
यवतमाळ – नेताजी मार्केटमध्ये देशी पिस्टल घेऊन फिरणाºया युवकाला मंगळवारी रात्री टोळी विरोधी पथकाने अटक केली. अतुल मारोतराव पानसे (२१) रा. विदर्भ हाऊसिंग सोसायटी असे अटक केलेल्या युवकाने नाव आहे. आज रात्री तो नेताजी मार्केटमध्ये देशी बनावटीची पिस्टल घेऊन फिरत होता. या बाबतची गुप्त माहिती टोळी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यावरून सापळा रचून अतुल याला अटक करून त्याच्याकडून तीन राऊंडचे देशी बनावटीचे पिस्टल जप्त केले. तो पिस्टल घेऊन कसासाठी फिरत होता हे अजुनही उघड झाले नाही. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली टोळी विरोधी पथकाचे सहा. पोलीस उपनिरीक्षक वसंत मडावी, सैय्यद साजीद, सुनिल खंडागळे, रुपेश पाली, बबलु चव्हाण, प्रशांत हेडाऊ, बबलु चंदन, सुरेंद्र वाकोडे, रवी आडे यांनी केली.
Archive for March 11th, 2014
0
देशी पिस्टल जप्त
महादेव मंदिरात महिलेची आत्महत्या
यवतमाळ – शहरातील महादेव मंदिर परिसरात जलकुंभात उडी घेऊन एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी दुपारी ३ वाजता घडली. ४५ वर्षीय अनोळखी महिलेने विष प्राशन करून जलकुभात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून वृत्त लिहेपर्यंत ओळख पटली नव्हती.
तीन चोरट्यास अटक
यवतमाळ – शहरात झालेल्या घरफोडीप्रकरणात तीन आरोपींना जिल्हा विशेष पथकाने आज सायंकाळी अटक केली. दोन गुन्ह्याची आरोपींनी कबुली दिली.
योगेश रोढे (२३), जगदिश दांडगे (२१), विकास धुमाळ (१९) सर्व रा. संकटमोचन रोड अशी आरोपींची नावे आहे. काही महिन्या अगोदर उमरसरा परिसरात अनेक चोरीच्या घटना घडल्या. या प्रकरणात सदर आरोपींनी केल्याची गुप्त माहिती जिल्हा विशेष पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने सापळा रचून तीन आरोपींना अटक केली. त्याच्याकडून पाच सिलेंडर, एक मोबाईल आदि साहित्य जप्त केले असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजू वटाणे, जमा. विजय डबले, ऋषी ठाकुर, गजानन डोंगरे, विशाल भगत, भोजराज करपते, मंगेश आजने, अतुल इंगळे, मयुरी मांगुळकर यांनी केली.
घाटी येथे पाच लाखाची घरफोडी
घाटंजी – चोरटयाने बंद घर फोडून पाच लाखाचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना सोमवारी रात्री घाटी (घाटंजी) येथे घडली. मोहम्मद आसिफ अब्दुल रसीद हे आपल्या कुटुंबीयासह मोठ्या वडीलाचा मृत्यू झाल्याने अत्यसंस्कारासाठी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्याने मोहम्मद आसिफ याच्या घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने व एक लाख रुपये रोख असा एकुण पाच लाखाचा मुद्देमाल चोरुन नेला. गावावरून परत आल्यानंतर हा प्रकार त्याच्या निदर्शनास आला. याप्रकरणी घाटंजी पोलिसांनी आरोपीविरूद्घ गुन्हा दाखल केला. अधिक तपास पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अनिल पुरळकर करीत आहे.
