
नाशिक – नाशिक मनपा जवळ सुयोजित हाईटसमधील एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयाबाहेर बॉम्ब ठेवणा-याला अटक करण्यात आली आहे. बॉम्ब ठेवणारा आरोपी १२वीचा विद्यार्थी आहे. नाशिक पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फूटेज तपासून बॉम्ब ठेवणा-याला अटक केली आहे. बॉम्ब ठेवणा-या तरुणाची चौकशी सुरू असून लवकरच संपूर्ण घटनेवर प्रकाश पडेल, अशी माहिती नाशिक पोलिसांनी दिली.
अटक करण्यात आलेला तरुण बॉम्ब ठेवण्यासाठी येताना चेह-यावर रुमाल बांधून स्कूटरवरुन आला होता. स्कूटर मनपाजवळ बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयाबाहेर उभी करुन तरुण एक खोका घेऊन कार्यालयात गेला. चेह-यावरील रुमाल न काढता त्याने कुरिअर घेऊन आल्याचे सांगितले. बांधकाम व्यावसायिकाकडे काम करणा-या शिपायाने तरुणाला खोका कार्यालयाच्या दरवाज्याजवळील टेबलावर ठेवून जाण्यास सांगितले. बाहेर पडल्यावर तरुणाने थोड्यावेळाने बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात फोन करुन बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. फोन आल्यानंतर लगेच बांधकाम व्यावसायिकाच्या कर्मचा-यांनी तरुणाने आणलेला खोका कार्यालयाच्या इमारतीबाहेर नेऊन ठेवला आणि पोलिसांना बोलावले. पोलिसांनी बॉम्ब शोक पथकाच्या सहकार्याने खोक्यातील बॉम्ब निकामी केला होता.
Archive for February 27th, 2015
0
मनपाजवळ बॉम्ब ठेवणा-या विद्यार्थीला अटक
0
भू-संपादन विधेयकात बदल करण्यास मोदींची तयारी

नवी दिल्ली- भूसंपादन विधेयकाला झालेल्या तीव्र विरोधामुळे आता भू-संपादन विधेयकात शेतक-यांच्या हितासाठी काही बदल करणे आवश्यक असल्यास ते करण्यास आम्ही तयार आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणानंतर लोकसभेत उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी नरमाईची भूमिका घेतली. मात्र भूसंपादन विधेयक, मनरेगा, काळा पैसा, जनधन योजना अशा अनेक मुद्यांवर मोदींनी विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केला.
सुरुवातीला काही बदल करणे आवश्यक असल्यास ते बदल करु, असे म्हणणा-या मोदींनी काही क्षणातच सरकारने प्रस्तावित केलेले भूसंपादन विधेयक देशातील शेतक-यांच्या हिताचेच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मात्र त्यात काही बदल करायचे असल्यास विरोधी पक्षांनी चर्चा करावी. आम्ही खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत चालायला तयार आहोत. मात्र कारणाशिवाय आणि राजकीय स्वार्थासाठी भूसंपादन विधेयकाला विरोध करु नका, असे मोदी म्हणाले.
त्याचबरोबर काँग्रेसचे भू-संपादन विधेयक शेतक-यांच्या फायद्याचे असते तर लोकांनी त्यांना निवडून दिले असते, अशी मुक्ताफळेही मोदींनी उधळली. तसेच हे सरकार गरिबांसाठी काम करणार असल्याचे आश्वासन दिले. मनरेगा हा काँग्रेसचा ६० वर्षांतला जिवंत पुरावा आहे. हा पुरावा मी मिटवणार नाही. मनरेगा हे काँग्रेसच्या अपयशाचे स्मारक आहे. त्यामुळे आम्ही ती योजना बंद करणार नाही. काळ्या पैशाच्या बाबतीत जी-२० च्या व्यासपीठावर हा विषय घेण्यात आला आहे. तीन वर्ष सरकारने काळ्या पैशासाठी एसआयटी स्थापन केली नव्हती, आम्ही ते काम पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत केले. योजना कुणी आणली, तिचे नाव काय आहे, हा मुद्दा नाही, तर समस्या आहे हे सगळ्यांना मान्य आहे ना, मग समस्या कशी सोडवायची हा मुद्दा आहे. देश स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊ. जनतेच्या समस्या, शेतक-यांचे प्रश्न सर्वजण मिळून सोडवू. काळा पैसा परत आणण्यासाठी ज्यांच्यावर दबाव टाकायचा आहे, त्यांच्यावर सर्वांनी मिळून दबाव टाकू, असे आवाहन मोदी यांनी केले.
0
पतीने जाळून घेतले – पतीचा मृत्यू, वाचविण्याच्या प्रयत्नात पत्नी भाजली

