
इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांची बॉम्बस्फोटाद्वारे हत्या करण्याचा कट गुरुवारी फसला. मुशर्रफ ज्या मार्गावरुन सुनावणीसाठी न्यायालायात जाणार होते त्या मार्गावर दहशतवाद्यांनी स्फोटके पेरुन ठेवली होती.
मुशर्रफ यांचा वाहनाताफा जाण्याच्या वीस मिनिटे आधी येथे स्फोट झाल्याने मुशर्रफ या हल्ल्यातून बचावले अशी माहिती पोलिस अधिकारी लियाकत नियाझी यांनी दिली. इस्लामाबादच्या बाहेर असलेले लष्करी रुग्णालय सध्या मुशर्रफ यांचे निवासस्थान आहे. जानेवारीपासून मुशर्रफ यांचे तेथे वास्तव्य आहे. मुशर्रफ यांच्यावर पाकिस्तानात देशद्रोहाच्या आरोपाखाली खटला सुरु आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी जाताना मुशर्रफ यांची बॉम्बस्फोटामध्ये हत्या करण्याचा कट दहशतवाद्यांनी आखला होता.
Archive for April, 2014
0
मुशर्रफ यांच्या हत्येचा कट फसला
0
आयपीएल दुसरा टप्पा २ मेपासून भारतात, अंतिम लढत मुंबईत

नवी दिल्ली- आयपीएलच्या सातव्या हंगामाची अंतिम लढत मुंबईत एक जूनला वानखेडे स्टेडियमवर रंगेल. आयपीएलचा दुसरा टप्पा भारतात होणार असून त्याला दोन मेपासून सुरुवात होईल, असे बीसीसीआयने गुरुवारी जाहीर केले.
मुंबई इंडियन्स गतविजेता असल्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) अंतिम लढत खेळवण्याचा मान मिळाला. ‘फायनल’बरोबर मुंबई इंडियन्सच्या लढती तसेच ‘क्वालिफायर २’ लढतही (३० मे रोजी ) मुंबईत होईल. मुंबईतील पहिली लढत तीन मे रोजी वानखेडेवर मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात रंगेल. आयपीएलच्या दुस-या टप्प्यात ३६ सामने आणि चार ‘प्ले ऑफ’ लढतींचा समावेश आहे. पहिला टप्पा संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) १६ ते ३० एप्रिलदरम्यान खेळला जाणार आहे. सार्वत्रिक दुसरा टप्पा बांगलादेशात तसेच तिसरा टप्पा भारतात होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र यावेळची आयपीएल दोन टप्प्यांतच होईल. तसेच दुसरा टप्पा भारतात होईल, यावर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले.
0
राहुल गांधींची बुधवारी प्रचारसभा

यवतमाळ – लोकसभा निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी ४ एप्रिल रोजी यवतमाळच्या दौºयावर आहेत.
यवतमाळ-वाशीम, हिंगोली व चंद्रपूर लोकसभेकरीता उभ्या असलेल्या कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ येथील पोस्टल मैदानावर आयोजीत सभेला ते संबोधनार आहे. अशी माहिती आज बुधवारी जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने आयोजीत पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कॉंग्रेसचे उमेदवार शिवाजीराव मोघे, जिल्हाध्यक्ष आ़ वामनराव कासावार आदी उपस्थित होते़ ४ एप्रिलला सकाळी १०़४५ वाजता राहुल गांधींच्या सभेला प्रारंभ होणार असल्याचे आ़ कासावार यांनी सांगितले़ या प्रचारसभेच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष आ़ माणिकराव ठाकरे आदी नेते मंडळी उपस्थित राहणार आहे. यवतमाळ-वाशीम लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव मोघे, हिंगोलीचे राजीव सातव व चंद्रपूरचे संजय देवतळे या तिन्ही उमेदवारांची ही संयुक्त प्रचारसभा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ६ एप्रिल रोजी कृषी मंत्री शरद पवार यांची मंगरूळपीर येथे जाहीर प्रचारसभा होत असल्याचे शिवाजीराव मोघे यांनी सांगितले. या सभेला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले.
0
बिबट्याची कातडी जप्त , आंध्रप्रदेशात शिकार