ट्रकच्या धडकेत युवक ठार
दिग्रस – भरधाव ट्रकने धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री ९.३० वाजता महागाव येथे घडली. विठ्ठल श्रीराम सुरोशे (३०) रा. लाख रायाजी असे मृतकाचे नाव आहे. तो महागाव येथील बसस्थानकावर उभा होता. अशातच समोरून आलेल्या सिमेंट नेणाºया ट्रकला (एम.एच. २९/ टि. ६२१) त्याने हात दाखवून थांबण्याचा इशारा केला. मात्र चालकाने ट्रक न थांबविता सदर युवकाला जोरदार धडक दिली. यामध्ये मागील चाकात येऊन विठ्ठल जागीच ठार झाला. यावेळी चालक ट्रक घेऊन पसार झाला होता. मात्र ग्रामस्थांनी तुपटाकळी येथील युवकांना या अपघाताची माहिती देऊन ट्रकचा क्रमांक कळविला होता. त्यावरून तुपटाकळीवासीयांना हा ट्रक अडवून चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी आर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
0
आॅटो उलटला, सात जण जखमी

यवतमाळ – भरधाव वेगात असलेला आॅटो उलटल्याने सात जण जखमी झाल्याची घटना आज मंगळवारी दुपारी २ वाजता हातगाव येथे घडली.
स्वप्नील भगत, गजानन रिंगणे, विलास वाघमारे, प्रविण वाघमारे, भूषण तितरे, शुभम नगराळे, आशिष नगराळे अशी जखमींची नावे आहे. लोणी घाटाना येथून एम.एच. २९ / टि ८०९३ क्रमांकाच्या आॅटोने ते अकोला बाजारकडे जात होते. अशातच हातगाव या गावाजवळ भरधाव वेगात असलेला सदर आॅटो उलटला. यामध्ये सातही जण जखमी झाले असून त्याच्यावर वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहे. शहर पोलिसांनी या प्रकरणी चालकाविरूद्घ गुन्हा दाखल केला.
0
वीज पडल्याने भिंत कोसळली , दुरचित्रवाणी निकामी

यवतमाळ – जिल्ह्यात वीजेचा कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरु असून सोमवारी रात्री गोवर्धन ले आऊट वीज कोसळल्याने घराची स्लॅबला तडे गेले. घरातील वीजेवर चालणारे उपकरण जळून खाक झाले आहे.
दहा दिवसापासून वादळी वारा, पाऊस, गारपिटीने कहर केला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोमवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास गोवर्धन ले आऊट उमरसरा येथील दत्ता मिसार यांच्या घरावर वीज कोसळली. त्यामुळे घराच्या स्लॅबला तडे गेले असून एक भिंतही कोसळली. तसेच मिसार, संजय देशभ्रतार याच्यासह दहा जणांच्या घरील टिव्ही, फ्रिजसह अन्य इलेक्ट्रीक साहित्य निकामी होऊन नुकसान झाले.
0
पन्नास पैशांचे नाणे अजूनही चलनात

वृत्तसंस्था, मुंबई – पन्नास पैशांचे नाणे अजूनही अधिकृतरीत्या चलनात आहे. मात्र, दैनंदिन व्यवहारांमध्ये लोक पन्नास पैशांची नाणी स्वीकारण्यास नकार देत असल्याचेच चित्र आहे. त्यामुळे लवकरच हे नाणे काळाच्या पडद्याआड जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबईत दुकानदार, लाँड्रीचालक, रिक्षाचालक; तसेच किराणा दुकानांमध्ये पन्नास पैशांचे नाणे स्वीकारण्यास नकार दिला जात आहे. पन्नास पैशांची नाणी चलनात असून, ती स्वीकारण्यास नकार देणे बेकायदेशीर आहे. मात्र, दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे ही नाणी बिनमोलाची ठरत आहेत. यापूर्वी २०११मध्ये रिझर्व्ह बँकेने २५ पैशांचे नाणे चलनातून काढून टाकले होते.
वांद्र्याच्या पाली मार्केटमधील रद्दीवाला पन्नास पैशांची एक किलो नाणी तीस रुपयांना विकत घेतो. ‘बाजारात पन्नास पैशांचे नाणे घेण्याचे लोकांनी थांबविले आहे,’ असे सांगून एका धान्य दुकानदारानेही हे नाणे घेण्यास नकार दिला. ‘बेस्ट’मधील कंडक्टरना कायद्यामुळे पन्नास पैशांची नाणी नाकारता येत नाहीत. मात्र, त्याच वेळी प्रवासी ही नाणी घेण्यास नकार देत असल्याचे आढळते, असे एका कंडक्टरने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. ‘सर्व व्यवसायिक बँकांमध्ये ही नाणी स्वीकारली जातात. रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयांमध्येही ही नाणी स्वीकारली जात आहेत. पन्नास पैशांच्या नाण्यांना कोणीही नाकारू शकत नाही,’ असे रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
पन्नास पैशांचा इतिहास
पन्नास पैशांच्या नाण्याचा इतिहास पाच शतके मागे मोगल सम्राट अकबराच्या काळापर्यंत जातो, असे जुन्या नाण्याची खरेदी विक्री करणारे माल्कम तोड्यावाला यांनी सांगितले. ‘पन्नास पैशांच्या नाण्याचे वजन त्या काळी एक रुपयाच्या नाण्याच्या अर्धे असायचे. चांदीच्या रुपयाचे वजन ११ ग्रॅम असे. कालांतराने कमी मूल्याची नाणी पाडणे खर्चिक बनत गेले,’ असेही तोड्यावाला यांनी सांगितले.
