
यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी काल झालेल्या निवडणूकीत ५८.८० टक्के इतके मतदान झाले. सर्वाधिक मतदान राळेगाव विधानसभा मतदारसंघात झाले असून या मतदारसंघाची मतदानाची टक्केवारी ६५.३२ इतकी आहे.
जिल्ह्यात एकूण १७ लाख ४ हजार २३८ इतके मतदार असून त्यापैकी १० लाख ३१ हजार ५३३ इतक्या मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. त्यात पुरुष ५ लाख ६४ हजार २७६ तर ४ लाख ६७ हजार २५७ स्त्री मतदारांचा समावेश आहे. वाशिम विधानसभा मतदारसंघात १ लाख ८३ हजार १४६ इतके मतदान झाले असून या मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी ५७.७२ इतकी आहे. कारंजा विधानसभा मतदारसंघात १ लाख ५० हजार १५४ (५३.४१टक्के), राळेगाव विधानसभा मतदारसंघात १लाख ७२ हजार ६३३ (६५.३२ टक्के), यवतमाळ विधानसभा मतदारसंघात १ लाख ७८ हजार ५०८ (५४.१८ टक्के), दिग्रस विधानसभा मतदारसंघात १ लाख ८५हजार ९२४ (६४.४६ टक्के) तर पुसद विधानसभा मतदारसंघात १ लाख ६१ हजार १६८ (५८.९१ टक्के) इतके मतदान झाले. राळेगाव पाठोपाठ दिग्रस मतदारसंघात ६४. ४६ इतके मतदान झाले. उवर्रीत चार विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी ही ६० टक्केच्या आत राहीली.
Archive for April, 2014
0
यवतमाळ-वाशिम मतदारसंघात ५८.८० टक्के मतदान
0
भावना गवळी व आ. संजय राठोड कडून आचारसहितेचा भंग

