Archive for March 31st, 2014
0
युवा सेनाध्यक्ष आदित्य ठाकरे बुधवारी यवतमाळात,भावना गवळींच्या प्रचारार्थ काढणार रॅली
यवतमाळ – युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे २ एप्रिल रोजी महायुतीच्या उमेदवार भावना गवळी यांच्या प्रचारार्थ यवतमाळ जिल्ह्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता अवधुत क्रिडा मैदानातून मोटर सायकल रॅली काढण्यात येणार आहे. तर नेर येथेही दुपारी १ वाजता मोटर सायकल रॅलीचे आयोजन केले आहे.
या रॅलीत महायुतीच्या उमेदवार भावना गवळी, शिवसेनेचे आ. संजय राठोड, शिवसेना जिल्हा प्रमुख श्रीकांत मुनगीनवार, माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, माजी आ. मदन येरावार, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे,मनोज इंगोले, बाबासाहेब गाडे पाटील, राजू पडगीलवार, रिपाईचे जिल्हाध्यक्ष मोहन भोयर, सुखदेव जाधव, गोविंद मेश्राम, भाजपचे अमर दिनकर, अमोल ढोणे, अजय बिहाडे, जयदीप सानप, प्रवीण प्रजापती, अजय राऊत, शिवसेनेचे प्रवीण पांडे, श्रीधर मोहोड, राजेंद्र गायकवाड, हरिहर लिंगनवार, गजानन डोमाळे, किशोर इंगळे आदी पदाधिकारी सहभागी होणार आहेत. येथील अवधुत क्रिडा मैदानातून सुरु होणारी मोटर सायकल रॅली दत्त चौक, वीर वामनराव चौक, दाते चौक, सत्य साईज्योत मंगल कार्यालय, आर्णी रोड, बस स्थानक चौक, लाठीवाला पेट्रोल पंप, लोकमाता चौक, एलआयसी चौक, पोस्ट आॅफिस चौकी, स्टेट बँक चौकी, अप्सरा टॉकीज, इंदिरा मार्केट, शिवाजी चौक आदी मार्गाने जावून अवधुत क्रीडा मैदानावर पोहचेल. या ठिकाणी आदित्य ठाकरे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. या मोटर सायकल रॅलीत राळेगाव, कळंब, बाभूळगाव, यवतमाळ या तालुक्यातील युवा सेना, विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आपआपल्या वाहनांसह सहभागी व्हावे, असे आवाहन युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी गजानन बेजंकीवार, निखील पाटील जैत, पराग पिंगळे, अभिषेक पांडे, राजू दुधे,निखील वाघ यांनी केले आहे.
अपघातात न्यायदंडाधिकारी व चालकाचा मृत्यू
उस्मानाबाद- गाडीचे टायर फुटून झालेल्या अपघातात लातूरचे प्रथम न्यायदंडाधिकारी आणि त्यांचा गाडीचा चालक यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अतिरिक्त जिल्हाधिका-यांसह त्यांची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.लातूरहून गुलबर्गाकडे जाणारे अतिरिक्त जिल्हाधिकारी अझीज तांबेळी यांच्या गाडीचे टायर फुटून सकाळी साडेनऊच्या सुमारास उमरग्याजवळ अपघात झाला. या अपघातात लातूरचे प्रथम न्यायदंडाधिकारी विश्वास गोंधपूरे आणि त्यांच्या गाडीच्या चालकाचा मत्यू झाला. अपघातात अझीज तांबोळी आणि त्यांची पत्नी आणि मुलगा गांभीर जखमी झाले आहेत.
0
भाजप म्हणजे द्वेषाचे राजकारण – सोनिया गांधी
लखीमपुर (आसाम)- भाजपचे नेते केवळ मोठ्या गप्पा मारतात आणि द्वेषाचे राजकारण करतात, असा हल्लाबोल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला. लखीमपूर येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारसभेत त्या रविवारी बोलत होत्या.
