
यवतमाळ : – नगर परिषदेचे राजकारण जिल्ह्याभोवती केंद्रीत असते. जिल्हा प्रशासन विभागाच्या वतीने निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला होता. त्यानुसार यवतमाळ, वणी, पुसद व दिग्रस या राजकीयदृष्ट्या महत्वाच्या नगर पालिकेत विषय समिती सभापतीची निवड प्रक्रीया आज पार पडली. २० ला उमरखेड, घाटंजी, आर्णी, नेर या नगर पालिकेत विषय समित्यांची निवड करण्यात येणार आहे. तत्पुर्वी आज यवतमाळचे उपविभागीय अधिकारी नरेंद्र टापरे हे आजच्या बैठकीत पिठासीन अधिकारी होते. तसेच मुख्याधिकारी रविंद्र पांढरे आणि प्रभारी मुख्याधिकारी दिपककुमार मीना यांच्या उपस्थितीत दुपारी यवतमाळ नगर परिषदेच्या सभागृहात अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात निवड प्रक्रीया पार पडली. यावेळी नगराध्यक्ष सुभाष राय प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी भाजप समर्थीत प्रणीता खडसे बांधकाम सभापती, भाजपाच्या रेखा कोठेकर शिक्षण सभापती,राष्ट्रवादीच्या सौ.अरूणा गावंडे आरोग्य सभापती, भाजपाच्या नंदा जिरापूरे नियोजन सभापती, मीना राहुल मसराम महिला व बालकल्याण सभापती म्हणून अविरोध निवडून आल्या. स्थायी समितीचे पदसिध्द अध्यक्ष नगराध्यक्ष असतात. उर्वरीत स्थायी समितीत नगरसेवक सुमित बाजोरीया, माजी सभापती प्रविण प्रजापती आणि राधिका बोरेले यांचा समावेश करण्यात आला. विषय समिती सभापतींची एसडीओ टापरे यांनी घोषणा करताच कार्यकत्र्यांनी एकच जल्लोष केला. सर्व महिला सभापती नगर परिषद इमारतीच्या खाली आवारात येताच ढोल ताशाच्या गजरात कार्यकत्र्यांनी आंनदोत्सव साजरा केला.
वणी नगर परिषदेत आज विषय समिती सभापतींची निवड प्रक्रीया ठरली होती. परंतु कोरम अभावी ही सभा बारगळली.
दिग्रसमध्ये नगर परिषदेत माजी मंत्री संजय देशमुख यांच्या परिवर्तन विकास आघाडीचे वर्चस्व आहे. मात्र याच मतदार संघातून राज्याचे महसुल राज्यमंत्री म्हणून संजय राठोड नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे खास करून दिग्रस नगर पालिकेतील विषय समिती सभापती निवडीवर जिल्ह्याचे लक्ष केंद्रीत झाले होते. शिवसेनेकडून परिवर्तन आघाडीला शह दिला जातो का? यावरही काथ्याकुट चालु होता. परंतु सहा समितीच्या सभापती निवड प्रक्रीयेत काँग्रेस समर्थीत परिवर्तन विकास आघाडीच्या सत्ताधारी नगर सेवकांची एक मताने निवड झाली. दारव्ह्याचे एसडीओ मनोहर कडू हे पिठासिन अधिकारी होते. दुपारी १ ते ३ च्या दरम्यान मुख्याधिकारी विठ्ठल कुमरे यांनी नामांकन अर्ज स्विकारले. ठिक ३ वाजता निवड प्रक्रीयेला सुरूवात झाली. त्यानुसार बांधकाम सभापती पदी शाम शंकर महिंद्रे, शिक्षण सभापती पदी रामप्यारी, उत्तम नरके, आरोग्य सभापती पदी रामुजी सुवालाल पवार, पाणी पुरवठा व जलनिस्सारण सभापती पदी नुरमहमंद खान, नियोजन सभापती पदी डॉ.मुस्ताक प्यार मोहम्मद शेख, महिला व बालकल्याण सभापती पदी सलमाबी अ.मोहसीन व उपसभापती पदी शबाना परवीन सै.मतीन यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या निवडणुक प्रक्रीयेत शिवसेनेचे गटनेते व नगरसेवक यांनी पाठ दाखविल्याने सत्ताधा:यांनी ठरल्याप्रमाणे निवड प्रक्रीया आटोपती घेतली. या सर्व नवनियुक्त सभापतींपुढे शहरातील विकासकामांचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
पुसद नगर परिषदेत सभापतींचा कार्यकाळ पुर्ण झाल्यामुळे आज नविन विषय समितींच्या सभापतींची निवड करण्यात आली. पाणी पुरवठा सभापती म्हणून राजीव दुधे यांची पुन्हा निवड करण्यात आली. नगर परिषदेचे उपाध्यक्ष हेच नियोजन समितीचे सभापती असतात. बांधकाम सभापती पदी जाकी अन्वर, आरोग्य सभापती म्हणून अॅड.भरत जाधव, शिक्षण सभापती म्हणून प्रा.नामदेव फाटे आणि बालकल्याण सभापती पदी मिराबाई साहु यांची अविरोध निवड करण्यात आली. एसडीओ जाजु आणि प्रभारी मुख्याधिकारी मानकर यांनी निवडीची ही घोषणा केली. त्यानंतर नगरसेवक आणि कार्यकत्र्यांनी उत्स्फुर्त जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला.
