
नवी दिल्ली, दि. १८ – माहिती तंत्रज्ञानासंबंधी महत्वपूर्ण माहिती उपल्बध करुन देणा-या गूगलने भारताचा चुकीचा नकाशा दाखविल्याने गूगलविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. देहराडूनमधील डालनवाला पोलीस ठाण्यात आयटी एक्ट अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस ठाण्याचे अनिल कुमार जोशी यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय नकाशामध्ये भारताच्या अनेक सीमा या इतर देशांच्या नकाशामध्ये दाखविण्याचा प्रताप गूगलने केला आहे. भारतीय सर्वेक्षण विभागाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी गूगलविरुध्द गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली होती. भारतीय सर्वेक्षण विभागाच्या तक्रारीनंतर देहराडूनमध्ये गूगलविरुध्द आयटी एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Archive for December 18th, 2014
0
भारताचा चुकीचा नकाशा दाखविणा-या गूगलविरूध्द गुन्हा
0
शाळेत चिमुरडीवर बलात्कार

मुंबई : चार वर्षांच्या विद्यार्थिनीवर शाळा अधिकाऱ्याने केलेले लैंगिक अत्याचार कुटुंबीयांनी लाजेखातर दडवून ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. भांडुपमधील एका खासगी शाळेत हा प्रकार घडल होता. याहून धक्कादायक बाब ही, की त्रास होऊ लागल्याने ही चिमुरडी भांडुपच्या सावित्रीबाई फुले व घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी आली. सर्व प्रकार समजूनही रुग्णालयाने या गुन्ह्याची माहिती पोलिसांना दिली नाही.
भांडुप पश्चिमेकडील तुलशेत पाडा परिसरात असलेल्या माउंट मेरी या खासगी शाळेत ९ डिसेंबर रोजी ज्युनिअर केजीत शिकणाऱ्या चार वर्षांच्या चिमुरडीसोबत हा प्रकार घडला. मधल्या सुटीत शौचालयात गेलेल्या चिमुरडीसोबत शाळेच्या प्रशासकीय विभागात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेल्या केसरीनंदन उपाध्याय (३२) ऊर्फ छोटू सर याने लैंगिक चाळे केले. आई, मावशीसोबत आजोळी राहणाऱ्या या चिमुरडीने संध्याकाळी घरी जाताच घडला प्रकार आजीच्या कानावर घातला. घाबरलेल्या आजीने कुटुंबाला या प्रकाराची माहिती दिली. मात्र या प्रकाराचा बोभाटा झाल्यास अब्रू जाईल, समाजात नाक कापले जाईल या विचाराने कुटुंबाने पोलीस ठाणे गाठून तक्रार देणे टाळले.
दरम्यान, रात्री उशिरा या चिमुरडीच्या पोटात वेदना होऊ लागल्या. दुसऱ्या दिवशी, १० डिसेंबरला आजीने चिमुरडीला भांडुपच्या सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहात उपचारार्थ नेले. तेथील डॉक्टरांना घडला प्रकारही सांगितला. मात्र हे प्रसूती गृह आहे. येथे नातीवर उपचार होणार नाहीत असे सांगून डॉक्टरांनी आजीला राजावाडी रूग्णालय गाठण्याचा सल्ला दिला. सोबत प्रसुतीगृहाची रूग्णवाहिका जोडून दिली. राजावाडी रूग्णालयातही आजीने नातीवर घडला प्रकार सांगितला. राजावाडी रूग्णालयातून उपचार घेऊन त्याच दिवशी चिमुरडी घरी परतली.
मात्र १२ डिसेंबरला चिमुरडीचा त्रास वाढला. तिला असह्य वेदना होऊ लागल्या. त्यामुळे कुटुंबियांनी चिमुरडीला पुन्हा राजावाडी रूग्णालयात नेले. मात्र बाह्यरूग्ण विभागातील डॉक्टर निघून गेल्याने चिमुरडीला तसेच घरी आणण्यात आले.
