
*सहा लोकसभा निवडणूकांचा समावेश * महत्वाचे दूरध्वनी व उपयुक्त माहिती
यवतमाळ – यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने गेल्या सहा लोकसभा निवडणूकांच्या विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारींचा समावेश असलेली पूर्वपीठिका जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने काढण्यात आली आहे. या पुस्तिकेचे विमोचन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्याहस्ते नुकतेच झाले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह परिविक्षाधीन आयएएस अधिकारी राधाविनोद शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भागवत डोईफोडे,
जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, तहसिलदार राजेंद्र अडपावार आदी उपस्थित होते.सदर पूर्वपीठिकेत सन 1991 पासून झालेल्या सहा लोकसभा निवडणूकींची विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी देण्यात आलेली आहे. त्यात मतदारसंघनिहाय उमेदवारांना मिळालेल्या मतदानाचा समावेश आहे. यासह होणाऱ्या लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगानेही उपयुक्त अशी माहिती आहे. विशेष म्हणजे पुर्वी स्वतंत्र असलेल्या यवतमाळ व वाशिम या लोकसभा मतदारसंघाची स्वतंत्र माहिती देण्यात आली आहे. सद्या असलेली मतदारांची संख्या, निवडणूकीदरम्यान राजकीय पक्षांनी काय करावे, काय करू नये याबाबत उपयुक्त मार्गदर्शिका, निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस अधिकारी, निवडणूक आयोग नवी दिल्ली, मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई, मिडीया सेंटर आदींचे महत्वपूर्ण दुरध्वनी क्रमांकही पूर्वपीठिकेत देण्यात आले आहे. सदर पूर्वपीठिका मागील लोकसभा निवडणूकांची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी, निवडणूक विश्लेषक, निवडणूकीसंर्भात माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या अभ्यासकांसाठी अतिशय उपयुक्त ठरणारी आहे.
Archive for March 23rd, 2014
0
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पूर्वपीठिकेचे प्रकाशन
0
विदर्भाला सर्मथन द्या, अन्यथा ‘नोटा’ चा वापर ; विदर्भ कनेक्टचा उमेदवारांना इशारा

नागपूर : राजकीय पक्षांनी स्वतंत्र विदर्भ राज्याला पाठिंबा न दिल्यास लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या वेळी नकाराधिकाराचा अधिकार असलेल्या ‘नोटा’ (None of the above) या प्रभावी पर्यायाचा विचार करण्यात येईल, असा इशारा ‘विदर्भ कनेक्ट’ या विदर्भवादी चळवळीने दिला आहे.
लोकसभा निवडणुकीतील सर्व उमेदवारांनी व त्यांच्या राजकीय पक्षांनी येत्या २६ मार्चपर्यंत विदर्भाच्या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा ‘विदर्भ कनेक्ट’शी जुळलेल्या सर्व विदर्भवादी संघटना एकत्रित येऊन संपूर्ण १0 लोकसभा मतदार संघात ‘नोटा’ चा प्रचार आणि प्रसार करतील, असा इशारा ‘विदर्भ कनेक्ट’चे अध्यक्ष अँड. मुकेश सर्मथ यांनी आज येथे एका पत्रपरिषदेत दिला. निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांपैकी कुणालाही मतदान करायचे नसल्यास मतदाराला यावेळी प्रथमच सर्वोच्च न्यायालयाने ‘नोटा’ (यापैकी कोणताही नाही) हे बटन दाबण्याचा अधिकार दिला आहे. लोकसभा निवडणुकीत स्वतंत्र विदर्भ राज्याचा आवाज अधिक बुलंद करण्याच्या हेतूने ‘विदर्भ कनेक्ट’ या चळवळीने ही अभिनव मोहीम सुरू केली आहे. अँड. सर्मथ यांनी यावेळी सांगितले की, स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला बहुतांश राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. परंतु निवडणुकीच्या वेळेस या राजकीय पक्षांना त्याचा विसर पडतो. अनेक वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत विदर्भातील मतदारांची होत असलेली फसवणूक यापुढे ही जनता सहन करणार नाही, म्हणूनच आम्ही लोकशाहीतील या परिणामकारक आयुधाचा वापर करायचे ठरवले आहे आणि तसे जनतेला आम्ही आवाहन करीत आहोत. या मोहिमेंतर्गत लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांकडून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या सर्मथनात शपथपत्र लिहून घेण्यात येणार आहे. राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात स्वतंत्र विदर्भ राज्याचा समावेश करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकडे उमेदवारांनी किंवा त्यांच्या राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केल्यास मतदारांनी मतदान यंत्रातील ‘नोटा’चे बटन दाबावे असे आवाहनही या पत्रपरिषदेत करण्यात आले. स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी ‘जनमंच’ या स्वयंसेवी संस्थेने अलीकडेच नागपुरात घेतलेल्या जनमत चाचणीत ५ लाख ४७ हजार लोकांनी विदर्भ राज्याच्या बाजूने कौल दिला. तसेच अमरावती, चंद्रपूर आणि यवतमाळ या ठिकाणी घेण्यात आलेल्या जनमत चाचणीतही बहुतांश नागरिकांनी सर्मथनार्थ कौल दिला. केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी तेलंगणा राज्याची निर्मिती केली. परंतु विदर्भाच्या मुद्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे हेतुपुरस्सर टाळत आहे. विदर्भातील जनतेचा कौल लक्षात घेता, विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी विदर्भ राज्य व्हायला हवे, या हेतूने ‘विदर्भ कनेक्ट’ ही लोकचळवळ सुरू करण्यात आली आहे. या चळवळीत जुळलेल्या नागरिकांचा कुठलाही राजकीय स्वार्थ किंवा वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या पत्रपरिषदेला वेळी विदर्भ कनेक्टचे सचिव दिनेश नायडू, उपाध्यक्ष विष्णू मनोहर, कोषाध्यक्ष तेजिंदरसिंग रेणू, जनमंचचे अध्यक्ष अँड. अनिल किलोर, कार्यकारिणी सदस्य अँड. स्मिता सरोदे-सिंगलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
0
लतादिदी नरेंद्र मोदी यांचे अँम्बेसेडर बनू नये – मेधा पाटकर

औरंगाबाद – गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर सर्वजण प्रेम करतात. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे अँम्बेसेडर बनू नये, अशी अपेक्षा आम आदमी पार्टीच्या नेत्या मेधा पाटकर यांनी येथे व्यक्त केली. गुजरातचा विकास झाला, हे फसवे चित्र आहे. दंगलीसह अन्य वास्तव वेगळेच आहे, ते त्यांनी पाहावे. लतादिदिविषयी असलेल्या प्रेमापोटीच ही अपेक्षा करत असल्याचेही पाटकरांनी नमूद केले. दरम्यान, शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे; तसेच काँग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांच्या शेतजमिनी झालर क्षेत्र आरक्षणातून कशा वगळल्या गेल्या, असा सवालही त्यांनी केला.
