
यवतमाळ , दि. ३० – नवर्षाला काही तास शिल्लक राहीले असून थर्टीफस्टच्या पार्श्वभूमिवर तरुणाईसह सर्वच जण सज्ज झाले आहे. नववर्षाच्या स्वागत करताना कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस दलाच्या वतीने उपाययोजना करण्यात येणार आहे. थर्टीफर्स्टच्या पार्टीवर पोलिसांचा वॉच राहणार आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी दिली.
सरत्या वर्षाला निरोप आणि नवनवर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे. यासाठी अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. थर्टीफर्स्टच्या रात्री मद्यपी चालकांना रोखण्यासाठी पोलिसांनी ‘ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह’ मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील प्रमुख मार्गावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवल्या जाणार आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री महामार्गासह शहरात व तालुक्यात महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी राहणार आहे. मद्यपी चालकांच्या तपासणीसाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी दिली. मद्यपान करून कुणीही सुसाट वेगात वाहने चालवणार नाही. ट्रिपल सीट जाणार नाही, यावरही पोलीस लक्ष ठेवणार आहेत.
जिल्हाभरात अडीच हजार पोलीस कर्मचाºयांसह उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा तैनात राहणार आहे. पोलिसांनी हॉटेल, वाईनबार मालकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या सूचना दिल्या आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाºयांवर कडक कारवाईचा बडगा उगारल्या जाणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला.
Archive for December 30th, 2014
0
थर्टीफर्स्टवर पोलिसांचा ‘वॉच’
0
यवतमाळ जिल्ह्यात थंडीचा पहिला बळी

यवतमाळ , दि. ३० – जिल्ह्यासह तालुक्यात थंडीचा कडाका कायम असून थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. थंडीच्या प्रकोपाने शेतात जागलीसाठी गेलेल्या मजुराचा मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. प्रल्हाद सिताराम महल्ले (७०) रा. दगड धानोरा असे मृतकाचे नाव आहे.
वातावरणात बदल झाला असून पारा खाली उतरला असून तालुक्यात थंडीने हुडहुडी भरली आहे. थंडीच्या लाटेमुळे दिवसाची सुरुवात सकाळी उशिराने होऊ लागली आहे. यवतमाळ जिल्ह्यात आज १४ अंश सेल्सियेस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. प्रल्हाद महल्ले हे दगड धानोरा येथील गजेंद्र टापरे याच्या शेतात पिकाचे संरक्षण व्हावे म्हणून सोमवारी रात्री जागलीसाठी गेले होते. दरम्यान रात्रीच्यावेळी थंडीची हुडहुडी भरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी शेतकरी टापरे हे शेतात गेले असता हा प्रकार उजेडात आला. यावेळी गावकºयांनी शेतात एकाच गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच नेर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
0
जनतेच्या तक्रारी सोडविण्यासाठी टोल फ्री क्रमांक

यवतमाळ , दि. ३० – जिल्ह्यातील जनतेच्या तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेत टोल फ्रि क्रमांकाची सुविधा करण्यात आली. तक्रार निवारण केंद्राचे उद्घाटन जि.प.अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.
स्वच्छ भारत मिशन, रमाई व राजीव गांधी आवास योजना अंतर्गत वैयक्तिक शौचायलाबाबत तक्रारींचे निवारण करण्यासाठी १८००२३३६३२ हा क्रमांक सुरू करण्यात आला आहे. वैयक्तिक तक्रार असल्यास या क्रमांक्रावर संपर्क साधता येणार असून ही सुविधा सकाळी १० वाजतापासून ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहणार आहे. ज्या विभागासंबंधी तक्रार आहे, त्यांच्याशी संपर्क साधून समस्यांचे निवारण करण्यात येईल. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जि.प.अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मोहोड यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.
0
४० प्रवाशांचे मृतदेह सापडले

