यवतमाळ, दि. १० (प्रतिनिधी) – येथून जवळच असलेल्या भोसा येथे महिलेने आपल्या एक वर्षीय चिमुकलीसह आत्महत्या केल्याची घटना काल घडली. मात्र ही आत्महत्या नसून पतीनेच पत्नीचा दोरीने गळा आवळून खून केला अन् चिमुकलीलाही विहीरीत फेकुन दिल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी वडगावरोड पोलिसांनी आरोपी शांताराम राऊत यास ताब्यात घेवून खूनाचा गुन्हा नोंदविला आहे.
भोसा येथील अर्चना शांताराम राऊत (२८), निधी शांताराम राऊत (१) रा. भोसा या मायलेकीनी काल मंगळवारी विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. वडगावरोड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करून तपास सुरू केल्यानंतर सुरूवातीपासूनच याप्रकरणात शांतारामवर पोलिसांचा संशय होता. अर्चनाचा मृतदेह शविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविल्यानंतर रात्री वैद्यकीय सुत्रांनी अर्चनाचा गळा आवळून तर निधीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे सांगितले. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर संशयाप्रमाणे शांतारामनेच खून केल्याचे समोर आले. अकोला बाजार नजिक असलेल्या पहूरनरखेडे येथील शांताराम राऊत (३०) हा यवतमाळ येथे पंधरा वर्षापासून किरायाच्या खोलीत राहत होता. आठ दिवसापुर्वीच त्याने भोसा येथे किरायाने खोली घेतली होती. दरम्यान त्याचा अर्चनाशी सतत वाद सुरू होता. या वादातच त्याने अर्चनाचा दोरीने गळा आवळून खून करून तिचा मृतदेह व १ वर्षीय निधीला परीसरातीलच विहिरीत फेकून दिले. त्यानंतर बाहेरगावी असल्याचे दाखवित घरी आल्यानंतर पत्नी व मुलगी बेपत्ता झाली म्हणून शोधाशोध घेण्याचा बनाव केला. पोलीस तपासात हे उघड झाल्यानंतर पोलिसांनी शांतारामला ताब्यात घेवून अटक केली आहे. मात्र शांतारामने अद्यापही पोलिसांपुढे गुन्ह्याची कबूली दिली नसल्याने पोलीस शांतारामचा पिसीआर मिळविण्यासाठी उद्या त्याला न्यायालयात हजर करणार आहे. त्याने खून का केला याचा अद्यापही उलगडा झाला नसला तरी त्याच्या या कृत्यामुळे समाजमन सुन्न झाले आहे.
Archive for December 10th, 2014
0
पतीनेच केला पत्नी व चिमुकलीचा खून , मायलेकीची आत्महत्या घातपात
0
आत्महत्येचा प्रयत्न गुन्हा नाही
नवी दिल्ली दि. १० ( प्रतिनिधी) – आत्महत्येच्या प्रयत्नाला गुन्ह्यांच्या श्रेणीतून लवकरच हटवण्यात येणार आहे. विधी आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार केंद्रातील मोदी सरकारने आयपीसी कलम ३०९ (आत्महत्येचा प्रयत्न) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आयीपीसीच्या कलम ३०९ नुसार आतापर्यंत आत्महत्येच्या प्रयत्न हा गुन्हा ठरत असल्याने संबंधिताला एक वर्षाची शिक्षा आणि दंड आकारण्याची तरतूद आहे.
१८ राज्य आणि ४ केंद्र शासित प्रदेश कलम ३०९ रद्द करण्याच्या बाजूने आहेत. राज्यांनी दिलेल्या सहमतीमुळे केंद्र सरकराने कलम ३०९ आयपीसीतून हटवण्याचा निर्णय घेतल्याचं गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. आत्महत्येच्या प्रयत्नाला मानवतेच्या दृष्टीकोनातून बघावं आणि गुन्ह्यांच्या श्रेणीतून ते हटवलं गेलं पाहिजे, अशी शिफारस विधी आयोगाने आपल्या अहवालातून सरकारला केली होती, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री यांनी ऑगस्टमध्येच लोकसभेत दिली होती.