0
१ लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान

नागपूर – अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नागपूर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा अंतिम अहवाल सोमवारी सादर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात एकूण १ लाख ६ हजार ५४३.९५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. विभागीय आयुक्तांमार्फत नुकसानीचा हा अहवाल कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव यांना पाठविण्यात येणार आहे. वादळी पाऊस आणि गारपिटीने पिके मातीमोल झाली आहेत. सुरुवातीला नागपूर जिल्ह्यात ४३ हजार ५२६ हेक्टरवर नुकसान झाल्याचा वर्तविण्यात आला होता. गाव, तालुका आणि उपविभागीय स्तरावर समित्या नेमून सर्वेक्षण केल्यानंतर नुकसानीचा आकडा वाढला आहे. ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले क्षेत्र १ लाख ६ हजार आहे. ५० टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेले क्षेत्र ३२ हजार २०३.१२ हेक्टर आहे. या अहवालावर प्रकाश टाकल्यास जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान मौदा तालुक्यात म्हणजे १४ हजार ८९७ हेक्टरवर झाल्याचे पुढे येते. नुकसानीची पाहणी करण्यासाठी नागपूर जिल्ह्यात १३ मार्च रोजी केंद्राची चमू येणार आहे. एका दिवसात नुकसानग्रस्त भागाचा आढावा ही समिती घेणार आहे. त्यानंतर आपला अहवाल केंद्रसरकारच्या कृषी विभागाला सादर करून नुकसानग्रस्तांसाठी केंद्राचीही मदत जाहीर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी सांगितले.
0
माओवादी हल्ला, २० जवान शहीद

नवी दिल्ली – छत्तीसगडच्या सुकमा जिल्हयातील जंगलामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) गस्तीपथकावर मंगळवारी माओवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात वीस जवान शहीद झाले आहेत.
मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास जेराम नुल्लाह भागात माओवाद्यांच्या एका मोठया गटाने घात लावून पोलिस आणि सीआरपीएफच्या पन्नास जणांच्या संयुक्त तुकडीवर हल्ला केला. हा भाग टोंगापाल पोलिस स्थानकाच्या हद्दीत येतो.सीआरपीएफचे पंधरा आणि राज्य पोलिसांचे पाच जवान या हल्ल्यात शहीद झाल्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक मुकेश गुप्ता यांनी सांगितले. एप्रिल २०१० मध्ये याच भागात माओवाद्यांनी पोलिसांवर घात लावून हल्ला केला होता. या हल्ल्यात ७६ पोलिस शहीद झाले होते.सीआरपीएफचे तीस आणि राज्य पोलिसांचे चौदा असे ४४ जणांचे पथक गस्तीवर होते. माओवाद्यांनी आधी सुरुंग स्फोट केला त्यानंतर जवानांच्या दिशेने बेछूट गोळीबार सुरु केला. छत्तीसग़ड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही या भागामध्ये माओवादी आणि सुरक्षापथकांमध्ये जोरदार चकमक सुरु आहे.तेथे लढणा-या जवानांच्या मदतीसाठी जगदालपूर आणि रायपूरमधुन येथून दोन हॅलिकॉप्टरमधुन अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली आहे. छत्तीसगडच्या काँग्रेस नेत्यांवर ज्या जिराम घाटीमध्ये हल्ला झाला होता त्या ठिकाणापासून काही अंतरावर ही चकमक सुरु आहे.
