मी , आर आर …..
नमस्कार .
मी रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर आर पाटील.
लोक मला प्रेमाने आबा म्हणतात. आणि आता तीच माझी ओळख बनलेली आहे.
१६ ऑगस्ट १९५७ साली महाराष्ट्र राज्यातल्या सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यात माझा जन्म झाला. अंजनी हे माझे जन्मगाव. शिक्षण क्षेत्रातल्या मा. प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या शाळेत मी माझ्या लहानपणी श्रमदान करून शिकलो. पुढे सांगलीतल्याच शांतीनिकेतन महाविद्यालामध्ये मी कला शाखेची पदवी घेतली. आणि नंतर मी वकिलीचेही शिक्षण पूर्ण केले.
माझ्या सुरवातीच्या राजकीय जीवनामध्ये मी प्रथम १९७९ ते १९९० पर्यंत सांगली जिल्हा परिषदेचा सदस्य होतो. नंतर १९९०, १९९५ ,१९९९ , २००४ आणि २००९ साली मी महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलो.
महाराष्ट्रामध्ये ग्राम विकास मंत्री म्हणून जे गाडगे महाराज स्वच्छता अभियान मी राबवलं त्यामुळे पवार साहेब आणि महाराष्ट्रातल्या जनतेकडून मला शाबासकी आणि प्रोत्साहन मिळालं.
मी स्व:त बद्दल बोलायला फार संकोची माणूस आहे. या ब्लॉगच्या निमित्ताने मी माझ्याबद्दल जे तुम्हाला सांगतो आहे ते सांगताना सुद्धा मला फार संकोच वाटतो . गृहमंत्री म्हणून कॅबिनेट दर्जाची मोठी जबाबदारी पवार साहेबांनी माझ्यावर दिली. माझ्या परीने मी हे काम निष्ठेने आणि पवार साहेबांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला तो सार्थ करण्याचा मी प्रयत्न केला . त्यात मला किती यश आले हे महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवायचे आहे. त्याबाबत मी या ब्लॉगवर काही बोलू इच्छित नाही.
माझ्या आयुष्यावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण , महाराष्ट्राचे महान लोकनेते वसंतदादा पाटील आणि माझे आदरणीय नेते आणि प्रेरणास्थान शरदचंद्र पवारसाहेब यांचा खूप मोठा प्रभाव आहे. त्यांनी आखून दिलेल्या वाटेवरून भयमुक्तता आणि विश्वासार्हता या दोन्ही गोष्टी महाराष्ट्रातल्या जनतेत पोलीसांमार्फत निर्माण करण्याचा मी सातत्याने प्रयत्न करतो आहे.
या व्यतिरिक्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या एका जबाबदार कार्यकर्त्याच्या भूमिकेतून मी पक्षाच्या कार्यक्षमतेमध्ये माझी बुद्धी , क्षमता आणि मेहनत या माध्यमातून पक्षाला अधिकाधिक देण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे. त्यात मला फार यश आले अथवा नाही याबद्दल माझे नेते आणि माझे सहकारीच सांगू शकतील.मला साधेपणा आवडतो. साधी, तळागाळातली माणसे यांच्या सोबत बसून गप्पा मारायला आवडतात, त्यांची सुख-दु:खे जाणून घ्यायला आवडतात. राज्यकर्त्या माणसाला हे खूप आवश्यक आहे असं मला व्यक्तिगतरीत्या वाटतं.
सत्ता, पैसे येतात आणि जातात पण जोडलेली माणसे आणि जीवाभावाचे खरे मित्र, उत्तम शरीरसंपदा हीच माणसाची खरी संपत्ती असते. या गोष्टीवरून आपल्या भोवतीच्या समाजाचा विश्वास उडत चाललेला दिसतो याचे मला खूप वैषम्य वाटते. अश्या वेळी रेड-इंडियन्स लोकांनी अमेरिकन लोकांना उद्देशून म्हणलेली एक म्हण मला नेहमीच आठवते. ती म्हणजे , “जो पर्यंत शेवटचं झाड मरत नाही, शेवटची नदी सुकत नाही आणि शेवटचा मासा जीव टाकत नाही तो पर्यंत या माणसांना कळणार नाही की माणूस पैसे खाऊन जिवंत राहू शकत नाही.”
माझ्याबद्दल याहून अधिक मी लिहू इच्छित नाही. मी जसा आहे तसा आहे त्याला माझा ईलाज नाही. काहींना मी आवडतो काहींना मी आवडत नाही. ज्यांना मी आवडत नाही त्यांच्याबद्दल माझ्या मनात अजिबात द्वेष नाही.माध्यमांनी मला प्रेमाच्या प्रसिद्धीचं जसं शिखर दाखवलं आहे तसच त्यांनी मला निंदेचा तळही दाखवला आहे. त्यामुळे आता मला गैरवाजवी टीका किंवा स्तुती बरोबर ओळखता येऊ लागलेली आहे.या ब्लॉग च्या माध्यमातून जो संवाद मी आपल्याशी साधत राहीन ते शब्द आणि ती वाक्य हे माझ अधिकृत म्हणणं आहे . माझं म्हणजे (आर आर पाटील ) याच . ते जसच्या तसं आपण छापायला माझी काही हरकत नाही.
Archive for February 16th, 2015
0
मी रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर आर पाटील.
0
आर.आर. पाटील यांचे निधन

