
लखीमपुर – संपूर्ण देशात भाजप फक्त मोठमोठया घोषणा करत आहे. भाजपने नेहमीच व्देषाचे राजकरण केले आहे. भाजपचे सरकार केंद्रात सत्तेवर असताना त्यांनी काय केले ? बोलणे आणि काम करणे यात भरपूर फरक आहे अशा शब्दात संपुआ प्रमुख आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजपवर टीका केली. त्या लखीमपूर येथील निवडणूक प्रचारसभेमध्ये बोलत होत्या.
काँग्रेसने देशाची गंगा-जमुना संस्कृती घट्ट केली तर, भाजपने नेहमीच जातीय राजकरण करुन देशाला कमकुवत केल्याचा आरोप सोनियांनी केला. २००९ च्या निवडणूक जाहीरनाम्यातील बहुतांश आश्वासने आम्ही पूर्ण केली. आता २०१४ च्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनेही आम्ही पूर्ण करु, पण त्यासाठी आम्हाला तुमच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे असे सोनिया म्हणाल्या.
आम्ही खोटी आश्वासने देत नाही. जी आश्वासने देतो ती पूर्ण करतो. प्रत्येक हातात शक्ती, प्रत्येक हाताची प्रगती यावर आमचा विश्वास असल्याचे सोनियांनी सांगितले. आसाम आणि अन्य भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही देशासाठी प्राणांचे बलिदान दिल्याचे सोनियांनी सांगितले.
देश घडवण्यावर आमचा विश्वास आहे. भाजप आणि अन्य विरोधी पक्ष त्यावेळी कुठे होते ? स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही याचे काय योगदान आहे ? देश, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचेच काम त्यांनी केले असा आरोप सोनियांनी केला. विरोधकांच्या खोटया प्रचाराला, आश्वासनांना बळी न पडता काँग्रेस उमेदवाराच्या पाठिशी उभे रहाण्याचे सोनियांनी उपस्थितांना आवाहन केले.
Archive for March 30th, 2014
0
सत्ता असताना भाजपने काय केले – सोनिया
0
लोकसभा निवडणूक, सुरक्षेसाठी दोन लाख जवान

नवी दिल्ली – लोकसभेच्या नऊ टप्प्यांमध्ये होणा-या निवडणुकांना हिंसाचाराचे गालबोट लागू नये, निवडणूका शांततेत पार पाडाव्यात यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरक्षेची जोरदार तयारी केली आहे.
संपूर्ण देशात दीड महिना चालणा-या मतदान प्रक्रियेसाठी निमलष्करी दलाचे दोन लाख शस्त्रसज्ज जवान, हजारो गाडया आणि डझनभर हॅलिकॉप्टर तैनात केली आहेत. सात एप्रिलपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. देशातील एकूण ५४३ लोकसभा मतदारसंघात ८१.४ कोटी लोक मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
हिंसाचाराची शक्यता असलेली माओवाद प्रभावित राज्ये, जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये सुरक्षा बंदोबस्तावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर निमलष्करी दलाच्या जवानांसह सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, एसएसबी आणि आसाम रायफल्सच्या जवानांचाही बंदोबस्त असणार आहे.
निवडणूक काळात निमलष्करी दलाच्या जवानांच्या प्रवासासाठी गृहमंत्रालय शंभरहून अधिक ट्रेनचा वापर करणार आहे. गृहमंत्रालयाने रेल्वेला तशी ट्रेन उपलब्ध करुन देण्याची विनंती केली आहे. निवडणूकीचे वेळापत्रक आणि सुरक्षेच्या गरजेनुसार या जवानांची तैनाती केली जाईल. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ट्रेनचा वापर केला जाईल जवळचा प्रवास रस्ते मार्गाने केला जाईल. त्याशिवाय हजारो खासगी गाडयाही भाडयावर घेण्यात येणार आहेत.
0
आवडेल तेथे कोठेही प्रवास’ १ एप्रिलपासून महागणार
‘
मुंबई – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एसटी) प्रवाशांसाठी विविध योजना राबवल्या जातात. मात्र एसटीची ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ या योजनेंतर्गतचा प्रवास १ एप्रिलपासून महागणार आहे. या योजनेतील चार व सात दिवसांच्या पासच्या किमतीत २५ ते ४० रुपयांनी वाढ होणार आहे.
एसटीच्या ताफ्यात सुमारे १७ हजार बस आहेत. प्रवाशांना प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी महामंडळाकडून विविध योजना राबवल्या जातात. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटीने ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ ही योजना सुरू केली. प्रवाशांचाही या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या योजनेंतर्गत चार व सात दिवसांचा पास दिला जातो. पासमुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली.
मात्र वाढत्या महागाईमुळे एसटीने या पासची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. इंधनाबरोबरच गाडय़ांच्या सुटय़ा भागांचे भावही वाढल्याने एसटीला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तिकीटदरातील वाढीपाठोपाठ सवलतीच्या पासमध्येही दरवाढ करण्यास एसटीला भाग पडत आहे, असे एसटीच्या अधिका-याने सांगितले. मात्र ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ या योजनेंतर्गत १ एप्रिल पूर्वी पास काढला असल्यास त्या संबंधित प्रवाशांकडून पूर्वीचेच दर आकारले जाणार आहेत.
0
काँग्रेस-भाजपमध्ये ४७ जागांवर अटीतटीचा सामना