0
३ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

मुंबई, दि. १० ( प्रतिनिधी) – देशात स्त्रियांवरील अत्याचारांच्या घटनांत वाढच होताना दिसत असून मुंबईतील माटुंगा येथे अवघ्या ३ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. माटुंग्यातील कामगार वस्तीत राहणारी ही चिमुरडी काल घरात झोपली होती, तिची आी कामासाठी बाहेर गेली होती. याचाच फायदा घेून नराधम आरोपी तिच्या घरात घुसला व त्याने त्या बालिकेवर अत्याचार केला व तेथून पळून गेला. संध्याकाळी त्या मुलीची आई घरी परत आल्यावर तिला घडलेला प्रकार लक्षात आला व तिने पोलिसांत तक्रार केली. या चिमुरडीवर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान याप्रकरणी शाहुनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून त्या नराधम आरोपीलाही अटक करण्यात आली आहे.
0
साहित्यिक चंद्रकांत खोत यांचे निधन

मुंबई, दि. १० ( प्रतिनिधी) – संत – योगी पुरुषांच्या चरित्रासोबतच लैंगिक विषयावरही ‘बिनधास्त’ लिखाण करणारे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत खोत यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. बिंब प्रतिबिंब, सन्याशाची सावली हे स्वामी विवेकानंद यांच्यावर आधारित चरित्रसंग्रह, बिनधास्त, उभयान्वयी अव्यय या त्यांच्या कादंब-या गाजल्या होत्या.
मराठी साहित्याच्या चौकटीबाहेर जाऊन लिखाण करणारे चंद्रकांत खोत यांचा जन्म ७ सप्टेंबर १९४० रोजी भीमाशंकर येथे झाला. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने खोत यांच्या वडिलांनी मुलांना सातवीपर्यंत शिक्षण घेऊ दिले व त्यानंतर कामधंद्याचे बघा असे सांगितले. मात्र शिक्षणाची ओढ असलेले खोत थांबले नाहीत व स्वकष्टाने त्यांनी पुढील शिक्षण घेतले. एमए झाल्यावर त्यांनी पीएचडी करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी सत्तरीच्या दशकातील कवितांचा मागोवा घेतला. पण पीएचडीसाठी गाईड न मिळाल्याने खोत यांचे स्वप्न अर्धवटच राहिले. मात्र तोवर खोत यांनी साहित्य क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. विशेष म्हणजे खोत यांना पीएचडी करता आली नसले तरी त्यांच्याच मुळगावातून येणा-या एका तरुणाने खोत आणि त्यांचे साहित्य यावर पीएचडी करुन डॉक्टरेटची पदवी मिळवली होती.
चंद्रकांत खोत हे साहित्य क्षेत्रात कवी म्हणून आले. १९६९ मध्ये प्रकाशित झालेला मर्तिक हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. यानंतर ते कादंबरी लिखाणाकडे वळले. १९७० मध्ये पुरुष वेश्या या बोल्ड विषयावर आधारित उभयान्वयी अन्वय ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध झाली व साहित्य क्षेत्रात एकच खळबळ माजली. यानंतर दोन वर्षांनी ‘बिनधास्त’ आणि १९७४ मध्ये प्रसिद्ध झालेली ‘विषयांतर’ ही कादंबरीदेखील लैंगिक विषयावरचीच. ‘अबकडइ’ हे दिवाळी अंकानेही वाचकांवर गारुड घातले होते. बोल्ड विषयांवर कादंबरी लिहील्यानंतर खोत हे अध्यात्मिक साहित्याकडे वळले. गेल्या अनेक वर्षांपासून ते मुंबईतील सातरस्ता येथील साईबाबा मंदिरात राहत होते. बुधवारी पहाटे वृद्धापकाळामुळे खोत यांचे निधन झाले. खोत यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्रातील बंडखोर लेखक हरपला अशी भावना व्यक्त होत आहे.
0
गॅस सिलेंडर १५५ रुपयात

नवी दिल्ली, दि. १०( प्रतिनिधी) – गृहिणींना स्वयंपाकासाठी लागणारा घरगुती गॅस सिलेंडर आता अवघ्या १५५ रुपयात देण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे.