0
७० भारतीय पासपोर्टची चोरी

वॉशिंग्टन – सॅन फ्रान्सिस्कोमधील बीएलएस इंटरनॅशनल या खासगी कंपनीतून ७० भारतीय पासपोर्टची चोरी झाली आहे. सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दूतावास या कंपनीकडून व्हीसा, पासपोर्टची कामे करुन घेते. अशाच कामांसाठी हे पासपोर्ट कंपनीच्या ताब्यात असताना, चोरी झाली.
पासपोर्टची चोरी होणे गंभीर प्रकरण असून, सॅन फ्रान्सिस्को पोलिस आणि भारतीय दूतावास दोघेही या प्रकरणाची चौकशी करत आहेत. चोरी झालेल्या पासपोर्टचा गैरवापर होऊ नये यासाठी स्थानिक पोलिसांनी अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयासह, सर्व संबंधित यंत्रणांचा या घटनेची माहिती दिली आहे.सॅन फ्रान्सिस्कोच्या बीएलएस इंटरनॅशनलच्या कार्यालयातून २९ नोव्हेंबरच्या आसपास या पासपोर्टची चोरी झाल्याची शक्यता आहे. कंपनीची तिजोरी उघडून पासपोर्टसह, रोख रक्कम आणि चेकची चोरी झाल्याची माहिती कंपनीच्या कर्मचा-यांनी पोलिसांना दिली. सॅन फ्रान्सिस्कोच्या भारतीय दूतावासाने हे सर्व पासपोर्ट रद्द केले आहेत.
0
‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम वादाच्या भोव-यात,निवडणूक आयोगाचा आक्षेप

लखनौ – भाजपचा ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम वादाच्या भोव-यात सापडला आहे. निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदी यांच्या चाय पे चर्चा कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. नमो टी स्टॉलवर मतदारांना मोफत चहा देणे हे एकप्रकारे लाच देण्यासारखे असून यामुळे मतदार प्रभावित होतात असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
उत्तरप्रदेशातील लखीमपूरमध्ये ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमातून आदर्श अचारसंहितेचा भंग झाल्याने आयोगाने कार्यक्रमाच्या आयोजकांवर कारवाई केली आहे. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांचे भाषण एलईडी स्क्रीनवरुन मतदारांना दाखवले जाते. यावेळी उपस्थितांना मोफत चहा वाटला जातो.निवडणूक आयोगाने जिल्ह्याच्या निवडणूक अधिका-यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या कार्यक्रमासाठी स्थानिक प्रशासनाकडून परवानगी न घेतल्याबद्दलही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. निवडणूकीच्या काळात कुठल्याही वस्तूचे मोफत वाटप हा निवडणूक अचारसंहितेचा भंग ठरेल असे निवडणूक आयोगाने आधीच स्पष्ट केले आहे.
0
पॅनासोनिकचा नवा ‘पी३१’ स्मार्टफोन
मुंबई – इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य मानल्या जाणा-या पॅनासोनिक कंपनीने नुकताच पी३१ हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. सध्या सगळीकडेच स्मार्टफोनची चलती आहे. त्यामुळे पॅनासोनिक कंपनीही त्याला अपवाद कशी काय असेल. त्यामुळे नोकिया, सॅमसंगच्या स्मार्टफोन्सना मिळणारी पसंती पॅनासोनिकच्या स्मार्टफोनलाही मिळवता येईल का पाहणे जरुरीचे ठरेल. पॅनासोनिक पी३१चे फीचर्स, पाच इंचाचा डिस्प्ले, १.३ गिगाहर्टझ क्वाड कोर प्रोसेसर, एक जीबी रॅम, चार जीबी इंटरनल मेमरी, आठ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा, फुल एचडी व्हिडीओ रेकॉर्डिंग, अँड्रॉईड ४.२ जेलीबीन, २००० एमएएच बॅटरी, थ्रीजी, वायफाय, ब्लूटूथ, किंमत – ११ हजार ९९०
0
देशाला रखवालदार नको तर हक्क हवेत – राहुल गांधी

बालासिनोर – भाजप नेते नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये जाऊन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी त्यांच्या तथाकथित विकासाचा आणि ढोंगीपणाचा बुरखा जनतेसमोर फाडला. नाझी हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरच्या राजवटीसारखी राजवट गुजरातमध्ये मोदींकडून चालवली जात असून भ्रष्टाचाराविरोधात लढण्याच्या बाता मारणा-या मोदी यांच्याच मंत्रिमंडळात अनेक भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठिशी घातले जात असल्याच्या वस्तुस्थितीकडे राहुल गांधी यांनी लक्ष वेधले. मोदी यांनी यापूर्वी केलेल्या भाषणांमधील मुद्यांचा राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात जोरदार समाचार घेतला.
