
पुणे – घरासमोर खेळत असलेल्या लहान मुलांना हाकलून लावल्याचा राग आल्याने मुलांच्या आईचे व बोलणारी महिला या दोघींमध्ये झालेल्या जोरदार मारहाणीत एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री खडक पोलीस ठाण्याच्या परिसरात कासेवाडी, भवानी पेठ येथे घडली. खडक पोलिसांनी याप्रकरणी महिलेला अटक केली आहे. रविवारी न्यायालयाने तिला ८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सुनीता नितीन वायदंडे (वय २४, रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे आरोपी महिलेचे नाव आहे. तर आस्मा लुकमान शेख (वय ४०, रा. लक्ष्मी माता मंदिराजवळ, कासेवाडी, भवानी पेठ) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आस्मा यांचा भाऊ जितेंद्र छोटुलाल परदेशी (वय ३८, रा. लक्ष्मी माता मंदिर, भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी सुनीता आणि आस्मा या दोघी एकमेकींच्या शेजारी राहात होत्या. आस्मा यांना हार्ट आणि शुगरचा त्रास असल्याने त्या औषध घेऊन घरी आराम करत होत्या. त्यावेळी शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास आरोपी सुनीता यांची दोन लहान मुले आस्मा यांच्या घरासमोर गोंधळ घालत असल्यामुळे आस्मा यांनी त्यांना हाकलून लावले. ही बाब मुलांनी त्यांची आई व गुन्ह्यातील आरोपी सुनीता हिला सांगितली. आरोपी सुनीता हिला या प्रकाराचा राग आल्याने तिने आस्माला शिवीगाळ केली. यावेळी आस्मा आणि सुनीता या दोघींमध्ये भांडण झाले व दोघींनी एकमेकींचे केस धरून मारहाण सुरू केली. सुनिताने आस्माच्या छाती, पोट व पाठीत मारहाण केल्याने ती बेशुद्ध पडली. तिला प्रथम खासगी व नंतर ससून रुग्णालयात दाखल केले असता डॉकटरांनी तिला मृत घोषित केले.
Archive for April, 2015
0
मुलांच्या खेळण्यावरुन झालेल्या वादात एका महिलेचा खून
0
कैदी पलायन प्रकरणात मदत करणाऱ्या दोन आरोपींना अटक

नागपूर – नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पलायन केलेल्या ५ कैद्यांना पळून जाण्यात मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. कैदी फरार प्रकरणात ही पहिलीच अटक आहे.
नवाब तोहिद खान आणि गणेश शर्मा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. धंतोली पोलिसांनी ही कारवाई केली. ३१ मार्च रोजी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून ५ कैद्यांनी पलायन केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत ११ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.
0
अफू पिकवणाऱ्या पंचवीस शेतकर्यांना दहा वर्षाची कैद

बीड – बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मोहा परिसरात शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर अवैध पध्दतीने अफूचे पीक घेतले होते. याप्रकरणी अंबाजोगाई येथील न्यायालयाने पंचवीस आरोपींना दहा वर्ष कैद आणि प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
बीड जिल्ह्यात २०१२ मध्ये पोलिसांनी छापा टाकून शेकडो एकरवर घेतल्या जाणाऱ्या अवैध अफू शेतीचा पर्दाफाश केला होता. याप्रकरणी परळी तालुक्यातील मोहा परिसरातील कान्हापूर, वंजारवाडी, घोरपडदरा तांडा येथील ३८ आरोपी शेतकरी व नांदेड येथील चार व्यापार्यांविरोधात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
आंबाजोगाई येथील जिल्हा सत्र न्यायालय क्रमांक तीन मध्ये या प्रकरणाची सुनावणी होऊन न्यायाधीश नवनाथ कोल्हे यांनी त्यापैकी २५ आरोपी शेतकर्यांना दहा वर्ष कारावास आणि प्रत्येकी एक लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षाच्यावतीने के. व्ही. गिरवलकर यांनी तर आरोपींच्या बाजूने अण्णासाहेब लोमटे, डी. व्ही. गाढे, डी. डी. लांब आणि हनुमंत राऊत यांनी काम पहिले.
0
मलेशियातून १७ संशयित दहशतवादी ताब्यात