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये ४७ जागांवर अटीतटीची लढत झाली होती.
फार थोडया फरकाने या जागांवरुन काँग्रेस आणि भाजपचे उमदेवार विजयी झाले होते. थोडा जास्त जोर लावला असता तर, चित्र वेगळे दिसले असते अशी त्यावेळची दोन्ही पक्षांची भावना होती.
त्यामुळे या ४७ जागांवर यावेळी दोन्ही पक्षांनी नवीन उमेदवारांना प्राधान्य दिले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या जागांवरील निकाल काँग्रेस आणि भाजप दोघांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. २००९ मध्ये भाजप आणि काँग्रेसने लढवलेल्या ३४ जागा अशा होत्या जिथे उमेदवार तीन टक्क्याहून कमी मताधिक्क्याने निवडून आले होते.
यंदा दोन्ही पक्षांनी ४७ पैकी तेरा जागांवर उमेदवार कायम ठेवले आहेत. आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारीनुसार रांची, गुलबर्गा, इंदूर, गुरदासपूर आणि सुंदरगडमध्ये उमेदवार कायम ठेवण्यात आले आहेत. २००९ मध्ये अटीतटीची लढत झालेल्या ४७ जागांपैकी २८ काँग्रेसने तर, १९ भाजपने जिंकल्या होत्या.
0
मृत्यूच्या दाढेतून भावाने बहिणीला वाचवले

मुंबई – एक्स्प्रेस पकडण्याच्या गोंधळात पाय निसटून सात वर्षांची चिमुरडी प्लॅटफॉर्ममधील गॅपमध्ये पडते आणि एकच गोंधळ उडतो. शनिवारी सकाळी मध्य रेल्वेवरील दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर थरारक प्रसंग निर्माण होतो. आपली बहीण प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडल्याचे समजताच भाऊ जिवाच्या आकांताने तिला सुरक्षितपणे वाचवण्यासाठी उडी मारतो. अखेरीस दोघेही अंगावर एकही ओरखडा उमटता बचावतात.
उत्तर प्रदेशमधून आलेले भारद्वाज कुटुंबीय शनिवारी मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाले होते. त्यात संजीव भारद्वाज आणि त्यांच्या दोन बहिणी, भावाचा समावेश होता. सकाळी सात वाजून एक मिनिटांनी दादर येथून सुटणारी इंटरसिटी पकडण्यासाठी त्यांची लगबग सुरू झाली होती. ही गाडी पकडण्याच्या गोंधळात सुनीताचा (७) पाय सरकून ती गॅपमध्ये अडकली. हे पाहताच तिची बहीण अनिता (१६) आणि दुसरा भाऊ शंकर यांनी मदतीसाठी टाहो पुकारला. संजीवने खाली उतरून तिला आडवे पडत घट्ट धरून ठेवले. त्यांचा आवाज ऐकून एका प्रवाशाने तात्काळ आपत्कालीन मदतीसाठी असणारी साखळी खेचली. त्याचवेळी रेल्वे सुरक्षा बलाच्या मिस्त्री नावाच्या कॉन्स्टेबलनेही गार्डला त्याची माहिती दिली. तोपर्यंत इंटरसिटी सुमारे २० मीटर पुढे गेली होती. पण सुनीता आणि तिच्या मदतीसाठी धावलेला संजीव हे दोघेही सुरक्षित होते.
परतवाडामध्ये आगीत होरपळून सात जणांचा मृत्यू
अमरावती – अमरावती जिल्ह्यातील परतवाडा भागातील वृंदावन फॅशन या कपडयाच्या दुकानाला रविवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत होरपळून सात जणांचा मृत्यू झाला.
मृत्यू झालेले सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. मृतांमधे दोन मुलं आणि दोन महिला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. परतवाडयातील टिळक चौक भागात हे दुकान आहे.या दुकानात ओटवाल कुटुंब रहात होते. दुकानात आग भडकली तेव्हा सर्वजण गाढ झोपेत असल्याचा अंदाज आहे. झोपेत असताना, आगीच्या ज्वाळांनी वेढल्याने सर्वांचा होरपळून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. आगाचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. पोलिस आणि अग्निशमन दल आगीच्या कारणांचा शोध घेत आहेत.