सन्मित्र कॉलनी येथे आम आदमी पार्टीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी मेधा पाटकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुभाष लोमटे, जालन्याचे उमेदवार दिलीप म्हस्के, अण्णासाहेब खंदारे, मनिषा चौधरी, अजमल खान आदी उपस्थित होते. गारपिटीमुळे शेतपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी अडचणी सापडला असून, आत्महत्या होत आहेत. त्यांच्यात मोठा आक्रोश असतानाच प्रस्थापित राजकीय पक्षाचे नेते जाहीर सभावर कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत. संवेदनाशून्य राजकारण होत आहे, अशी टीका पाटकर यांनी केली. भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांनी गेल्या १७ वर्षांत अदानी यांना कोट्यवधी रुपये मिळवून देण्यासाठी मदत केली आहे, असा आरोपही त्यांनी केला. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी भाजप नेते नरेंद्र मोदी यांचे अँम्बेसेडर बनू नये, अशी अपेक्षाही पाटकरांनी व्यक्त केली. साखर कारखाने विक्रीत मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले, परंतु हे प्रकरण विरोधकांनी लावून धरले नाही, असा आरोपही केला. चुनवा नही चुनौती है, असा नारा त्यांनी देत कार्यकर्त्यांनी सोशल नेटवर्किंगचा प्रभावी वापर करणाऱ्या बरोबरच जनतेच्या गाठीभेटीवरच अधिक भर द्यावा, आंदोलनाचे राजकारण करावे, असे आवाहन केले. या सभेत आपने ४४६२ रुपयांचा निधी गोळा करण्यात आला.
0
हितेश भगतचा कोल्हापूरात मृत्यू

कोल्हापूर – मटका किंग सुरेश भगत हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेला त्याचा मुलगा हितेश भगत याचा कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूबाबत अधिक तपशील मिळू शकलेला नाही. १३ जून २००८ रोजी अलिबाग येथून परत येत असताना सुरेश भगतच्या स्कॉर्पिओला संशयास्पद अपघात झाला होता. त्यात तो जागीच ठार झाला होता. त्याचा मृत्यू हा अंडरवर्ल्ड विश्वात चर्चेचा विषय ठरला होता. सुरेश भगतची मालमत्ता आणि मटक्याचा व्यवसाय ताब्यात घेण्यासाठीच त्याची हत्या करण्यात आल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले होते. याप्रकरणात पत्नी जया भगत, मुलगा हितेश भगत या दोघांसह सहा जणांना दोषी ठरवून न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.
0
दोन गतिमंद विद्यार्थिनींवर बलात्कार

मुंबई- मानखुर्द येथील दोन गतिमंद विद्यार्थिनींवर शाळेतील शिपायानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी शिपायाला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गतिमंद विद्यार्थिनींच्या समुपदेशनादरम्यान हा प्रकार उजेडात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कदम यांनी दिली.
गतिमंद विद्यार्थिनींवर शिपायाकडून बलात्कार
राजेश दत्तात्रय तरे (३८) असे अटक आरोपीचे नाव असून, तो ट्रॉम्बे येथील परमेश्वर मंदिराजवळील केणी निवास येथील रहिवासी आहे. तो तेथीलच एका गतिमंद मुलांच्या शाळेत शिपाई म्हणून कामाला आहे. गतिमंद विद्यार्थ्यांची शाळा व वसतिगृह ट्रॉम्बे परिसरातच आहे. १६ व १८ वयोगटांतील दोन गतिमंद मुलींवर त्याने बलात्कार केल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी आणखी काही मुलींसोबतही त्याने असा प्रकार केला आहे का, यादृष्टीने तपास सुरू असल्याचे कदम यांनी सांगितले. आरोपी तरे याने एका विद्यार्थिनीवर चार महिन्यांपूर्वी शाळेतील शौचालयात बलात्कार केला होता. तर दुस-या मुलीशीही त्याने शौचालयातच अश्लील चाळे करून अनैसर्गिक कृत्य केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स’च्या ‘चुनौती’ या प्रकल्पांतर्गत गतिमंद मुलींचे समुपदेशन करण्यात आले. त्यात विनिता खेडकर व जिलेल लॉरेन्स या दोन समुपदेशकांना या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर बलात्काराच्या दोन्ही घटना उजेडात आल्या. त्यानंतर या दोन्ही समुपदेशकांनी याबाबत शाळेच्या प्रभारी माधुरी रामेकर यांना सांगितले. त्यांनी शुक्रवारी रात्री ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी शिपाई तरे याला अटक केली.