क्वालांलपूर – दहशतवादी हल्ल्याचा कट रचणा-या १७ संशयित दहशतवाद्यांना क्वालांलपूर येथील मुस्लिम बहुसंख्य असलेल्या भागातून ताब्यात घेण्यात आले.
विशेष पथकाने केलेल्या कारवाईदरम्यान या सर्व संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले. यापैकी दोन दहशतवादी हे नुकतेच सिरियातून परतलेले आहेत. दरम्य़ान, या दहशतवाद्यांबद्दल अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. इस्लामिक राज्य असलेल्या इराक आणि सिरियामध्ये जाण्याचे मलेशियन नागरिकांचे प्रमाण वाढले आहे.या दहशतवादाविरोधात पंतप्रधान नजीब रझाक यांनी गेल्या दशतवादविरोधी दोन विधेयके आठवड्यात संसदेत सादर केली. या विधेयकात प्रशासनाला संशयित दहशतवाद्याला सुनावणीशिवाय अनिश्चित कालावधीसाठी ताब्यात घेण्याचे अधिकार असावेत असा प्रस्ताव आहे.
0
गोळीबारात तीन पोलीस ठार

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यातील एका गावात सोमवारी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तीन पोलीस ठार झाले.
शोपियन जिल्ह्यातील आशिपोरा गावात गुन्ह्याबाबतच्या तपासासाठी गेलेल्या पोलिसांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये एक हेड कॉन्स्टेबल आणि दोन कॉन्स्टेबल यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस अधिका-यांनी सांगितले.
या हल्ल्यात ठार झालेले तीनही पोलीस वर्दीविना होते आणि गावात ते एका गुन्ह्याच्या तपासासाठी गेले होते. यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. तासाभरात पोलिसांवर केलेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. यापूर्वी सकाळी बारामुल्ला जिल्ह्यातील पट्टाण भागात एका पोलीस अधिका-यावर हल्ला करण्यात आला. उपनिरीक्षक गुलाम मुस्तफा हे या हल्ल्यात जखमी झाले.
0
भिवंडी मनपाचे ३ सहाय्यक आयुक्तांसह लिपिक निलंबित
भिवंडी,(प्रतिनिधी,सतिष राठोड)
भिवंडीत अवैध बांधकाम करणाञांविरुध्द एमआरटीपी कायद्यानुसार कारवाई न करता त्यांना संरक्षण दिल्यामुळे भिवंडी मनपाचे ३ सहाय्यक आयुक्तांसह १ वरिष्ठ लिपिक यांना मनपाचे आयुक्त जीवन सोनवणे यांनी निलंबित केले आहे.तसेच सोनवणेंच्या या करवाईच्या निर्णयामुळे मनपाचे अनेक अधिकारी सतर्क झाले आहेत.याआधी प्रभाग समितीमध्ये अवैध बांधकाम विरुध्द दिलेल्या सुचनेच्या पालनाकडेही दुर्लक्ष केल्याचेही त्यांनी सांगितले.
स्थानीक लोकांनी अवैध बांधकाम विरुध्द तक्रार करुनही निलंबित झालेल्या अधिकाञांनी दुर्लक्ष केले होते.
* निलंबित झालेल्या अधिकार्यांचे नाव *
१) सुनिल भालेराव ( सहय्यक आयुक्त, प्रभाग समिती १)
२) विपिन साप्टे ( सहय्यक आयुक्त, प्रभाग समिती २)
३) अजित गोडांबे ( सहय्यक आयुक्त, प्रभाग समिती ५)
४) अशोक बाने ( वरिष्ठ लिपिक )
0
२१ व्या शतकातील छोटे चंद्रग्रहण

नवी दिल्ली – या वर्षातील सर्वात लहान चंद्रग्रहण आज पूर्व भारतीयांनी अनुभवले. अवघ्या ४ मिनीटे ४३ सेकंदाचे हे चंद्रग्रहण होते. ५ वाजून २७ मिनीटांच्या दरम्यान पूर्व आणि उत्तर-पूर्व भागात हे चंद्रग्रहण दिसून आले. दरम्यान जपान, न्यूझीलंड आणि परदेशातील अनेक शहरांमध्ये हे चंद्रग्रहण दिसून आले.
शनिवारचे चंद्रग्रहण हे गेल्या ५०० वर्षातील सर्वात कमी कालावधीचे असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले. याआधी १५२९ मध्ये झालेले चंद्रग्रहण १ मिनीटे ४२ सेकेंदाचे होते. २१ व्या शतकातील कमी कालावधीच्या या चंद्रग्रहणाला ३ वाजून ४५ मिनीटांनी सुरुवात झाली. तर ७ वाजून १४ मिनीटांनी हे चंद्रग्रहण संपले. झाली. मात्र खऱ्या अर्थाने चंद्रग्रहण हे ५ वाजून २७ मिनीटांनी सुरु होऊन ५ वाजून ३२ मिनीटांनी संपले. चंद्र हा पृथ्वीच्या सावलीचा किनारी भाग ओलांडून गेला. त्यामुळे हे चंद्रग्रहण कमी कालावधीचे म्हणण्यात आले. अरुणाचल प्रदेशातील तेझू आणि रोईंगमध्ये नागरिकांना चार मिनीटे आणि ४३ सेकंदाच्या चंद्रग्रहणाचे साक्षीदार होता आले. यानंतर २८ सप्टेंबर २०१५ मध्ये पूर्ण चंद्रग्रहण होणार आहे. मात्र भारतीयांना हे चंद्रग्रहण पाहता येणार नाही. परदेशातील नागरिकांना याचे साक्षीदार होता येणार आहे.
0
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

