नाशिक – नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील गोळशी येथे आरती हॉटेलमध्ये काल (बुधवारी) रात्री दहाच्या सुमारास सुरू झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले आणि हॉटेल मालकासह तीनजणांचा मृत्यू झाला.
हॉटेलमध्ये वीटभट्टी आणि ट्रक व्यावसायिक किरण ढाकणे, ट्रकचालक श्रीराम शिखरे आणि अन्य एक व्यक्ती असे तिघेजण रात्री दहाच्या सुमारास जेवत होते. त्यावेळी टेबलवर शिखरे यांनी उलटी केली. हॉटेलमालक रमेश सोनवणे यांनी शिखरे यांना टेबल साफ करुन देण्यास सांगितले. यावरुन शिखरे आणि सोनवणे यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले आणि शिखरे यांचा मृत्यू झाला. ही घटना कळताच शिखरे यांना ओळखणा-या दहा-पंधरा जणांचा जमाव हॉटेलमध्ये आला. जमावाने केलेल्या हल्ल्यात हॉटेल मालक सोनवणे आणि हॉटेलचा आचारी मनोज गंभीर जखमी झाले. दोघांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी चौकशीसाठी काहीजणांना ताब्यात घेतले आहे आणि घटनास्थळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. हॉटेलमधील घटनेनंतर गोळशी आणि आसपासच्या भागात तणावाचे वातावरण आहे.
Archive for March 27th, 2014
0
हॉटेलमध्ये हाणामारी, ३ ठार
0
गावस्करांना हंगामी अध्यक्ष बनवा – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली – आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी अंतरिम आदेश देणार आहे. या संपूर्ण प्रकरणावर अंतिम निकाल येईपर्यंत एन.श्रीनिवासन यांच्या जागी सुनील गावस्कर यांची बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त करावी असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
तसेच चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांनी आयपीएल-सात मध्ये सहभागी होऊ नये असा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाने दिला. इंडिया सिमेंटशी संबंधित कुठल्याही व्यक्तीने बीसीसीआयमध्ये राहू नये असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या या मतांवर बीसीसाआयकडून उद्यापर्यंत उत्तर मागितले आहे.
त्याआधी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआय अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांना पदावरुन पायउतार होण्याचा इशारा दिला होता. त्यावर बीसीसीआयने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश मुकूल मुदगल समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव दिला. अहवालात ज्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे त्यांच्यावर कारवाई करु असे बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने क्रिकेटच्या भल्यासाठी आम्हाला कठोर विचार करुन तसे आदेश द्यावे लागतील असे सांगितले. एन.श्रीनिवासन बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर असेपर्यंत आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही त्यामुळे श्रीनिवासन पदावरुन पायउतार व्हा, नाही तर तसे आदेश द्यावे लागेल असा सर्वोच्च न्यायालयाने इशारा दिला होता.
0
लोकसभा निवडणूक, श्रीमंत आणि गुन्हेगारांचे वर्चस्व

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आसाममधील पाच आणि त्रिपूरामधील एका जागेसाठी सात एप्रिलला निवडणूक होत आहे. या सहा मतदार संघात एकूण ६४ उमेदवार उभे आहे. त्यांनी निवडणूक अर्ज भरताना निवडणूक आयोगाकडे दिलेल्या शपथपत्रानुसार त्यातील १७ उमेदवार करोडपती आहेत. या करोडपती उमेदवारांकडे प्रत्येकी सरासरी पाच कोटी ७५ लाख रुपयांची संपत्ती आहे.
सहा उमेदवारांवर गुन्हे दाखल असून त्यातील तीन जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर बलात्कार आणि खूनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापैकी सर्वाधिक आसाम गण परिषदेचे (एजीपी) उमेदवार आहेत. एजीपीच्या पाच उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. लॉटरी किंग मोनी कुमार सुब्बा हे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार असून त्यांच्याकडे ३०६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. इशान्य भारतातील ते सर्वाधिक श्रीमंत आहेत. ६४ पैकी १० जणांचे उत्पन्न चार लाख आहे. तर लाखिमपुर ऋषिकेश येथून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या एका उमेदवाराने आपल्याकडे अवघे नऊ हजार रुपये उत्पन्न असल्याचे सांगितले. यातील ३१ टक्के उमेदवार बारावी आणि त्याहून कमी शिकलेले आहेत. तर ६९ टक्के उमेदवार पदवी किंवा त्याहून अधिक शिकलेले आहेत. ५५ टक्के उमेदवार २५ ते ५० वयाचे आहेत. ४१ टक्के उमेदवार ५१ ते ७० च्या दरम्यान आहेत. तर तीन टक्के उमेदवारांनी वयाची सत्तरी पार केली आहे. यातील ९१ टक्के पुरुष असून महिलांचे प्रमाण अवघे नऊ टक्के आहे.