यवतमाळ – रामनवमी रॅलीमध्ये प्रचार केल्याप्रकरणी महायुतीच्या उमेदवार भावना गवळी व आ. संजय राठोड यांच्याविरुद्घ पोलिसांनी आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला.
लोक सभा निवडणूकीच्या प्रचार तोफा ८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता थंडावल्या होत्या. त्यानंतर विविध सामाजिक संघटनांच्या वतीने रामनवमीनिमित्य सार्वजनिक रॅली काढण्यात आली होती. यावेळी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार भावना गवळी व सेनेचे जिल्हाध्यक्ष आ. संजय राठोड यांनी दत्त चौकात रॅली येताच तेथे मत देण्याचे आवाहन केले. नायब तहसीलदार अरुण भगत यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वडगाव रोड पोलिसंनी कलम १७१, १८८ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
0
शेतकºयावर आचारसहिता भंगचा गुन्हा
यवतमाळ – गारपिटीनंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेल्या कंझारा येथील शेतात शेतकºयाने एका पक्षाच्या प्रचारार्थ जंगी पार्टी दिल्याने त्याच्याविरूद्ध लाडखेड पोलिसांनी आचारसहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामध्ये बोरी अरब येथील विष्णू गजानन ठाकरे या यांच्या शेतातील पपई बाग उन्मळून पडल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले होते. दरम्यान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या शेतकºयाच्या शेतात भेट देऊन मदत करण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला चालना मिळण्यासाठी या शेतकºयाच्या शेतात ९ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता खास पार्टीचे आयोजन करुन परिसरातील नागरिकांना भोजनासाठी आमंत्रित केले. अनेक नागरिक भोजनावर ताव मारत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक भरारी पथकाला मिळाली होती. त्यावरुन पथकाने या शेतात धाड टाकून व्हिडीओ चित्रीकरण केले. याप्रकरणी भरारी पथक प्रमुख नायब तहसीलदार व्ही.बी. काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन लाडखेड पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
0
काँग्रेसचे अशोक बोबडेंविरुद्घ गुन्हा
यवतमाळ – परवानगी संपल्यानंतर रॅली काढून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अशोक बोबडे यांच्याविरुद्घ वडगाव रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भारतीय राष्टÑीय काँग्रेस पार्टीचे यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अॅड. शिवाजीराव मोघे यांच्या प्रचारार्थ ८ एप्रिल रोजी मोटर सायकल रॅली काढण्यात आली होती. जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोक अमृत बोबडे रा. दर्डा नगर यांनी रितसर परवानगी घेतली होती. मात्र वेळ संपल्यानंतर आयोजकांनी रॅली काढून दुसºयाच मार्गाने फिरविली. यावेळी निवडणूक विभागाच्या पथकाने व्हिडीओ चित्रिकरण केले होते. त्यामध्ये आयोजकांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचे दिसून आले. याप्रकरणी नायब तहसीलदार अरुण भगत यांनी वडगाव रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी बोबडे यांच्याविरुद्घ कलम १७१, १८८ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
0
विदर्भात ६२.३६ टक्के मतदान
नागपूर – विदर्भातल्या दहा लोकसभा मतदार संघात मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदान केले आहे. मागील निवडणूकीशी तुलना केल्यास विदर्भात मतदानाचा टक्का वाढला असून येथे सरासरी ६२.३६ टक्के मतदान झाले आहे. २००९ मध्ये हेच प्रमाण ५७.७ इतके होते.
सर्वाधिक मतदान हे गडचिरोली, भंडारा, अकोला आणि अमरावती या मतदार संघात झाले आहे. विशेष म्हणजे नक्षलवाद्यांचा विरोध झुगारून गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये मोठया प्रमाणात मतदार मतदानासाठी बाहेर पडले होते. राज्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान विदर्भातील १० लोकसभा मतदार संघात झाले. काही तुरळक घटना वगळता सर्वच मतदार संघात मतदान हे शांततेत झाले. उन्हाचा कडाका लक्षात घेता सुरूवातीच्या मतदानावर त्याचा परिणाम दिसून आला. दुपारपर्यंत मतदान अगदीच संथ गतीने सुरु होते. सरासरी २५ टक्केच मतदानाची नोंद दुपारी तीन वाजेपर्यंत झाली होती. त्यामुळे मतदान मागील वेळे पेक्षा कमी होते की काय अशी शंका सर्वांनाच वाटत होती. मात्र संध्याकाळी मतदानाला वेग आला. विशेष म्हणजे मागील वेळ पेक्षा जास्त मतदान यावेळी विदर्भातील दहाही लोकसभा मतदार संघात झाले आहे. त्यात अकोला, अमरावती, भंडारा आणि नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोलीमध्ये सर्वाधिक ६५ टक्के मतदान झाले आहे. तर बुलढाणा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजेच ५८.६६ टक्के मतदान झाले. तर बीग फाईट असलेल्या नागपूर मतदार संघात ५९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सर्वात जास्त मतदान झालेल्या अमरावती मतदारसंघात दुपापर्यंत केवळ १५ टक्केच मतदान झाले होते. मात्र संध्याकाळी येथील मतदानाचा वेग वाढला होता.
दरम्यान नागपूर मध्ये भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी टाऊन हॉल येथे जाऊन मतदान केले. नागपूरात विलास मुत्तेमवार, भंडा-यात प्रफुल्ल पटेल, मुकुल वासनिक, अकोल्यात प्रकाश आंबेडकर, अमरावतीत नवनित कौर राणा, शिवाजीराव मोघे, संजय देवतळे, सागर मेघे या प्रमुख उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
विदर्भात झालेल्या मतदानानंतर या प्रमुख उमेदवारांसह जवळपास २०१ उमेदवारांची भवितव्य आता मतदान यंत्रात बंद झाले आहे.
विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघ
मतदानाची टक्केवारी
बुलढाणा ५८.६६
अकोला ६५.००
अमरावती ६५.००
वर्धा ६१.००
रामटेक ६२.००
नागपूर ५९.००
भंडारा ६५.००
गडचिरोली-चिमूर ६५.००
चंद्रपूर ६३.००
यवतमाळ ६०.००
सरासरी- ६२.३६
0
तरुणांकडून बलात्काराच्या चुका होतात- मुलायमसिंग