ठाणे- एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर दोघांनी बलात्कार केल्याची घटना डोंबिवलीमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांना मानपाडा पोलिसांनी अवघ्या काही तासातच मोबाईल नेटवर्क लोकेशनच्या आधारे अटक केली आहे.
डोंबिवली पूर्वेतील माणगाव परिसरात राहणारी १४ वर्षाची मुलगी बुधवारी रात्री राहत असलेल्या घराचा दरवाजा बंद करण्यासाठी गेली होती. हे घर इमारतीमध्ये तळमजल्यावर आहे. त्यामुळे इमारतीच्या तळमजल्याजवळ खाली ही मुलगी आली होती. तेथील समोरच्या इमारतीमध्ये पीओपीचे काम करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांनी तिचे अपहरण करत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी देत ज्या घरात काम सुरू होते, त्या घरात जाऊन ते झोपले. ही घटना पीडित मुलीने आपल्या आईला सांगत मानपाडा पोलीस ठाणे गाठले. सकाळी मुलीच्या घराबाहेर गोंधळ पाहून दोघेही पळून गेले. मानपाडा पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून या दोघांचा शोध युद्धपातळीवर सुरु केला. मुब्रा येथे राहणारे हे दोन्ही आरोपी उत्तरप्रदेशातील बरानपूर या मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच हजामत अली (२०) आणि खुर्शीद आलम (२२) या दोघांना मानपाडा पोलिसांनी मोबाईल फोन लोकेशनच्या आधारे एकास ठाण्यातून तर दुसऱ्याला मुंब्र्याहून अटक केली.
0
भावानेच फासला नात्याला काळीमा ! सख्या बहिणीवर लैंगिक अत्याचार

ठाणे – रक्षाबंधन आणि भाऊबिजेला ज्या बहिणीचे संरक्षण करायची हमी भावाने घ्यायची असते, त्याच भावाने सख्या बहिणीला पट्टयाने मारहाण करुन अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी उघडकीस आल्याने सूचक नाका परिसर सुन्न झाला आहे.
कोळसेवाडी पोलिसांनी मात्र तात्काळ त्या वासनांध भावाला बेड्या ठोकून गजाआड केले आहे.
कल्याण-शिळ मार्गावर सूचक नाका परिसरात १५ वर्षीय मुलगी आपल्या माता-पिता आणि १७ वर्षीय भावासह राहते. दोन महिन्यांपूर्वी याच भावाने आपल्या लहान बहिणीवर कमरपट्टयाने बेदम मारहाण करुन लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. याच प्रकाराची पुनरावृत्ती१ एप्रिल रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास झाली. घरात कुणीही नसल्याची संधी साधून नाराधमाने बहिणीला कमरपट्टयाने बेदम मारहाण करुन लैंगिक अत्याचार केला.
भावाने दिलेल्या धमक्यांना घाबरुन मुलीने दोन दिवस आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची वाच्यता केली नाही. मात्र असे प्रकार वारंवार घडत राहतील म्हणून तिने याबाबत आपल्या आईला सांगितले. त्यानंतर पीडित मुलीने शुक्रवारी संध्याकाळी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी नाराधमास तात्काळ पकडून गजाआड केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर सूचक नाका परिसरात संतापाचे वातावरण पसरले होते.
0
टोल नाक्याची तोडफोड

