
दिग्रस (यवतमाळ), दि. १ – पैशाच्या वादातून युवकाची निर्घुन हत्या करण्यात आल्याची घटना काल शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास आर्णी नाक्यावर घडल्याने खळबळ उडाली आहे. गोळीबाराच्या अफवेचेही शहरात पेव फुटल्यानंतर बाजारपेठेतील प्रतिष्ठाने क्षणातच बंद झाली होती. मोहम्मद हसन पप्पूवाले (२६) रा. मोतीनगर असे मृतकाचे नाव आहे.
शहरात गुन्हेगारीने डोकेवर काढले आहे. दोन वर्षापूर्वी आर्णी चौकात घडलेल्या घटनेनंतर पुन्हा एकदा चौकाला खूनाचे गालबोट लागले आहे. गाडी भाडे देण्याच्या वादातून मोहम्मद हसन पप्पूवाले या युवकाला शे. फिरोज शे. मोबीन, शे. मतीन शे. मोबीन, मुन्ना नागपूरवाला, शे. बबलू शे. मोबीन, शे. इमरान शे. मोबीन, शे. शोहेब शे. फिरोज, शे. मोहसीन शे. मोेबीन, बिलाल, शाहीन, सलीमा मोबीन, यासीन, अख्तर लाला यांनी आर्णी नाक्यावर गाठले. सांयकाळी ७ वाजतापासूनच युवकाच्या हत्येसाठी यांनी सापळा रचला होता. युवक आर्णी नाक्यावर पोहचताच शे. फिरोज शे. मोबीनसह त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर हल्ला केला. तलवार व गुप्ती सारख्या धारदार शस्त्राने युवकावर १४ वार करण्यात आले. यावेळी रक्ताच्या थारोळ््यात युवक खाली पडल्यानंतर आरोपी पसार झाले. खुनाची वार्ता शहरात रात्रीच पसरताच मुख्य बाजारपेठेत बंद झाली. आर्णी चौकात गोळीबार झाल्याच्या अफवेने तर दिग्रसकरांमध्ये भिती निर्माण झाली. खूनाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून युवकाला ग्रामीण रुग्णालयात भरती केले. मात्र उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक संजय देशमूख यांनी घटनेचे गांभीर्य पाहून नागरीकांना शांत राहण्याचे आवाहन केले. याबाबत मृतकाची आई तस्लीम हसन पप्पूवाले यांनी पोलीस स्टेशनला १२ जणा विरुद्घ तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंद करून शे. मोहसीन शे. मोबीन यास अटक केली आहे. तर उर्वरीत आरोपी पसार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अतिरीक्त पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे.
Archive for March 1st, 2015
0
तलवार व गुप्तीने भोसकुन युवकाची हत्या
0
यवतमाळ जिल्ह्यात संततधार, गहू, हरबरा, संत्रापिकाचे नुकसान

यवतमाळ, दि. १ – वादळी वाºयासह शनिवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावून दाणादाण उडविली. अवकाळी पावसाचा फटका शेतकºयांसह सर्वसामान्यजनतेला बसला आहे. बाभूळगाव तालुक्यात वीज तारा तुटल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. दाभा (पहूर) परिसरात गारपीट झाल्याने गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. दिग्रस, नेर, राळेगाव, महागाव, उमरखेड यासह इतर तालुक्यालाही अवकाळीचा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले असून, सर्वेक्षण करण्याचे आदेश पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. जिल्ह्यात कालदुपासून पाऊस सुरू असून, २०.४३ मिमी एवढी नोंद प्रशासनाकडून करण्यात आली. सर्वाधिक पाऊस यवतमाळ तालुक्यात ५३.८ मिमी झाला. बाभूळगाव ४० मिमी, राळेगाव १८ मिमी, कळंब १४ मिमी, पांढरकवडा १८.५मिमी , घाटंजी १७ मिमी, आर्णी २८ मिमी, महागाव ११मिमी, उमरखेड २१ मिमी, दिग्रस ३१ मिमी, पुसद ८ मिमी, दारव्हा ३३ मिमी, नेर २९ मिमी, झरी १ मिमी, मारेगाव ४ मिमी अशी नोंद करण्यात आली आहे.