मुरादाबाद – ‘लडके है, गलती हो जाती है’, असे तारे तोडत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यांनी मुंबईतील शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील आरोपींची कड घेतली आहे. या प्रकरणात तीन आरोपींना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा चुकीची असल्याचेही मुलायम यांनी म्हटले आहे.
मुरादाबाद येथील सभेत बोलताना मुलायम यांनी हे वादग्रस्त विधान केले. शक्ती मिल परीसरात टेलिफोन ऑपरेटर तसेच पत्रकार तरुणीवर झालेल्या बलात्कारप्रकरणातील तीन मुख्य आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या निकालाचे देशभरातून स्वागत होत असताना मुलायम यांनी मात्र या तिघा नराधमांची कड घेऊन नव्या वादाला तोंड फोडले आहे.
‘मुंबई बलात्कार प्रकरणातील तिघा आरोपींना फाशीची शिक्षा देणे मला योग्य वाटत नाही. शेवटी ती मुलंच आहेत. त्यांच्याकडून अशाप्रकारच्या चुका होऊ शकतात. पण, त्यासाठी त्यांना थेट फाशीची शिक्षा देणे चुकीचे आहे’, असे मुलायम म्हणाले. ‘मुला-मुलींमध्ये मैत्री असते तोपर्यंत कोणाचीच काही तक्रार नसते. पण दोघांमध्ये भांडण झालं की सगळं बिघडतं. संबंधित मुलगी तिच्यावर बलात्कार झाल्याचा जबाब पोलिसांकडे देते आणि मग बिचाऱ्या मुलाला त्यामुळे फासावर लटकावे लागते’, असा अजब तर्कही मुलायम यांनी लावला आहे. बलात्काराच्या घटनांमध्ये आरोपीला सरकसकट फाशीची शिक्षा देण्यास विरोध करताना मुलायम यांनी यावेळी हुंडाबळी, दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा यासारख्या कायद्यांचा दुरुपयोग थांबवला गेला पाहिजे, असे नमूद केले. कायद्याचा गैरवापर रोखता येईल, अशाप्रकारचे कायदे आम्ही बनवणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. दरम्यान, मुलायम यांच्या वादग्रस्त विधानाचा विरोधकांनी खरपूस समाचार घेतला असून भाजप, काँग्रेस आणि बसपाने मुलायम यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.
0
नक्षल्यांचा निवडणूक कर्मचाऱ्यांवर हल्ला

गडचिरोली- जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात मतदानाची प्रक्रिया आटोपून परतत असलेल्या पोलिंग पार्टीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. या हल्ल्याला सुरक्षा जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. तालुक्यातील जरदेवाडा येथे ही घटना घडली. हल्ल्याचे लक्ष्य ठरलेले निवडणूक निर्णय अधिकारी, कर्मचारी तसेच मतपेट्या सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले. नक्षली कारवायांमुळे गडचिरोली जिल्हा हा संवेदनशील मानला जातो. त्यामुळे या भागात फक्त दुपारी ३ पर्यंत मतदानाची वेळ ठेवण्यात आली होती. मतदान संपल्यानंतर मतपेट्या परत नेतांना अधिकाऱ्यांवर हा हल्ला करण्यात आला.
0
सत्यपाल सिंगांच्या ताफ्यावर हल्ला

लखनऊ – उत्तरप्रदेश मधील भाजपचे उमेदवार आणि मुबंईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांच्या ताफ्यावर आज हल्ला करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांनी बागपत लोकसभा मतदारसंघातील मलकापूर या गावी त्यांचावर हल्ला केला. सत्यापाल यांच्या ताफ्यातील एका कारची काच तोडण्यात आली. यामध्ये दोघेजण जखमी झाले. सुदैवाने सत्यपाल सिंग यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. जेव्हा सत्यपाल सिंग हे बोगस मतदान करणाऱ्या आरोपींची चौकशी करण्यासाठी जात होते त्यावेळेस त्यांच्यावर हल्ला झाला. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या परिस्थिती नियंत्रणात असून भाजपचे उमेदवार सुरक्षित स्थळी रवाना झाले आहेत. नागरी उड्डाण मंत्री आणि राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख अजित सिंग हे तेथील खासदार आहेत. यंदा पुन्हा एकदा तेच निवडणुकिच्या रिंगणात उतरले आहेत. या हल्ल्यामागे नक्की कोणाचा हात आहे याचा अधिक तपास करण्यात येत आहे.
0
मोदींची संपत्ती केवळ दीड कोटी

