
पुणे : या आठवड्यात कमी झालेला थंडीचा कडाका शनिवारी पुन्हा वाढला. काही शहरांचे किमान तापमान वेगाने घसरले. नागपूरमध्ये सर्वांत कमी ६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ नाशिकमध्ये ७.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली आहे़ तेथून बोचरे वारे राज्यात वेगाने वाहत असल्याने पुन्हा पारा घसरू लागला आहे. नागपूरचे किमान तापमान सरासरीपेक्षा तब्बल ५.६ अंश सेल्सिअसने कमी झाले होते. विदर्भाचे तापमान आज सर्वांत जास्त घटले होते.त्यापाठोपाठ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचे तापमान घटले होते. पुढील ४८ तासांत राज्याच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
किमान तापमान
जळगाव १०, कोल्हापूर १५.४, महाबळेश्वर १०.६, मालेगाव ९, सांगली १४.५, सातारा १३.४, सोलापूर १३, मुंबई २१.६, अलिबाग १७.६, रत्नागिरी १८.९, डहाणू १७.१, उस्मानाबाद ९.९, औरंगाबाद ११.४, परभणी १०.२, नांदेड १०, अकोला ८.६, अमरावती १२.२,चंद्रपूर ११, यवतमाळ १०.४.
Archive for December 28th, 2014
0
राज्यात थंडीचा जोर वाढला , यवतमाळ १०.४., नागपूर ६.७ अंशांवर
0
विवाहपूर्व शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार ठरु शकत नाही – हायकोर्ट

मुंबई – भारतातील मोठ्या शहरांमध्ये सध्या विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवण्याचे प्रमाण वाढत असून लग्नाचे आश्वासन देऊन ठेवलेले शरीरसंबंध म्हणजे बलात्कार ठरत नाही असे मत मुंबई हायकोर्टाने मांडले आहे.
नाशिकमधील वकिल असलेल्या एका प्रेमीयुगुलाचे प्रकरण मुंबई हायकोर्टात आले आहे. यातील तरुणीने तिच्या प्रियकरावर लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या तरुणाने मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. ‘१९९९ पासून आमचे प्रेमसंबंध होते. आम्हा दोघांचा धर्म वेगळा असल्याने तिच्याशी लग्न करता आले नाही. मात्र दोघांमध्येही संमतीने शरीरसंबंध निर्माण झाले होते’ असा युक्तीवाद संबंधीत तरुणाने कोर्टासमोर केला होता. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यावर हायकोर्टाने विवाहपूर्व शरीरसंबंध आणि बलात्काराच्या घटना याविषयी मत मांडले आहे. सध्या प्रेमसंबंधांमध्ये लग्नापूर्वीच शरीरसंबंध ठेवण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे. मुंबई, पुणे सारख्या मेट्रो शहरांमध्ये तर यासाठी संमतीच मिळू लागली आहे. शहरातील उच्चशिक्षीत तरुणींनी विवाहपूर्व शरीरसंबंधांचे परिणाम आणि त्यांच्या शारीरिक गरजा लक्षात ठेवणे गरजेचे असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवण्याचा एखाद्या तरुणीचा निर्णय हा तिच्या संमतीने होता की नाही हे परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे ठरु शकते असे सांगत कोर्टाने उदाहरणही दिले आहे. पहिले लग्न लपवून ग्रामीण भागातील अशिक्षित तरुणीला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवणे हा बलात्कार ठरु शकतो असे हायकोर्टाने स्पष्ट केले. संबंधीत प्रकरणातील तरुणी ही उच्चशिक्षीत असून शरीरसंबंधांसाठी तिचीही संमती असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे स्पष्ट करत हायकोर्टाने संबंधीत तरुणाला जामीन मंजूर केला.
0
विजय चौधरी ठरला महाराष्ट्र केसरी

