
मुंबई- भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय लष्करातील जवानांसाठी एक अशोक चक्र, तीन किर्ती चक्र आणि नऊ शौर्य चक्र पुरस्कारांना राष्ट्रपतींनी मान्यता दिली आहे. याशिवाय मेजर मुकुंद वरदराजन यांना १५ ऑगस्ट २०१४ रोजी जाहीर करण्यात आलेले अशोक चक्र या यादीत समाविष्ट करण्यात आले असून ते प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सोमवारी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहे.
राजपुताना रायफलचे जवान नाईक नीरज कुमार सिंग (मरणोत्तर) यावेळी अशोक चक्र जाहीर करण्यात आले आहे. तर १५ ऑगस्ट रोजी राजपूत रेजिमेंटचे मेजर मुकुंद वरदराजन जाहीर झालेला अशोक चक्र (मरणोत्तर) यांचाही समावेश यात आहे. तर किर्ती चक्र पुरस्कारात राष्ट्रीय रायफलचे कॅप्टन जयदेव, सुभेदार अजय वर्धन(मरणोत्तर) आणि गोरखा रायफल्सचे नायब सुभेदार कोश बहादूर गुरंग या तिघांचा समावेश आहे.
शौर्य चक्रात पंजाब रेजिमेंटचे लेफ्टनंट कर्नल संकल्प कुमार (मरणोत्तर), चार पॅरा (एसएफ)चे मेजर मुकुल शर्मा, आर अँड ओ फ्लाइटचे इंजिनिअर मेजर अभिजय (मरणोत्तर), राष्ट्रीय रायफल्सचे मेजर आाशुतोष कुमार पांडे, इंजिनिअर मेजर आर वामशी कृष्णन, ५/५ जीआर एफएफचे मेजर बिभांशू धोंडियाल, २० महारचे नाईक स्वरुप कुमार घोराई, बटालियन पॅराशूट रेजिमेंटरचे पॅरादूपर बलविंदर सिंग (मरणोत्तर) आणि जम्मू व काश्मीर रायफल्सचे रायफलमन मंगा राम यांचा यात समावेश आहे.
तर जीवनरक्षा पदकासाठी जितेश काळे, भूषण संखे हे मानकरी ठरले आहेत. धाडसाने दुस-याचा जीव वाचवणा-या व्यक्तींना तीन प्रकारच्या जीवनरक्षा पदक पुरस्कारांनी सन्मानित केले जाते तर पदक, गृहमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र आणि एक रकमी डिमांड ड्राफ्ट असे या पुरस्काराचे स्वरुप असते.
तसेच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला यंदा भारतीय हवाई दलातल्या ८३ जणांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सहा एअर मार्शल्सना परम विशिष्ट सेवा पदक, दोन एअर मार्शल्स, चार एअर व्हाईस आणि नऊ एअर कमांडर्सना अति विशिष्ट सेवा पदके जाहीर झाली आहेत.
Archive for January 25th, 2015
0
राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहीर
0
प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस पदक जाहीर

नवी दिल्ली – यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ९६७ जणांना पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहेत. यापैकी २५ जणांना शौर्यासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते पोलिस पदक, ९८ जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक तर ७१२ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकाने गौरविण्यात येणार आहे.
राज्यातील दिवंगत हवालदार गणपत नेवरु मडवी यांना मरणोत्तर राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक जाहीर झाले आहे. याशिवाय दिवंगत पोलीस नाईक गिरीधर अत्राम, पोलीस अधिक्षक यशवंत काळे, पोलीस उप निरीक्षक प्रकाश वाघमारे, पोलीस नाईक सदाशिव मढवी, पोलीस नाईक गंगाधर सिडाम, पोलीस हवालदार मुरलीधर वेलाडी, पोलीस उप निरीक्षक अतुल तावडे, पोलीस उप निरिक्षक अंकुश माने, पोलीस नाईक विनोद हिचामी, पोलीस हवालदार दिवंगत सुनील मडवी, पोलीस नाईक इंदरशाह सडमेरु, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र कुमार तिवारी, पोलीस उप निरीक्षक अविनाश गडख, पोलीस हवालदार रमेश येडे, पोलीस नाईक वामन पारधी, पोलीस नाईक राधेश्याम गटे, पोलीस नाईक उमेश इंगळे, पोलीस अधिक्षक मोहम्मद, सुवेझ हक यांना पोलीस शौर्य पदक जाहीर करण्यांत आले आहे. याव्यतिरिक्त उर्वरित दोन प्रकारच्या पुरस्कारांमध्येही महाराष्ट्रांतील अनेकांचा समावेश आहे.
जीवनरक्षा पदक पुरस्कार-२०१४ जाहीर
२०१४ या वर्षातील ‘जीवन रक्षक पदक’ पुरस्कारांकरिता राष्ट्रपतींनी ५६ व्यक्तींच्या नावाला मंजूरी दिली. सर्वोत्तम जीवन रक्षा पदकासाठी चार जणांची, उत्तम जीवनरक्षा पदकासाठी १७ जणांची आणि जीवनरक्षा पदकासाठी ३५ जणांची निवड झाली आहे.
यापैकी २७ जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात उत्तम जीवनरक्षा पदकात महाराष्ट्रातील शशिकांत पवार आणि गणेश अहिरराव यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे.
0
भारत-अमेरिका मैत्री जगाच्या हिताची – बराक ओबामा