0
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण वेळेत पुर्ण करा – राहुल रंजन महिवाल
जिल्हा नियंत्रण कक्ष 24 तास सुरु
यवतमाळ, दि. 1 : कालपासून जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस सुरु आहे. ठिकठिकाणी या पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण विहित वेळेत पुर्ण करण्याचे सुचना जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी संबंधीत सर्व अधिकारी व विभागांना केल्या आहे.
आज सकाळपर्यंत यवतमाळ तालुक्यात 53.8, बाभुळगाव 40, दिग्रस 31, नेर 29, आर्णी 28, उमरखेड 21, पांढरकवडा 18.5, राळेगाव 18 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली होती. अन्य तालुक्यातसुध्दा थोड्या प्रमाणात पावसाची नोंद आहे. काल झालेल्या पावसामुळे बिटरगाव येथील पांडुरंग मल्हारी चिकणे या व्यक्तीचा विज पडून मृत्यु झाला. त्यांची मुले मनोज व विशाल ही विजेमुळे जखमी झाली असून त्यांच्यावर ढाणकी येथे उपचार सुरु आहे. उमरखेड तालुक्यातीलच पिंपळगाव येथील शंकर सुर्यभान मालतकर यांच्या मालकीची म्हैस विज पडल्याने मरण पावली.
ठिकठिकाणी झालेल्या या नुकसानीची सर्वेक्षण करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व संबंधीत विभागांना केल्या आहे. या सर्वेक्षणातून शेतीपीके, पिकांचे, घरांचे व जनावरांचे नुकसान तसेच जनावरांच्या गोठ्याचे नुकसान सर्वेक्षणातून सुटु नये अशा सुचनाही करण्यात आल्या आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष 24 तास सुरु असून निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले हे या कक्षाचे प्रमुख आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मिनल जगताप, सहकारी एकनाथ बिजवे, यु.ए.जुमडे, मंगेश सुळके, नितीन मांडेकर, नितीन पाटकुरवार हे या कक्षात कार्यरत आहे. नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी क्रमांक 255077, 240720 व टोल फ्री क्रमांक 1077 अशा आहे. जिल्ह्यात कुठेही नुकसान झाल्यास या क्रमांकावर माहिती कळवावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे. शेतकऱ्यांनी नुकसानीमुळे खचुन जावू नये, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
0
2 एकर क्षेत्रात 200 क्विंटल हळद, बिजोरा येथील शेतकऱ्याचा प्रयोग, दरवर्षी 3 लाखाचे निव्वळ उत्पन्न

यवतमाळ, दि. 1 : पारंपारिक शेतीत खर्च अधिक आणि त्या तुलनेत उत्पन्न कमी अशी स्थिती आहे. त्यामुळे अनेक शेतकरी वेगवेगळ्या पिकांकडे वळत आहे. काही शेतकरी फळपिके, भाजीपाला तर काही हळद, अद्रक तर काही डाळींब, पपई यासारख्या पिकांना पसंती देत आहे. गेल्या काही वर्षात अनेक शेतकरी या प्रयोगशिल शेतीतून आर्थिकदृष्ट्या समृध्द झाले आहे. महागाव तालुक्यातील बिजोरी येथील अशाच एका शेतकऱ्याने हळदीचा प्रयोग यशस्वी राबवून यातून वार्षिक 3 लाखाच्या निव्वळ उत्पन्नाची किमया गाठली आहे.
कापुस, सोयाबिन यासह तुर, गहु, ज्वारी ही पारंपारीक पिके गेल्या काही वर्षात प्रचंड खर्चीक झाली असून त्यातून मिळणारे उत्पन्न तुलनेत कमी आहे. लागवड खर्च, मजूरी, रासायनीक खते, बि-बियाने याचा खर्च प्रचंड वाढल्याने तसेच निसर्गाच्या लहरीपणाने ही पिके शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. त्यातुनच शेतकरी शाश्वत उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे वळत असल्याचे चित्र जिल्ह्यात गेल्या काही वर्षात पाहावयास मिळत आहे.