कळंब दि. २७ – कौटुंबिक कलहातून वाद निर्माण झाल्याने रागाच्या भरात पतीने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यामध्ये सदर इसमाचा मृत्यू झाला तर वाचविण्यासाठी गेलेली त्याची पत्नीही गंभीरपने भाजली असून मृत्यूशी झुंज देत आहे. तालुक्यातील बोरी महाल येथे गुरुवारी रात्री ८ वाजता ही घटना घडली असून गावात खळबळ उडाली आहे.
गणेश सिताराम मेश्राम (३८) असे मृतकाचे तर सुनंदा गणेश मेश्राम (३०) रा. बोरी महाल असे जखमी पती-पत्नीची नावे आहेत. गणेश हा पत्नीसोबत सतत क्षुल्लक कारणावरून वाद करून भांडण करीत होता. अशातच शुक्रवारी २६ फेबु्रवारी रोजी रात्री ८ वाजता पती-पत्नीचे कडाक्याचे भांडण झाले. यावेळी रागाच्या भरात गणेशने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यावेळी त्याला वाचविण्यासाठी गेलीली त्याची पत्नी सुनंदा ही गंभीरपणे भाजली. हा प्रकार लक्षात येताच नातेवाईक व गावकºयांनी मेश्राम दाम्पत्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र ९० टक्के जळाल्याने गणेशचा रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर ६० टक्के भाजलेली सुनंदा ही मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. त्याच्या मागे दोन मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
0
मुलीवर अतीप्रसंग करण्याचा प्रयत्न . आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावास

यवतमाळ . दि. २७ – घरी एकटी असल्याचे पाहुन मुलीवर अतीप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाºया आरोपीला तीन वर्ष सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली. अतिरीक्त सत्र न्यायाधिश ए.सी. चाफले यांच्या न्यायालयाने आज शुक्रवारी या खटल्याचा निकाल दिला.
रमेश तिमाजी ठाकरे (४५) रा. पहुर पुनर्वसन ता. बाभूळगाव असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. गावातीलच १३ वर्षीय बालिकेला राहत्या घरी एकटी टिव्ही पाहत असताना रमेश घरात घुसला. त्यानंतर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बालिकेने सुटका केली. याप्रकरणी बाभूळगाव पोलिसांनी आरोपी रमेशविरूद्घ गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी जमादार रमेश मगर यांनी आरोपीला अटक करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. हा खटा न्या. ए.सी. चाफले यांच्या न्यायालयात चालला. सरकारी पक्षाच्या वतीने सात साक्षी तपासण्यात आल्या. रमेशला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये तीन वर्ष सश्रम कारावास, ५०० रुपये दंड आणि भांदवि ३५४, ४४८, ४५२ या कलमान्वयेही शिक्षा ठोठावयात आली आहे. या खटल्यात अतिरीक्त सरकारी वकील अॅड. निलीमा जयवंत यांनी युक्तीवाद केला.
0
वीज बिलाची होळी

उमरखेड , दि. २७ – महाराष्टÑ वीज ग्राहक संघटनेच्या वतीने वीज दरवाडी विरोधात संतप्त वीज ग्राहकांनी स्थानिक गांधी चौकात वीज बिलांची होळी केली.
राज्यातील ३०० युनिटच्या आतील सर्व सामान्य घरगुती व व्यावसायीक विद्युत ग्राहकावर २०१४ मध्ये सबसिडी रद्द केली. त्यावर २० टक्केदरवाढीचा बोजा लादण्यात आला. आता पुन्हा १२ टक्के दरवाढ होण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे यंत्रमाग धारक व उद्योजक या सर्व वित्त ग्राहकांचे वीज दर शेजारच्या राज्याच्या तुलनेत दिड ते दुप्पट झाले आहे. सदर दरवाढ सर्व सामान्य व्यक्तीला परवडणारी नाही. त्यामुळे शासनाने किमान दोन वर्षापासाठी वीजदर स्थिर ठेवावे. शेजारील राज्याप्रमाणे दर ठेवावे अशी मागणी मुख्यमंत्री, उर्जामंत्र ी महाराष्टÑ राज्य यांचंकडे संघटनेने केली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष साजीद जागीरदार, सचिव राजू जयस्वाल, ओम सारड, इनायतुला जनाब, नंदकिशोर अग्रवाल, मझर टेलर, प्रमोद रुडे, इसराज, प्रेम बाहेती, राठोड याच्यासह वीज ग्राहक उपस्थित होते.
0
द.आफ्रिकाकडून वेस्ट इंडिजचा २५७ धावांनी पराभव