नवी दिल्ली- भारत-अमेरिका परस्पर सहकार्य कायम ठेवणार असून भारत-अमेरिका मैत्री ही जगाच्या हिताची आहे. भारत-अमेरिका संबंध नव्या उंचीवर नेऊ, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओबामा यांनी हैदराबाद हाऊस येथे संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजमेर, विशाखापट्टणम व अलाहाबाद या तीन शहरांचा विकास आम्ही करू. ही तिन्ही शहरे स्मार्ट बनवू, असे आश्वासन ओबामा यांनी दिले आहे. मोदींचे मॅडिसन स्क्वेअर येथे बॉलिवूड स्टारप्रमाणे स्वागत करण्यात आल्याची आठवणही त्यांनी सांगितली. त्याबद्दल त्यांनी मोदींचे कौतुक केले.
ओबामा यांनी हिंदीतून ‘नमस्ते‘ असे म्हणत आपल्या संवादाला सुरुवात केली. ‘भारतवासीयों को मेरा प्यार भरा नमस्कार‘ असेही हिंदीतून बोलत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी दहशतवादाविरोधात लढण्याबाबत दोन्ही देशांमध्ये एकमत झाल्याचे मोदी यांनी सांगितले. या शतकाच्या वाटचालीला एका व्यक्तिमत्वाप्रमाणे आकार देण्यासाठी भारत-अमेरिका संबंध महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
भारत-अमेरिका अणुकरारातील दोन महत्त्वाचे अडसर दूर
भारत आणि अमेरिका यांच्यामधील महत्त्वाकांक्षी अणुकरारातील दोन मुद्द्यांवर सहमती झाल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले. तसेच अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात सहकार्य करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यासोबतच दहशतवादाशी दोन हात करताना कोणतीही तडजोड होणार नाही, असेही बराक ओबामा आणि नरेंद्र मोदी म्हणाले. भारताला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळावे यासाठी आम्ही पाठिंबा देऊ असे आश्वासनही त्यांनी दिले.
संयुक्त पत्रकार परिषदेत संबोधन करण्याआधी दुपारी मोदी आणि ओबामा यांच्यात २० मिनिटे चर्चा झाली. यावेळी मोदींनी स्वत: ओबामांसाठी चहा तयार केला. त्यानंतर ‘थँक्यू फॉर द चाय पे चर्चा’ असा उल्लेख ओबामा यांनी आपल्या संबोधनात केला.
ओबामांचे आभार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे तीन दिवसाच्या भारत दौ-यावर असून रविवारी दुपारी हैद्राबाद हाऊसमध्ये ओबामा आणि मोदी यांच्यात सुमारे दीड ते दोन तास चर्चा झाली. या चर्चेनंतर ओबामा आणि मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मोदींनी व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून भारत दौ-यावर आल्याबद्दल ओबामांचे आभार मानले. दोन्ही देशांमधील नैसर्गिक संबंध असून संरक्षण, उत्पादन या क्षेत्रात दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करतील असे मोदींनी सांगितले. दहशतवादाविरोधात लढण्यात दोन्ही देशांमध्ये एकमत असल्याचा पुनरुच्चार मोदींनी केला. तर ओबामा यांनीही भारतीयांच्या आदरातिथ्यामुळे भारावून गेल्याचे सांगितले.
हिंदीचा शब्दांचा वापर
नमस्ते, नमस्कार, भारतवासीयों को मेरा प्यार भरा नमस्कार.. असे सांगत ओबामा यांनी भाषणाची सुरुवात केली. ‘चाय पे चर्चा’ या हिंदी शब्दाचा वापर करुन त्यांनी भारतीयांवर स्वतःची छाप पाडण्याचा प्रयत्न केला.
0
चिंतामणी दहिहांडीसाठी लाखो भाविकांची गर्दी