नगर – यंदाचा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान जळगावचा कुस्तीपटू विजय चौधरी याने मिळवला आहे. १० हजारावर कुस्तीप्रेमींच्या गर्दीत झालेल्या अंतिम लढतीत विजयने पुण्याच्या सचिन येलबरला लोळवत ‘महाराष्ट्र केसरी’वर आपले नाव कोरले. या विजयानंतर ‘पैलवान आला गं पैलवान आला…’ या गाण्याच्या धूनवर विजयच्या चाहत्यांनी आखाड्यावर जल्लोष केला.
येथील वाडिया पार्कात स्वर्गीय पै. छबूराव लांडगे क्रीडा नगरीत ‘महाराष्ट्र केसरी’साठी विजय चौधरी आणि सचिन येलबर यांच्यात झुंज रंगली. मॅटवरच्या या लढतीत पहिल्यापासूनच वर्चस्व राखत विजयने विजयाला गवसणी घातली आणि आपणच मॅटचा बादशाह असल्याचे दाखवून दिले. विशेष म्हणजे विजय आणि सचिन या दोघाही कुस्तीपटूंना याआधी या पुरस्काराने हुलकावणी दिलेली आहे. याआधी दोघेही एकेकदा उपविजेते राहिलेले आहेत. आज विजयने सचिनवर मात करत आपलं स्वप्न साकार केलं.
विजयच्या विजयाने संपूर्ण उत्तर महाराष्ट्रच आनंदला आहे. कुस्तीच्या या मानाच्या स्पर्धेवर नेहमीच पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईतील कुस्तीपटूंचे वर्चस्व पहायला मिळाले आहे. आज जळगावकडे हे जेतेपद गेल्याने उत्तर महाराष्ट्रातील कुस्तीपटूंनीही ‘हम भी कुछ कम नाही’ असाच संदेश या माध्यमातून दिला आहे.
0
यवतमाळात मनसेला खिंडार

यवतमाळ, दि. २८ – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अवस्था मावळ्याविना सेना अशी झाली आहे. संस्थापक अध्यक्ष राज ठाकरेंच्या निकटवर्तीय नेत्यांच्या एककल्ली कारभारामुळे मनसे हा पक्ष दुभंगत चालला असून, आता जिल्ह्यातही मनसेला प्रचंड मोठे खिंडार पडले आहे. जिल्हा उपाध्यक्ष संजय बोक्से यांच्यासह शेकडो मनसे सैनिकांनी पक्षनेतृत्त्वाच्या कार्यपद्धतीला कंटाळून शुक्रवारी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या निवासस्थानी हा सोहळा पार पडला.
मुंबईसह मोठ्या शहरात रोजगारानिमित्त आलेल्या परप्रांतीयांच्या दबंगखोरी विरोधात राज ठाकरे यांनी बिगुल फुंकला होता. मराठी भाषेच्या अस्मितेचे रक्षण व्हावे म्हणून त्यांनी २००५ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. २००९ च्या विधानसभेत तब्बल १३ आमदार मनसेचे निवडून आलेत. अल्पावधीतच या पक्षाला यश मिळाले असताना राज ठाकरे यांच्या जवळील निकटवर्तीय नेत्यांनी मनमानी करीत पक्षाची प्रतीमा मलीन केली. परिणामी २०१४ च्या नुकत्याच झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत या पक्षाचा जणू सफायाच झाला. जिल्ह्यात या पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन खेडोपाडी पक्षाची पाळेमुळे रूजविली. त्यामध्ये मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय बोक्से यांनी गावोगावी कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली. मात्र पक्षातील नेतृत्वामुळे दिवसेंदिवस पक्षाचा सफाया होत असल्याचे पाहून अखेर त्यांनीही मनेसला रामराम ठोकला. शुक्रवारी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे यांचे निवासस्थानी बोक्से यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यावेळी कॉंग्रेसचे नेते अरूण राऊत, जि.प. उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, जि.प. सदस्य राहुल ठाकरे, रवी ढोक, अनिल गायकवाड आदी उपस्थित होते. बोक्से यांचेसोबत कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेणाºयांमध्ये जांभोºयोच नितीन बागेकार, वाटखेडचे महेंद्र अगलदरे, खैरगावचे सरपंच गणेश चव्हाण, ईचोरीचे माजी सरपंच विष्णू मुरमुरे, आकपुरीचे शाखा अध्यक्ष योगेश खरात, बारडचे दिलीप फुपरे, बोरीसिंहचे गजानन वायखळे, महादेव नागोसे, शाखा प्रमुख किशोर शेठे, दिलीप चिंतावार, रुईचे योगेश महल्ले, वडगावचे सचिन गुल्हाणे, हिवरीचे अमोल चौधरी, सालोटचे गजानन बोंडे, रोहटेकचे उमेश पेंदोर, उमरसºयाचे अरूण भिसे, साचखेडचे नितीन उईके, हातोल्याचे दिलीप आडे, लाडखेडचे राजेश विरुळकर, शाखाध्यक्ष नीलेश वानखेडे, पाथ्रडदेवीचे उमेश केवदे, धवळसरचे उमरेश रोहनकर, भोसाचे सुरेश वाघमारे, चौधºयाचे अविनाश राठोड, सावरगडचे संजय गोडे, यांचेसह ४०० कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
0
४ जानेवारीला परिचरपदाची लेखी परीक्षा

