यवतमाळ- वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. या मागणीकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिपाई (ए)च्या वतीने २४ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यात आली. मात्र विदर्भाची मागणी जुणी असूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. रिपाईचे जिल्हाध्यक्ष मोहन भोयर यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन गोविंद मेश्राम, नवनित महाजन, महेंद्र मानकर, अॅड.रवींद्र अलोणे, वसूर्केत पाटील, सदाशिव मनवर, रामदास बनकर, अॅड.भारती मेश्राम, जि.प.सदस्या सुलोचना भोयर, वनिता मिसळे यांनी केले आहे.
Archive for February 20th, 2014
वेडसीच्या ‘त्या’युवकाचा खून, चार जणाविरूद्घ गुन्हे
यवतमाळ – वेडसी येथील बेपत्ता युवकाचा एक म हिन्यापूर्वी मृतदेह आढळ ला होता. या युवकाचा खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून वडकी पोलिसांनी चार जणाविरूद्घ खूनाचा गुन्हा दाखल केला. संजय पांडूरंग चिवाने रा. वेडशी असे मृतकाचे नाव आहे. मृतकाने १६ जानेवारी रोजी अश्लिल शिवीगाळ केल्याची तक्रार मुक्ता सुनिल लेनगुडे या महिलेने वडकी पोलिस ठाण्यात दिली होती. दरम्यान १९ जानेवारीपासून संजय हा घरून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी पोलिसात दिली. अशातच त्याची शोधमोहीम सुरु असतानाच २१ जानेवारी रोजी गावातीलच नाल्यात सदर युवकाचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करुन अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान वडील पांडूरंग झुलाराम चिवाने (५५) यांनी मुलगा संजयचा खून केल्याचा आरोप करुन वडकी पोलिसात तक्रार दिली. त्यामध्ये आरोपी नाना सदाशिव लेनगुरे (५५) रा. कुंभा, मनोहर सदाशिव लेनगुरे, सुनिल सदाशिव लेनगुरे, मुक्ता सुनिल लेनगुरे यानी खून केल्याचे नमुद केले. त्यावरुन पोलिसांनी चारही आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३०२, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. अधिक तपास ठाणेदार एम.एस. राजपूत करीत आहे.
राजीव नगरात धाडसी चोरी, चार लाखाचा ऐंवज लंपास
यवतमाळ – राजीव नगरमधील घर फोडून चोरट्याने सोन्याच्या दागिन्यासह ४ लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना बुधवारी रात्री ११.३० वाजता घडली. प्रकाश नंदराव मिसाळ रा. राजीव नगर मोठे वडगाव हे आपल्या कुटुंबीयासह बुधवारी रात्री ८.३० वाजता मित्राकडे जेवन करण्यासाठी गेले होते. अशातच चोरट्याने त्याच्या घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. कपाटातून २ लाख ४ हजार रोख , ५० ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र, १२ ग्रॅमचे कानातले, १५ ग्रॅमची अंगठी, ५ ग्रॅमची अंगठी, प्रत्येकी ५ ग्रॅमच्या दोन चैन, तीन सोन्याचे सिक्के असा एकुण ४ लाख ३० हजार रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेला. रात्री ११.३० वाजता मिसाळ कुटुंबीय घरी परत येताच दाराचे कुलुप तुटल्याचे दिसले. घरात जाऊन पाहणी केली असता कपाटातून रोख व सोन्याचे दागिने चोरी गेल्याचे उघड झाले. या घटनेची माहिती मिळताच यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, वडगाव रोडचे प्रभारी ठाणेदार दिलीप मसराम, पोलीस उपनिरीक्षक नरेश पिंपळकर, पोलीस उपनिरीक्षक शिल्पा निमकर व पोलीस कर्मचाºयांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी प्रकाश मिसाळ यांच्या तक्रारीवरून वडगाव रोड पोलिसांनी चोरट्याविरुद्घ भादंवि कलम ४५७, ३८० अंतर्गत गुन्हा दाखल केला.