पाच किलो वजनाचा हा मिनी गॅस सिलेंडर घरगुती गॅस ग्राहकांना अवघ्या १५५ रुपयात देण्यात येईल, असे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राज्य सभेत सांगितले. सध्या घरगुती गॅस ग्राहकांना वर्षाला १४.२ किलो वजनाचे १२ अनुदानित घरगुती गॅस सिलेंडर मिळतात. एका सिलेंडरची दिल्लीतील किंमत ४१७ रुपये आहे. आता पाच किलो वजनाचा हा मिनी घरगुती गॅस सिलेंडर असून तो १५५ रुपयांना मिळणार आहे. तसेच वर्षाला ३४ मिनी घरगुती गॅस सिलेंडर अनुदानित देण्यात येणार आहेत. यामुळे गरीबांना गॅस सिलेंडर परवडतील, असे प्रधान म्हणाले.त्यानंतरही आवश्यकता भासल्यास हे विनाअनुदानित मिनी घरगुती गॅस सिलेंडर बाजारात ३५१ रुपयांना मिळणार आहे. तर १४.२ किलो वजनाचे विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडर ७५२ रुपयांना मिळतात.
0
पेसा कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा – राज्यपाल सी.विद्यासागर राव

यवतमाळ , दि. १०(विशेष प्रतिनिधी)- पंचायत क्षेत्र विस्तार अधिनियम (पेसा) हा आदिवासी क्षेत्राच्या विकासासाठी अतिशय महत्वाचा अधिनियम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात या अधिनियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांना सिंचनाच्या सोई उपलब्ध करुन देण्यासाठी वनक्षेत्रात पाणी अडविण्यासाठी बंधाऱ्यांचा उपक्रम राबविणे आवश्यक आहे, असे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी सांगितले. राज्यपालांनी येथील बचत भवनात पेसा व वनहक्क कायदा तसेच आदिवासींसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सुचना केल्या. बैठकीला राज्यपालांचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव परिमल सिंह, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, मुख्य वनसंरक्षक श्री.गुरमे, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, पोलीस अधीक्षक संजय दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुळकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्यासह सर्व विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पेसा अधिनियमाने आदिवासी क्षेत्रातील गावांना विकासासाठी बरेच अधिकार दिले आहे. या अधिकारान्वये या क्षेत्रातील गावांचे विकासाचे नियोजन, नैसर्गिक साधन संपत्तीवरील अधिकार, वनउपज आदींचे व्यवस्थापन संबंधीत गावांच्या ग्रामसभेला करावयाचे आहे. अशा ग्रामसभांमध्ये लाभार्थी निवडण्यासोबतच संपुर्ण गावाचे विकासाचे नियोजन करण्यासाठी यंत्रणेने पुर्ण क्षमतेने काम केले पाहिजे, अशा सुचनाही राज्यपालांनी बैठकीत केल्या. वनहक्क कायद्याअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वनहक्काचे वैयक्तिक तसेच गावाच्या विकासासाठी सामुहिक दावे जास्तीस जास्त प्रमाणात मंजुर होणे आवश्यक आहे. या कायद्याच्या जनजागृतीसोबतच अधिकाधिक दावे दाखल होण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. आदिवासी विशेषत: पेसा क्षेत्रात आदिवासी विकासाच्या योजना चांगल्या पध्दतीने राबविल्या जाव्या. आदिवासी उपयोजनेअंतर्गत योजना राबवित असतांना लाभार्थ्यांची निवड ही ग्रामसभेकडून झाली पाहिजे. वैयक्तिक लाभार्थ्यांची निवड करून त्यांना योजनांचा लाभ मिळावा. वनक्षेत्रात सिंचानाच्या सोई उपलब्ध करण्यासाठी सिमेंट नाला बंधारे उभारणीला वनविभागाने प्राधान्य दिले पाहिजे. सिंचनाच्या सोई उपलब्ध झाल्यास आदिवासी क्षेत्रातील गावांना त्याचा फायदा होईल, असे राज्यपाल म्हणाले.