0
दोन वनरक्षकास अटक ; कारवाई टाळण्यासाठी १० हजार लाचेची मागणी

यवतमाळ – वन जमिनीवरील पराटी काढल्याप्रकरणी कारवाई टाळण्यासाठी लाच लाच मागणाºया दोन वनरक्षकांना अटक केली. आज गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुकुटबन येथील शासकीय निवासस्थानी ही कारवाही केली. संदिप शालीक साखरकर (२७), संदिप रमेश पारधी (२६) अशी अटक केलेल्या वनरक्षकांची नावे असून ते मुकुटबन येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालात कार्यरत होते.
बालाजी देवराव नांदेकर (३९) रा. हेटी ता. कोरपना जि. चंद्रपुर यानी २४ मार्च रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. वनविभागाची परवानगी न घेता वनजमिनीवरील पराटी ट्रॅक्टरने काढल्याने ट्रॅक्टर जप्त करुन दंड करतो अशी भिती दाखवून दाखविली. कायदेशिर कारवाई टाळायची असेल तर १० हजार लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमुद केले. त्यावरुन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २५ मार्च रोजी पडताळणी केली. यामध्ये पंचासमक्ष दोन्ही वनरक्षकांनी कायदेशिर कारवाई टाळण्यासाठी १० हजार लाचेची मागणी केली होती. दरम्यान आज २७ मार्च रोजी वनरक्षकांच्या शासकीय निवासस्थानीच अटक केली. ही कामगिरी पोलीस उपअधिक्षक सतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावतीचे पोलीस उपअधिक्षक उत्तम जाधव, अरुण गिरी, प्रकाश शेंडे, नरेंद्र इंगोले, सुधाकर कोकेवार, गजानन राठोड, अमोल महल्ले,शैलेश ढोणे, अमित जोशी, निलेश पखाले, सुधाकर मेश्राम, अनिल राजकुमार , किरण खेडकर यांनी पार पाडली.
0
खा. विजय दर्डा यांच्याविरुद्ध आरोपपत्र ; कोळसा खाणवाटप घोटाळा

नवी दिल्ली – अनेक घोटाळ्यांनी बदनाम झालेल्या यूपीए सरकारच्या तोंडाला काळं फासणा-या कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं दाखल केलेल्या दुस-या आरोपपत्रात राज्यसभेचे खासदार विजय दर्डा यांचं नाव आल्यानं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला मोठा झटका बसलाय.
विजय दर्डा आणि त्यांचे चिरंजीव देवेंद्र दर्डा यांच्याविरोधात आयपीसीच्या कलम १२० ब , ४२० अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २०१२ पासून कोळसा खाणवाटप घोटाळ्याची चौकशी सीबीआय करत आहे. या कोळसा घोटाळ्यात खासदार विजय दर्डा यांचेही हात काळे झाल्याचा आरोप याआधी झाला होता. चुकीची आकडेवारी आणि सादरीकरण करून कोळसा खाणी मिळवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यामुळे विजय दर्डा प्रमोटर असलेल्या जेएलडी यवमताळ एनर्जी लिमिटेडवर सीबीआयनं छापेही टाकले होते. तसंच, या कंपनीसह पाच कंपन्यांच्या २० आजी-माजी संचालकांवर एफआयआरही दाखल केला होता. त्यात एएमआर आयर्न अँड स्टीलचे संचालक अरविंद कुमार जैसवाल, मनोज जैसवाल, रमेश जैसवाल, देवेंद्र दर्डा, अज्ञात सरकारी कर्मचारी आणि खासगी व्यक्तींचा समावेश होता. या कोळसा घोटाळ्यातील पाच प्रकरणांबाबतच्या तपासाची माहिती सीबीआय शुक्रवारी सुप्रीम कोर्टात देणार होतं. परंतु, त्याआधीच त्यांनी आज दिल्ली कोर्टात दुसरं आरोपपत्र दाखल केलं. त्यात विजय दर्डा आणि देवेंद्र दर्डा यांचं नाव आल्यानं प्रदेश काँग्रेसच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मोदींच्या सभेपूर्वी गयामध्ये दोन बॉम्बस्फोट
गया – भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या गयामध्ये होणा-या सभेपूर्वी माओवाद्यांनी या जिल्ह्यात दोन मोबाईल टॉवर शक्तीशाली स्फोटांमध्ये उडवून दिले आहेत.