जुगार अड्डयावर धाड, सात अटकेत
यवतमाळ – शहरातील राऊत नगरमध्ये घरात सुरु असलेल्या जुगार अड्यावर धाड टाकुन सात जणांना अटक केली. जिल्हा विशेष पथकाने बुधवारी रात्री ८.१५ वाजता ही कारवाई केली असून ४५ हजार रुपयाचा मुुद्देमाल जप्त केला.
किशोर मधुकर गुल्हाणे रा. राऊत नगर याच्या घरी ५२ पत्ते जुगार सुरु असल्याची गुप्त माहिती जिल्हा विशेष पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने रात्री राऊत नगरात धाड टाकली. यावेळी किशोर गुल्हाणे, स्वप्नील फुलमाळी, अजय राणे, सर्व रा. राऊत नगर, विलास किनवटकर रा. महाविर नगर, विवेक नंदुरकर ,पुरुषोत्तम पावडे रा. लोहारा , गिरीधर मांगुळकर रा. टाकळी याना अटक केली. त्याच्याकडून ४५ हजार ७०० रुपये रोख व जुगार साहित्य जप्त केले. ही कारवाई राजू वटाणे, जमा. विजय डबले, जमा. ऋषी ठाकुर, गजानन डोंगरे,विशाल भगत, रितुराज मेंढवे, प्रविण गौरखेडे, भोजराज करपते, मयुरी मांगुळकर, रेवण जागृत यांनी केली.
नेर नबाबपूर न.प. पोटनिवडणूक कार्यक्रम जाहिर , २३ मार्च रोजी मतदान
यवतमाळ – राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नेर नबाबपूर नगरपरिषदच्या प्रभाग क्रमांक 3 क च्या रिक्त पदासाठी जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे.
दिनांक २१ ते २८ फेब्रुवारी पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. सुट्टीच्या दिवशी मात्र नामनिर्देशन पत्र देण्यात येणार नाही तसेच ते स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशन पत्राची छाणनी १ मार्च रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. छाणनी नंतर नामनिर्देशन पत्र १० मार्च पर्यंत मागे घेता येईल. २३ मार्च रोजी मतदान घेण्यात येईल तर २४ मार्च रोजी मतमोजणी होईल. ही पोटनिवडणूक प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी लघू सिंचन कामे क्रमांक २ यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तसेच नगरपरिषद नेर नबाबपूरचे मुख्याधिकारी यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकाºयांनी नियुक्ती केली आहे.
काँग्रेसनेच देशाचा विकास केला – आ़ ठाकरे

दारव्हा – धर्म हा प्रत्येकाच्या वैयक्तीक श्रध्देचा भाग असून, राजकर्त्यांनी जाती, पंथ, धर्म, भाषा न पाहता देशातील प्रत्येक समूहाच्या विकासाकडे लक्ष देणे अभिप्रेत असते़ स्वातंत्र्यापासून आजपर्यंत या देशाचा सर्व समावेशक विकास कॉंग्रेसनेच केला असून, कॉंग्रेस पक्ष विकासाच्या नावावर लोकांना मतदान मागते तर विरोधक जाती-पातीच्या नावावर मते मागतात अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ़ माणिकराव ठाकरे यांनी केली़ आज गुरुवारी दारव्हा येथील कविता मंगल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते़
जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कॉंग्रेसच्या वतीने कार्यकर्ता मेळावे घेतले जात आहे़ आज गुरुवारी दिग्रस विधानसभा क्षेत्रीय कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते़ या मेळाव्याचे उद्घाटक राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे तर अध्यक्ष म्हणून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आ़ माणिकराव ठाकरे होते़ प्रमुख अतिथी म्हणून कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. वामनराव कासावार, माजी खा़ हरिभाऊ राठोड, शिक्षण सभापती मनमोहनसिंग चव्हाण, जीवन पाटील, महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अॅड़ सीमा तेलंगे, डॉ़ टी़सी़ राठोड, जि़प़ सदस्य राहुल ठाकरे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर बोरकर, राजेंद्र माहुरे, वसंतराव निरपासे, नगराध्यक्ष अशोक चिरडे, सैय्यद फारुख, वजाहत मिर्झा, माधुरी गडपायले, विजया सांगळे, ज्योती उपलेंचवार आदी उपस्थित होते़ पुढे बोलताना आ़ ठाकरे म्हणाले की, कॉंग्रेसने कुठलाही जातीभेद न पाळता देशातील प्रत्येक वंचित घटकाच्या विकासासाठी