
सुरतमध्ये लोकांनी तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पादनांची पाकीटे जाळून होळी साजरी केली.
Archive for March 5th, 2015
0
सुहास जोशी, निशिगंधा वाड यांना महाराष्ट्र कन्या गौरव पुरस्कार

मुंबई- आयकॉन फाऊंडेशनच्या वतीने महिला दिनाच्या पूर्वसंध्येस देण्यात येणा-या महाराष्ट्र कन्या गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, धारीवाल फाऊंडेशनच्या उपाध्यक्ष शोभा धारीवाल, अभिनेत्री निशिगंधा वाड, प्रख्यात गायनॉकॉलॉजिस्ट डॉ. संध्या जैन यांची निवड करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र प्रबोधन जीवन गौरव पुरस्कार प्रख्यात शेफ संजीव कपूर यांना देण्यात येणार आहे.
याशिवाय शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, प्रख्यात लेखिका व वक्त्या मानसी देशमुख, पुण्याच्या जागृती संस्थेच्या संस्थापिका विश्वस्त व भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या चेअरमन जयश्री काळे, आंतरराष्ट्रीय धावपटू संजीवनी जाधव, उद्योजिका प्रतिभा खोडके यांनाही हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
हा सोहळा शनिवारी ७ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरच्या रंगस्वर सभागृहात होणार असून त्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकासमंत्री विष्ण सावरा, एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या प्रकुलगुरू डॉ. वंदना चक्रवर्ती, विश्वकोष मंडळाच्या अध्यक्ष डॉ. विजया वाड, प्रख्यात उद्योगपती किशोर खाबिया, डॉ. उषा खाबिया, विश्वविख्यात बॅरिअॅट्रिक सर्जन डॉ. जयंत वाघ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आयकॉन फाऊंडेशनचे संचालक मनोज वरंदळ यांनी दिली आहे.
0
वाहनाचे पहिले माती परिक्षण दाभडीत

केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांची दाभडी गावास भेट
यवतमाळ, दि. 5 : केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आर्णी तालुक्यातील दाभडी या गावास भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली. काही दिवसांपूर्वी या गावात विठ्ठल सवाई राठोड या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. या शेतकऱ्यांच्या कुटुंबास भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी आ.राजु तोडसाम, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, परिविक्षाधिन आयएएस अधिकारी दिपककुमार मिना, राजु डांगे, उध्दव येरमे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय केमीकल व फर्टीलायझरच्यावतीने प्राप्त झालेल्या फिरत्या माती परिक्षण वाहनाचा शुभारंभ आर्णी येथील विश्रामगृह येथे ना. अहीर यांच्या हस्ते झाला. राष्ट्रीय आरोग्य व सुपिकता व्यवस्थापनांतर्गत सदर वाहन उपलब्ध झाले आहे. वाहनाच्या शुभारंभाप्रसंगी राष्ट्रीय केमीकल व फर्टीलायझरचे सहाय्यक महाव्यवस्थापक जे.के.राठोड, व्यवस्थापक डी.एल.देशमुख, पी.डी.मांडवकर उपस्थित होते. शुभारंभानंतर सदर वाहन दाभडी या गावात आल्यानंतर वाहनाने दाभडी येथे पहिले माती परिक्षण केले. शेतकरी अमोल रामभाऊ दिवाने यांच्या शेतात मातीचे नमुने घेऊन परिक्षण करण्यात आले. दाभडी या गावात भेटीप्रसंगी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेटीसह गावकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. गावात गरीब 50 कुटुंबांना शौचालय बांधण्यासोबतच गावाच्या विकासासाठी 10 लक्ष रूपये उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा करतांना त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
0
होळीनिमत्त पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते वृक्षारोपण
यवतमाळ, दि. ५ : होळी सण साजरा करण्यासाठी वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी होळीमध्ये लाकडांचा वापर करण्याऐवजी वृक्षपूजनाने होळी साजरी करण्याचा संदेश राज्याचे महसूल राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज येथे दिला.
स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील गार्डन हॉलसमोरील बगीच्यात होळी निमित्त आज गुरूवारी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते पिंपळाचे रोपटे लावण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. मदन येरावार, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जिल्हा निवडणूक अधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी डॉ. राजेश अडपावार, तहसीलदार अनुप खांडे, नायब तहसीलदार दिलीप झाडे, दिलीप कडासने, अजय शेटे आदी कर्मचारी उपस्थित होते.