गयामध्ये गुरुवारी नरेंद्र मोदी यांच्या दोन प्रचार सभा होणार आहेत. बुधवारी मध्यरात्री माझहोली आणि दुमारिया बाजार या गावात मोठया संख्येने जमलेल्या माओवाद्यांनी दोन शक्तीशाली स्फोट घडवून आणत खासगी कंपन्यांचे मोबाईल टॉवर उध्दवस्त केले.अलीकडेच छत्रा येथे सुरक्षापथकांच्या कारवाईत दहा माओवादी मारले गेले होते. त्याच्या निषेधार्थ माओवाद्यांनी गुरुवारी बिहार आणि झारखंड बंद पुकारला आहे. माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या सासाराम आणि गयामध्ये गुरुवारी मोदी दोन निवडणूक प्रचारसभा घेणार आहेत.माओवादी आणि दहशतवाद्यांकडून कुठल्या प्रकारचा धोका निर्माण होऊ शकतो याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. त्यानुसार आम्ही सुरक्षेच्या उपायोजना केल्या आहेत असे पोलीस महासंचालक अभयानंद यांनी सांगितले.
0
आप’चा चहा पाच हजार रुपये

गुडगाव – आम आदमी म्हणून सर्वत्र वावरणा-या ‘आप’चे पक्षनिधीचे नवनवीन फंडे मात्र चांगलेच महाग आहेत. आधी बीजेपीने ‘नमो चाय’ म्हणून निवडणुकीच्या प्रचारसभेत रंगत निर्माण केली होती. त्यापाठोपाठ भाजपच्या पावलावर पाऊल ठेवत आम आदमी पक्षाकडूनही अशाच प्रकारची चहा पार्टीचे आयोजन केले जात आहे. मात्र हा ‘आम’ चहा काही साधासुधा नाही आहे तर या चहाच्या एका कपाची किंमत आहे तब्बल पाच हजार रुपये.
गुडगावमध्ये येत्या २९ मार्चला आम आदमी पक्षाची चहा पार्टी रंगणार आहे. या चहा पार्टीत सहभागी व्हायचे असल्यास पाच हजार रुपये मोजावे लागणार आहेत.गुडगावमधील ‘आप’चे उमेदवार योगेंद्र यादव या पार्टीच्या निमित्ताने मतदारांशी संवाद साधणार आहेत. ही पार्टी कुठे होणार आहे याबाबत काही सांगण्यात आलेले नाही. याआधी खाजगी मॅनेजमेंट महाविद्यालयात अशी पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी १५० लोकांनी भाग घेतला होता. या पार्टीच्या निमित्ताने अधिक निधी गोळा करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे ‘आप’चे संयोजक संजय कुमार यांनी सांगितले. निवडणुकीच्या प्रचार सभेचा खर्च अधिक असतो त्यामुळे अशा प्रकारे पक्षाला निधी गोळा करावा लागतो असेही कुमार म्हणाले.याआधी आपने दहा हजार द्या आणि केजरीवालांसोबत जेवा हा अनोखा फंडा वापरला होता. पक्षनिधी वाढवण्यासाठी आपने खास डिनर पार्टी आयोजित केली होती. मात्र आपच्या या फंड्यावर चहूबाजूंनी टीकाकारांनी टीका केली होती
0
आयटम गर्ल राखी निवडणुकीच्या रिंगणात

मुंबई – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अनेक कलाकार आणि क्रीडापटू निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. यात आता बॉलीवूडची आयटम गर्ल राखी सावंतहीचा देखील समावेश झाला आहे. अन्य कलाकारांप्रमाणेच राखीही निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत राखी वायव्य मुंबईमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे.