प्रयत्न केले़ ज्या काळात ग्रामीण भागात मुलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या त्या काळात रस्ते, पूल, शाळा, आरोग्याच्या सुविधा पोहचविण्याचे काम कॉंग्रेसने केले़ विरोधी पक्षांकडे विकासाची कुठलीही दृष्टी नसून, देशाची अखंडता संकटात घालण्याचे काम ते करताहेत, असा घणाघात त्यांनी केला़ आ़ माणिकराव ठाकरे यांच्याहस्ते मुख्यमंत्री विकास निधी अंतर्गत मंजूर ३ कोटी ५४ लाख रुपयाच्या विकास कामाचे भूमिपूजन गोळीबार चौक व बसस्थानक चौकात करण्यात आले़ यावेळी ना़ शिवाजीराव मोघे, आ़ वामनराव कासावार, माजी़ खा़ हरिभाऊ राठोड आदींची भाषणे झाली़
आरती इंगोलेच्या कुटूंबीयांना पोलीस संरक्षण द्या – युवा सेनेनेची मागणी
यवतमाळ – बहुचर्चीत आरती इंगोले खुन प्रकरणातील मुख्य आरोपी देवा पवार यांने तीच्या आई-वडीलांना तक्रार मागे घेण्यासाठी घरी जाऊन पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकाराने इंगोले कुटुंब भयभित झाले असून त्यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी युवा सेनेने केली आहे. याबाबतचे निवेदन आज जिल्हाधिकाºयांना दिले.
देवा पवारने एक वर्षापूर्वी आरती इंगोलेची निर्घूण हत्या करून मृतदेह जाळून टाकला होता. दरम्यान देवाची जामिनावर सुटका झाली असून तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणत आहे. त्यातूनच त्याने तीन दिवसानपूर्वी पिस्तुल रोखली होती. त्यामुळे इंगोले कुटुबीयाच्या जिवाला धोका असून पोलीस संरक्षण देण्याची मागणी युवा सेनेने केली आहे. जिल्हाधिकाºयांना निवेदन देतेवेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य मोटके, शहर प्रमुख निखील वाघ, खुशाल संकट, मनोज झाडे, मनोज कांबळे, मुलीचे वडील प्रल्हाद इंगोले, आई मंदा इंगोले, सपना खरतडे, शुभम दाणी, बबलू, मसराम, शुभम घोडे, राज अदलाखे, चंद्रशेखर मोहानुर, मंगेश हसतबांधे, आकाश जयस्वाल, हार्दिक दावडा, सौरभ अलसिंगकर, संतोष भारती उपस्थित होते.
तेलंगण विधेयक राज्यसभेत मंजूर
नवी दिल्ली – प्रचंड गदारोळ आणि आरडाओरड सुरु असताना स्वतंत्र तेलंगण राज्याचे विधेयक आज, गुरुवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. यासोबत तेलंगण हे देशातले २९ वे नवे राज्य अस्तित्वात आले असून महाराष्ट्राला एक नवा शेजारी मिळाला आहे.
तेलंगण राज्याच्या निर्मितीचे विधेयक राज्यसभेत मंजूर होताच दिल्लीत आंध्रभवनसमोर जल्लोष व्यक्त करण्यात आला. तर आंध्रप्रदेशातील विरोधी पक्षांच्या खासदारांनी सरकारच्या या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. आज, गुरुवारी राज्यसभेत हे विधेयक मांडले गेल्यानंतर याविषयावर अनेक पक्षाच्या नेत्यांनी आपापली मते मांडली. कॉंग्रेसचे आंध्र प्रदेशातील खासदार, पर्यटन मंत्री चिरंजीवी यांनी पक्षाच्या भूमिकेच्या विरुद्ध जाऊन या विधेयकाला विरोध दर्शवला. पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात बोलताना दुःख होत असल्याचे ते आपल्या भाषणात म्हणाले. भाजपने या विधेयकाला पाठिंबा जाहीर केला. स्वतंत्र तेलंगण राज्य निर्मितीली भाजपचा नेहमी पाठिंबा होता, असं राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी सांगितले. केंद्रातील यूपीए सरकारने अत्यंत घिसाडघाईने ही प्रक्रिया केली असल्याचा आरोप जेटली यांनी केला. बसप नेत्या मायावती यांनी यावेळी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राची विभागणी करावी अशी मागणी केली. लोकजनशक्ती पार्टीचे खासदार रामविलास पासवान यांनी महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा वेगळा करण्याची मागणी केली. तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधानांसमोर जाऊन पेपर फाडून निषेध व्यक्त केला. सीमांध्रचे खासदार पंतप्रधानांच्या भाषणात व्यत्यय आणताना दिसत होते. स्वतंत्र तेलंगणच्या विधेयकावर मतदान सुरु होताच डावे पक्ष आणि एआयएडीएमचेच्या खासदारांनी मात्र सभात्याग केला होता.