होळीत लाकडे जाळल्याने पर्यावरणाचा र्हास होतो. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. त्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन गरजेचे असून होळीसारख्या सणांना नागरिकांनी वृक्षारोपण व वृक्षपूजन केले पाहिजे, असे ना. संजय राठोड म्हणाले. त्याचप्रमाणे रंगपंचमी साजरी करताना, पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन त्यांनी केले. पाण्याऐवजी कोरडे गुलालाचे रंग वापरून धुळवड साजरी करण्याचे आवाहन याप्रसंगी ना. संजय राठोड यांनी केले.
0
अपघात नव्हे, अनैतिक सबंधातून युवकाचा खून

यवतमाळ दि. ५ – वणी येथील वणी-घुगूस मार्गावर मंदर शिवारातील पुलाजवळ उकणी येथील युवकाचा दुचाकीसह मृतदेह आढळून आला होता़ पोलीस तपासामध्ये ‘त्या’ युवकाचा अपघात नसून अनैतिक सबंधातून खून झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी महिलेसह तीन आरोपींना आज ५ मार्च रोजी अटक केली.
प्रशांत चिंतामण रणदिवे (३१) रा. उकणी असे मृतकाचे नाव असून निळापूर येथील आरोपी अनिल बोढाले सोबत मैत्रीचे संबंध होते़ हे दोघे महाविद्यालयीन शिक्षणापासून एकमेकाचे मित्र असल्याने त्यांचे घरी येणे-जाणे होते़ त्यातच मृतकाचे अनिलची पत्नी पुजा सोबत प्रेमसंबंध जुळले़ या अनैतिक प्रेमसंबंधामुळे गत एक महिन्यापूर्वी त्यांच्यात वाद निर्माण झाला होता़ याचा वचपा काढण्याकरीता सहकारी वामन पाचभाई रा़शेलू व विनोद मारोती मिलमिले यांनी संगनमताने दि़२२ फेब्रुवारीला मृतकास घरी जेवण्याकरीता बोलाविले़ मृतक हा आपल्या पत्नीला बाहेर जेवण करायला जात असल्याचे सांगून निळापूर येथील आरोपी अनिल याच्या घरी गेला़ यावेळी अनैतीक संबंधावरुन वाद उत्पन्न झाला असता आरोपींनी हातोड्याने मृतकाच्या डोक्यावर सपासप वार केले़ तसेच त्याच्या गुप्तांगावरही घाव करण्यात आल्याने अनिलचा आरोपीच्या घरीच मृत्यू झाला़ तसेच मृतकाला त्याच्याच दुचाकीवर बसवून घुगूस मार्गावरील पुलाजवळ टाकून अपघाताचा देखावा निर्माण केला़ या बाबत येथील ठाणेदार असलम खान व गुन्हेशोध पथकाने आरोपी व मृतकाचे मोबाईलचे टॉवर लोकेशन व कॉल डिटेल्स मिळवून भक्कम पुरवे गोळा करून त्या दृष्टीने तपासकार्य चालविले़ ५मार्च रोजी मुख्य आरोपी अनिल बोढाले, पुजा अनिल बोढाले हे दोघे रा़निळापूर, वामन पाचभाई रा़शेलू, विनोद मिलमिले रा़विरकुंड यांना अटक करण्यात आली़ त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली असून न्यायालयात हजर केले असता दि़८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे़
ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक संजय दराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सविता तुरेकार, एलसीबीचे अधिकारी पुजलवार यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार असलम खान, पो़लीस उपनिरीक्षक कवडू चांदेकर, दिलीप सायरे, प्रज्ञा वाडेकर, डिबी पथकाचे जमा. अरुण नाकतोडे, गोपाल वास्टर, साजिद सय्यद, विकास खडसे, प्रमोद जूनूनकर, सुधिर पांडे, शेख नफिस, आनंद अलचेवार, वाहन चालक प्रमोद जिड्डेवार यांनी परिश्रम घेतले़
0
मुख्यमंत्र्यांनी पिंपरी बुटी गावात घालविली रात्र

पिंपरीत शेतकऱ्याच्या घरी भोजन व मुक्काम
यवतमाळ, दि. 4 : शेतकरी आत्महत्येमागील नेमक्या कारणांचा शोध घेवून या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्यातील तीन गावांना भेटी देवून गावकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यवतमाळ पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या रातचांदणा व घोडखींडी येथील शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 1600 लोकसंख्येच्या पिंपरी बुटी येथील शेतकरी विधवा महिलांशी संवाद साधला. त्यानंतर तेथीलच विष्णुजी रंगराव ढुमणे या शेतकऱ्याकडे भोजन घेवून यांनी मुक्काम केले.