दरम्यान, काल संध्याकाळी परिसरातील स्वयंसेवी संस्थेने चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या पर्यवेक्षकाविरोधात गुन्हा का दाखल करत नाही, असा जाब भांडुप पोलिसांना विचारला. तोवर भांडुप पोलिसांना असा काही प्रकार घडला असेल याची कल्पनाही नव्हती. अचानक झालेल्या या हल्ल्याने पोलीसही गांगरले. अखेर स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने भांडुप पोलिसांनी या चिमुरडीचे घर शोधून काढले. चिमुरडीला विश्वासात घेऊन बोलते केले. सोबत कुटुंबियांकडेही चौकशी केली. तेव्हा ९ डिसेंबरला घडलेला प्रकार समोर आला. सोबत कुटुंबियांना गुन्हा नोंदिवण्यास वाटलेल्या लाजेसोबत महापालिका रूग्णालयांचा भोंगळ कारभारही उघड झाला.
काल रात्री भांडुप पोलिसांनी या लहान मुलीचा, तिच्या कुटुंबियांचा जबाब नोंदवून घेतला. त्यात मुलीने छोटू सरांनी (आरोपी केसरीनंदन उपाध्याय)केलेल्या अत्याचाराची माहिती दिली. पोलिसांना छोटू सर इतकेच आरोपीचे नाव माहिती होते. त्यामुळे आज सकाळी शाळा उघडताच पोलिसांनी तेथे कार्यरत असलेल्या सर्वच पुरूषांना पोलीस ठाण्यात आणले आणि चिमुरडीसमोर उभे केले. तेव्हा चिमुरडीने आरोपी उपाध्याय उर्फ छोटू सर याच्याकडे बोट दाखवताच पोलिसांनी त्याला अटक केली. उपाध्यायविरोधात भांडुप पोलिसांनी बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचारातील कलमांनुसार गुन्हा नोंदविला आहे. उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाईल.
0
मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम , राज्य सरकारला धक्का

नवी दिल्ली, दि. १८ – मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणा-या राज्य सरकारच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने गुरुवारी नकार दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम राहणार असून सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे राज्य सरकारलाही जोरदार दणका बसला आहे.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आघाडी सरकारने सरकारी नोकरी व शिक्षण क्षेत्रात मराठा समाजासाठी १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ५२ टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येत नसल्याचे सांगत मुंबई हायकोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती कायम ठेवली होती. तर मुस्लिम समाजासाठी शिक्षण क्षेत्रामध्येच आरक्षण देण्याची परवानगी दिली होती. या विरोधात नवनियुक्त भाजपा सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने या याचिकेवर सुनावणीसाठी नकार दिला आहे. दरम्यान, या निर्णयाविरोधात पुन्हा न्यायालयात जाण्याची भूमिका राज्य सरकारने घेतल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत दिली.
0
भाजप नेत्यांनी काढली राजीव गांधी यांची कुंडली


नवी दिल्ली , दि. १८ – भारतीय शास्त्रज्ञ-संशोधक विज्ञानाच्या मदतीने जग कवेत घेणाऱ्या नवनव्या मोहिमा आखत असताना देशातील सत्ताधारी व विरोधकांमध्ये ग्रहगोल आणि शकुनअपशुकनांचे ‘ज्योतिषयुद्ध’ रंगले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती ईराणी यांच्या ‘भविष्यवेध’ कार्यक्रमामुळे गोत्यात आलेल्या भाजपने आता काँग्रेसवर पलटवार केला आहे. पंडित नेहरू यांच्या ज्योतिषश्रद्धेचा पुरावा म्हणून भाजप नेत्यांनी राजीव गांधी यांची कुंडलीच काढली आहे.
मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती ईराणी यांनी काही दिवसांपूर्वी एका ज्योतिषाला हात दाखवून भविष्य जाणून घेतल्यामुळं भाजपला टीकेचा सामना करावा लागला होता. काँग्रेसनं पंडित नेहरूंच्या विज्ञानवादाचा हवाला देत भाजपवर टीकेची झोड उठवली होती. काँग्रेसचा हा हल्ला भाजपने त्यांच्याच शस्त्राने परतावून लावला आहे. भाजपने बुधवारी एका पत्रकार परिषदेत पंडित नेहरू यांनी लिहिलेले पत्रच प्रसिद्ध केले. या पत्रातून नेहरू यांनी त्यांचे नातू व माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जन्मकुंडली बनविण्याचा आग्रह धरल्याचे दिसत आहे.
राजीव गांधी यांच्या जन्मानंतर काही दिवसांनी म्हणजेच, २९ ऑगस्ट १९४४ रोजी नेहरू यांनी कृष्णा हाथीसिंग यांना लिहिलेल्या पत्रात राजीव यांची योग्य कुंडली बनविण्याचे निर्देश दिले होते. इंदिरा गांधी यांनाही त्यांनी कुंडली बनविण्यासाठी चांगल्या ज्योतिषाचा शोध घेण्यास सांगितलं होतं. तसं या पत्रात त्यांनी स्वत: नमूद केलं आहे. कुंडलीतील वेळ ही सौरवेळ असावी, सध्याची प्रचलित वेळ नसावी, असंही नेहरूंनी यात म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू आणि रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत नेहरूंचं हे पत्र भाजपने काल मीडियाला दिलं. भाजपच्या या खेळीमुळं काँग्रेस तोंडघशी पडली आहे.
0
बलात्कार पीडितेच्या घरी प्रदर्शन मांडणार नाही – मंत्री पंकजा मुंडे

नागपूर , दि. १८ – ‘बलात्कारामुळे त्या महिलेवर मोठा आघात झाला असतो. या आघातातून पीडितेला बाहेर काढणे गरजेचे आहे. पीडितेला मदत कशी करता येईल यासाठी हवे ते प्रयत्न करेल; मात्र बलात्कार पीडितेच्या घरी जाऊन प्रदर्शन मांडणार नाही’, असा निश्चय महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केला.
राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने विधानपरिषदेच्या सभागृहात चालविण्यात येणाऱ्या संसदीय अभ्यासवर्गात पंकजा मुंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी आमदार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या. पीडित व्यक्तीच्या घरी मंत्री, नेते यांच्या भेटी वाढल्याने कशी स्थिती उत्पन्न होऊ शकते याचे चित्रण आमीर खानच्या ‘पिपली लाइव्ह’ या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. असे प्रकार घडू नयेत म्हणून पीडितेच्या घरी जाणार नसल्याचा निर्णय मुंडे यांनी घेतला.
मुंडे यांनी या चित्रपटाचा उल्लेख केला नसला तरी या चित्रपटाची आठवण अनेकांनी ताजी केली. पीडित महिलेला समाजात पुन्हा आत्मविश्वासाने जगण्यासाठी उभे करण्यासाठी तिची ओळख पटू नये ही खबरदारी घेण्याची गरज आहे. मात्र, मंत्री पीडित महिलेल्या घरी गेल्यास संपूर्ण ताफा घेऊन जातो. अशा स्थितीत त्या महिलेच्या वैयक्तिक अधिकारावर गदा येऊ शकते. त्यामुळे आपण हा प्रकार करणार नसल्याचे सांगत पीडित महिलेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
बलात्कारासारख्या संवेदनशील घटनेचेही भडक चित्रीकरण करणाऱ्या माध्यमांवर रोख कशी लावता येईल, हा प्रश्न एका विद्यार्थिनीने विचारून महिला नेत्यांपुढे कोडे निर्माण केले. प्रणिती शिंदे यांनी माध्यमे चौथा स्तंभ असल्याचे सांगून त्याचे महत्त्व स्पष्ट केले. मात्र, यावर सेन्सॉर कोण लावणार, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी त्यांनी माइक पंकजा यांच्याकडे सरकवला. प्रत्येकाचे वैयक्तिक जीवन जपले पाहिजे. बलात्कार, हत्याकांड या निर्घृण प्रकाराचे भडक चित्रीकरण नको, असा विचार मांडत चित्रपटांना सेन्सॉर आहे, मात्र माध्यमांवर का नाही, असा सवाल पंकजा यांनी उपस्थित केला. परदेशी माध्यमांपेक्षा भारतातील मीडिया संवेदनशील असल्याचेही त्यांनी यावेळी मान्य केले. बचतगटाचा उपक्रम महिलांना बळकटी देणारा आहे. मात्र, हा उपक्रम केवळ आर्थिक सक्षमीकरण ठरू नये तर महिलांना या उपक्रमाच्या माध्यमातून मानसिक सक्षमीकरणाचीही अधिक गरज असल्याचे शिंदे म्हणाल्या.