यातूनच अनेक शेतकरी नवनवीन प्रयोग करीत असल्याचे दिसते. महागाव तालुक्यातील बिजोरा येथील देविदास मोहकर व रामदास मोहकर हे भावंड जिल्ह्यातील असेच प्रयोगशिल शेतकरी आहे. या भावंडाने चार वर्षापूर्वी हळदीचा प्रयोग आपल्या शेतात राबविला. पहिल्याचवर्षी चांगले उत्पन्न मिळाल्याने त्यावर्षीपासून ते दरवर्षी किमान दोन एकर क्षेत्रात हळदीची लागवड करते. यातून त्यांना दरवर्षी सर्व खर्च वजा जाता सरासरी 3 लाख रूपये निव्वळ नफा शिल्लक राहते.
यावर्षीही त्यांनी दोन एकर क्षेत्रात हळदीची लागवड केली होती. यावर्षी मान्सूनने दगा दिला. जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट कोसळले परंतु त्यांनी आपल्या शेतात निर्माण केलेल्या सिंचनाच्या सोईमुळे त्यांना यावर्षीही तब्बल 200 क्विंटल इकक्या ओल्या हळदीचे उत्पन्न आझे. सदर हळद सुकविल्यानंतर साधारणेपणे ती 40 क्विंटल इतकी भरण्याची शक्यता आहे. सद्या बाजारातील सुक्या हळदीचे दर पाहता 4 लाखाचे एकून उत्पन्न होण्याची शक्यता असल्याचे देविदास व रामदास मोहकर यांनी सांगितले. यातून 1 लाख रूपये खर्च वजा जाता 3 लाख निव्वळ नफा शिल्लक राहतील, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी निव्वळ पारंपारिक शेतीवर अवलंबून न राहता नवनवीन प्रयोग राबविले पाहिजे, असे मोहकर बंधू सांगतात.
0
काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी मुफ्ती मोहोम्मद सईद

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी पीडीपी-भाजपा आघाडीचे सरकार अस्तित्वात आले आहे.
पीडीपीचे सर्वेसर्वा मुफ्ती मोहोम्मद सईद यांना राज्यपाल एन.एन.व्होरा यांनी रविवारी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. जम्मूमध्ये एका सभागृहात हा शपथविधी सोहळा झाला. भाजपा नेते निर्मल सिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
फुटीरतावादाकडून राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आलेले सज्जाद लोन यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती उपस्थित होत्या.
नऊ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सईद राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा संभाळत आहेत तसेच ते दुस-यांदा आघाडी सरकारचे नेतृत्व करणार आहेत. याआधी २००२ मध्ये त्यांनी पीडीपी-काँग्रेस आघाडीचे नेतृत्व केले होते. त्यावेळी तीनवर्ष ते राज्याचे मुख्यमंत्री होते.
पूर्णपणे परस्परविरोधी विचारांचे हे पक्ष सत्तेसाठी एकत्र आले आहेत. त्यासाठी दोघांनी कलम ३७० आणि लष्कराला विशेषधिकार देणा-या कायदा या मुद्यांवर एक एक पाऊल मागे घेतले आहे. भाजपाने तूर्तास काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याचा आग्रह सोडला आहे तर, पीडीपीने लष्कराला विशेषधिकार देणा-या एएफएसपी कायदा रद्द करण्याचा हट्ट तूर्तास बाजूला ठेवला आहे.
0
कट्टरपंथीयांविरोधात ‘आवाज’ उठवणारे रॉय यांची हत्या

ढाका- इस्लामी कट्टरपंथीयांविरोधात ‘मुक्तो-मनो’ (मुक्त मन) या आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून ‘आवाज’ उठवणारे अमेरिकन ब्लॉगर अविजीत रॉय यांची ढाक्यात चॉपरचे घाव घालून हत्या करण्यात आली. भररस्त्यात झालेल्या या हल्ल्यात रॉय यांच्या पत्नी रफिदा अहमद बन्ना याही गंभीर जखमी झाल्या आहेत. या हल्ल्यात त्यांच्या हाताचे बोटही छाटले गेले आहे.