या भेटीत मुख्यमंत्र्यांसोबत पालकमंत्री संजय राठोड, आ.मदन येरावार, आ.डॅा.अशोक ऊईके, आ.राजु नजरधने तसेच प्रधान सचिव प्रविण परदेशी, आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मल्लिनाथ कलशेट्टी, पोलिस अधिक्षक संजय दराडे यांनीही या गावात रात्र घालविली. मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या गावांना दिलेल्या भेटीप्रसंगीही हे सर्व मान्यवर उपस्थित होते. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहे. त्यामुळे येथील आत्महत्या थांबविण्यासोबतच त्यामागील कारणांचा नेमका शोध घेण्यासाठी यवतमाळ येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्रानंतर मुख्यमंत्र्यांनी सायंकाळी 8 वाजता थेट रातचांदणा हे गाव गाठले. त्यानंतर काही अंतरावर असलेल्या घोडखिंडी व नंतर पिंपरी बुटी येथील शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.
शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे. वारंवार शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सिंचनाच्या सोयी उपलब्ध करुन दिल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी दिर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येत आहे. परंतु तात्काळ दिलासा देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले असून या अभियानातुन शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. येत्या जुन अखेर पर्यंत याचे चांगले परिणाम दिसून येतील, असे मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधतांना म्हणाले.
गेल्या काही वर्षांमध्ये पाहीजे त्या प्रमाणात सिंचन विहीरींची कामे झाली नाहीत. येत्या जुन पर्यंत प्रलंबीत सर्व विहीरी पुर्ण करण्यात येणार आहे. शिवाय या विहीरींना विज कनेक्शन दिले जातील. शेतकऱ्यांनी खचुन न जाता खंबीपणे उभे राहावे. शासन पुर्ण ताकदीनीशी पाठीशी उभे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पिंपरी बुटी येथे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत शेतकऱ्यांच्या विधवा महिलांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी महिलांनीही आपल्या अडीअडचणी विषद केल्या. विधवा महिलांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न आहे, असे सांगूण मुख्यमंत्र्यांनी सर्वच महिलांना धीर देत त्यांच्याशी चर्चा केली. या गावात रात्री 11 पर्यंत मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांची निवेदने स्विकारुन चर्चा केली.
पिंपरी बुटी हे यवतमाळ पासून 22 किलोंमीटर अंतरावर असलेले 1600 लोकसंख्येचे गाव आहे. गावकऱ्यांशी चर्चा आटोपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकरी विष्णूजी रंगराव ढुमणे यांच्या घरी पालकमंत्री संजय राठोड व आ. मदन येरावार यांच्यासोबत भोजन घेतले. मुख्यमंत्र्यांच्या बाजूस शेतकरी विष्णूजी ढोमणे बसले होते. भोजन आटोपल्यानंतर सर्वांनी श्री. ढोमणे यांच्याकडेच मुक्काम केला. ढोमणे यांच्याकडे 13 एकर कोरडवाहु शेती आहे. त्यात ते कापुस व सोयाबिन पिके घेतात. अन्य आमदार तथा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावात वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम केले. दुसऱ्या दिवशी स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकामाचे भूमिपूजन केल्यानंतर मुख्यमंत्री परभणीकडे रवाना झाले.