Archive for December 19th, 2014
0
तीन नगर पालिका विषय समितीची निवड, वणीत निवड बारगळली
0
मनसेचा जिल्हाकचेरीवर गाठोडे मोर्चा

यवतमाळ -केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले असून, शेतकºयांना दिलेल्या वचननाम्याची अद्यापही पुर्तता झाली नसल्याने शेतकºयांच्या न्याय मागण्यांसाठी मनसेने आज शुक्रवारी शहरात गोठोडे मोर्चा काढून आपल्या भावना व्यक्त केल्या. जिल्हाकचेरीवर धडकलेल्या या मोर्चातील पदाधिकाºयांची निवेदनावरून पोलिसांसोबत धक्काबुक्की झाल्याने मोर्चेकरांनी जिल्हाधिकाºयांच्या कक्षासमोर ठिय्या मांडून संताप व्यक्त केला.
भाजपने सत्तेवर आल्यानंतर शेतकºयांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करून शेतकºयांना दिलासा देण्याची गरज होती. मात्र सत्तेत आल्यानंतर भाजप शेतकºयांच्या हक्काच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. कापसाला ७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव, कृषीपंपाचे वीज बिल माफी, उत्पादन खर्चावर आधारीत भाव, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे पुर्नवसन, सिंचनाची सुविधा आदी मागण्यांना घेऊन मनसेच्यावतीने नेताजी चौकातून गोठोडे मोर्चा काढण्यात आला. शहरातून मार्गक्रमन करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचलेल्या गाठोडे मोर्चाला निवेदन देण्यासाठी पोलिसांनी मज्जाव केला. यावेळी मोर्चेकरी पोलिसांना धक्काबुक्की करीत निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या कक्षात शिरले. मागणीचे निवेदन व कापसाचे गाठोडे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. निवेदन देण्यासाठी पोलिसांनी अडवणूक केल्यामुळे संतप्त झालेल्या मोर्चेकरांनी जिल्हाधिकारी यांच्या कक्षासमोर ठिय्या मांडून निषेध नोंदविला. यावेळी अनिल हमदापूरे, संजय देठे, विकास पवार, संगिता घोडमारे, राजू बावणे, सुधाकर झोटींग, देवा शिवरामवार, अंजु चिल्लोकर, छबु आठवले, शंकर मोकळे, प्रवीण मोगरे, धनराज चव्हाण आदी उपस्थित होते.