अहमदाबाद- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची संपत्ती केवळ दीड कोटी रुपये इतकी आहे. वडोदरा आणि वाराणसी अशा दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणा-या मोदी यांच्याकडे स्वतःचे असे एकही वाहन नाही.
मोदी यांनी बुधवारी वडोदरा लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी संपत्ती एक कोटी ५१ लाख इतकी संपत्ती असल्याचे म्हटले आहे. यातील ५१ लाख ५७ हजार ५८२ कोटी रुपये बँकेतील खात्यात आणि फिक्स डिपॉझिट स्वरुपात आहेत. त्याच्या हातात केवळ २९ हजार ७०० रुपये आहेत. तर एक लाख ३५ हजार रुपयांच्या चार अंगठ्या असल्याचे मोदी यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.विशेष म्हणजे त्यांच्याकडे स्वतःची अशी एकही गाडी नाही. तसेच गेल्या दोन वर्षात त्यांनी कोणतेही दागिने विकत घेतलेले नाही.मोदीचे गांधीनगरमध्ये स्वतःचे घर आहे. त्याची किमत एक कोटी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय आपल्याकडे अन्य कोणताही मालमत्ता नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे. २०१२च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मोदींनी सादर केलल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती एक कोटी ३३ लाख रुपये इतकी दाखवण्यात आली होती.
गेल्या दोन वर्षात मोदींनी विविध योजनांमध्ये गुंतवलेल्या रक्कमेतून त्यांना १८ लाख रुपये मिळाले आहेत.
मोदींचे उत्पन्न- २०१२-१३: चार लाख ५४ हजार ०९४ – २०११-१२: एक लाख ५० हजार ६३०
0
दुस-या टप्प्यातील ४४ उमेदवारांवर गंभीर गुन्हे

मुंबई- स्वच्छ प्रतिमेचा, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असावेत अशी सामान्य मतदारांची आपेक्षा असते. मात्र प्रत्यक्षात विविध राजकीय पक्षांकडून गुन्हेगारी, भ्रष्टाचाराची लोकांना उमेदवारी दिली जाते.
१७ एप्रिल रोजी राज्यात दुस-या टप्यात १९ लोकसभा मतदानसंघात मतदान होणार आहे. या १९ जागांवर ३४६ उमेदवार उभे आहेत. यापैकी ४४ जणांवर खुन, खुनाचा प्रयत्न आणि बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. एकूण उमेदवारांमध्ये हे प्रमाण १३ टक्के असल्याचे दिसून येते. तर ७१ जणांवर म्हणजेच २१ टक्के उमेदवारांवर विविध गुन्हे दाखल आहेत.
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात दुस-या टप्प्यात मतदान होत आहे. राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना उमेदवारी दिल्याचे महाराष्ट्र इलेक्शन वॉच या संस्थेने म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे उस्मानाबादमधील उमेदवार पद्मसिंह पाटील, हातकणंगलेमधील स्वाभीमान शेतकरी संघटनेचे उमेदवारी राजू शेट्टी आणि संदीप मोजर या उमेदवारांवर खुनाचे गुन्हे आहेत. शिरुरमधील शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव पाटील यांच्यावर देखील खुनाचा गुन्हा आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उदयराजे भोसले यांच्यावर देखील खुन आणि अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत.
विशेष म्हणजे स्वच्छ प्रतिमेचे उमेदवारांना उमेदवारी देऊ असे सांगणा-या ‘आप’च्या पाच उमेदवारांवर देखील गुन्हे असल्याचे समोर आले आहे. यापैकी मावळ लोकसभा मतदारसंघातील मारुती भापकर यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत.
0
छत्तीसगडमध्ये दहा मतदान केंद्रावर गोळीबार