यवतमाळ, दि. २८ – जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या परिचर पदाची लेखी परीक्षा ४ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. २२ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या परिचर पदाच्या लेखी परीक्षेचा पेपर विस्तार अधिकाºयाने फोडल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. परिचर पदाच्या ४५ जागांसाठी तब्बल १८ हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. ११० परीक्षा केंद्रावरून ही परीक्षा घेण्यात आली होती. पेपरफुटीमुळे जिल्हा परिषदेच्या पदभरतीला गालबोट लागले आहे. यापूर्वी रद्द झालेल्या पदाची परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेला मोठ्या संख्येने उमेदवारांनी पाठ फिरवून रोष व्यक्त केला. आता परिचरपदाच्या रिक्त पदासाठी ४ जानेवारीला लेखी परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षा निर्विघ्न पार पडावी म्हणून जिल्हा परिषद प्रशासनावर ताण पडला आहे.
0
काँग्रेसचा 129 वा स्थापना दिवस साजरा

मुंबई – काँग्रेस पक्षाचा 129 वा स्थापना दिवस दि. 28 डिसेंबर 2014 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.प्रदेश कार्यालय टिळक भवन येथे काँग्रेस स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री श्री सुशीलकुमार शिंदे, मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष श्री कृपाशंकर सिंह, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रकांत दायमा, माजी मंत्री श्री नसीम खान, डॉ.श्री नितीन राऊत, प्रदेश सरचिटणीस श्री यशवंत हाप्पे, श्री राजेश शर्मा यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाला आ.श्री माणिकराव ठाकरे आणि श्री सुशीलकुमार शिंदे यांनी संबोधित केले. याप्रसंगी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली.
0
साप चावल्याने पांढ-या वाघाचा मृत्यू

इंदूर – अत्यंत विषारी कोब्रा साप चावल्याने जगात दुर्मीळ असलेल्या पांढ-या वाघाचा येथील प्राणिसंग्रहालयात मृत्यू झाला.
या घटनेने संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. येथील कमला नेहरू प्राणिसंग्रहालयात तीन वर्षाचा ‘रज्जन’ हा पांढरा वाघ होता.
शनिवारी सकाळी त्याला कोब्रा या सापाने दंश केला. त्यानंतर वाघानेही त्याचा प्रतिकार केला. मात्र अंगात विष भिनल्याने वाघाचा मृत्यू झाला, अशी माहिती प्राणिसंग्रहालयाचे प्रमुख उत्तम यादव यांनी दिली.
0
दिल्ली गारठली, पाच वर्षांतील तापमानाचा नीचांक

