन कसोटीत केवळ ९ विकेट घेता आल्यात.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन कसोटीतील सहा डावांत केवळ एकच अर्धशतक ठोकणारा सलामीवीर शिखर धवनचा १५ सदस्यीय संघात समावेश आहे. त्याच्यासह रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे हे मुंबईकर डावाची सुरुवात करतील. गरज भासल्यास रहाणे मधल्या फळीत खेळू शकेल. त्याच्यासह विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायडू आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा मधल्या फळीत समावेश आहे.
चार मध्यमगती आणि तीन फिरकीपटूवर भारताची गोलंदाजीची धुरा आहेत. मध्यमगती चौकडीत भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी, इशांत शर्मा आणि उमेश यादवचा समावेश आहे. या चौकडीच्या जोडीला अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नी आहे. ऑफस्पिनर आर. अश्विनसह डावखुरा अक्षर पटेल तसेच रवींद्र जडेजावर फिरकी मा-याची भिस्त आहे.
धडाकेबाज सलामीवीर वीरेंदर सेहवाग, गौतम गंभीर, मागील वर्ल्डकपचा ‘हीरो’ युवराज सिंग, मुरली विजय आणि रॉबिन उथप्पाच्या नावाची चर्चा झाली. मात्र त्यांना संघात स्थान मिळाले नाही. मुख्य सिलेक्टर संदीप पाटील यांनी प्रशिक्षक फ्लेचर आणि कर्णधार धोनीशी टेलिकॉन्फरन्सद्वारे चर्चा केली.
विद्यमान कसोटी मालिकेनंतर ऑस्ट्रेलियात होणा-या तिरंगी मालिकेसाठी भारताच्या संघाची मंगळवारी घोषणा झाली. विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या १५ जणांचाच यात समावेश आहे. मात्र राखीव म्हणून धवल कुलकर्णी आणि मोहित शर्मा या मध्यमगती दुकलीला संघात स्थान देण्यात आलेले आहे. तिरंगी मालिकेला १८ जानेवारीपासून सुरुवात होईल. यात ऑस्ट्रेलिया आणि भारतासह तिसरा संघ इंग्लंड असेल. तिरंगी मालिकेसाठीचा संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी, इशांत शर्मा, स्टुअर्ट बिन्नी, उमेश यादव, धवल कुलकर्णी आणि मोहित शर्मा
0
भाजप प्रदेशाध्यक्षपदी दानवे

नवी दिल्ली – केंद्रीय राज्यमंत्री आणि जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांच्या गळ्यात अखेर महाराष्ट्र प्रदेश भाजपाध्यक्षपदाची माळ पडली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दानवे यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब केले. या निवडीने भाजपने बहुजन चेहऱ्याला संधी देतानाच मराठवाड्यालाही मानाचे पान दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार हाती घेतल्यानंतर भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी चेहऱ्याचा शोध सुरू झाला होता. पक्ष पातळीवर अनेक नावांचा विचार करण्यात आला. त्यात भाजपचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार आणि रावसाहेब दानवे यांची नावे सर्वात आघाडीवर होती. त्यामधून दानवे यांनी बाजी मारली आहे. दानवे हे गेल्या ३० वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय आहेत. मराठवाड्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी संघटना वाढविण्यासाठी मेहनत घेतली. दानवे जसे दिवंगत मुंडे यांचे कट्टर समर्थक होते तसेच त्यांचे नितीन गडकरी यांच्याशीही सलोख्याचे संबंध राहिले आहेत. शिवाय बहुजन समाजातील चेहरा म्हणूनही दानवे यांच्या पारड्यात पक्ष श्रेष्ठींचे झुकते माप पडले.
दानवे यांच्या नावाची अधिकृत घोषणा आज अमित शहा यांच्या कार्यालयातून जाहीर करण्यात आली. दानवे सध्या केंद्रात राज्यमंत्रिपदही सांभाळत असून पक्षाने दिलेल्या नव्या जबाबदारीमुळे त्यांना केंद्रातील मंत्रिपदाचा त्याग करावा लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एका नव्या चेहऱ्यासाठीही केंद्रीय मंत्रिपदाची कवाडे लवकरच खुली होणार आहेत.
0
पाटणा स्फोट : ११ जणांवर गुन्हे