रायपूर – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगडमधील बस्तर भागात गुरुवारी दहा मतदान केंद्रावरील सुरक्षा रक्षकांवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. बस्तर मतदारसंघात दुपारपर्यंत ३० टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
बस्तरमधील दहा मतदान केंद्रावर मतदान सुरु असताना नक्षलवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर हवेत गोळीबार केला. मात्र या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पोलिस अधिका-यांनी दिली. दरम्यान, याआधी सुरक्षा रक्षकांनी विविध ठिकाणांहून तीन बॉम्ब आणि १५ आयईडी स्फोटके हस्तगत केली.सुकुमा जिल्ह्यातील कोरा आणि आमिरगढ, दंतेवाडा येथील सामोली आणि थानिकारा, नारायणपूर जिल्ह्यातील नेडनार आणि कोंडागाव जिल्ह्यातील पाडेली आणि रायगाबो़डी या मतदान केंद्रांवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर काही वेळासाठी मतदान थांबवण्यात आले होते. बस्तर मतदारसंघातून दोन महिलासह आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
0
आंबेडकर जयंती निमित्त देशभर सुट्टी

नवी दिल्ली- घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, केंद सरकारने १४ एप्रिल रोजी देशभर सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
गुरुवारी ही घोषणा करण्यात आली. यामुळे देशभरातील व्यापारी आणि औद्योगिक कारखान्यांसह केंद्र सरकारच्या ५० लाख सरकारी कर्मचा-यांना सोमवारी सुट्टी मिळणार आहे.
केंद्र आणि दिल्ली राज्य सरकारने यापूर्वीच आज मतदान करण्यासाठी सुट्टी जाहीर केली. तर पुढच्या आठवड्यात या कर्मचा-यांना तीन दिवस सुट्टी मिळणार आहे. शुक्रवार १८ एप्रिल रोजी ‘गुड फ्रायडे’ निमित्त सुट्टी आहे.
0
पाकिस्तानात बॉम्बस्फोट, २३ ठार

इस्लामाबाद – पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये बुधवारी सकाळी शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. इस्लामाबादमधील फळ-भाज्यांच्या बाजारपेठेत हा बॉम्बस्फोट झाला. या शक्तीशाली स्फोटात २३ नागरिक ठार झाले असून, ४० जण जखमी झाल्याची माहिती अधिका-यांनी दिली.
मृतांना आणि जखमींना जवळच असलेल्या पाकिस्तानी इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सकाळच्या वेळी ग्राहक बाजारात खरेदी करत असताना हा स्फोट झाला.
फळ-भाज्यांच्या खोक्यांमध्ये लपवून हा बॉम्ब आणला असावा अशी शक्यता आहे. स्फोट होताच फळ-भाज्यांच्या टोपल्या उंच हवेत उडाल्या. चित्रफीतीमध्ये सर्वत्र रक्ताचा सडा पडलेला दिसत होता. टोप्या, चप्पला विखरुन पडलेल्या होत्या. सुरक्षापथकांनी घटनास्थळाला घेराव घातला असून, बॉम्ब तज्ञ परिसरात शोध घेत आहेत.
0
कुटुंबप्रमुखानं केली आई, पत्नी आणि मुलीची हत्या