गुजरातमध्ये कोणत्या प्रकारची चौकीदारी(पहारा) सुरू आहे, असा सवाल त्यांनी जनतेला केला. शेतक-यांची लाखो एकर जमीन त्यांच्यापासून हिरावून घेऊन ती उद्योगपतींच्या घशात घातली जाते. या विरोधात जेव्हा शेतकरी आवाज उठवतात, तेव्हा त्यांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष केले जाते, असे राहुल गांधी म्हणाले. शेतक-यांच्या जमिनी हिसकावून घेणा-या रखवालदाराची गरज नाही तर जनतेला त्यांचे हक्क हवे आहेत असा टोला त्यांनी लगावला.गुजरातमधील विकास हा फक्त मोजक्या लोकांपर्य़ंतच मर्य़ादित राहिलेला आहे. मात्र हा विकास गरीब जनतेपर्य़ंत पोहोचलेलाच नाही. काँग्रेसने माहितीचा अधिकार, जनलोकपाल विधेयक मंजूर केले आहेत. मात्र या विधेयकांना भाजपकडून विरोध केला जात असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. गुजरातच्या विकासाचे श्रेय कोणा एका व्यक्तीला जात नाही तर ते तेथील जनतेला जाते, असेही त्यांनी सांगितले.
0
प्रेमाचा त्रिकोण ‘एलबीडब्ल्यू’

मराठीतील आघाडीचे कलाकार अभिनेता जितेंद्र जोशी, सुशांत शेलार आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांचा बहारदार अभिनय एकत्र एका पडद्यावर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. येत्या ‘एलबीडब्ल्यू’ या धमाकेदार मराठी सिनेमात हे कलाकार आपल्या बहारदार अदाकारीने रंग भरणार आहेत.
अंकुर काकटकर दिग्दर्शित आणि संदीप नादंगे निर्मित व रॉयल आर्य मिडिया अॅन्ड एन्टरटेन्मेंट प्रस्तुत या सिनेमात प्रेमाचा त्रिकोण असून एक रोमॅंटिक कॉमेडी दाखवण्यात आली आहे. अभिनेते जितेंद्र जोशी, सुशांत शेलार आणि अभिनेत्री अमृता खानविलकर हे या सिनेमात फॅशन डिझायनर च्या भूमिकांमध्ये रसिकांना बघायला मिळणार आहेत. या कलाकारांबरोबरच या सिनेमात संजय मोने, मिलिंद फाटक, सुचित्रा बांदेकर, सुलेखा तळवलकर, ऋतुराज फडके, स्नेहा देशमुख, आशिष कुलकर्णी यांच्याही भूमिका असणार आहेत.
0
संगीतकार कौशल इनामदारचे ‘यलो’साठी नवे कौशल्य

मराठी संगीत क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव म्हणजे संगीतकार कौशल इनामदार. कौशल इनामदार हे सिनेमांना संगीत देताना सतत नवीन प्रयोग करत असतात आणि त्यामुळेच त्यांचं वेगळेपण चर्चेत राहतं. वेगवेगळ्या सिनेमांना, अल्बम्सना उत्कृष्ट संगीत दिल्यानंतर कौशल इनामदार हे पुन्हा एकदा रसिकांना संगीतमय करण्यास येत आहेत. रितेश देशमुख आणि उत्तुंग ठाकूर यांची निर्मिती असलेल्या आणि सिनेमटोग्राफर महेश लिमये यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘यलो’ या सिनेमाला संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीत दिले आहे.