पाटणा – येथे २७ ऑक्टोबर २०१३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हुंकार रॅली’ दरम्यान झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी इंडियन मुजाहिदीन (आयएम) आणि स्टुटंड इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी)च्या अकरा संशयितांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष कोर्टाने गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला होता, तर १०० जण जखमी झाले होते.
एनआयएचे विशेष न्यायाधीश अनिल कुमार सिंग यांच्यासमोर १९ जानेवारीपासून या प्रकरणातील साक्षीदारांची सुनावणी होणार आहे. या प्रकरणी हैदर अली, नूमन अन्सारी, तौफिक अन्सारी, उमर सिद्दिकी, अजरुद्दीन कुरेशी, इफ्तिकार आलम, फिरोज आलम, अहमद हुसेन, फकरुद्दीन आणि अन्य एका अल्पवयीन संशयितांवर विविध कायद्यांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संशयितांपैकी हैदर अली हा ‘सिमी’चा दहशतवादी असून, तो जुलै २०१३ बोधगया येथील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणीही पोलिसांना हवा आहे.
दरम्यान, रॅली दरम्यान, १७ बॉम्ब पेरण्यात आले होते. त्यापैकी सात बॉम्बचा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी तौफिकला पाटणा पोलिसांनी अटक केली होती. तो स्फोटा दरम्यान जखमी झाला होता. अन्य आरोपींना देशाच्या विविध भागांतून ताब्यात घेण्यात आले होते.
0
सुनंदा पुष्कर यांची हत्याच!

नवी दिल्ली – केंद्रीय राज्यमंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू हत्या असल्याची खळबळजनक माहिती दिल्ली पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी दिली आहे. या आधी सुनंदा पुष्कर यांनी आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी केलेल्या या खुलाशानंतर शशी थरूर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच शशी थरूर यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पाकिस्तानी महिला पत्रकार मेहेर तरार यांच्याशी शशी थरूर यांचे कथित प्रेमसंबंध, त्यावरून खवळलेल्या सुनंदा पुष्कर, ट्विटरवरून त्यांनी व्यक्त केलला उद्वेग, ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचा थरूर यांचा दावा, अशा वेगवान हालचाली राजधानीत दोन दिवस गाजल्या. परंतु, या जोडप्यानं संयुक्तपणे ‘हॅप्पीली मॅरीड’चं पत्र फेसबुकवरून टाकल्यानंतर हा विषय संपल्याचेच संकेत मिळाले होते. मात्र, शुक्रवारी १७ जानेवारी रोजी रात्री अचानक दिल्लीच्या लीला हॉटेलमध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह आढळला होता आणि सगळेच हादरले होते. सुनंदा पुष्कर यांनी आत्महत्या केली असावी का, त्यामागे नेमकं काय कारण असावं, की हा घातपात आहे, त्यात कुणाचा हात असेल, यावरून तर्कवितर्क लढवले जात होते.
सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू अनैसर्गिक अन् आकस्मिक आहे. परंतु, त्यांच्या रक्तात विषाचा अंश सापडलेला नाही. त्यांच्या शरीरावर काही जखमा असल्या, तरी त्या त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्यात का, हे आत्ताच सांगता येणार नाही, अशी माहिती एम्स हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक सायन्स विभागाचे प्रमुख सुधीर कुमार गुप्ता यांनी दिली होती. मात्र २९ डिसेंबर २०१४ रोजी मेडिकल बोर्डाने दिल्ली पोलिसांना एक अहवाल सोपवला. या अहवालातील माहिती पोस्टमार्टम अहवालाच्या एकदम विरुद्ध असल्याचे समोर आले. विसेरा अहवालानुसार त्यांच्या शरीरात विषाचा अंश आढळला होता. आता मेडिकल बोर्डाने देखील विसेरा अहवालाला दुजारा दिला आहे.
0
लाचखोर पोलीसास रंगेहात अटक

यवतमाळ, दि. ६ – न्यायालयाने काढलेल्या वॉरंटमध्ये अटक टाळण्यासाठी सातशे रुपयाची लाच स्वीकारणाºया पोलीस कर्मचाºयास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे पुसदच्या पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
कचरू तुकाराम भालेराव (४३) असे लाचखोर पोलीस नायकाचे नाव आहे. तक्रारदार असलेल्या व्यक्तीविरुद्ध विद्यमान न्यायालयाने वॉरंट काढला होता. न्यायालयामधून वॉरंट रद्द करून आणतो तसेच अटक करणार नाही, असे म्हणून कचरू भालेराव याने सातशे रुपयाच्या लाचेची मागणी केली. या प्रकरणाची तक्रार यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे करण्यात आली. आज ठरल्यानुसार मधुसुदननगरच्या प्रवेशद्वाराजवळ भालेराव याने पंचासमक्ष लाच स्वीकारताच त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनात नीतीन लेवरकर, अरुण गिरी, प्रकाश शेंडे, नरेंद्र इंगोले, गजानन राठोड, शैलेश ढोले, अमोल महल्ले, अमित जोशी, निलेश पखाले, भारत चिरडे, अनिल राजकुमार, किरण खेडकर, विशाल धनवाल यांनी केली.
0
१ लाखाची रोकड लंपास