कळंब, दि. २५ – विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया श्री चिंतामणी जन्मोत्सवानिमित्त २१ जानेवारीपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आज रविवारी आयोजीत दंहिहांडी कार्यक्रमासाठी लाखो भक्तांनी गर्दी करून दर्शन घेतले.
श्री चिंतामणी उत्सवानिमित्त शहरातून मिरवणुक काढण्यात आली. त्यानंतर दहिहांडी शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये १०० च्यावर भजनी मंडळ व दिंड्यासह लाखो भक्तांनी सहभाग घेतला होता. यामध्ये ज्ञानेश्वर भजनी मंडळ कोठा, मुंगसाजी भजनी मंउळ कळंब, शारदा भजनी मंडळ कळंब, चिंतामणी महिला भजनी मंडळ, गाडगेबाबा महीला भजनी मंडळ, मोरया भजनी मंडळ, तपेश्वर भजनी मंडळ, गुरुदेव दत्तात्र्य भजनी मंडळ, गुरुदेव भजनी मंडळ, भगतसिंग भजनी मंडळ, राणी लक्ष्मी भजनी मंडळ, जयगुरू भजनी मंडळ, गजानन महाराज भजनी मंडळ, मंगलमुर्ती भजी मंडळ, स्वामी समर्थ भजनी मंडळ याच्या अन्य मंडळाचा समावेश होता. त्याच प्रमाणे जिल्हा परिषद बेसिक शाळा, जिल्हा परिषद कन्या शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवशक्ती कन्या हायस्कुल, कनिष्ठ महाविद्यालय, गणेश विद्यानिकेतन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरी महाल व राजुरा येथील विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झाले होते. या शोभायात्रेला चिंतामणी मंदिरापासून सुरूवात करण्यात आली. शहरातील इंदिरा चौक, राममंदिर, पोलीस स्टेशन, गांधी चौक, नेहरु चौक, तथागत नगर, गाडगेबाबा पुतळा मैदान आदि मार्गाने शोभायात्रेने मार्गक्रम केले. यावेळी तरुणांनी चौकाचौकात पिण्याचे पाणी व शरबतची व्यवस्था केली होती. यावेळी अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
0
पुसदमध्ये आगीत सहा घरे जळून खाक

पुसद , दि. २५ – शहरात दोन वेगवेगळ््या लागलेल्या आगीत सहा घरांची राखरांगोळी झाली. ही घटना काल दुपारी व रात्री दरम्यान घडली. शॉर्ट शर्कीटमुळे आग लागल्याचे सांगिल्या जात असून, सहा परिवार बेघर झाले आहे. आगीच्या तांडवात लाखो रुपयाचे नुकसान झाले.
घर जळून खाक झालेल्यांमध्ये पुंजाजी मोहकर (४५), छगन मोहकर (४५), बबन रामजी आढाव(४५),प्रभू रामजी आढाव, संतोष आढाव (३६),काळूराम मोहकर(५०), नासीर बेग (३५) यांचा समावेश आहे. शनिवारी दुपारी १२ वाजता दरम्यान दुबई परिसरात वीज प्रवाहातील दाबामुळे अचानक वायर, लाईट, टीव्हीमधून धूर निघायला लागता. बघता-बघता आग लागली. यात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान झाले. जवळपास दहा घरात हा प्रकार घडला. तर रात्री १२ वाजताच्या सुमारास वसंतनगर भागातील बेंडकी परिसरात अचानक धूर निघताना दिसला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेण्यापूर्वी सहा घरांनी पेट घेतला होता. शहरात तणावपूर्ण शांतता असल्याने विविध चर्चेला उधाण आले होते. मात्र ही आग शॉर्ट शर्कीटने लागल्याचे स्पष्ट झाले. रात्री आग लागलेल्या घरातील सदस्य बाहेरगावी गेले होते. सर्व घरे लाकडी पाट्यांची असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. परिसरातील नागरिकांनी घराघरातून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या पथकाला आगीची माहिती मिळाल्यानंतर ते उशीराच दाखल झाले. त्यातली बंब अर्धाच भरला असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला.
0
विविध अपघातात तीन ठार