‘अधांतरी’, ‘आग’, ‘इट्स ब्रेकिंग न्यूज’, ‘कृष्णा काठची मीरा’, ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’, ‘बालगंधर्व’, ‘रास्ता रोको’, ‘हंगामा’, ‘अजिंठा’ आणि ‘संशयकल्लोळ’ या गाजलेल्या सिनेमांना दिलेल्या वेगळ्या संगीतामुळे तसेच मराठी अभिमान गीताच्या अफाट यशामुळे संगीतकार कौशल इनामदार सतत चर्चेत राहिले आहेत. त्यांच्या ‘बालगंधर्व’ आणि ‘अजिंठा’ या सिनेमासाठी त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. आता पुन्हा एकदा ते ‘यलो’ च्या निमित्ताने आपल्या सुंदर चालींची जादू प्रेक्षकांवर टाकणार आहेत. या सिनेमाला पार्श्वसंगीत सुद्धा त्यांनीच दिले आहे.
याबद्दल सांगताना कौशल इनामदार यांनी सांगीतले की, “या सिनेमातील दोन गाणी आणि पार्श्वसंगीत सुद्धा मीच केलंय. ‘यलो’च्या निमित्ताने मी रॉक म्युझिक प्रकारावर पहिल्यांदाच काम केलंय. आधीच्या कुठल्याच सिनेमांमध्ये मी हा जॉनर वापरलेला नाहीये तरी सुद्धा महेशने माझ्यावर विश्वास ठेवला. हा जॉनर माझ्यासाठी पूर्णपणे नवीन असल्याकारणाने मी दुसरं कोणतही काम या दरम्यान हाती घेतलं नाही. ‘यलो’साठी रॉक म्युझिक करायचं होतं म्हणून मी तब्बल सहा महिने फक्त रॉक म्युझिक ऎकलं. याआधी मी रॉक फार ऎकलेलं नव्हतं. महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही गाण्यांसाठी ‘की-बोर्ड, इलेक्ट्रॉनिक गिटार, ड्रम आणि बेस’ फक्त ही चार वाद्य वापरण्यात आली आहे. सिनेमाचा बॅकग्राऊंड स्कोर आणि सिनेमाची गाणी ही वेगवेगळी वाटता कामा नये याची आम्ही खूप काळजी घेतली. गुरू ठाकूर या गीतकाराबरोबर पुन्हा एकदा काम करायला मिळाले. अतिशय सुंदर शब्द गुरूने लिहिले असून दोन्ही गाणी अतिशय श्रवणीय झाली आहेत. माझ्यासाठी हा सिनेमा खूप वेगळा होता. वेगवेगळ्या सिनेमांवर काम करत असतांना आपल्याला खूप काही शिकायला मिळत असतं. पण ‘यलो’वर काम करत असताना मी माणूस म्हणून सुद्धा खूप बदललोय. हे खूप कमी सिनेमांच्याबाबतीत होतं. त्यामुळेही हा सिनेमा माझ्यासाठी अतिशय अतिशय वेगळा अनुभव होता”.
0
मराठी ‘हायवे’वर हिंदी तिस्का

मराठी सिनेमा ग्लोबलाईझ झाल्यापासून बॉलीवूडमधील अनेक चांगले कलाकार मराठी सिनेमाच्या वाटेवर येताना दिसत आहेत. याच कलाकारांपैकी एक कलाकार एका आगामी मराठी सिनेमामध्ये दिसणार आहे ती म्हणजे अभिनेत्री तिस्का चोप्रा. अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये आपल्या बोल्ड अवतारामुळे आणि वेगवेगळ्या भूमिकांमुळे तिस्का चांगलीच लोकप्रिय झाली आहे. आता तिस्का मराठी पडद्यावर आपली जादू चालवणार आहे. ‘वळू’, ‘विहीर’, ‘देऊळ’ या गाजलेल्या सिनेमांची जोडी म्हणजेच दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेता-लेखक गिरीश कुलकर्णी एका नवीन सिनेमासाठी पुन्हा एकत्र आले आहेत. ‘हायवे’ असे या सिनेमाचे टायटल असून यातच अभिनेत्री तिस्का चोप्रा भूमिका करणार आहे. हिंदी ‘काकस्पर्श’मध्येही रोल ‘काकस्पर्श’ या सिनेमाला दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर हे हिंदीत तयार करीत असून मराठी ‘काकस्पर्श’मध्ये मेधा मांजरेकर यांनी साकारलेली भूमिका तिस्का चोप्रा करणार आहे.