वणी, दि़ ६ – चुन्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राजूर येथील चुनाभट्टीवरील काम करणाºया कर्मचाºयाच्या दुचाकीच्या डिक्कीतून भरदिवसा १ लाख १५ हजार रुपयाची रोकड लंपास केल्याची घटना आज घडली. या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
राजूर येथील चुनाभट्टीवर लिपीक पदावर काम करणारा राजू बालाजी डवरे याने आज वणी येथील आयसीआय बॅकेतून दीड लाखाची काढली. त्यातील ५ हजार त्याने एका इसमाला दिले़ याच इसमाला घेवून दोघेही दुचाकीने लालपुलीया परिसरात असलेल्या टायरच्या दुकानात जावून त्या दुकानदाराला ३० हजार रुपये दिले व काही पैसे घेवून तेथेच असलेल्या एका वर्कशॉपकडे गेले़ उर्वरित रक्कम गाडीच्या डिक्कीत ठेवण्यात आली होती़ इंजिनिअरींग वर्कशॉपकडून दुचाकीकडे आले असता गाडीतील डिक्की उघडी दिसल्याने त्यांना संशय आला़ डिक्कीत पाहिले असता अज्ञात चोरट्याने डिक्कीतील १ लाख १५ हजार रुपये लंपास केल्याचे निदर्शनास येताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. लगेच या घटनेची तक्रार वणी पोलीसात तक्रार देण्यात आली आह़े गत काही दिवसापासून तालुक्यात चोरीच्या घटनात वाढ झाल्यामुळे नागरिकात भितीचे वातावरण पसरले आहे.
0
धावता ट्रक पेटला

यवतमाळ दि. ६ – सरकी घेऊन जाणाºया ट्रकने पेट घेतल्याची घटना आज कात्री जवळ घडली. पांढरकवडा येथून मथुराकडे हा ट्रक जात असताना अचानक टायर फुटल्याने पेट घेतला. काही क्षणातच आगीने रौद्ररुप धारण करून ट्रकला कवेत घेतली. या घटनेची माहिती मिळताच नगर परिषद अग्निशमन दलाने घटनास्थळ गाठून पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. तब्बल दोन तास या मार्गावरील वाहतुक खोळंबली होती. यावेळी कुठलीही अनुचित प्रकार घटना घडू नये व वाहतुक सुरळीत करण्यासाठी पोलिस आपल्या ताफ्यासह तेथे पोहचले होते.
0
प्रेमीयुगुलास अटक

यवतमाळ, दि. ६ – दारव्हा तालुक्यातील महागाव (कसबा) शिवारातील शेतात लपून असलेल्या प्रेमीयुगुलास लाडखेड पोलिसांनी अटक केली. या कारवाईमुळे नागरिकांत विविध चर्चेला उधाण आले आहे.
वाशिम जिल्ह्यातील संदीप देवराव पिंगाने (२२) या युवकाने एका अल्पवयीन युवतीला प्रेमजाळ््यात ओढले. ‘साथ जियेंगे साथ मरेंगे’ अशी शपथ घेतलेल्या प्रेमीयुगुलाने घरून पळ काढला. या घटनेची माहिती युवतीच्या घरी माहित पडताच त्यांना मानोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. महागाव (कसबा) शिवारात असलेल्या शेतात प्रेमीयुगुल लपून असल्याची माहिती लाडखेड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी रात्रीच परिसर पिंजून काढायला सुरूवात केली. रात्री १ वाजता दरम्यान शंकर परांडे यांच्या शेतात प्रेमीयुगुल लपून असल्याचे आढळून आले. लगेच दोघांना अटक करून पोलिसांनी लाडखेड पोलीस ठाणे गाठले. वाशिम जिल्ह्यातून पळून आलेल्या प्रेमीयुगुलास अटक करण्यात आल्याच्या चर्चेने परिसरात खळबळ उडाली. ही कारवाई बिट जमादार राजेश्वर राठोड, सलीम पप्पुवाले, शेख अनिस,मनीषा दुथळे,बंडू ताजणे आदींनी केली.
0
ज्येष्ठ पत्रकार देविदास भोरे यांचे निधन

यवतमाळ दि. ६ – येथील दै. सिंहझेपचे संस्थापक संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार देविदास भोरे यांचे पहाटे ३ वाजतादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते ६८ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा व बराच मोठा आप्त परिवार आहे.
देविदास भोरे यांनी आपली संपूर्ण हयात पत्रकारितेला अर्पण केली होती. दै. सिंहझेपची स्थापना करून त्यांनी अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिला. देविदास भोरे यांच्या तालमित तयार झालेले अनेक पत्रकारांनी आपल्या क्षेत्रात नावलौकीक मिळविला आहे. त्यांना महाराष्टÑ शासनाच्या वतीने ‘दर्पण’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. विदर्भवादी असलेले भोरे यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी अनेक आंदोलने केली होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पत्रकार, लोकप्रतिनिधी, साहित्यिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी निवास्थान गाठून श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या पार्थिवावर आज ६ वाजता स्थानिक पांढरकवडा मार्गावरील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी खा. जांम्बुवंतराव धोटे, माजी आ. विजया धोटे यांच्यासह मोठ्यासंख्येने नागरिक उपस्थित होते.