पुणे – पुण्याच्या वानवडी भागात एका कुटुंबप्रमुखानं कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली आई, पत्नी आणि मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. सागर गायकवाड असं या व्यक्तीचं नाव असून त्यानंही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यातून बचावल्यानंतर तो पोलिसांना शरण आला आहे.
सागर गायकवाड (४० वर्षे) हा गेल्या दोन वर्षांपासून बेरोजगार होता. त्याच्या डोक्यावर सात लाख रुपयांचं कर्ज होतं. बीपीओ कंपनीत नोकरी असताना त्याचे हप्ते तो भरू शकत होता. परंतु, दोन महिन्यांपासून तो हप्ते देऊ न शकल्यानं कर्जदारांनी त्याच्यामागे तगादा लावला होता. हळूहळू सगळंच हाताबाहेर जाईल, या भीतीनं तो खचून गेला आणि नैराश्याच्या भरातच त्यानं आपलं कुटुंब संपवलं. आई शकुंतला (५८), पत्नी कविता (३६) आणि मुलगी ईशिता (७) या तिघींचा त्यानं काल दुपारी घरातच ओढणीनं गळा दाबून खून केला. त्यानंतर, गळफास घेऊन आत्महत्येचाही प्रयत्न केला. परंतु, त्यातून तो बचावला. शेवटी, आज सकाळी नऊच्या सुमारास सागरनं वानवडी पोलीस स्टेशनात जाऊन घटनेची माहिती दिली. कर्जबाजारीपणाला कंटाळून आपणच हा प्रकार केल्याचं त्यानं कबूल केलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढचा तपास सुरू केला आहे.
0
पाकमध्ये बॉम्बस्फोट, २३ ठार

इस्लामाबाद – पाकिस्तानची राजधानी असलेले इस्लामाबाद शहर बुधवारी सकाळी बॉम्बस्फोटाने हादरले. शहरातील एका गजबजलेल्या बाजारपेठेत फळे आणि भाज्या विक्री विभागात आज सकाळी बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात २३ जण ठार झाले आणि ४० ते ५० जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. स्फोटाचे स्वरुप पाहता, मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पोलिसांनी घटनास्थळाला घेराव घातला असून बॉम्ब एक्स्पर्टच्या सहकार्याने कोणती स्फोटके वापरण्यात आली याचा तपास सुरू आहे. एका फळांच्या खोक्यात लपवलेला पाच किलो वजनाचा बॉम्ब जप्त करण्यात आला आहे. हा बॉम्ब निकामी करण्याचे काम सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. येत्या दहा एप्रिलपासून तेहरिक-ई-तालिबान ही दहशतवादी संघटना शस्त्रसंधी करणार आहे. ही शस्त्रसंधी सुरू होण्याआधीच स्फोट झाला आहे. मात्र तेहरिकसह पाकमधील कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.
0
फेसबुकवर मैत्री, समलैंगिक संबंधांची ऑफर देऊन लुटले