0
नंदकुमार बुटे यांचा सत्कार

यवतमाळ दि. १९ – राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन औरंगाबाद येथे नुकतेच संपन्न झाले व यामध्ये राज्यस्तरीय कार्यकारीणीचे गठण करण्यात आले. राज्यस्तरीय कार्यकारीणीत यवतमाळ येथील कर्मचारी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार बुटे यांची उपाध्यक्षपदावर नियुक्ती झाली. या निमित्ताने जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटना, महसूल कर्मचारी संघटना तसेच वाहन चालक व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने बचत भवन मध्ये सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी कर्मचारी नेते रवींद्र देशमुख हे होते. तसेच आगामी काळात मध्यवर्ती संघटनेच्या वतीने घेण्यात येणाºया सर्व आंदोलनात जिल्हा मागे न राहता सर्व कार्यक्रम राबविणार असल्याचा एकमुखी ठरावही पारीत करण्यात आला. कर्मचारी नेते रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वात बांधणी करण्यात आलेले संघटन त्याच पद्धतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल असा विश्वासही या सत्कार समारंभाच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आला. याच कार्यक्रमात संघटनेमध्ये कार्यरत असलेले व आता पदोन्नत तसेच सेवा निवृत्त झालेले राजाभाऊ चिंतकुटलावार, सी. के. गिरी, शेखर बारले, कैलास बोरकर, अजय गौरकार, दिलीप झाडे, के. डी. वायकोस या पदाधिकाºयांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र निफाडकर, बाबासाहेब कबाडे, श्रीरंग रेकलवार, किशोर पोहनकर, नंदकुमार नेटके, विजय साबापुरे, टी. के. चव्हाण, नरेंद्र राऊत, राजेंद्र गावंडे, सुभाष वानरे, राजाभाऊ चिंतकुटलावार, शीला पेडणेकर, अजय मिश्रा हे उपस्थित होते. यशस्वीतेकरिता जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी विजय कदम, कल्पेश वाडीवा, योगेश खरात, रवी चव्हाण, प्रकाश देशपांडे, शैलेश रापर्तीवार, रत्नदिप मेश्राम, गोपाल शेलाकार, स्वप्नील पानोडे, विलास वानखडे, आनंद भगत, आनंद कांबळे, अविनाश वाकोडे, धीरज डाखरे, मनोज मायले, दीपक पराते, दिलीप कोहळे, प्रवीण शिंदे, सचिन परचाके यांनी परिश्रम घेतले.
0
तीन बस चालकात ‘फ्री-स्टाईल’

बाभूळगाव, दि. १९ – बसमध्ये प्रवास करीत असलेल्या दोन बस चालक व गाडीचालवित असलेल्या चालकामध्ये वाद निर्माण होऊन फ्रीस्टाईल झाली. गुरुवारी सायंकाळी ही घटना धामणगाव-यवतमाळ बसमध्ये खडकसावंगा फाट्याजवळ घडली.या प्रकाराने प्रवाशामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
यवतमाळ आगाराची बस (एम.एच. ४०/ एन ९२९८) धामणगाव वरून प्रवाश घेऊन यवतमाळकडे निघाली होती. यामध्ये देवगाव येथून रामबरम किसन पतालीया (३९) रा. राणी अमरावती, संभा महादेव अंजनकर (३९) रा. पिंप्री हे बाभूळगाव येथे जाण्यासाठी बसले. ते दोघेही चांदुर रेल्वे आगारामध्ये बसचालक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान त्यांनी बस वाहकाशी विानाकारण वाद करण्यास सुरूवात केली. त्यामुळे सदर बसवरील चालक रमेश रामकृष्ण ढाले (५२) रा. यवतमाळ यानी बस खडकसावंगा फाट्याजवळ थांबविली. दोन्ही बस चालकांना शांत राहण्यास सांगितले असता दोघेही ढाले याच्या अंगावर गेले. यावेळी एकाने बसमधील टामी काढून सदर चालकावर उगारली. वाद विकोपाला गेल्याने बस चालक ढाले यांनी सरळ बस बाभूळगाव पोलिस स्टेशनमध्ये लावली. बस चालक रमेश ढाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पतालीया व अंजनकर याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
0
ऊस तोड एजंटची अपरहणकर्त्यांच्या तावडीतून सुटका

आर्णी – पैसे घेवून ऊस तोड कामगार पळून गेल्यानंतर कंट्राटदाराने एजंटचे अपहरण केल्याची घटना घडली होती. अपहरण कर्त्याने कर्नाटकातून स्वत:ची सुखरूप सुटका करून घेतल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