यवतमाळ दि. २५ – जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याच्या घटना आज रविवारी घडल्या.
शेतकरी ठार
बोरी (अरब) – भरधाव वाहनाने धडक दिल्याने कामनदेव येथील शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना आज रविवारी रात्री ७ वाजता यवतमाळ रोडवर गावालगत घडली.
किसन पवार (६०) रा. कामनदेव असे मृतकाचे नाव आहे. आज सायंकाळी ते शेतात जात होते. अशातच समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने पवार हे रक्ताच्या थारोळ््यात रस्त्यावर कोसळले. यावेळी चालकाने वाहनासह तेथून पोबारा केला. घटनेनंतर अर्धा तास तेथेच पडून राहील्याने पवार यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच लाडखेड पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरूद्घ गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
इसम जागीच ठार
उमरखेड – महागाववरून उमरखेडकडे जात असलेल्या भरधाव ट्रकने धडक दिल्याने इसम जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी १० वाजता घडली. किसन रामसिंग पवार (५८) रा. चिल्ली असे मृतकाचे नाव आहे. महागाव वरून उमरखेडकडे जाणाºया एम.एच. ३१/ सी कयु २४२९ क्रमांकाच्या ट्रकने चिल्ली या गावाजवळ पवार यांना जोरदार धडक दिली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी इंदल चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाविरूद्घ गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
अज्ञात वाहनाने एकाचा मृत्यू
यवतमाळ – अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार झाल्याची घटना दारव्ह्यानजीक घडली. गजानन वाघमारे रा. कुपटा असे मृताकचे नाव आहे. गजानन दुचाकीने जात असताना, समोरून येणाºया भरधाव वाहनाने त्याला धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या गजाननला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून, याबाबत रमेश वाघमारे यांनी दारव्हा पोलीस स्टेशनला तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी चालकाविरुद्घ गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
0
आॅटो उलटून मुलगा ठार, सात जखमी

नेर दि. २५, – देवदर्शनासाठी जाणारा आॅटो उलटून एक मुलगा ठार तर सात जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी १० वाजता पिंप्री मुखत्यारपूर येथे घडली.
सुरज घनशाम राठोड (६) रा. ब्राम्हणवाडा (पूर्व) असे मृतकाचे नाव आहे. तर धु्रपदा भगवान राठोड (६०), सचिन हरिहर चरडे (१८), विठ्ठल कोल्हे (४५), आॅटो चालक घनशाम राठोड (४५) , पार्वता राठोड, प्रज्वल मडावी, सायली राठोड आदि सात जण जखमी झाले असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. ब्राम्हणवाडा पूर्व येथुन आज २५ जानेवारी रोजी अमरावती जिल्ह्यातील भिलटेक येथे ते देवदर्शनासाठी आॅटोने (एम.एच. २९ / व्ही ८२९८) जात होते. अशातच पिंप्री मुखत्यारपूर चालकाने नियंत्रण सुटल्याने आॅटो उलटला. यामध्ये सदर मुलगा ठार झाला तर उर्वरीत सात जण जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी आॅटो चालकाविरूद्घ गुन्हा दाखल केला असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.
0
मूकबधीर मुलीवर बलात्कार; तीन अटक