ढाका विद्यापीठाच्या आवारातील ‘बांगला अकादमी बुक फेअर’ला भेट देऊन परतणा-या रॉय दाम्पत्याला घेरून गुरुवारी रात्री १० ते १२ जणांच्या सशस्त्र टोळक्याने त्यांच्यावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यातील या दोघांना हल्लेखोरांनी फरफटत पदपथावर फेकले. रॉय यांच्या डोक्याची जखम खोलवर असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी बन्ना या बचावल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
‘बांगला अकादमी बुक फेअर’ला उपस्थित राहण्यासाठी रॉय दाम्पत्य काही दिवसांपूर्वीच ढाक्यात आले होते. आपल्या लिखाणातून सातत्याने इस्लाममधील कट्टरवाद्यांवर टीका करणा-या रॉय यांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यामुळे अशाच शक्तींनी त्यांची हत्या केली असावी, अशी शक्यता असून पोलीस त्या दिशेनेच तपास करत आहेत. अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
रॉय यांचा जन्म बांगलादेशातील होता. त्यांनी नंतर अमेरिकी नागरिकत्व स्वीकारले होते. ‘मुक्तो मोनो’ हा त्यांचा ब्लॉग कट्टरतेविरोधातील लिखाणाने चर्चेत होता. त्यांचे लिखाण आणि विश्वासर व्हायरस (व्हायरस ऑफ फेथ) आणि सुन्यो थेके महाविश्वा (फ्रॉम व्हॅक्युम टु दि युनिव्हर्स) ही दोन पुस्तके झोंबल्यामुळे त्यांना सातत्याने धमक्या येत होत्या. बांगलादेशात आल्यास रॉय जिवंत जाणार नाहीत, अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या जात होत्या, असे रॉय कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर रॉय यांचा ब्लॉग तात्पुरता बंद करण्यात आला असून ‘आज आम्ही शोकाकुल असलो तरी आम्हाला कुणीही संपवू शकणार नाही’ असा बांगला भाषेतील संदेश या ब्लॉगपेजवर सध्या दिसत आहे.
0
श्रीलंकेचा इंग्लंडवर दणदणीत विजय

वेलिंग्टन – ‘अ’ गटातील श्रीलंका विरुध्द इंग्लंड या तुल्यबळ संघांमधील लढतीत श्रीलंकेने इंग्लंडवर नऊ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
इंग्लंडने दिलेले ३१० धावांचे लक्ष्य श्रीलंकेने लहिरु थिरिमने आणि कुमार संगकारा यांच्या शानदार शतकाच्या बळावर आरामात पार केले.
थिरिमने आणि संगकारा श्रीलंकेच्या विजयाचे शिल्पकार ठरले. थिरिमनेने नाबाद (१३९) आणि संगकाराने नाबाद (११७) धावा केल्या. दोघांनी इंग्लिश गोलंदाजांना अजिबात दाद न देता चौफेर फटकेबाजी केली आणि धावा वसूल केल्या.
इंग्लंडला दिलशानच्या रुपाने श्रीलंकेचा फक्त एकमेव गडी बाद करता आला. यावरुन इंग्लंडची गोलंदाजी किती निष्प्रभ आणि निस्तेज होती ते स्पष्ट झाले.
श्रीलंकेने गटात सलग तीन विजयांची हॅट्रीक केली असून, लंकेचा संघ गटात दुस-या स्थानावर पोहोचला आहे. सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव झाल्यानंतर अफगाणिस्तान विरुध्द विजयासाठी संघर्ष करणा-या श्रीलंकेने हळूहळून आपली कामगिरी उंचावली आहे. शतकी सलामी दिल्यानंतर तिल्करत्न दिलशान ४४ धावांवर बाद झाला. मोईन अलीने त्याला मॉर्गनकरवी झेलबाद केले.