पेसा क्षेत्रातील विज जोडणीचा आढावा घेतांना या क्षेत्रात प्रत्येक कुटुंबाला विज जोडणी देणे आवश्यक आहे. विज जोडण्या शिल्लक असल्यास त्या तातडीने पुर्ण करण्याचा दृष्टीने नियोजन करावे, असे सांगत आदिवासी भागातील शौचालयाचे बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य आदींचीही माहिती राज्यपालांनी जाणून घेतली. यावेळी शेतकरी आत्महत्येमागील कारणे जाणून घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी समुपदेशनासारखे कार्यक्रम घेवून शेतकऱ्यांचे आत्मबल वाढविण्यासाठी गावपातळीवर प्रयत्न करावे, अशा सुचनाही यावेळी त्यांनी केल्या. राज्यपालांचे सचिव विकासचंद्र रस्तोगी तसेच उपसचिव परिमल सिंह यांनी पेसा कायद्याच्या अंमलबजावणीवर सर्व संबंधीत अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देणे आवश्यक आहे, असे सांगून विविध सुचना केल्या. सुरुवातीस जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी सादरीकरण केले. पेसा कायद्याच्या अंमलबजावणीची माहिती त्यांनी दिली. तत्पूर्वी राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी शिष्टमंडळांना भेटी देवून निवेदने स्विकारली व शिष्टमंडळांशी चर्चा केली. एकूण 10 शिष्टमंडळांनी निवदने सादर केली.
0
राज्यपालांनी साधला विद्यार्थी अन् ग्रामस्थांशी संवाद

यवतमाळ , दि. १०(विशेष प्रतिनिधी) – राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज दिनांक 10 डिसेंबर रोजी यवतमाळ जिल्हयातील झरी (जामणी) व केळापूर या आदिवासी बहुल तालुक्यातील दुभाटी (पौड), शिबला आणि गोपाळपूर या गावांना भेटी देवुन आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी आणि ग्रामस्थांशी संवाद सर्वप्रथम राज्यपालांचे आगमन झरी (जामणी) तालुक्यातील दुभाटी (पोड) येथे झाले. यावेळी जि.प.प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी गोंडी नृत्य सादर करुन राज्यपालांचे स्वागत केले. यावेळी राज्यपाल विद्यासागर राव यांनी अंगणवाडीची पाहणी करुन अंगणवाडी सेविकेकडून लाभार्थी विद्यार्थ्यांबाबत व त्यांना मिळणा-या आहाराबाबत माहिती जाणून घेतली. राज्यपालांचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, राजभवनाचे उपसचिव परीमलसिंग आ. संजीवरेडडी बोदकुरवार जिल्हाधिकारी, राहुल रंजन महिवाल, पोलिस अधीक्षक संजय दराडे, दुभाटी (पोड) सरपंच जानू धडांजे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
वनहक्क पटटयाचा लाभ मिळालेल्या काही लाभार्थ्यांशी राज्यपालांनी चर्चा केली. वन हक्काबाबत आपणास माहिती आहे काय असे राज्यपालांनी लाभार्थ्यांना विचारले असता आपण वनातून तेंदूपाने, मध, डिंक तसेच इतर गौण वनोपज गोळा करुन त्याच्या विक्रीतून आपला उदरनिर्वाह करीत
असल्याने लाभार्थ्यांनी राज्यपालांना सांगितले. शेतात कोणती पिके घेता आणि सिंचनाची सुविधा आहे काय असा प्रश्न राज्यपालांनी लाभार्थ्यांना केला असता आम्हाला जर सिंचनाची व विजेची सुविधा उपलब्ध झाली तर बारमाही पिके घेणे शक्य होईल असेही लाभार्थ्यांनी राज्यपालांना सांगितले. दुभाटी (पोड) हे गांव जंगल परिसरात असल्यामुळे ग्रामस्थांनी सहकार्यातून आणि श्रमातून गावशेजारच्या परिसरात छोटया तलावांची निर्मिती करावी. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास व शेतीला सिंचनाची व्यवस्था करता येणे शक्य असून शासन आपणास योग्य ती मदत करणार आहे. असेही राज्यपालांनी लाभार्थ्यांना व ग्रामस्थांना सांगितले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने देण्यात येणा-या ऑईल इंजिनचे वाटप पोतू लखमा आत्राम या लाभार्थ्याला करण्यात आले. दुभाटी (पोड) व परिसरातील ग्रामस्थांची बहुसंख्येने कार्यक्रमाला उपस्थिती होती. शिबला येथील शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळेला राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भेट दिली. यावेळी राज्यपालांनी आश्रमशाळेतील संगणक कक्षाची पाहणी केली. इयत्ता 9 वीतील रोनीत तोडसाम या विद्यार्थ्यांने संगणक हाताळण्या बाबतची माहिती दिली. इयत्ता 12 वी (विज्ञान) मध्ये शिक्षण घेणा-या संतोषी चंदनकर या विद्याथींनीला शिक्षण घेऊन भविष्यात काय व्हायचे आहे असे राज्यपालांनी विचारले असता तीने केमिकल इंजिनिअर होणार असल्याचे सांगितले.