0
‘यशवंतराव चव्हाण – बखर एका वादळाची’ चित्रपटाचे लोकार्पण प्रीतीसंगमावर

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, व्यासंगी नेते, अभ्यासू व्यक्तिमत्व, दूरदृष्टी असलेलं कार्यकुशल नेतृत्व अशा अनेक बिरुदावली लाभलेले व्यक्तिमत्व म्हणजे मा. यशवंतराव चव्हाण. वैयक्तिक आयुष्यासोबतच राजकीय आणि सामाजिक जीवनातही अतिशय आव्हानात्मक परिस्थितींवर यशस्वीपणे मात करणा-या यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘यशवंतराव चव्हाण – बखर एका वादळाची’ हा जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपट येत्या १४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची प्रस्तुती महाराष्ट्र शासन आणि एस्सेल व्हिजनची आहे. या चित्रपटाचे लोकार्पण यशवंतरावांच्या जन्मभूमीत म्हणजे कराड येथील प्रीतीसंगमावर होणार असून यासाठी दिग्दर्शक जब्बार पटेल. यशवंतरावांची भूमिका साकारणारे अशोक लोखंडे आणि ओम भूतकर, वैशाली दाभाडे आदि कलाकार उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याप्रसंगी प्रसिद्ध संगीतकार गायक शंकर महादेवन आणि नंदेश उमप चित्रपटातील गाण्यांद्वारे यशवंतरावांना आदरांजली वाहतील.
यशवंतराव चव्हाण यांची कारकीर्द ही केवळ राजकारणापुरती मर्यादित नव्हती तर भारतीय स्वातंत्र्याची चळवळ, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, सामाजिक, सांस्कृतिक कार्य, लोकाभिमुख निर्णय, दिल्लीमध्ये महाराष्ट्राची जपलेली अस्मिता अशा विविध टप्प्यांनी त्यांची कारकीर्द सजली होती. यशवंतरावांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वावर चित्रपट बनवणे खूप मोठे आव्हान होते. लीलया पेललं आहे, दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी तर यशवंतरावांची ही झंझावाती कारकीर्द पटकथेतून परिणामकारकरित्या मांडण्याचं काम ज्येष्ठ लेखक, पत्रकार अरूण साधू यांनी केलं आहे. पटकथेसोबतच चित्रपटातील गीतेही कथानकाचाच एक भाग म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. महाराष्ट्राच्या निर्मितीकाळातील लोकसंगीत, साहित्य आणि समाजकारणातील उर्जितावस्था, लोककलांचे महत्त्व लक्षात घेऊन संगीताची मोलाची जबाबदारी आनंद मोडक यांनी या चित्रपटात सांभाळली आहे. चित्रपटात विविध बाजाची एकूण १६ गाणी असून ती ना.धों. महानोर, कुसुमाग्रज आणि विठाबाई चव्हाण यांनी लिहिली असून अनेक नामवंत गायकांनी ती स्वरबद्ध केली आहेत. महाराष्ट्राचा हा लाडका नेता आपल्या अभिनयातून साकार करण्याची किमया साधली आहे अशोक लोखंडे यांनी तर लुब्ना सलिम , ओम भुतकर, वैशाली दाभाडे, मीना नाईक, रेखा कामत, सुप्रिया विनोद, सतीश आळेकर, राहूल सोलापूरकर, बेंजामीन गिलानी यांच्या अन्य महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाचे छायांकन सय्यद लायक अली यांचे तर संकलन नितीन रोकडे यांचे आहे. लीला गांधी यांनी नृत्य दिग्दर्शन, कला व वेशभूषा शाम भूतकर आणि मोहन रत्नपारखी यांनी तर रंगभूषेची अतिशय महत्त्वाची जबाबदारी विक्रम गायकवाड यांनी सांभाळली आहे.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची निर्मिती असलेल्या ‘यशवंतराव चव्हाण – बखर एका वादळाची’ चित्रपटाची प्रस्तुती महाराष्ट्र शासनाची असून एस्सेल व्हिजनच्या सहयोगाने हा चित्रपट येत्या १४ मार्चला राज्यभरातील सुमारे २५० हून अधिक चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.