सिडनी- दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा २५७ धावांनी दणदणीत पराभव केला. वेस्ट इंडिजच्या संपूर्ण संघाला आफ्रिकेने अवघ्या ३३ षटक आणि एका चेंडूत १५१ धावांमध्ये गुंडाळले.
डीविलियर्सच्या नाबाद १६२ धावांच्या खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करणा-या दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला विजयासाठी ४०९ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ १५१ धावांवर गारद झाला. ख्रिस गेल अवघ्या ३ धावांवर बाद झाला. जो होल्डरने सर्वाधिक ५६ धावा केल्या. स्मीथ ३१, सॅम्यूअल्स ००, कार्टर १०, रामदीन २२, सॅमी ०५ धावा केल्या. तर सिमन्स आणि रसेल शून्यावर बाद झाले. बेन अवघी एक धाव काढून तंबूत परतला. जे टेलर १५ धावांवर नाबाद राहिला. तत्पूर्वी, झंझावती फलंदाजीसाठी प्रसिध्द असलेला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ए. बी. डीविलियर्स याने अवघ्या ६६ चेंडूंमध्ये १६२ धावांची तुफान खेळी साकारली. तर आमला, प्लेसी, रोसॉ यांच्या अर्धशतकी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडीजविरुद्ध ५० षटकांत ५ बाद ४०८ धावांचा डोंगर उभा केला. आमला (६५), डू प्लेसी (६२) तर रॉसॉने केवळ ३९ चेंडूंमध्ये ६१ धावा केल्या.
0
पाकिस्तानात भूकंपाचा धक्का, पाच जखमी

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या वायव्य भागात शुक्रवारी सकाळी ५.४ रिश्टर स्केलचा भूकंपाचा तीव्र धक्का बसला. भूकंपाचा धक्का बसल्याने पाच जण जखमी झाले आहे.
अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, इस्लामाबादमधील खैबर पख्तुनवाला प्रांतातील हझारसा भागापासून १०० किलोमीटर अंतरावर या भूकंपाचे केंद्रबिंदू होते.
‘आतापर्यंत हाती आलेल्या अहवालानुसार पाच नागरिक यात जखमी झाले आहेत. मात्र जखमींमध्ये कोणाचीही प्रकृती चिंताजनक नाही,असे पोलीस अधिका-यांनी सांगितले.
इस्लामाबाद तसेच पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील काही भागांमध्येही या भूकंपाचे हादरे जाणवले.
0
स्वाइन फ्लू : ज्येष्ठ पत्रकार रमेश राऊत यांचे निधन

औरंगाबाद – ज्येष्ठ पत्रकार रमेश राऊत यांचे आज पहाटे स्वाइन फ्लूमुळे निधन झाले आहे. ते 52 वर्षांचे होते. सात दिवसांपासून आजारी असलेल्या राऊत यांना गुरुवारी स्वाइन फ्लू झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांना घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी पाहाटे पाच वाजताच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्च्यात पत्नी माधूरी आणि मुलगी रेणू आहे.
रमेश राऊत यांनी गेली दोन दशके औरंगाबादमधील अनेक दैनिकांमध्ये पत्रकार ते संपादक पदापर्यंत जबाबदारी सांभाळली होती. साप्ताहिक चित्रलेखाचे ते अनेक वर्षे मराठवाडा प्रतिनिधी होते. या काळात त्यांनी केलेले सामाजिक आणि राजकीय लेखन गाजले होते. मुंबईत दैनिक सामानामध्येही त्यांनी काम केले.
सामनामध्ये काम केल्यामुळे ठाकरे कुटुंबियांशी त्यांची ओळख होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबाद दौर्यावर आल्यानंतर राऊत यांची आस्थेवाईक चौकशी करत असायचे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारणीवरही ते होेते. त्याचबरोबर साक्षात प्रकाशन संस्थेचे ते संचालक होते.
राऊत यांना प्रथम डॉ. हेडगेवार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गुरुवारी त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना घाटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. त्यांची पत्नी माधूरी यांच्यावरही घाटीमध्ये उपचार सुरु आहेत.
0
पाकिस्तानचा भारतीय चौकीवर गोळीबार

श्रीनगर – आंतरराष्ट्रीय सीमेवर आठवडाभर शांतता पाळल्यानंतर पाकिस्तानी रेंजर्सनी गुरुवारी रात्री पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
रात्री साडेनऊच्या सुमारास जम्मूमधील आर.एस.पूरा सेक्टरमधील सीमा सुरक्षा दलाच्या चौकीवर गोळीबार केला. पाकिस्तानी रेंजर्सनी गोळीबारासाठी छोटया शस्त्रास्त्रांचा वापर करत नावपिंड चौकीवर गोळीबार केला. पाकिस्तानच्या हद्दीत असलेल्या थाटी भागातून हा गोळीबार झाला. सौम्य स्वरुपाचा हा गोळीबार असल्याने बीएसएफने या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले नाही.
घुसखोरीला मदत करण्यासाठी हा गोळीबार झाला असण्याची शक्यता असून, बीएसएफने आंतरराष्ट्रीय सीमेवर सर्तकतेचा इशारा दिला आहे.
0
वडिलांना अग्नी देऊन विद्यार्थिनीने दिला बारावीचा पेपर