मुख्यमंत्र्यांचे भरीत, भाकरीचे साधे जेवण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी बुटी येथील मुक्कामात श्री. ढोमणे यांच्याघरी भरीत, भाकरीचे जेवण घेतले. जमिनीवर पंगतीत बसून त्यांनी साध्या भोजनाचा आस्वाद घेतला. त्यांच्या बाजूला शेतकरी श्री.ढोमणे तर दुसऱ्या बाजूला पालकमंत्री संजय राठोड तसेच आ.राजु नजरधने, आ.डॅा.अशोक उईके बसले होते. भरीत, भाकरीसह जेवणात दाळभाजी, ठेचा व भाताचा समावेश होतो. दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांना परभणी येथे जावयाचे असल्याने सकाळीच उठून स्नान करून पुढील कार्यक्रमास रवाना झाले.
0
निराश होऊ नका, चित्र पालटेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यवतमाळ,दि. 4 : शेती व्यवसायात उत्पादनाच्या तुलनेत खर्चाचे प्रमाण अधिक आहे. खर्चाची ही शेती अधिक नफा आणि फायद्यात कशी आणता येईल, यासाठी शासन प्रयोग राबवित आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांचा माल थेट प्रक्रीया उद्योगांना विकण्याची व्यवस्था होणार आहे. शासन प्रामाणिक आणि संवेदनशिलपणे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशिल आहे. शेतकऱ्यांनी कृपया निराश होऊ नये. शासनावर विश्वास ठेवा. आजूबाजूच्यांना सांगा. येत्या काळात परिस्थिती निश्चितपणे पालटणार आहे, असा भावनिक संवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यातील घोडखिंडी व पिंपरी बुट्टी या गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी मनमोकळेपणाने त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी पालकमंत्री संजय राठोड, आ.मदन येरावार, आ.राजु नजरधने, आ.डॅा.अशोक उईके, प्रधान सचिव प्रविण परदेशी, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मल्लिनाथ कलशेट्टी आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांना वेळेवर पथपुरवठा होणे आवश्यक आहे. यवतमाळ जिल्ह्यात विविध कारणास्तव अर्धे शेतकरी संस्थात्मक कर्ज पुरवठ्यापासून वंचित आहे. थकीत कर्जाचे पुनर्गठण केल्यानंतर ते व्याजासह भरावे लागते. सदर पुनर्गठण दिर्घ मुदतीत कसे करता येईल सोबतच यातील काही भाग शासनास भरता येईल का? याचाही विचार करावा लागेल. ग्रामीण भागात कर्ज पुरवठ्याच्या संस्था उपलब्ध नसणे हे सुध्दा शेतकऱ्यांच्यादृष्टीने त्रासदायक आहे. यावर तोडगा काढण्यासाठी येत्या काळात पथपुरवठा संस्थांचे जाळे उभारणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
शासन शेतकरी तथा सर्वसामान्यांच्या हितासाठी विविध प्रकारच्या योजना राबवित असते. योजनांवर खर्च होणारा जनतेचा पैसा जनतेच्या कामी योग्यप्रकारे लागतो आहे का? तसेच विविध योजनांच्या अंमलबजावणी तपासण्यासाठी सॅटेलाईट यंत्रणा लवकरच उभी राहणार आहे. नापिकीमुळे शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागतो. त्यासाठी दिर्घकालीन उपायांसोबतच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तातडीच्या उपाययोजना करण्यात येणार आहे. येत्या जुनपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधावर किमान ओलावा तयार होतील यादृष्टीने विविध कामे घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांचा माल थेट प्रक्रीया उद्योजकांना विकण्यासाठी त्यांच्याशी बोलणी सुरु असल्याचे ते म्हणाले.
लवकरच प्रत्येक कुटुंबाचे सुक्ष्म सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणातून ज्या बाबी समोर येतील त्या आधारावर नविन योजना राबवून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. जिल्ह्यात प्रलंबित सिंचन विहिरी जुनपर्यंत पुर्ण करून त्यांना विज जोडण्या दिल्या जातील. यासाठी निधीची कमतरता नसल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या विधवा महिलांशी संवाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी बुट्टी येथे गावकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेत गावातील शेतकऱ्यांच्या विधवा महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या महिलांकडून त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. यावेळी दहा कुटुंबांना कुठलीच मदत मिळाली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी तात्काळ सदर महिलांना कुठल्या योजनेतून लाभ देता येईल ते पाहण्याच्या सुचना यावेळी संबंधीतांना केल्या.