जाकार्ता – इंडोनेशियाच्या हवाई हद्दीतून रविवारी बेपत्ता झालेल्या एअर एशियाच्या विमानातील ४० प्रवाशांचे मृतदेह आढळले आहेत. इंडोनेशियातून उड्डाण केल्यानंतर ज्या ठिकाणी हे विमान अखेरचे दिसले, तेथील समुद्रातच हे मृतदेह तरंगताना आढळल्याचे तपास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता विमानाचा शोध घेणारे इंडोनेशियाचे तपास पथक मंगळवारी हेलिकॉप्टरने बोर्नियो बेटावर उतरले. तिथे त्यांना काही मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. फुगलेल्या अवस्थेत असलेल्या या मृतदेहांची ओळख पटविता येणे मात्र शक्य आहे. हे मृतदेह इंडोनेशियन नौदलाच्या एका जहाजावर आणल्याचे राष्ट्रीय शोध व बचाव पथकाचे संचालक एस. बी. सुप्रियादी यांनी सांगितले. मृतदेहांवर कोणत्याही प्रकारचे लाइफ जॅकेट नव्हते, अशी माहिती सुप्रियादी यांनी स्थानिक पत्रकारांना दिली. नौदलाचे प्रवक्ते मनहन सिमोरंकीर यांनीही मृतदेह मिळाल्याच्या माहितीला दुजोरा दिला.
0
धोनीचा कसोटी क्रिकेटला रामराम

मेलबर्न – ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपदाचा तडकाफडकी राजीनामा देत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धोनीच्या या ‘बॉम्ब’ने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. दरम्यान, धोनीच्या राजीनाम्यामुळे ६ जानेवारीला सुरू होणाऱ्या चौथ्या आणि शेवटच्या सिडनी कसोटीचे कर्णधारपद विराट कोहलीकडे सोपविण्यात आले आहे. ‘बीसीसीआय’ने याबाबत अधिकृत पत्रक जारी केले आहे.
धोनीच्या नेतृत्वाखाली देशात आणि विदेशातही भारतीय संघाने मोठे यश मिळवले. कसोटीत मागे पडलेल्या भारतीय संघाला धोनीनेच पहिल्या स्थानीही नेऊन ठेवण्याचा पराक्रम केला. धोनीच्या कल्पक नेतृत्वामुळे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द. आफ्रिकेसारख्या कसोटीतील बलाढ्य संघांनाही भारताने तगडे आव्हान उभे केले. आज मात्र ऑस्ट्रेलियाकडून २-० असा मालिका पराभव पदरात पडल्याने धोनीने निवृत्तीचा टोकाचा निर्णय घेतला. वनडे आणि टी-२० कडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे धोनीने सांगितले.
धोनीने आपल्या यशस्वी कारकीर्दीत ९० कसोटी सामन्यांमधून ४ हजार ८७६ धावा तडकावल्या आहेत. त्याच्या नावावर ६ शतकं, ३१ अर्धशतकांची नोंद आहे. २२४ ही त्याची वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्या आहे. २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध चेन्नईत त्याने ही खेळी केली होती.
0
महिलेचा नवरा मांजर

चेन्नई – अहो जरा बाहेर येता का? अशी साद एखाद्या महिलेने घातली आणि समोरून ‘म्याऊsss’ असा प्रतिसाद आला तर? ऐकून नवलच वाटेल पण चेन्नईतील एका महिलेने असा दावाच केला आहे की, तिच्या घरातील मांजर म्हणजे तिचा नवरा आहे.
१२ डिसेंबर रोजी जेव्हा सुपरस्टार रजनीकांतच्या वाढदिवसामुळे चेन्नईत प्रचंड उत्साह असतो अशा वेळी बी. इंद्राणी नावाची एक महिला मात्र आपले मांजर हरवले म्हणून नाराज होती. हे मांजर म्हणजे आपला नवरा आहे, असा या महिलाचा विश्वास आहे आणि म्हणूनच ते मांजर दिसत नाही तोपर्यंत तिला जेवणही नीट जात नव्हते. अखेर दोन आठवड्यांनी २६ डिसेंबर रोजी ते मांजर सापडले आणि तिचा जीव भांड्यात पडला.
१२ डिसेंबर २०१११ बी. इंद्राणी यांच्यासाठी अतिशय दु:खाचा दिवस होता. कारण याच दिवशी पोलीस विभागात कार्यरत असलेल्या त्यांच्या पतीचे निधन झाले होते. त्यानंतर बरोबर दहाव्या दिवशी एक मांजर त्यांच्या घरात आले. इंद्राणी यांनी त्या मांजराला दत्तक घेतलं आणि त्या मांजराचं नाव वेल्लची ठेवलं. जेव्हा इंद्राणी यांना त्यांच्या नवऱ्याची आठवण यायची तेव्हा वेल्लची त्यांचं मन त्या दु:खातून बाहेर काढत असे. हळूहळू त्यांच्यात एक अतूट नातं निर्माण झालं. म्हणूनच हे मांजर म्हणजे माझा नवरा आहे, असा दावा इंद्राणी यांनी केला आहे. हे मांजर इंद्राणी यांच्या गल्लीत देखील प्रसिद्ध आहे. इंद्राणी यांच्या परवानगीशिवाय हे मांजर कुणाकडे काहीही खात नाही. १२ डिसेंबर रोजी पशू पक्षी खाणाऱ्या जमातीतील काही लोक या मांजराच्या मागे लागले आणि त्यामुळेच हे मांजर हरवले. २६ डिसेंबर रोजी जेव्हा हे मांजर घरी परतले तेव्हा गल्लीतील लोकांनी प्रचंड जल्लोष केला. घराघरात मिठाई वाटली. सगळे लोक आनंद साजरा करण्यासाठी इंद्राणी यांच्या घरासमोर जमले होते. इंद्राणी यांचा मुलगा एन.बी.सेतुरामन याने देखील मांजर पुन्हा सापडल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि या मांजराबद्दलच्या काही जुन्या आठवणी देखील सांगितल्या.
0
भाजीपाला पिकापासून वार्षिक 2 लाखाचे उत्पन्न