मुंबई – समलैंगिक संबंधांची चटक लागलेल्या तरुणांना सोशल साइटच्या (फेसबुक) माध्यमातून आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी समलैंगिक संबंध ठेवून त्यांना लुटण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील वाकोला पोलिसांनी केलेल्या कारवाईत चार तरुणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यातज आला आहे.
वाकोला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साहिल नावाच्या व्यक्तीने वाकोलात राहणाऱ्या एका तरुणाशी फेसबुकवर मैत्री करून त्याला समलैंगिक संबंधासाठी तयार केले. त्यानंतर तो त्याच्या घरी गेला. घरी जाताच त्याच्याशी संबंध करण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याच्या सोबतचे तिघेही तिथे पोहचले. त्यांनी त्या तरुणाला धमकावून त्याच्याकडे एक लाखांची मागणी केली. त्यावेळेस चौघेही २० हजार, घरातील लॅपटॉप आणि टॅब घेऊन निघून गेले. पीडित तरुणाने त्यानंतर लागलीच वाकोला पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी तक्रार नोंदवली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिल्लक असलेले ८० हजार घेण्यासाठी आलेल्या चौघांनाही पोलिसांनी रंगेहाथ पकडले. रईस शेख, अवधूत हाटनकर, सलीम उर्फ साहिल अब्दुल शेख आणि अंबादास बुध्दिवंत अशी या चौघांची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
0
कॉंग्रेसची ओबीसी यात्रा!
नागपूर (सुरेश चरडे ) – कॉंग्रेस ओबीसी यात्रा तर काढू शकते. परंतु ओबीसीला पंतप्रधान करू शकत नाही. म्हणूनच भाजपाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून ओबीसी वर्गातील गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना घोषित केल्यानंतर कॉंग्रेसची पंचाईत झाली आहे. कारण कॉंग्रेस एखाद्या शिखाला पंतप्रधान करू शकेल. एखाद्या मुसलमानाला करू शकेल. परंतु ओबीसीला पंतप्रधान करू शकणार नाही.
कारण आता तर राहुलला पंतप्रधान करायचा आहे. त्यामुळे एका ओबीसीला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर त्याला पर्याय ते देऊ शकत नाही. असे जर करेल तर मग कॉंग्रेसच्या राजकुमाराचा राज्याभिषेक कसा होऊ शकेल? संघ, भाजप हे वर्णवर्चस्ववादी आहेत, त्यांनी ओबीसीला पाताळात गाडले. त्यांचा विकास गोठवला, त्यांना कर्मकांडात गुंतवून ठेवले. त्यामुळे जातीयवादी, धर्मवादी भाजपापासून दूर राहण्याचे आवाहन करीत धर्मनिरपेक्ष असलेल्या कॉंग्रेसच्या मतदाराला मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या त्यांच्या आवाहनावरून लोकांचा असा समज होतो की कॉंग्रेसचे कार्यकर्ते, नेते किती परिवर्तनवादी किंवा समतावादी आहेत. ब्राम्हणी व्यवस्थेला माणणारे नाहीत. त्यांना पूजेसाठी ब्राम्हण लागत नाही. ते ज्योतिष पाहात नाही. कुंडली पाहात नाहीत. अशाप्रकारचे किती कॉंग्रेसी आहेत? जर नाहीत तर त्यांना मग अशाप्रकारचा कांगावा करण्याची गरज काय आहे? भाजपा वर्णवर्चस्ववादी असली तरी त्यांना आता ओबीसीशिवाय दुसरा पर्याय नाही. कॉंग्रेसमध्ये अशी स्थिती आहे काय? तिथे राजकुमार तयार गुडघ्याला बाशिंग बांधून. तिथे दुसºयाला काय संधी आहे? म्हणून मग त्यांना आता ओबीसी यात्रा काढत आहे. ओबीसींना आपल्याकडे वळवण्यासाठी कॉंग्रेसकडे याशिवाय दुसरा पर्याय नाही. ओबीसींची मते घेण्यासाठी यात्रा काढण्याशिवाय दुसरे करणार तरी काय?
———-
मुत्तेमवारांची हातघाई
नागपुरात कॉंग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार पाचव्यांदा नागपुरातून खासदारकीसाठी उभे आहेत. चारवेळा जिंकून आल्यानंतर या खासदाराने नागपूरच्या विकासासाठी काय केले, हा प्रश्न आहे. तरीपण यावेळेसही पाचव्यांदा नागपुरातून ते लोकसभेची लढाई लढत आहे. याआधी ते चिमुरमधून तीनवेळा निवडणूक लढले. एवढे सारे असताना या खासदाराने विदर्भात कोणते
विकास कामे केली हा प्रश्नच आहे. ज्या जनवादच्या भरोश्यावर राजकारणात काही भव्य दिव्य केले नसले तरी टिकून राहिले त्या जनवाद या वृत्तपत्राला हा खासदार चालवू शकला नाही. इतर विकासकामे तर सोडून द्या. असे असतानाही हा व्यक्ती पुन्हा खासदार बनण्याचे स्वप्न पाहात आहे. नागपूरकर त्यांना निवडून देणार का, लवकरच स्पष्ट होणार आहे.
0
छत्तीसगढमधील अपघातात १५ ठार, २० जखमी

रायपूर – छत्तीसगढमधील सुरगुजा जिल्ह्यात वाहतूक करणा-या गाडीला झालेल्या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला तर २० जण जखमी झाले आहेत.
मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला. अंबिकापूर येथून प्रतापपूरच्या दिशेने जात असलेल्या गाडीत ४० जण प्रवास करत होते. अंबिकापूरमधील लुच्छिघाट येथे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला जाऊन आदळली. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला तर २० जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.मृतांमध्ये सात महिलांचा समावेश आहे. जखमींना अंबिकापूर जिल्ह्यातील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.जखमींमध्ये तीन लहानग्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
0
विदर्भातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या