हडपसर : सहा महिन्यांपूर्वीच ती आईच्या मायेला पारखी झाली, त्यातच वडीलांचेही छत्र हरपले. मात्र शिक्षणाचा ध्यास घेत श्रद्धाने वडिलांना अग्नी देऊन बारावीचा पेपर लिहिला. शिक्षणावरील या श्रद्धेने तिने विद्यार्थीमित्रांपुढे नवा आदर्श ठेवला आहे.
श्रद्धा मनोज कदम (१९, रा. ढेरे बंगला, गोपाळपट्टी, मांजरी बु.) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वीच तिच्या आईचे निधन झाले होते. त्यानंतर बारावीचा दुसरा पेपर दिला आणि लगेचच वडिलांच्या निधनाची बातमी तिला ऐकावी लागली. बुधवारी रात्री ८.१५ च्या सुमारास वडिलांचे निधन झाले. गुरुवार सकाळी साडे नऊ वाजता श्रद्धाने वडिलांना मांजरी गावातील स्मशानभूमीमध्ये अग्नी दिला व ११ वाजता परीक्षा केंद्रावर हजर झाली.
दरम्यान, श्रद्धाला पेपर देण्यास धीर मिळावा म्हणून तिच्या चुलत बहिणीला गुरुवारी परीक्षा हॉलच्या बाहेर बसविण्या आले होते, असे साधना विद्यालयाचे प्राचार्या के. डी. रत्नपारखी यांनी सांगितले. श्रद्धा कदम या विद्यार्थिनीवर झालेला भावनिक आघात पाहता तिने परीक्षेला दाखविलेली उपस्थिती सर्वच विद्यार्थ्यांना आदर्श ठरली. आज दिवसभर हडपसरमध्ये तिच्या उपस्थितीचा विषय चर्चेचा ठरला.
0
हिंदुधर्मात घरवापसी केलेल्या ख्रिश्चनांना मिळणार आरक्षणाचा लाभ – सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली, दि. २७ – ख्रिश्चन धर्मातून पुन्हा हिंदू धर्मात घरवापसी केलेल्या पूर्वाश्रमीच्या दलितांना आरक्षणाचा लाभ मिळेल असा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने गुरुवारी दिला आहे. बाबासाहेब आंबेडकर, जेम्स मेस्सी, मंडल आयोग व चिनप्पा आयोग यांच्या लिखाणाचा दाखला देत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की उन्नतीच्या आशेने हिंदू धर्मातून ख्रिश्चन झालेल्या अनेकांची अवस्था सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या मागास आहे. जर अशा व्यक्ती पुन्हा हिंदूधर्मात आल्या व त्यांनी त्यांच्या पूर्वजांची जात स्वीकारली तर त्यांना आरक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही असे न्यायाधीशांनी म्हटले आहे.
जरी दोन चार पिढ्यांपूर्वी हिंदू व्यक्ती ख्रिश्चन झाल्या असतिल तरीही आताच्या त्यांच्या वारसांना हिंदूधर्मात गेल्यास आरक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही असे कोर्टाने म्हटले आहे. अर्थात, त्यासाठी त्यांनी आपल्या मूळ दलित जातीत जावे लागेल असेही कोर्टाने म्हटले आहे. अर्थात, यासाठी तीन गोष्टी आवश्यक असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे. एक म्हणजे अशा व्यक्तीने त्याची मूळ जात मागासवर्गीय असल्याचे सिद्ध केले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या म्हणजे हिंदू धर्माचा त्याने पुन्हा स्वीकार करायला हवा आणि तिसरी गोष्ट म्हणजे समाजाने हे स्वीकारायला हवे. त्याचप्रमाणे ख्रिश्चन व्यक्तीशी विविह ही बाब केवळ एखाद्या व्यक्तिला आरक्षणासाठी अपात्र ठरवत नाही.
ख्रिश्चन दांपत्याच्या पोटी जन्माला आलेल्या व्यक्तिचे जात प्रमाणपत्र रद्द केल्याप्रकरणी न्यायालयात हे प्रकरण गेले असता सुप्रीम कोर्टाने सदर निकाल दिला आहे. त्यामुळे हिंदुधर्मातून अन्य धर्मात गेलेल्यांना मागासवर्गीयांसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ मिळणार नसल्याचे परंतु ते पुन्हा हिंदु धर्मात आल्यास व त्यांनी पुन्हा आपली आधीची मागास जात स्वीकारल्यास हे आरक्षण त्यांना मिळू शकेल असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.