नातेवाईकाकडून तीन चिमुकल्यांची क्रूर हत्या
हैदराबाद – घरातील नातेवाईकानेच तीन मुलींना पळवून त्यांना पेटवून दिल्याची क्रूर घटना आंध्र प्रदेशमधील निझामाबाद जिल्ह्यात घडली. गुरुवारी सकाळी निझामाबाद येथील एक कॉलेजजवळ या तीन चिमुकल्यांचे मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नरेंदर रेड्डी असे या आरोपीचे नाव असून त्याने बुधवारी रात्री त्याने सिरी(नऊ), अक्षया(सात) आणि खुशी(पाच) या तिघांना कारमधून पळवून नेले. त्यानंतर निझामाबाद शहराबाहेर या तिघींवर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिल्याची माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली.याआधी बुधवारी तिनही मुली बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीच्या घरच्यांनी केली होती. यानंतर पोलिसांनी तपास केला असता या चिमुकल्यांचे मृतदेह निझामाबाद येथे आढळून आले. लग्न होत नसल्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्यने हे कृत्य केले असावे असे समजते. पोलिस यासंबधी पुढील तपास करत आहेत.
पासधारकांना स्मार्ट कार्ड
मुंबई- वर्षभरात पेपरलेस कारभाराची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा संकल्प राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) घेतला असून, एसटीच्या विविध पासधारकांना स्मार्ट कार्ड देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. महामंडळातर्फे देण्यात येणारे विद्यार्थी पास, आहिल्याबाई होळकर पास, आवडेल तेथे प्रवास योजनेचा पास, ४ व ७ दिवसांचे पास तसेच मासिक, त्रमासिक पास आता स्मार्ट कार्ड स्वरूपात देण्यात येणार आहेत.
राज्यात एसटीचे सुमारे ३० हजारांहून अधिक पासधारक प्रवासी असून, त्यांना या स्मार्ट कार्डचा लाभ होणार आहे. सध्या सर्व विभागीय मुख्यालयातील आगारांत स्मार्ट कार्डचा वापर सुरू झाला असून, या महिन्याच्या अखेरीस राज्यातील सर्व आगारांत स्मार्ट कार्ड उपलब्ध होणार आहेत. पासची रक्कम स्वीकारल्यावर आवश्यक माहिती नोंदवून स्मार्ट कार्ड व ओळखपत्र देण्यात येईल. प्रवास करताना वाहकाजवळील ईटीआयएम मशिनद्वारे स्मार्ट कार्डची माहिती नोंदवली जाईल. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन प्रणालीवर हे स्मार्ट कार्ड काम करेल.
त्यामध्ये ‘सिक्युरिटी की’ असल्याने या कार्डाचा गैरवापर करता येणार नाही. मुदत संपल्यानंतर सहा महिन्यांच्या आत या स्मार्ट कार्डचे नूतनीकरण करणे आवश्यक असेल. स्मार्ट कार्डचा वापर ५ वर्षापर्यंत करता येणार आहे. त्यासाठी पासधारकांना स्मार्ट कार्डचे ३० तर ओळखपत्रासाठी ५ रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. या स्मार्ट कार्डमुळे वेळेची बचत होईल आणि वाहकांच्या कामात सुलभता येईल, असा विश्वास एसटी प्रशासनाने व्यक्त केला आहे.