मुंबई – मुंबई- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे सोमवारी दुपारी लिलावती रुग्णालयात निधन झाले. ते ५७ वर्षाचे होते.त्यांच्यावर ब्रीच कॅन्डी रुग्णालय, बॉम्बे हॉस्पिटल्समध्ये उपचार करण्यात आले. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. मध्यंतरी त्यांची प्रकृती उत्तम होती. त्यांनी चालण्याचा सरावही केला. मात्र, आज त्यांची प्रकृती पुन्हा खालावली.
दरम्यान, प्रकृती खालावल्याचे वृत्त समजताच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी सोमवारी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयाबाहेर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.
0
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला

कोल्हापूर – ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि विचारवंत गोविंद पानसरे यांच्यावर सोमवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात गोविंद पानसरे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर कोल्हापूरच्या अँस्टर आधार रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सकाळी आठच्या सुमारास गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापुरातील सागरमळा भागातील रहत्या घराजवळ हल्ला झाला. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा नेहमीप्रमाणे शिवाजी विद्यापीठ परिसरातून मॉर्निंग वॉकवरुन परतत असताना, दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी पानसरे आणि त्यांच्या पत्नींवर गोळया झाडल्या.
हल्लेखोरांनी एकूण तीन गोळया झाडल्या. त्यातील एक गोळी पानसरे यांच्या मानेला लागली. एक गोळी त्यांच्या हाताला चाटून गेली. उमा पानसरे यांनाही एक गोळी लागली मात्र त्यांच्या प्रकृतीला धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
गोविंद पानसरे यांची प्रकृती चिंताजनक असली तरी, स्थिर आहे. दुपारपर्यंत डॉक्टर पानसरे यांच्या प्रकृतीविषयी नेमकी माहिती देऊ शकतात. ज्या ठिकाणी गोळीबार झाला त्या ठिकाणाला पोलिसांनी वेढा घातला असून, पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टि्वटवरुन या हल्ल्याचा निषेध केला. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर हल्ल्याची बातमी ऐकून मला धक्का बसला. मी या हल्ल्याचा निषेध करतो. मी कोल्हापूरच्या पोलिस अधीक्षकांशी बोललो असून, आरोपींना पकडण्यासाठी वेगाने तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.
हल्लेखोरांना पकडण्यासाठी संपूर्ण राज्यभरात नाकाबंदी करण्यात आली असून, तपासासाठी दहा पथके बनवण्यात येणार आहेत. गोविंद पानसरे टोलविरोधी आंदोलनात सक्रीय आहेत. आघाडीवर राहून ते या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची पध्दती दोन वर्षांपूर्वी अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याशी मिळती-जुळती आहे.
डॉ.नरेंद्र दाभोळकर यांची भररस्त्यात गोळया झाडून निर्घुण हत्या करण्यात आली होती. सकाळच्या समयी डॉ. दाभोळकर यांना एकटयाला गाठून त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळया चालवल्या होत्या. अजूनही या मारेक-यांचा शोध लागलेला नाही.
0
संत सेवालाल महाराज यांचा २७६वा जयंती महोत्सव उत्साहात

कल्याण,(प्रतिनिधी), – बंजारा समाजाचे अाराध्य दैवत संत श्री जगतगुरु संत सेवालाल महाराज यांचा,दर वर्षाप्रमाणे यावर्षीही १५ फेब्रुवारी ला २७६ वा जयंती महोत्सव संपूर्ण भारतभर बंजारा समाजबांधवानी अतिशय अानंदात साजरा केला.
कल्याण शहरातील अंबिवली येथे,राष्ट्रीय बंजारा टायगर्स,कल्याण तालुका या सामाजिक संघटनेच्या वतीने संत सेवालाल महाराज यांचा २७६ वा जयंती महोत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात अाला असुन,समाज बांधवांच्या समस्यांचा अाढावा घेण्यात अाला,तसेच समाजातील लोकांना जागृत करण्याचे काम अाजच्या तरुण पिढीने करावा, असे अावाहन समाज सेवक मा.अजय राठोड साहेब व कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेनेचे नगर सेवक मा.दशरथजी तरे साहेबांनी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष दशरथजी तरे, प्रमुख अतिथी समाज सेवक अजय राठोड (जि.प.ठाणे),अशोकभाऊ चव्हाण (प्रदेश सरचिटणीस-रा.बं.टा),संतोषभाऊ चव्हाण(मुंबई प्रदेशाध्यक्ष- रा.बं.टा),मा.सुदामभाऊ चव्हाण(ठाणे जिल्हाध्यक्ष- रा.बं.टा),मा.सतिष राठोड(कल्याण तालुकाध्यक्ष – रा.बं.टा),मा.डाॅ.अविनाश राठोड,डाॅॅ.युवराज राठोड,इ.पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी-रा.बं.टा टिम-अंकुश जाधव,विष्णु नाईक,.तेजराव चव्हाण,वकिल राठोड,अनिल चव्हाण,भास्कर पवार,विकास पवार,इंदल चव्हाण,अंकुश जाधव,श्यामराव राठोड,दिलीप राठोड,विश्वनाथ पवार,अनिल चव्हाण,जगदिश जाधव,सौ.सुनिता चव्हाण,सौ.अनुसया चव्हाण,सुरेखा राठोड इ.कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.