नांदेड – तीन सेवक आणि विद्यार्थ्यांकडून सतत होत असलेल्या बलात्काराच्या प्रकाराला कंटाळून मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला. यामुळे सामुहिक बलात्काराचे गूढ उकलले आहे. याप्रकरणी बिलोली तालुक्यातील नरसी येथील निवासी मूकबधीर विद्यालयाच्या तीन सेवकांना पोलिसांनी अटक केली.
अल्पवयीन मूकबधीर मुलीला वडील नसल्याने व तिची आईच मोलमजुरी करून तिच्या शिक्षणाचा खर्च चालवत असते. गेल्या दोन वर्षांपासून या शाळेत शिकणाऱ्या या मतीमंद मुलीसोबत काही मुलांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. हा प्रकार शाळेतील तीन सेवकांच्या लक्षात येताच त्यानी संस्थाचालक किंवा मुख्याध्यापकाकडे तक्रार न करता त्यांनी ही या मुलीशी अनैतिक संबंध प्रस्थापित केले. मकर संक्रातीच्या सणाला ही मुलगी आईकडे नरसी येथे आली असताना भेदरलेली दिसत होती. कोणालाही काहीही न बोलता तिने १८ जानेवारी रोजी तिने अंगावर रॉकेल ओतून घेतले व काडी लावणार इतक्यात, तिच्या धाकट्या बहिणीने तिच्या जवळील काडीपेटी हिसकावून घेतली. हा प्रकार का करीत आहेस अशी विचारणा केल्यानंतर तिने खाणाखुणाच्या भाषेत झालेल्या सामूहिक अत्याचाराचा पाढा वाचला. त्यानंतर या मुलीच्या आईने या मुलीच्या काकाला बोलावून हा घृणास्पद प्रकार कथन केला. तेंव्हा मुलीच्या काकाने मुकबधीर विद्यालयच्या मुख्याध्यापकास हा प्रकार सांगितला. मुख्यध्यापकांनी तीनही सेवकांना पाठीशी घालत संस्थेची बदनामी होईल म्हणून पालकांना गप्प राहण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मुलीचे काका,आईने रामतीर्थ पोलिस ठाणे गाठले. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून देवीदास शंकर चिखले, मुजीब बाबूमिया शहजोर आणि चंद्रभान संभाजी भरणे यांना अटक करण्यात आली. बाकी सर्व आरोपी १२ ते १४ वयोगटातील आहेत.
0
पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार

जम्मू – अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतात दाखल होण्यापूर्वी पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
पाकिस्तानी रेंजर्सनी मध्यरात्रीच्या सुमारास आर.एस.पूरा सेक्टरमधील जोगवानमधील सीमा सुरक्षा दलाच्या चौकीवर गोळीबार केला. पाकिस्तानी रेंजर्सनी रात्रीच्या एकच्या सुमारास छोटया शस्त्रास्त्रामधून काही मिनिटे गोळीबार केला. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले.
या गोळीबारात भारताच्या बाजूला जीवितहानी झाली नाही. २२ जानेवारीलाही पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन, सांबा जिल्ह्यातील सीमा सुरक्षा दलाच्या चौकीवर गोळीबार केला होता.
२१ जानेवारीला बीएसएफने अर्णियामध्ये घुसखोरीचा कट उधळून लावला होता. बराक ओबामा यांच्या तीन दिवसीय भारत दौ-याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने पाकिस्तानला भारतात कुठेही दहशतवादी कृत्य करु नका असे बजावले आहे.
0
बराक ओबामा भारतात दाखल

नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतात दाखल झाले आहेत. सकाळी साडेनऊच्या सुमारास नवी दिल्लीच्या पालम विमानतळावर बराक ओबामांच्या एअरफोर्स-वन विमानाचे लँण्डीग झाले.
राजशिष्टाचार बाजूला ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विमानतळावर ओबामा पती-पत्नींचे स्वागत केले. बराक ओबामा यांच्या वाहनांचा ताफा हॉटेलच्या दिशेने रवाना झाला आहे. बराक ओबामा हॉटेलमध्ये थोडावेळ विश्रांती घेऊन, नंतर राष्ट्रपती भवनात जाणार आहेत. राष्ट्रपती भवनात बराक ओबामांना मानवंदना दिली जाईल. तेथे राष्ट्रपती प्रणव मुखर्जींशी ते चर्चा करतील.
त्यानंतर राजघाटावर जाऊन महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळावर आदरांजली वाहतील. त्यानंतर हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी व ओबामा यांच्यात चर्चा होईल. रात्री ओबामा यांच्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी खास मेजवानीचे आयोजन केले आहे.
ओबामा २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणारे ते अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत तसेच राष्ट्राध्यक्षपदाच्या कारर्कीदीत दुस-यांदा भारत दौ-यावर आलेले ते पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत.
ओबामा यांच्या तीन दिवसीय भारत दौ-याला सुरुवात झाली आहे. ओबामांच्या या दौ-याच्या निमित्ताने दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होतील. या दौ-यात अणू, संरक्षण, तंत्रज्ञान हस्तांतर, आर्थिक, पर्यावरण आदी करार होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ओबामा यांनी आग्रा येथील ताजमहाल भेटीचा कार्यक्रम रद्द केल्याबद्दल खेद व्यक्त केला.
0
डॉ. आंबेडकरांचे लंडनमधील निवासस्थान सरकार विकत घेणार