सध्या भाजपचे नेते देशभरात फिरून विकासाच्या मोठ्या गप्पा मारत आहेत. मात्र भाजपशासित राज्यांमध्ये कोणता विकास झाला, असा प्रश्न उपस्थित करत भाजपच्या बोलण्यात आणि करण्यामध्ये खूप मोठा फरक आहे, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. २००९मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातील बहुतेक सर्व आश्वासने यूपीए सरकारने पूर्ण केली आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातील सर्व आश्वासने पूर्ण करण्याचा पक्षाचा प्रयत्न राहील, त्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. देशातील प्रत्येकाचा विकास करण्यावर काँग्रेसचा भर आहे.आम्ही कोणतीच खोटी आश्वासने देत नाहीत आणि दिलेली आश्वासने पूर्ण करतो, असे सांगत त्यांनी केंद्र सरकारच्या कार्याचा गौरव केला. देशाच्या ऐक्याला बाधा पोहोचवत भाजप देशाला कमकुवत करत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपकडून दिल्या जाणा-या खोट्या आश्वासनांना भुलून न जाता आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करून आणि योग्य निर्णय घेऊन काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.काँग्रेसच्या नेत्यांनी देशासाठी नेहमीच बलिदान दिले आणि त्याग केला आहे. तर दुसरीकडे भाजप समजांमध्ये तेढ निर्माण करून फुटीरतावादी वृत्तींना खतपाणी घालत आहे, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसने देशाची गंगा-जमुना संस्कृती घट्ट केली तर, भाजपने नेहमीच जातीय राजकारण करुन देशाला कमकुवत केल्याचा आरोप सोनियांनी केला. प्रत्येक हातात शक्ती, प्रत्येक हाताची प्रगती यावर आमचा विश्वास असल्याचे सोनियांनी यावेळी सांगितले. आसाम आणि अन्य भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही देशासाठी प्राणांचे बलिदान दिल्याचे सोनियांनी सांगितले. देश घडवण्यावर आमचा विश्वास आहे. भाजप आणि अन्य विरोधी पक्ष त्यावेळी कुठे होते? स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्यांचे काय योगदान आहे? देश, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचेच काम त्यांनी केले असा आरोप सोनिया यांनी केला. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला, आश्वासनांना बळी न पडता काँग्रेस उमेदवाराच्या पाठिशी उभे रहाण्याचे सोनियांनी उपस्थितांना आवाहन केले.
0
नववर्षाचे उत्साहात स्वागत
मुंबई- ढोलताशांचा गजर, सजवलेल्या पालख्या, दिंड्या, लेझिम पथके, मृदुंगाचा ताल, तुता-यांचा निनाद आणि विठुनामाचा गजर अशा मराठमोळ्या वातावरणात शोभा यात्रा काढून सोमवारी नववर्षाचे स्वागत करण्यात आले. तसेच राज्यभर आनंदाची गुढी उभारुन या नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले.
मराठी नूतनवर्ष गुढीपाडव्यानिमित्त काढलेल्या भव्य स्वागतयात्रांमुळे मुंबईसह ठाण्यातील अनेक भागात पारंपरिक आणि संस्कृतीचे दर्शन घडले. पुणे, नाशिक, नागपूरसह मुंबईत गिरगाव, दादर, बोरीवली आणि ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, वसई भागातही भव्य अशा स्वागतयात्रांचे आयोजन करण्यात आले.डोंबिवलीत निघालेल्या भव्य यात्रेदरम्यान दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मदतनिधी गोळा करण्यात आला.गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे मुलुंडच्या संभाजी मैदानात छत्रपती शिवाजी महाराजांची दहा फुटांची रांगोळी काढण्यात आली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी रविवारी या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन केले
0
सेन्सेक्सचा नवा सर्वोच्च विक्रम
मुंबई- गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर निफ्टी आणि मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने नवा विक्रम केला. सोमवारी सकाळी बाजाराला सुरुवात होताच उर्जा, तेल, गॅस, वाहन आणि बँकींग क्षेत्रातील शेअर्सच्या विक्रमी खरेदीने निर्देशांक २२,४६४.८६ या नव्या सर्वोच्च पदावर विराजमान झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही ३२.९५ अंकानी वाढ झाल्याने निफ्टीनेही ६, ७२६.८५ असा उच्चांक गाठला.