यवतमाळ, दि. ३० : कमी धारणक्षेत्रामध्ये किफायतशीर शेती होऊ शकत नाही, या संकल्पनेला बाभूळगाव तालुक्यातील उमरी (स्मारक) येथील महादेव छत्रपती ढेपे या शेतकऱ्याने खोटे ठरविले आहे. पारंपारिक पिकांना फाटा देत भाजीपाला पिकांपासून वार्षीक 2 लाखाचे उत्पन्न मिळविणाऱ्या या शेतकऱ्याने परिसरातील शेतकऱ्यांसाठी वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
ढेपे यांच्याकडे वडीलोपार्जीत 3.50 एकर इतकी शेतजमीन आहे. या शेतीवर दरवर्षी परंपरेने सोयाबीन, कापसाचे पिक घेतले जायचे. या पिकांना खर्च अधिक आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न कमी अशी स्थिती असल्याने त्यांनी भाजापाला पिकाकडे लक्ष दिले. 1997-98 मध्ये कृषी विभागाच्या मदतीने शेतात विहीर व मोटर बसवून सिंचनाची सुविधा उपलब्ध केली. ओलिताची सोय उपलब्ध झाल्याने त्यांनी पहिल्या वर्षी अर्धा एकर क्षेत्रावर भाजिपाला पिके घेण्यास सुरूवात केली. त्यातून त्यांना चांगला नफा मिळू लागला. ढेपे यांना आत्मा योजनेची माहिती झाल्यानंतर त्यांनी या योजनेंतर्गत भाजीपाला पिकाचे प्रशिक्षण, अभ्यास दौरे आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या शेताला भेटी दिल्यानंतर त्यांचा भाजीपाला पिकांबाबत आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी या पिकाखालील क्षेत्रात वाढ केली. आजमितीस ते दरवर्षी 2.50 एकर क्षेत्रावर टोमॅटो, सांभार, भेंडी, चवळी सारख्या भाजीपाला पिकांची लागवड करीत आहे. उर्वरीत एक एकर क्षेत्रावर कापुस अथवा सोयाबीनचे पिक घेतात.आत्मा योजनेंतर्गत आधुनिक तंत्रज्ञान, पिकांची लागवड, खर्चात बचत, पिकांचे संगोपण आदी बाबी त्यांनी आत्मसात केल्याने गेल्या तिन वर्षात त्यांच्या भाजीपाला उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे. सन 2011-12 मध्ये त्यांना भाजीपाल्यापासून 1 लाख 30 हजाराचे उत्पन्न मिळाले होते. दुसऱ्या वर्षी 2012- 13 मध्ये 1 लाख 55 हजार तर गेल्यावर्षी 2 लाखाचे उत्पन्न त्यांना मिळाले. सदर भाजीपाला पिकं स्थानिक बाजारासह बाभूळगाव व यवतमाळ येथे विक्री करतात. शेतीसाठी लागणारा खर्च कमी करण्यासाठी ते कुटुंबासह स्वत: शेतीची कामे करतात त्यामुळे उत्पादन खर्चातही बरीच कपात त्यांनी केली आहे. दैनंदिन स्वयंपाकासाठी बऱ्याच वस्तू लागत असतात. त्यातील बहुतांश वस्तू खरेदी कराव्या लागते. मात्र ढेपे यांनी स्वयंपाकासाठी दररोज लागणाऱ्या मोहरी, जीरे, सोप, ओवा, कांदा यासारख्या वस्तु स्वत: थोड्या क्षेत्रात लागवड करून उत्पादीत करतात त्यामुळे त्यांना या वस्तु बाहेरून पैसे देऊन विकत आणाव्या लागत नाही.