नागपूर – महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा आज म्हणजे मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता थंडावणार आहेत. महाराष्ट्रात विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे.
महाराष्ट्रात पहिल्या आणि देशात तिस-या टप्प्याचे मतदान दहा एप्रिल रोजी होणार असून, विदर्भातील दहा जागांसाठी एकूण २०१ उमेदवार रिंगणात आहेत. देशाच्या राजकरणातील प्रमुख नेत्यांचे भवितव्य या निवडणुकीत निश्चित होणार आहे. प्रथमच लोकसभेची निवडणूक लढवणारे भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार या लढतीकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. ‘आप’च्या अंजली दमानियाही नागपूरमधून निवडणूक लढवत आहेत त्यांच्यामुळे ही निवडणूक चुरशीची बनली आहे.
केंद्रीय अवजड उद्योग मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल भंडारा-गोदिंयामधून रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर भाजपचे नाना पाटोले यांचे आव्हान आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुकुल वासनिक रामटेकमधून, राज्य सरकारमधील काँग्रेसचे मंत्री शिवाजीराव मोघे यवतमाळ-वाशिममधून, संजय देवतेळ चंद्रपूरमधून रिंगणात आहेत. वर्धा, अकोला, गडचिरोली, अमरावतीमधून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आपले नशीब आजमवत आहेत. २०१ उमेदवारांमध्ये ९० अपक्ष उमेदवार असून यामध्ये १५ महिलांचा समावेश आहे. ८० नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार आहेत. एकूण १ कोटी २१ लाख ७५ हजार ६६२ मतदार या उमेदवारांचे भवितव्य निश्चित करणार आहेत. विदर्भातील दहा जागांसाठी काँग्रेसने सात, राष्ट्रवादीने तीन, भाजपने सहा, शिवसेनेने चार, सीपीआयने एक आणि बसपने सर्वच्या सर्व दहा जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.नागपूर लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक ३३ आणि अकोल्यातून सर्वात कमी म्हणजे सात उमेदवार रिंगणात आहेत. प्रचाराचा अंतिम टप्पा असल्याने सर्वच पक्षांचे प्रमुख नेते विदर्भात आपआपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करत आहेत.
देशात दुस-या टप्प्यात म्हणजे दहा एप्रिलला महाराष्ट्र दहा , ओरिसा दहा , उत्तर प्रदेश दहा, अंदमान आणि निकोबार एक, चंदीगड एक, लक्षद्वीप एक, दिल्ली सात जागा, बिहारच्या सहा, छत्तीसगड एक, हरियाणा दहा, जम्मू आणि काश्मीर एक, झारखंड चार, केरळ वीस आणि मध्यप्रदेशच्या नऊ जागांवर मतदान होईल.
0
देशभरातून १९५ कोटी, २६ लाख लिटर मद्य जप्त

नवी दिल्ली – उमेदवारांच्या प्रचार खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने नेमलेल्या निवडणूक निरिक्षकांच्या वेगवेगळया पथकांनी देशभरातून आतापर्यंत १९५ कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त केली आहे.
निवडणूक काळात आंध्रप्रदेशात सर्वाधिक पैशांचे गैरव्यवहार सुरु असून, आंध्रप्रदेशातून आतापर्यंत ११८ कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. तामिळनाडूतून १८.३१ कोटी, महाराष्ट्रातून १४.४० कोटी, उत्तरप्रदेशातून १०.४६ कोटी, पंजाबमधुन चार कोटी त्याशिवाय अन्य राज्यांमधुन काही लाखांच्या रक्कमा जप्त केल्या आहेत. पैशाबरोबरच मद्यही मोठया प्रमाणात जप्त करण्यात आले आहे. देशभरातून २६.५६ लाख लिटर मद्य आणि ७० किलो हेरॉईजन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाने वेगवेगळया राज्यांमध्ये ११,४६९ प्राथमिक तक्रारी दाखल केल्या आहेत. निवडणूक काळात काळया पैशाचा वापर रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष निरिक्षकांची नियुक्ती केली आहे.