‘बाझेल ३’ च्या अंमलबजावणीला मुदतवाढ मिळाल्याने बँकिंग क्षेत्रात झालेल्या मोठ्या खरेदीने मागच्या आठवड्यातच सेन्सेक्सच्या तेजीला बळ मिळाले. शुक्रवारी सेन्सेक्स १२५.९० अंकांच्या वाढीसह २२,३३९.९७ वर बंद झाला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही ५४.१५ अंकांची वाढ झाली आणि तो ६.६९५.९० वर बंद झाला. परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. सेबीच्या आकडेवारीनुसार ‘एफआयआय’ने १२ मार्चपासून बाजारात १८,०७३ कोटींची गुंतवणूक केली आहे. विक्रमाकडे आठवडाभर मागे वळून न पाहणा-या भांडवली बाजाराच्या सोमवारच्या प्रवासाची सुरुवात चांगली झाली आहे. या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आणि मंगळवार एक एप्रिल रोजी रिझव्र्ह बँकेचे पतधोरण जाहीर होणार आहे, त्यामुळे उत्सुकता आणखी शिगेला पोहचली आहे.
0
विमान घातपातामागे दहशतवादी?
लंडन- मलेशियन एअरलाइन्सच्या बेपत्ता विमानामागे दहशतवादी कारवाईची शक्यता मलेशियाच्या अधिका-यांनी व्यक्त केली आहे. या बाबींचा तपास करण्यासाठी त्यांनी इंग्लंड ‘एमआय-६’, अमेरिकेची ‘सीआयए’ आणि चीनच्या गुप्तचर संस्थांची मदत मागितली.
या गुप्तचर संस्थांनी वैमानिक जहारी अहमद शहाच्या घरी सापडलेल्या फ्लाइट सिम्युलेटरची तपासणी सुरू केली. अपघातामागे दहशतवादी, अपहरण, व्यक्तिगत आणि मानसिक समस्या असावी असा कयास आहे.विविध गुप्तचर संस्थांशी याबाबत चर्चा सुरू असल्याचे मलेशियाचे वाहतूकमंत्री हिशामुद्दीन हुसैन यांनी सांगितले. दरम्यान, विमान कोसळल्याचे पुरावे मलेशिया सरकारने द्यावेत, अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे.
0
दहशतवादी भुल्लरला फाशीऐवजी जन्मठेप
नवी दिल्ली- खलिस्तानी दहशतवादी देविंदरपाल सिंग भुल्लर याला ठोठावण्यात आलेली फाशीची शिक्षा कमी करून ती जन्मठेपेवर आणण्याची केंद्र सरकारची शिफारस सर्वोच्च न्यायालयास मान्य केली. त्यानुसार भुल्लरची फाशी रद्द झाली असून ही शिक्षा जन्मठेपेत परावर्तीत करण्यात आली आहे.
नवी दिल्ली येथे सप्टेंबर १९९३ मध्ये घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी भुल्लर याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या बॉम्बस्फोटात नऊ जण ठार आणि २५ जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटांप्रकरणी भुल्लर याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यावर भुल्लरने दया अर्ज दाखल केला होता. मात्र त्याच्या दया याचिकेवर निर्णय घेण्यास आठ वर्षांचा विलंब झाल्याने या प्रकरणात शिक्षा परावर्तित होऊ शकते, असे महाधिवक्ता जी ई वहाणवटी यांनी सरन्यायाधीश सदासिवम यांच्या खंडपीठास सांगितले. त्यावर सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने भुल्लरची फाशी रद्द करून त्याला जन्मठेप सुनावली. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पी सदासिवम, न्यायमूर्ती आर एम लोढा, न्यायमूर्ती एच एल दत्तु आणि न्यायमूर्ती एस जे मुखोपाध्याय यांच्या खंडपीठाने हा निर्णय सुनावला. दिल्लीतील युवक काँग्रेसच्या कार्यालयात १९९३साली भुल्लर याने बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्यात नऊजण ठार झाले होते. याप्रकरणी भुल्लर याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र, अनेक वर्षे हा दयाअर्ज राष्ट्रपतींच्या संमतीविना सरकारकडे पडून होता.


