दिग्रस तालुक्यातील तुपटाकळी येथील सुभाष नारायण आडे (३०) याने कर्नाटकातील ऊस कारखान्याला मजूर पुरविण्याचे काम घेतले होते. त्यासाठी मजुरांचा शोध घेवून १० कामगारांना प्रत्येकी १० हजार रुपये प्रमाणे अॅडव्हांस देण्याचे ठरले होते. कमिशन म्हणून सुभाषला दहा हजार रुपये मिळणार होते. २ डिसेंबर रोजी सर्व मजूर आर्णी येथील दर्गाजवळ आले. दहाही कामगारांनी प्रत्येकी दहा हजार घेतले आणि पळून गेले. यामुळे बाळू देवानंद चव्हाण चांगलाच संतापला. त्याने सुभाषचे अपहरण करून कर्नाटकात नेले. याप्रकरणाची तक्रार नारायण तायडे यांनी आर्णी पोलीस ठाण्यात केली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला. गणेश हिरूळकर, रमेश वीर यांचे पथक १५ डिसेंबर रोजी सुभाषच्या शोधात कर्नाटकात गेले. मात्र या पथकाच्या हाती काही लागू न शकल्याने रिकाम्या हाताने परत यावे लागले. विजापूर जिल्ह्यातील आलमेल पोलीस ठाण्यातंर्गत येणाºया गावातील पोलीस पाटील आरोपीच्या संपर्कात असल्याने आरोपी निसटल्याचे पोलीस सांगत आहे. मोठ्या शिताफीने सुभाषने अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. आरोपी माझ्या दोन्ही किडन्या विकणार होता, असे खळबळजनक बयान त्याने पोलिसांना दिले आहे. अपहृत व्यक्ती सुखरूप परतला असला तरी आरोपी मोकाट असल्याने त्याला जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
0
पतसंस्थेच्या विकासात कर्मचाºयांचे योगदान – राजूदास जाधव

यवतमाळ, दि. १९ – जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेने केलेल्या विकासामध्ये संचालक मंडळासोबतच कर्मचाºयांचे योगदान सुध्दा अत्यंत महत्वाचे आहे असे प्रतिपादन राजूदास जाधव यांनी केले.
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचा सध्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता सप्ताहात सर्व कर्मचाºयांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सचिव राजेंद्र राऊ त, संचालक शेख लुकमान, सुमाला पुडके, वनमाला मेटे, डॉ. दिलीप चौधरी, संजय गावंडे, शरद घारोड, साहेबराव राठोड, गौतम कांबळे उपस्थित होते. याप्रसंगी सरव्यवस्थापक वसंत राठोड, दिपक पाटणे, अशोक पेटेवार, शालीक दानखडे यांनी आपले विचार व्यक्त आहे.
0
उत्तर भारत थंडीने गारठला

नवी दिल्ली – हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीची लाट आली असून, उत्तरेकडच्या राज्यांमध्ये तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. दिल्ली, पंजाब आणि हरयाणामध्ये नागरीक कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेत आहेत. या राज्यांमध्ये सकाळी असणा-या दाट धुक्यांमुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर परिणाम होत आहे. दाट धुक्यामुळे दिल्लीत विमान सेवेवर परिणाम झाला आहे.
हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशच्या डोंगराळ भागात झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे संपूर्ण राज्यात थंडीची लाट आहे तसेच बर्फवृष्टीमुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. आठवडयाच्या सुरुवातीला सिमलामध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे काही भागात विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. पाणी पुरवठा करणा-या पाईपलाईन्स बर्फ जमा झाल्यामुळे बंद झाल्या आहेत.
प्रशासनाकडून या सेवा सुरु करण्याचे युध्द पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. कुलू-मनालीमध्ये मोठया प्रमाणावर बर्फवृष्टी झाली आहे. राज्यातील जवळपास २०० रस्ते बर्फवृष्टीमुळे बंद झाले होते. कुलू-मनालीमध्ये अडकून पडलेल्या अनेक पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून मोठया प्रमाणावर पर्यटक कुलू-मनालीला जातात. हिमाचलप्रदेशमध्ये थंडीमुळे आतापर्यंत तीस जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक भागात तापमान उणे अंश सेल्सिअसमध्ये आहे.