0
डहाणू टँकर अपघातातील मृतांचा आकडा १०

डहाणू- डहाणूतील चारोटी नाक्यावर झालेल्या टँकर अपघातातील मृतांचा आकडा १० वर पोहचला आहे. गुजरातकडून मुंबईकडे निघालेला रिलायन्स कंपनीचा पेट्रोल टँकरचालकाचा ताबा सुटून मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी नाक्यावर पलटी झाला. टॅँकर पलटी झाल्यानंतर जोरदार स्फोट झाला. यात टँकरचालकासह आठ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १७ जण गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
ठाणे ग्रमिण रुग्णालयात दाखल केलेले अंजली बोभा (१४) आणि सुनिल उंबरसडा (३०) अशी त्यांची नावे असून एकाची ओळख अद्याप पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अद्यापही १३ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेले ठाणे ग्रामिणचे पोलिस हवालदार भुषण शंके (३३) यांनी प्रसंगावधान राखून अनेकांचे जीव वाचवल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
0
इंडियन मुजाहिदीनच्या चार दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली- पाकिस्तानच्या फरार आरोपीसह इंडियन मुजाहिदीनच्या चार संशयित दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने राजस्थानमधून अटक केली आहे. त्यातील एकाची ओळख पटली असून त्याचे नाव वकास असल्याचे विशेष पोलिस पथकाचे आयुक्त एस. एम. श्रीवास्तव यांनी सांगितले.
पाकिस्तानचा फरार आरोपी वकास याचा मुंबईतील झवेरी बाजारमधील १२ जुलै २०११ मध्ये झालेल्या बाँबस्फोटासह अनेक बाँबस्फोट प्रकरणात हात आहे. राजस्थानच्या जोधपूर भागात ते पोलिसांना सापडले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. आगामी लोकसभा निवडणूक काळात मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजवण्याचा त्यांचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे.वकास हा पाकिस्तानी दहशतवादी सप्टेंबर २०१० मध्ये असदुल्ला अख्तर उर्फ हद्दी याच्यासह भारतामध्ये पहिल्यांदा आला होता. हद्दीला इंडियन मुजाहिदीनचा प्रमुख यासीन भटकळ याच्यासह अटक केली होती. वकास हा स्फोट घडवून आणण्यात तरबेज आहे. जामा मशीद (सप्टेंबर २०१०), वाराणसी (डिसेंबर २०१०), मुंबई (जुलै २०११), पुणे (ऑगस्ट २०१२) व हैदराबाद (फेब्रुवारी २०१३) येथे झालेले बाँबस्फोट वकास यानेच घडवून आणल्याचा दाट संशय आहे.
0
जसवंत सिंग अपक्ष निवडणूक लढणार

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीसाठी बारमेरमधून तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंग यांनी अखेर बंडाचा झेंडा उभारला असून सोमवारी ते अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वत: जसवंत सिंग यांनीच ही घोषणा रविवारी केली.
मात्र अजूनही सिंह यांचं तळ्यात- मळ्यात सुरु आहे. आपण आपल्या सहका-यांशी चर्चा करणार आहोत. त्यानंतर पक्षाने दखल घेतली नाही तर सोमवारी अर्ज भरणार असल्याचे ते म्हणाले.
सध्याच्या भाजप या पक्षात बाहेरून आलेल्या लोकांनी अतिक्रमण केल्याचा आरोप जसवंत सिंग यांनी केला आहे. बारमेरमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचे संकेत देत त्यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जाहीर केले.बारमेरमधून निवडणूक लढवण्याची आपली इच्छा असताना आपल्याला डावलून काँग्रेसमधून भाजपात आलेल्या कर्नल सोनाराम चौधरींना पक्षाने उमेदवारी दिली. आपल्या बाबतीत पक्षाने दुसर्यांदा असे केले असल्याचे जसवंतसिंग म्हणाले. पक्षाने दोनदा दगाफटका केल्याने आता तडजोडीची कुठलीच शक्यता नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.