नवी दिल्ली – दिल्लीत थंडीचा कडाका अद्यापही कायम असून गेल्या पाच वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद रविवारी दिल्लीत झाली. रविवारी दिल्लीतील तापमानाचा पारा २.६ अंश सेल्सियसपर्यंत घसरला.
कडाक्याच्या थंडीमुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झाले असून वाहतूकीवरही मोठा परिणाम झाला आहे. दाट धुक्यामुळे ३५५ विमाने तसेच ७० रेल्वे वाहतूकीवर याचा परिणाम झाला.
सकाळी साडेवाजता दिल्लीत २.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. वातावरणात ९७ टक्के आर्द्रता होती तर ५० मीटर अंतरापर्यंत दाट धुके पसरले होते, अशी माहिती वेधशाळेच्या अधिका-यांनी दिली. गेल्या पाच वर्षातील तापमानाने गाठलेला हा नीचांक आहे. २६ डिसेंबर १९४५ मध्ये दिल्लीत सर्वात कमी १.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती, असे अधिका-यांनी सांगितले.
दाट धुक्यामुळे दिल्लीतील हवाई तसेच रेल्वेवाहतूकीवरही मोठा परिणाम झाला आहे. ५५ विमानांचे उड्डाण उशिराने होत आहे. तर तीन आंतरराष्ट्रीय विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तर ७० रेल्वेच्या वाहतूकीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. चार रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर सहा रेल्वेगाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.
0
जीप दरीत कोसळून ३ पोलिस हवालदारांचा मृत्यू

पुणे, दि. २८ – रात्री गस्तीवर असलेल्या पुणे पोलिसांची जीप ३०० फुट खोल दरीत कोसळल्याने तीन पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे तिघेही सासवड पोलिस ठाण्यात कार्यरत होते.
सासवड पोलिस ठाण्यातील अविनाश ढोले, शशिकांत राऊत आणि उल्हास मयेकर हे तिघे हवालदार शनिवारी रात्री ड्यूटीवर होते. रात्री गस्त घालण्यासाठी हे तिघेही जीप घेऊन निघाले. अविनाश ढोले हे जीप चालवत होते. सासवडजवळील पानवडी घाटात ढोले यांना रस्त्याचा अंदाज आला नाही व जीप थेट ३०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सासवड पोलिस ठाण्यात शोककळा पसरली आहे.
0
नैराश्य घालविण्यासाठी शेतीला जोडधंदा हवा – कृषिमंत्री

अकोला : राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर नेमका उपाय सापडत नसून, १०० टक्के आत्महत्या थांबतील यासाठी सध्यातरी कोणता मार्ग दिसत नाही, अशी अगतिकता कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी अकोला येथे व्यक्त केली. शेतकऱ्यांचे नैराश्य घालविण्यासाठी शेतीपूरक जोडधंद्याशिवाय तरणोपाय नाही, असेही ते म्हणाले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी कृषिमंत्री खडसे बोलत होते. दुष्काळामुळे नापिकी आल्याने राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. विदर्भ-मराठवाड्यातील आत्महत्येचे लोण आता पश्चिम महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे.
शेतकऱ्यांना ४० शेळ्या व २ बोकड देणार असून अनुसूचित जाती, जमातींच्या शेतकऱ्यांना निशुल्क गायींचे वाटप केले जाईल. सूक्ष्म, संरक्षित सिंचनास शेततळ्यांची योजना नव्याने राबविण्यात येईल. याकरिता २० लाखांचे अनुदान शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. शेततळ्यातून पाणी घेण्यासाठी सौरऊर्जेवरील पंपदेखील देण्यात येतील. यासाठी ४.१० लाखांचे अनुदान दिले जाईल. सूक्ष्म सिंचन योजनेचे साहित्य घेण्यासाठी अनुदान वाढवून दिले जाणार असून, आठ दिवसांत हे अनुदान त्यांना मिळेल. जिथे शेत तिथे रस्ता तयार करण्याचे आदेश दिले आहेत. माती परीक्षणाचा अहवाल कृषी कार्ड शेतकऱ्यांना घरपोच दिले जाणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.
0
एअर एशियाचे विमान बेपत्ता