‘अ’ गटातील इंग्लंड विरुध्द श्रीलंका सामन्यात प्रथम फलंदाजी करणा-या इंग्लंडने श्रीलंकेला विजयासाठी ३१० धावांचे लक्ष्य दिले होते. ज्यो रुटची शानदार शतकी खेळी (१२१), इयान बेलच्या (४९) धावा आणि शेवटच्या षटकांमध्ये बटलरने केलेल्या फटकेबाजीमुळे (३९) इंग्लंडने पन्नास षटकात सहाबाद ३०९ धावांचा डोंगर उभारला होता.
इंग्लंडच्या डावात तीन महत्वपूर्ण भागीदा-या झाल्या. सलामीवीर मोईन अली आणि इयान बेलने ६२ धावांची सलामी दिली. त्यानंतर कर्णधार इयॉन मार्गन आणि रुटमध्ये चौथ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी झाली.
मॉर्गन (२७) धावांवर बाद झाला. त्यानंतर टेलर आणि रुटची जोडी जमली. दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी झाली. टेलरने (२५) धावा केल्या. अखेरच्या षटकांमध्ये धावा वेगाने जमवताना बटलरने १९ चेंडूत (३९) धावा फटकावल्या. यात सहा चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
0
बॉलिवूड कलाकारांनाही स्वाईन फ्लूची लागण

राजकोट – मुंबईसह राज्यसभरात अनेक जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. मात्र, आता हा आजार बॉलिवूडमध्येही पसरु लागला आहे.
बॉलिवूड दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून त्यांच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांच्यानंतर आता त्यांची पत्नी अनुपमा आणि मुलगा अग्निला सुद्धा हा आजार झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, अनुपमा यांनी ट्विटरवरुन त्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची माहिती दिली.
तर राझंणा फेम सोनम कपूरला शूटिंगदरम्यान कफ आणि घशात जळजळ यांसारखी स्वाईन फ्लूसारखी लक्षणे दिसल्याने राजकोटमधील स्टर्लिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत स्वाईन फ्लूसह सात चाचण्या करण्यात आल्या आहे. त्यांचे अहवाल येणे बाकी आहे. असे स्टर्लिंग रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक कमल पारिख यांनी सांगितले.
0
जागतिक वित्त केंद्र मुंबईऐवजी गुजरातमध्ये

मुंबई – मुंबईही देशाची आर्थिक राजधानी आहे. या शहरात जागतिक वित्त केंद्र उभारण्याची गरज असताना ते पंतप्रधान मोदींनी गुजरातला पळवल्याचे या अर्थसंकल्पातून उघड झाले आहे.
गुजरात आंतरराष्ट्रीय वित्त टेकसिटी (जीआयएफटी) हे केंद्र गुजरातमध्ये ‘आंतरराष्ट्रीय वित्त केंद्र’ या नावाने विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली.
महिन्यापूर्वी झालेल्या परिसंवादात मुंबईत जागतिक वित्त केंद्र उभारण्याची घोषणा केंद्रीय अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याला दुजोरा दिला होता. मात्र, अर्थसंकल्पातून हे केंद्र गुजरातमध्ये उभारण्याचे निश्चित झाले आहे.
या जागतिक वित्त केंद्रासाठी लागणा-या सर्व नियमन मंजु-या मार्चमध्ये देण्यात येणार आहेत. या केंद्राच्या पहिल्या टप्प्याला लवकरच प्रारंभ होणार आहे.
दुबई आणि सिंगापूरला आंतरराष्ट्रीय वित्त केंद्र म्हणून जगभरात मान्यता आहे. या शहरातील सुविधा आता नवीन जागतिक वित्त केंद्रात उभारण्यात येणार आहेत. या केंद्राला कर, नियामकांबाबतच्या सर्व सुविधा पुरवण्यात येईल.