कोल्हापूर – महाराष्ट्रात टोल विरोधात सतत आंदोलन करुनही टोलनाके बंद न करता टोलदर वाढवले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर संतप्त कोल्हापूरकरांनी कळंबा येथील आयआरबीचा टोलनाका फोडला आहे.
टोलनाक्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या कॉ. गोविंद पानसरेंची हत्या होऊनदेखील सरकार टोल कंत्राटदारांविरुद्ध काही करत नाहीत अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरू आहे.
0
पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या मेजवानीस न्या. कुरिअन गैरहजर राहणार

नवी दिल्ली- शुक्रवारी न्यायाधीश परिषद आयोजित करण्यात आली होती. गुडफ्रायडेच्या दिवशी परिषद नको असे सर्वोच्च न्यायाधिशांना लिहिणारे न्या. जोसेफ कुरिअन यांनी आपले गाऱ्हाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मांडले आहे.
धार्मिकदृष्ट्या पवित्र असणाऱ्या दिवशी कुठलेही महत्वाचे कार्यक्रम ठेऊ नयेत असे त्यांनी म्हटले आहे. कुठल्याही धर्माच्या सणाला राष्ट्रीय सणाइतके महत्व द्यावे अशी विनंती त्यांनी पंतप्रधानांना पत्राद्वारे केली आहे. आज पंतप्रधानांनी न्यायधीशांसाठी रात्रीच्या मेजवानीचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला आपण हजर राहू शकणार नाहीत असे त्यांनी कळविले आहे.
0
सुरेश रैनाचे शुभमंगल सावधान

नवी दिल्ली – भारताचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू सुरेश रैना अखेर शुक्रवारी विवाहबंधनात अडकला. नवी दिल्लीतील द लीला पॅलेस या हॉटेलमध्ये कुटुंबिय, जवळचे मित्र-मैत्रिणी आणि काही संघ सहका-यांच्या उपस्थितीत सुरैश रैना आणि प्रियंका चौधरी यांचा विवाहसोहळा पार पडला.
प्रियंका ही रैनाची लहानणपणाची मैत्रीण. प्रियंका ही तेजपाल चौधरी यांची कन्या आहे. प्रियंका सध्या अमस्टॅडममध्ये बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहे. या दोघांच्या घरचे संबंधही जवळकीचे होते. रैनाच्या विवाहसोहळ्यास भारतीय संघातील अनेक क्रिकेटपटूंनी हजेरी लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या शुभेच्छा रैनाला दिल्या होत्या.
आयसीसीचे अध्यक्ष श्रीनिवासन, कर्णधार एम.एस.धोनी आणि त्याची पत्नी, विराट कोहली, विरेंद्र सेहवाग या सोहळ्यास उपस्थित होते. तसेच चेन्नई सुपर किंग्ज संघातील त्याचा सहकारी ड्वायेन ब्राव्हो, प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली होती.
0
शिवसेना उपशाखाप्रमुखाची हत्या

बदलापूर- बदलापूरमधील शिवसेना उपशाखाप्रमुख केशव मोहिते यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. या हल्ल्यात मोहिते यांचा मृत्यू झाला.
बदलापूरमधील एमआयडीसी परिसरात सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. रिक्षाचालक असलेल्या मोहिते यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी रिक्षातच धारदार शस्त्राने हल्ला केला.
जखमी झालेल्या मोहिते यांना उपचारासाठी डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोहिते यांच्या हत्येच्या निषेधार्थ बदालापूरमधील रिक्षा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
0
गळफास घेऊन पती-पत्नीची आत्महत्या

नागपूर – दिघोरीमध्ये राहणाऱ्या पत्नी-पत्नीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नौशाद पंढरीनाथ डोनाडकर (वय-२८) आणि त्याच्या पत्नी रोहिणी नौशाद डोनाडकर (वय-२०) असे या दाम्पत्याचे नाव आहे.
नौशाद आणि रोहिणी डोनाडकर हे पती-पत्नी दिघोरी येथील सुफी प्लाझा येथे राहत होते. २००९ मध्ये दोघांचे लग्न झाले होते. त्यांना अडीच वर्षांची एक मुलगीही आहे. मात्र गुरुवारी रात्री या पती-पत्नीने घरीच पंख्याला दुपट्ट्याच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी त्यांची अडीच वर्षाची मुलगी नातलगांच्या घरी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण अजूनपर्यंत स्पष्ट झालेले नाही. हुडकेश्वर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहे.
0
स्मृती इराणींनी पकडला छुपा कॅमेरा