मुंबई – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील निवासस्थान राज्य सरकार विकत घेणार असून, त्याचे रूपांतर स्मारकामध्ये केले जाणार आहे. डॉ. आंबेडकर यांनी निवास केलेले हे घर मूळ मालकाने ३५ कोटी रुपयांना विक्रीस काढले होते. त्यानुसार हे घर विकत घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. डॉ. आंबेडकर यांच्या १४ एप्रिलच्या जयंतीला हे घर स्मारक म्हणून जनतेसाठी खुले केले जाणार आहे.
१९२१ ते २२ अशी दोन वर्ष डॉ. आंबेडकर यांचे वास्तव्य लंडन येथील या घरात होते. हे घर विक्रीस काढले होते. याबाबत बुद्धिस्ट फोरमच्या संतोष दास पाठपुरावा करत होत्या. जागतिक शिक्षणमंत्र्यांच्या परिषदेसाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे लंडन येथे गेले आहेत. यावेळी तावडे यांनी यासंदर्भात फोरमच्या अध्यक्षा दास यांच्याशी संपर्क साधून व्यवहाराची माहिती घेतली.
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हे घर विकत घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी तावडे यांनी बुद्धिस्ट फोरम आणि भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकारी यांच्यासमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाला भेट दिली.
त्यानंतर इंडिया हाऊसमध्ये ब्रिटिश उच्चायुक्त रंजन मथाई, बुद्धिस्ट फोरमच्या संतोष दास, तेथील उच्च अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या घर खरेदीसाठी कायदेशीर आणि परदेशातील खरेदीचे नियम पूर्ण करून २ महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
0
वाचन संस्कृती रूजविण्यासाठीच ग्रंथोत्सवाचे आयोजन – राजेश खवले

यवतमाळ दि. 24 : वाचनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येकाने वाचन ही आवड म्हणून विकसीत केली पाहिजे. त्याच अनुषंगाने सर्वसामान्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासोबतच
विविध प्रकारची पुस्तके सहजरित्या एकाच ठिकाणी वाचकांना उपलब्ध व्हावी म्हणून ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी दिली.
यवतमाळ येथे दिनांक 31 जानेवारी पासून तीन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून त्या निमित्त निवासी उपजिल्हाधिकारी खवले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा माहिती कार्यालय येथे बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस समितीचे सदस्य ज्येष्ठ कवी शंकर बडे, प्रा.देवेंद्र पुनसे, प्राचार्य डॅा.आशा देशमुख, प्राचार्य अविनाश शिर्के, ग्रंथालय संघटनेचे कार्यवाह विनोद देशपांडे, अंकुर साहित्य संघाचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक सुरेश गांजरे, बाबाराव मडावी, कवी आनंद गायकवाड, योगानंद टेभुर्णे, विनोद बुरबुरे, प्रा.निलेश भगत, आनंद कसंबे, प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, नपचे मुख्याधिकारी रविंद्र पांढरे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने तथा आयोजन समितीचे सदस्य सचिव प्र.जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यावेळी उपस्थित होते.
सुरुवातीस मंगेश वरकड यांनी ग्रंथोत्सव आयोजनाच्या तयारीची माहिती दिली. यावेळी खवले यांनी राज्यातील नामवंत पुस्तक प्रकाशकांसोबतच युवकांना उपयुक्त ठरणाऱ्या पुस्तकांची प्रदर्शनीही ठेवल्या जाईल, असे सांगितले. शासनाच्यावतीने वेळोवेळी प्रकाशीत होणारी परंतु वाचणीय पुस्तके आवर्जुण वाचकांना ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने उपलब्ध करुन देण्यात यावी, असे ते म्हणाले.ग्रंथोत्सवानिमित्त पुस्तक प्रदर्शन व विक्रीसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचेही आयोजन करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली. बैठकीला उपस्थित आयोजन समितीच्या सदस्यांनी मौलिक सूचना केल्या. शेवटी आभार अंकुर साहित्य संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश गांजरे यांनी मानले. सदर ग्रंथोत्सव दिनांक 31 जानेवारी ते 2 फेब्रूवारी दरम्यान नगर परिषदेच्या नगर भवन येथे होणार आहे.