स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र, महिलांऐवजी त्यांचे पतीच अधिकार गाजवितात, ही स्थिती पाहायला मिळते. पतीचे मार्गदर्शन घेण्यात काहीच हरकत नाही; मात्र पतीचे वर्चस्व निर्माण व्हायला नको. पुढील १० वर्षांत हे चित्र पालटेल आणि महिला स्वतःचे निर्णय स्वतः घेतील असा विश्वासही मुंडे यांनी व्यक्त केला.
0
खड्ड्यामुळे महिलेचा मृत्यू , संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा

मुंबई, दि. १८ -अहमदाबाद व्हाया मनोर, वाडा, भिवंडी मार्गे पनवेल हा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा ठरू लागला आहे. या रस्त्यावरील खड्ड्यामुळे गुरुवारी शर्मिला राजेश पाटील (२५) या महिलेला प्राण गमावावा लागला आहे. याघटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने हा मार्ग तब्बल सात तास रोखून धरला होता. सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केल्याशिवाय अपघातग्रस्त ठिकाणावरून मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका घेतल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला होता. अखेर, संध्याकाळी जव्हारचे पोलिस उपअधिक्षक प्रदीप जाधव यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास शर्मिला पाटील त्यांच्यासमवेत दुचाकीवरून जात असताना, रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीचा तोल गेल्याने त्या खाली पडल्या. त्याचवेळी समोरून आलेल्या ट्रकखाली त्या चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच या परिसरातील संतप्त जमावाने सहा तासांहून अधिकवेळ हा मार्ग रोखून धरला होता. यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. या रस्त्याच्या दुरूस्ती वारंवार मागणी करूनही याकडे सार्वजनीक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांच्या संतापाचा भडका उडाला होता. बांधकाम विभागाच्या अभियंत्यांसह इतर अधिकाऱ्यांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याशिवाय शर्मिला यांचा मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका त्यांच्या नातेवाईकांसह अन्य नागरिकांनी घेतल्याने वातावरण तणावग्रस्त झाले होते.
संतप्त जमावाला वाडा येथील तहसीलदार संदीप चव्हाण व पोलिस अधिकारी संजय हजारे यांनी फिर्याद नोंदवून घेत असून, चौकशी झाल्यानंतर दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र, जमावाने प्रथम गुन्हा दाखल करण्याचा आपल्या मागणीवर ठाम राहिले होते. यानंतर संतप्त जमावाने वाडा येथील सार्वजनीक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोडही केली. दरम्यान, या महामार्गावरील वाहतूक सहा ते सात तास रोखून धरल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. संध्याकाळी सात पर्यंत मृतदेह घटनास्थळावरून न उचल्याने वातावरण अधिकच गंभीर होऊ लागले होते. अखेर जव्हार पोलिस उपअधिक्षक प्रदीप जाधव घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी संतप्त जमावाची समजूत घातली. तसेच, सार्वजनीक बांधकाम खात्यामधील अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच येत्या तीन दिवसांत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर या जमावाने आंदोलन मागे घेत,शर्मिला पाटील यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
0
२६/११चा सूत्रधार लख्वीला जामीन

इस्लामाबाद, दि. १८ – दोनच दिवसांपूर्वी पेशावरमधील तालिबानी हल्ल्यानं हादरलेल्या आणि दहशतवाद संपवायची भाषा करणाऱ्या पाकिस्ताननं आपले खरे रंग लगेचच दाखवले आहेत. २६/११च्या मुंबई हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार, लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या झकीउर रेहमान लख्वीला रावळपिंडीच्या कोर्टानं आज जामीन मंजूर केला आहे. त्यातून त्यांचा खोटेपणा आणि भारताबद्दलचा द्वेषच स्पष्ट होतो.