जकार्ता – इंडोनेशियाहून सिंगापूरला निघालेले एअर एशियाचे विमान रविवारी सकाळी बेपत्ता झाले आहे. या विमानात १६२ प्रवासी असून विमानासाठी शोध मोहीमही सुरु झाली आहे.
इंडोनेशियातील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार रविवारी सकाळी पाचच्या सुमारास एअर एशियाचे QZ ८५०१ हे विमान सिंगापूरच्या दिशेने रवाना झाले. मात्र उड्डाणाच्या तासाभरानंतर विमानाचा जकार्ता हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. या विमानात १५५ प्रवासी आणि ७ कर्मचारी असे १६२ जण आहेत. या विमानात एकही भारतीय नाही. विमानासाठी शोध घेण्यासाठी मोहीम सुरु झाली असून खराब हवामानामुळे शोधमोहीमेत अडथळे येत असल्याचे समजते. दरम्यान, सुमात्रा बेटाजवळ बेलितूंग येथे एक विमान कोसळल्याचे वृत्त असले तरी याविषयी अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. विमान बेपत्ता झाल्याचे समजताच विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांनी विमानतळावर धाव घेतली आहे. प्रवाशांसाठी एअर एशियाने हेल्पलाईनही सुरु केली आहे. यंदाचे वर्ष हे एअरलाईन्स क्षेत्रासाठी दुर्दैवी ठरले आहे. मलेशियन एअरलाईन्सचे एमएच ३७० हे विमान अजूनही बेपत्ता असून त्याचे बेपत्ता होण्याचे गुढ अजूनही कायम आहे.
0
भूमिका राय अंधत्वप्रकरणी फेरचौकशीचे आदेश

यवतमाळ : डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे अंधत्व आलेल्या भूमिका राय या प्रकरणाचा सखोल तपास करावा, असा आदेश प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एम.एस. तिवारी यांनी वडगाव रोड पोलिसांना दिला आहे.
येथील डॉ. संजीव जोशी यांनी केलेला चुकीचा औषधोपचार आणि हलगर्जीपणा यामुळे भूमिकाला कायमचे अंधत्व आल्याची तक्रार तिचे वडील सुजीत राय यांनी मार्च २0१२ मध्ये नोंदविली होती. याप्रकरणात वडगाव रोड पोलिसांनी फिर्यादीनुसार तपास न करता आरोपीचा बचाव व्हावा, अशा पद्धतीने आरोपपत्र दाखल केले, असा आरोप राय यांनी केला आहे. दरम्यान त्यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोडचे कलम १७३(८) नुसार फर्दर इन्व्हेस्टिगेशन करण्याचे दिशानिर्देश करण्यात यावे, असा विनंती करणारा अर्ज न्यायालयात दाखल केला होता. शिवाय या डॉक्टरसंदर्भात इतर बाबींचीही चौकशी करावी, अशी मागणी केली होती. यानुसार न्यायालयाने फेरचौकशीचे आदेश दिले आहे. पुरवणी अहवाल दोन महिन्याच्या आत सादर करावा, असे न्यायालयाने म्हटले आहे. डॉ. संजीव जोशी यांनी वैद्यकीय कागदपत्रांमध्ये खोडतोड करून पोलिसांनी तपास यंत्रणेची दिशाभूल केली. याविषयी अक्षर तज्ज्ञांचे मत या मुद्यावर दिशानिर्देश देण्याची विनंती केली होती. राय यांची बाजू अँड. वीरेंद्र दरणे यांनी मांडली.