जम्मू-काश्मीर
जम्मू-काश्मीरमध्ये यंदाच्या हिवाळयाच्या मोसमातील गुरुवारची रात्र सर्वात थंड रात्र ठरली आहे. मायनस ४.२ तापमान होते. मागच्या आठवडयाभरापासून काश्मीर खो-यात किमान तापमान मायनस तीन ते मायनस सातमध्ये आहे. पंजाब आणि हरयाणा ही राज्येही थंडी बरोबर दाट धुक्यांच्या चादरीमध्ये लपेटली आहेत. यामुळे येथील रस्ते वाहतूकीवर परिणाम होत आहे.
0
तिहार तुरुंगाच्या सुरक्षेत वाढ

नवी दिल्ली -तिहार तुरुंगातील दहशतवाद्यांची सुटका करण्यासाठी लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी तुरुंगावर हल्ला करण्याची शक्यता आहे असा इशारा गुप्तचर यंत्रणेकडून मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर तिहार तुरुंगातील सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे.
पेशावरमध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौ-याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत यापूर्वीच हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तुरुंगातील सुरक्षाव्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. तुरुंगाातील कैद्यांची सुरक्षा ही आमची पहिली जबाबादारी आहे. याबाबत आम्ही कोणताही धोका पत्करु शकत नाही, असे कारागृह उप महानिरीक्षक मुकेश प्रसाद यांनी सांगितले.
तिहारमधय्ये अनेक मोठमोठे दहशतवादी तसेच कैदी आहेत. हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला आणि सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉयही तिहार तुरुंगात आहेत. तुरुंगातील सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली असून तुरुंगातील आणि तुरुंगाच्या बाहेरील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांची तुरुंगातून सुटका कऱण्यासाठी हा हल्ला केला जाणार असल्याची माहिती आहे.
0
लख्वी तुरुंगातच रहाणार
नवी दिल्ली – भारताने नोंदवलेल्या तीव्र आक्षेपानंतर मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झाकीउर रहमान लख्वी पाकिस्तानी तुरुंगातच रहाणार आहे. लख्वीला गुरुवारी पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने २६/११ हल्ला प्रकरणात जामीन मंजूर केला होता.
भारताने लख्वीला जामीन मंजूर होण्याच्या निर्णयाला जोरदार विरोध केला. त्यामुळे लख्वीची सुटका होताच त्याला कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहोचवल्याच्या नव्या आरोपाखाली पुन्हा अटक करण्यात आली आहे. लख्वी तुरुंगातच रहाणार आहे.
भारताने शुक्रवारी सकाळी राजनैतिक अधिका-यांमार्फत लख्वीच्या सुटके विरोधात आपली नापसंती आणि चिंता पाकिस्तानला कळवली. लख्वीची सुटका पाकिस्तानच्या दहशतवादा विरुध्द लढण्याच्या कटिबध्दतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचे भारताने आपल्या संदेशात म्हटले होते.
मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ला प्रकरणात पाकिस्तानात लख्वीसह सात आरोपींविरोधात खटला सुरु आहे. मात्र कधी कायदा अधिका-यांच्या अनुपस्थितीमुळे तर कधी अन्य कारणांमुळे या खटल्याची सुनावणी वारंवार पुढे ढकलण्यात आली तसेच तहकूब करण्यात आली. भारताने वेळोवेळी या खटल्याचा मुद्दा पाकिस्तानकडे लावून धरला असून, पाकिस्तानने झटपट या खटल्याची सुनावणीपूर्ण करुन दहशतवादाविरुध्दचे आपले गांर्भीय दाखवून द्यावे अशी भारताची मागणी आहे.
पेशावरमध्ये लष्करी शाळेवर मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी बुधवारी समूळ दहशतवादाचे उच्चाटन करण्याचा इरादा जाहीर केला होता. त्यानंतर लगेचच गुरुवारी लख्वीला जामीन मंजूर झाल्याने पाकिस्तानच्या मूळ हेतूबद्दल पुन्हा शंका उपस्थित झाली होती
0
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कोट्यवधी गैरव्यवहार

मुंबई – सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कोट्यवधी रुपयांच्या कंत्राटांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपप्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांचे पुत्र पंकज आणि पुतणे समीर यांची लाचलुचपत प्रतिबंधक खाते (एसीबी) व सक्तवसुली संचलनालय (ईडी) यांनी चौकशी करावी, असा आदेश गुरुवारी मुंबई हायकोर्टाने दिला.
तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री भुजबळ यांनी पदावर असताना खासगी कंत्राटदारांना नियमबाह्य कंत्राटे दिली व त्या बदल्यात त्यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टला मोठी रक्कम मिळाल्याचा आरोप आहे. या लाभार्थी कंत्राटदारांच्या वांद्रे आणि अंधेरी भागात मालमत्ता असल्याचे कळते. हा मनी लाँडरिंगचा गुन्हा असल्याचा आरोप असल्याने ईडी आणि एसीबी विभागाच्या संचालकांनी भुजबळ आणि त्यांचे पुत्र व पुतणे या तिघांची खुली चौकशी करावी, असा आदेश मुख्य न्या. मोहित शहा यांच्या खंडपीठाने दिला आहे. तसेच २८ फेब्रुवारीपर्यंत या सर्वांची चौकशी पूर्ण करण्यास बजावले असून या मुदतीत ती पूर्ण होऊ न शकल्यास आतापर्यंत झालेल्या चौकशीचा हंगामी अहवाल पुढच्या सुनावणीला सादर करावा, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.
हायकोर्टाचा निर्णय मला मान्य आहे. जे काही सत्य असेल ते चौकशीत उजेडात येईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
0
भ्रष्ट शहरांच्या यादीत पुण्याचा पहिला नंबर

पुणे -पुण्याची शैक्षणिक, सांस्कृतिक आणि एकूणच शांत व समृद्ध पार्श्वभूमी या म्हणीतून अभिप्रेत आहे. पण आता ही म्हण केवळ सकारात्मक अर्थाने घेण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. कारण, राज्यातील भ्रष्ट शहरांच्या यादीत पुण्याचा पहिला नंबर लागला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं राज्यातील सर्वाधिक भ्रष्ट शहरांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. या यादीत पुण्यानं सर्वात पहिला क्रमांक पटकावला आहे. चालू वर्षात पुण्यात लाच घेतल्याप्रकरणी २१६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्या खालोखाल नाशिकचा क्रमांक असून इथं लाचखोरीच्या प्रकरणात २१० जणांना अटक करण्यात आली आहे.
शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणं गेल्या काही दिवसांत औद्योगिक व आयटी नगरी म्हणून उदयास आलं आहे. या भरभराटीमुळं लाचखोरीचं प्रमाण वाढलं असल्याचं एसीबीचं म्हणणं आहे. याप्रकरणी एसीबीनं आतापर्यंत तब्बल १३३ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
राज्याची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला ही यादी काही प्रमाणात दिलासा देणारी आहे. गेल्या वर्षी पहिल्या तीन भ्रष्ट शहरांमध्ये असलेली मुंबई यंदा यादीत आठव्या क्रमांकावर आहे. यंदा मुंबईत फक्त ९० जणांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे. मात्र, मुंबईतील अधिकाऱ्यांच्या हुशारीमुळं हा क्रमांक घसरल्याचं एसीबीला वाटतं. मुंबईतील अधिकारी धूर्त असून ते सहसा पकडले जात नसल्याचं एसीबीचं निरीक्षण आहे.
0
एकाच कुटुंबातील आठ मुलांची निर्घृण हत्या

केन्स (ऑस्ट्रेलिया), दि. १९ – ऑस्ट्रेलियातील केन्स येथे एकाच कुटुंबातील आठ लहान मुलांची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या हल्ल्यात एक महिलाही जखमी अवस्थेत आढळली असून ती या मुलांची आई असल्याचे समजते. सध्या त्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
केन्स परिसरात शुक्रवारी सकाळी एक महिला घराबाहेर रक्तबंबाळ अवस्थेत आढळल्याचा फोन स्थानिक पोलिसांना गेला होता. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घरात आठ लहान मुलांचे मृतदेह आढळले. या सर्वांची चाकूने वार करुन हत्या करण्यात आली होती. मृतांमध्ये १८ महिने ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश आहे. घरातील चित्र अत्यंत भीषणावह होते असे सर्वात पहिले घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस अधिका-याने स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितले. या हत्याकांडामागे दहशतवादाचा काहीही संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. जखमी अवस्थेत आढळलेल्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु असून पोलिस तिच्याकडून नेमका घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ही हत्या कोणी केली, हत्येचे नेमके कारण हे अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले.