२६/११च्या मुंबई हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्याचा, माहिती पुरवल्याचा आरोप झकीउर रेहमान लख्वीवर आहे. मोहम्मद अजमल कसाबच्या कुटुंबाला त्यानं आर्थिक मदतही केली आहे. त्याच्याविरोधातील पुरावे सापडल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि रावळपिंडीच्या अडियाला जेलमध्ये त्याची रवानगी झाली. त्याचा ताबा देण्याची मागणी भारत सरकारनं अनेकदा पाकिस्तानकडे केली आहे. परंतु, एरवी मैत्रीची भाषा करणारं पाक सरकार त्याबद्दल काहीच बोलत नाही. त्यांच्या या कावेबाजपणा आज पुन्हा उघड झाला. रावळपिंडी कोर्टानं लख्वीला जामीन मंजूर केल्यानं त्याचा जेलमधील मुक्काम संपणार आहे. दहशतवाद संपवण्याच्या गर्जना करणारं पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचंच या जामिनातून पुन्हा समोर आलंय. पेशावरमधील अमानुष हल्ल्यातूनही त्यांनी काहीच बोध घेतलेला नाही.
0
महसूल राज्यमंत्र्यांकडून विकास कामांचा आढावा, दारव्हा पाणीपुरवठा योजनेतील अडचणी दुर करू – संजय राठोड
यवतमाळ, दि. १८ : जिल्ह्यातील दारव्हा येथील पाणी पुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी वितरण व्यवस्थेसह नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. अडाण प्रकल्पावर आधारीत या योजनेला गती देण्यासोबत अस्तित्वास असलेली पाणी पुरवठा योजना सुरळीत सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. श्री.राठोड यांनी यवतमाळ जिल्ह्यातील विविध विकास कामे तसेच प्रलंबित कामांचा आढावा नागपूर येथील रविभवनात आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.शरद कुळकर्णी, पोलिस अधिक्षक संजय दराडे, विज वितरणचे अधिक्षक अभियंता बाबासाहेब जाधव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.
दारव्हा येथील प्रस्तावित योजना 41 किमी अंतराची असून अडाण प्रकल्पावर ती आधारीत आहे. योजनेला तांत्रिक मान्यता प्राप्त झाली असून सुजल निर्मल अभियानांतर्गत सदर योजना घेण्यात आली आहे. या योजनेला शासनस्तरावर गती देण्यासाठी मुंबई येथे स्वतंत्र बैठक बोलाविली जाणार असल्याचे श्री.राठोड म्हणाले. दारव्हा येथील योजनेसह प्रस्तावित प्रशासकीय ईमारत, वणी येथील बाजार गाळे,नेर येथील वळण रस्ता, हरसूल-वनोली-मोरखेड रस्ता तसेच वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाचा आढावाही त्यांनी घेतला. नेर येथे प्रशासकीय तथा पोलिस स्टेशनच्या ईमारतीसाठी प्रस्ताव सादर करण्याची सुचना त्यांनी केली. दारव्हा येथे मागासवर्गीय मुला-मुलींच्या वसतीगृहासाठी शासकीय जागा उपलब्ध नसल्यास बाजार भावाने जागा खरेदी करण्याची कार्यवाही करण्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील रस्त्यांची स्थिती, अंगणवाडीचे बांधकाम, चारा टंचाई, दृष्काळस्थिती, सिंचन आदींचा आढावाही त्यांनी घेतला.