वायव्य मुंबईमधून राखी सावंत काँग्रेसचे गुरुदास कामत, शिवसेनेचे गजानन किर्तीकर, आपचे मयांक गांधी आणि मनसेचे महेश मांजरेकर यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहे.राखीला भाजपकडून उमेदवारी हवी होती. त्यासाठी तिने दिल्लीतील भाजपच्या मुख्य कार्यालयाला भेटही दिली. मात्र भाजपने तिला मुंबईसाठी उमेदवारी नाकारत श्रीरामपूरमधून तिकीट देऊ केले. भाजपने तिकीट नाकारल्याने राखीने अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी तिने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला आहे. त्यासोबतच या निवडणुकीत या उमेदवारांना जोरदार टक्कर देणार असल्याचाही विश्वास तिने यावेळी व्यक्त केला.
0
भाजपच्या सभा दहशतवाद्यांच्या रडारवर

लखनऊ – उत्तरप्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी गोरखपूर रेल्वे स्टेशन जवळून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. दोन्ही दहशतवाद्यांची भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यासह काही प्रभावी नेत्यांच्या प्रचार सभांमध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ला करण्याची योजना होती.
बरकत आणि मुझम्मील अशी अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांची नावे असून, ते पाकिस्तानी नागरिक आहेत. लखनऊच्या एटीएस मुख्यालयात दोघांची कसून चौकशी सुरु आहे. अटक केलेल्या दोन्ही दहशतवाद्यांना मोठया निवडणूक प्रचारसभांमध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ला करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या अशी माहिती तपास अधिका-यांनी दिली.दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर उत्तरप्रदेश एटीएसने ही कारवाई केली. एटीएसचे प्रमुख राजीव सब्बरवाल यांनी अटकेच्या वृत्ताल दुजोरा दिला मात्र त्यापेक्षा अधिक माहिती देण्यास नकार दिला.
दोन दहशतवाद्यांना अटक
अयोध्या – उत्तर प्रदेशच्या दहशतवादी विरोधी पथकाने (अँटी टेररिस्ट स्क्वाड) अयोध्येजवळ गोरखपूर स्टेशनवरुन बरकत आणि मुझममिल या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दोघे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमदेवार नरेंद्र मोदी यांना मारण्यासाठी मानवी बॉम्ब होण्याच्या उद्देशाने आले असल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. पकडलेल्या दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा आणि बॉम्ब निर्मितीचे बरेच साहित्य जप्त करण्यात आले.
दहशतवादी तहसीन अख्तर याच्या चौकशी दरम्यान दिल्ली पोलिसांना मानवी बॉम्ब बनण्यासाठी आलेल्यांची माहिती मिळाली. ही माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच सापळा रचून कारवाई केल्याचे एटीएसचे पोलिस महानिरीक्षक राजीव सभरवाल यांनी सांगितले. पकडलेले दोन्ही दहशतवादी पाकमधील मुलतानचे रहिवासी आहेत, असेही ते म्हणाले. याआधी दिल्ली आणि राजस्थान पोलिसांनी संयुक्त कारवाई करत राजस्थानमधून इंडियन मुजाहिदीनच्या सहा जणांना पकडले. यात बॉम्ब तयार करणारा पाकिस्तानी दहशतवादी वकास हा देखिल होता. हे दहशतवादी देखिल मोदींनाच मारण्याच्या उद्देशाने सक्रिय झाले होते. आठवड्याभरात मोदींना लक्ष्य करण्यासाठी सक्रिय झालेल्या आठजणांना पकडल्यामुळे मोदींच्या सुरक्षा यंत्रणेला विशेष खबरदारी घेण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.
0
मनसेचे राजू पाटील राजे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज
यवतमाळ – मनसेचे यवतमाळ वाशिम लोकसभेचे उमेदवार राजू पाटील राजे यांच्या प्रचाराचा २७ मार्च रोजी प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. श्री संत सेवालाल महाराज, श्री संत मुंगसाजही महाराज यांचे चरणी नारळ फोडून पोहरा देवी ते धामणगाव देव पर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. लोकसभे