कँडोलिम ( गोवा), दि. 3 – गोव्यातल्या फॅब इंडियाच्या चेंजिंग रूममध्ये हिडन कॅमेरा रोखला असल्याचा अनुभव खुद्द मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांना आला असून या बाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा कॅमेरा चार महिन्यांपूर्वी बसवण्यात आला असून स्थानिक भाजपा आमदार मायकेल लोबो यांनी धक्काच बसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या संपूर्ण भागामधल्या दुकानांची तपासणी करावी आणि अन्य कुठल्या दुकानांनी असला प्रकार केलाय का याचा तपास करावा अशी सूचना पोलीसांना केल्याचे लोबो यांनी सांगितले. दरम्यान, हा कॅमेरा सामानांची चोरी रोखण्यासाठी लावण्यात आला होता असे स्पष्टीकरण फॅबइंडियाच्या एमडीने दिले असून पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
0
भरधाव गाडी सलुनमध्ये घुसली, ३ ठार

मलकापूर, दि. ३ – बुलढाणा येथील मलकापूर येथे भरधाव वेगात असलेल्या फॉर्ड आयकॉन गाडीचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्यालगच्या सलुनमध्ये घुसली. या विचित्र अपघातात तिघा जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये दोघा सख्ख्या भावंडांचा समावेश आहे. या अपघातात आणखी दोघे जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
जामनेर येथे राहणारे दत्तात्रय घोंगडे, त्यांचा भाऊ श्रीकृष्ण घोंगडे व अन्य तिघे जण खासगी कामानिमित्त शुक्रवारी सकाळी जामनेरहून अकोला येथे निघाले होते. दत्तात्रय घोंगडे हे स्वतः गाडी चालवत होते. राष्ट्रीय महामार्गावर मलकापूरजवळ दत्तात्रय घोंगडे यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी रस्त्यालगतच्या सलुनच्या दुकानात घुसली. दुकान बंद असल्याने तेथील कोणीही जखमी झाला नाही. पण गाडीचे चालवणारे दत्तात्रय घोंगडे, श्रीकृष्ण घोंगडे व भागवत गीते या तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर आणखी दोघे जण गंभीर जखमी झाले.
दरम्यान, शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास यवतमाळमधील जामवाडी तलाव येथे लक्झरी बस झाडावर आदळल्याने बसमधील दोघा जणांचा मृत्यू झाला. तर पाच ते सहा प्रवासी जखमी झाले आहेत. मृत्यू झालेले दोघे जण डिग्रसमधील रहिवाशी असून अद्याप त्यांची नावे समजू शकलेली नाही.
0
घुमानमध्ये ८८व्या मराठी साहित्य संमेलनाचे दिमाखात उद्घाटन
घुमान (पंजाब) – संतश्रेष्ठ श्री नामदेव यांची कर्मभूमी असलेल्या पंजाबमधील घुमान येथे ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. घुमाननगरीत शुक्रवारी साहित्य संमेलनाचे दिमाखात उद्घाटन झाले.
या उद्घाटनसोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्यासह वरिष्ठ साहित्यिक आणि साहित्यप्रेमी उपस्थित आहेत.या उद्घाटनसोहळ्यादरम्यान ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी भाषण केले.
0
विहिरीत पडून युवतीचा मृत्यू

दिग्रस, दि. ३ – विहीरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या युवतीचा विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना रामगाव (डोर्ली) येथे ३ एप्रिल रोजी सकाळी ८.१५ वाजता घडली.
किरण शंकर आडे (१८) असे मृतक युवतीचे नाव आहे. घराजवळील ग्रामपंचायतच्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली होती. अशातच पाय घसरून विहिरीत पडल्याने तीचा मृत्यू झाला. मृतक युवतीचे आई-वडिल हे मजुरीचे कामाकरिता मुंबई येथे गेलेले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला. सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी आजोबा उत्तम आडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
0
ट्रॅव्हल्स झाडावर आदळली, दोन ठार

यवतमाळ, दि. ३ – भरधाव ट्रॅव्हल्स झाडावर आदळल्याने दोन जण जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे जामवाडी येथे घडली. सैय्यद अज्जु ग्यासूदीन (३२) रा. रजानगर दिग्रस, सुभाष भिका जाधव रा. कुंभारकिन्ही ता. दारव्हा असे मृतकाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री प्रसन्न ट्रॅव्हल्समध्ये पुसद येथून नागपूरकडे प्रवाशी घेऊन जात होते. अशातच जामवाडी या गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स निंबाच्या झाडावर आदळली. यामध्ये दोन जण जागीच ठार झाले असून अनेक महिला प्रवाशी जखमी झाले आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.