प्रारंभी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिप प्रज्वलन केले. मुलींनी स्वागत गीत गाऊन आदिवासी यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव परिमलसिंग, आ. राजू तोडसाम आ. संजीवरेडडी बोदकुरवार, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जिल्हा पोलिस अधिक्षक संजय दराडे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडाचे प्रकल्प अधिकारी डॉ. प्रशांत रुमाले प्रामुख्याने उपस्थित होते.
0
मागास भागांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील – राज्यपाल

यवतमाळ , दि. १०(विशेष प्रतिनिधी) – राज्यातील मागास भाग हा विकासाच्या प्रवाहात आला पाहिजे. मागास भागातील समस्या जाणून घेण्यासाठी आपण दौ-यावर आलो असून, हया भागातील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.
आज 10 डिसेंबर रोजी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी यवतमाळ जिल्हयातील केळापूर तालुक्यातील आकोली (बु) येथील संत गाडगे महाराज मिशन मुंबईच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या संत गाडगे महाराज आदिवासी प्राथमिक शाळेला भेटीप्रसंगी विद्यार्थी संवाद कार्यक्रमातून राज्यपाल बोलत होते.
यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव परीमलसिंग, आ.राजू तोडसाम, आ. संजीवरेडडी बोदकुरवार, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जिल्हा पोलिस अधिक्षक संजय दराडे, संत गाडगेबाबा मिशन मुंबईचे अध्यक्ष मधुसूदन मोहिते पाटील मंचावर उपस्थित होते. राज्यपाल पुढे म्हणाले, प्रत्येकाला भेटता यावे यासाठी मी इथे आलो आहे. स्वच्छ भारताचे काम संत गाडगेबाबांच्या प्रेरणेतून सुरु आहे. पूर्वीच्या आंध्रप्रदेश आणि नव्याने अस्थित्वात आलेल्या तेलंगणा राज्यात 100 वर्षापूर्वी रामजी गोंड या आदिवासीने इंग्रजांविरुध्द बंड पुकारुन आदिवासींचा जल, जंगल आणि जमीन यावरील हक्कांसाठी लढा दिला. आदिवासींचा जल, जंगल आणि जमीन यावर हक्क आहे तो त्यांना मिळाला पाहिजे. केवळ आदिवासीच नव्हे तर ओबीसी, अनूसूचित जाती व इतर घटकांच्याही समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे राज्यपाल श्री. विद्यासागर राव यांनी यावेळी सांगितले. संत गाडगेबाबा यांच्या पुतळयाला राज्यपालांनी पुष्पहार अर्पण करुन आश्रमशाळा परिसरात बांधण्यात आलेल्या स्व राजारामबापू घोंगटे सभागृहाचे उद्घाटन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.
यावेळी संत गाडगे महाराज मिशन मुंबईचे अध्यक्ष मधूसूदन मोहिते पाटील यांनी राज्यपालांचा स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. राज्यपालांनी विद्यार्थ्यांशी तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला. प्रास्ताविक मिशन चे सचिव सचिन घोंगटे यांनी तर रविद्र बायस्कर यांनी आभार मानले. यावेळी परिसरातील ग्रामस्थांची मोठया संख्येने उपस्थिती होती.