पांढरकवडा (यवतमाळ )- आंध्रप्रदेशातून विक्री करण्यासाठी येत असलेली बिबट्याची कातडी अत्यंत शिताफीने वनविभागाने जप्त करून तिघांना अटक केली आहे. ही कारवाई आज पाटणबोरीनजीक करण्यात आली. रामू कुमरे, सुखदेव खडके, प्रमोद मेश्राम (रा. मारेगाव बंडल),असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.
आंध्रप्रदेशातील काही शिकारी १० लाख रुपयात बिबट्याची कातडी महाराष्टÑात विकणार असल्याची गुप्त माहिती वनविभागाच्या सूत्रांना मिळाली. त्यावरून वनविभागाच्या कर्मचाºयांनी व्यापारी बनून १० लाख रुपयात कातडीचा सौदा केला. दुचाकीने तिघे महाराष्टÑ येत असताना पिंपळखुटी चेक पोस्ट वर रामू कुमरे, सुखदेव खडके, प्रमोद मेश्राम यांना अडवून तपासणी केली असता त्यांच्याजवळ बिबट्याची कातडी असल्याचे आढळून आले. वनविभागाच्या पथकाने यावेळी बिबट्याची कातडी, दुचाकी क्रमांक एम.एच. २९ आर/ ९९२८ वनविभागाने जप्त केली. आरोपी विरूध्द भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत ९, २९, ४४, ४८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ महिन्यापूर्वी आंध्रप्रदेशात शिकार केल्याचे प्राथमिक चौकशीत आरोपींनी सांगितले. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी वाय.डी. नागुलवार, वनपाल दिपेश लोखंडे, वनकर्मचारी कुन्नेनवार, भोयर, मिलमिले, अश्विन राठोड यांनी केली.
0
स्कुलबसच्या धडकेत फौजदार ठार

यवतमाळ – स्कुलबसने दुचाकीला धडक दिल्याने फौजदार जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी १०.३० वाजता वरुड येथे घडली. भाऊराव हनुमंत करे (५७) असे मृतकाचे नाव असून ते दिग्रस पोलिस ठाण्यात सहा. पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. आज पुसद येथे न्यायालयात ते साक्ष देण्यासाठी आपल्या दुचाकीने जात होते. अशातच समोरुन आलेल्या स्कुल बसने दुचाकीला धडक दिली. ही धडक एवढी जबर होती की, यामध्ये करे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घडनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. या प्रकरणी स्कुल बस चालकाविरुद्घ गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. या घटनेने दिग्रस येथे शोककळा पसरली होती.
0
मंदिरात प्रेमीयुगलाला बदडले

यवतमाळ – राममंदिरात असभ्य वर्तुणुक करणाºया प्रेमीयुगलाला नागरिकांनी बदडल्याची घटना आज बुधवारी दुपारी ३ वाजता नेर येथे घडली. नागरिकांनी प्रेमीयुगलाला पोलिसांच्या स्वाधिन केले. पिंप्री कलगाव येथील १९ वर्षीय युवकाचे मंगरुळ चव्हाळा येथील २१ वर्षीय युवतीसोबत प्रेमसबंध आहे. अमरावती येथे आयटीआयमध्ये ही युवती शिक्षण घेत असून आज त्या दोघांनीही आज दुपारी नेर येथे भेटण्याचा बेत आखला होता. उन्हाळा असल्याने दुपारी ३ वाजता बसायचे कुठे म्हणून त्यांनी राममंदिराचा सहारा घेतला. यावेळी मंदिरात लहान मुले खेळण्यासाठी आलेल्या मुलांना या प्रेमीयुगलाने हकलुन दिले. या मुलांनी हा प्रकार परिसरातील नागरिकांना सांगितला. त्यावरुन नागरिकांनी मंदिराज जाऊन पाहीले असता ते मंदिरात असभ्य वर्तुणूक करीत होते. या वेळी नागरिकांनी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिले.त्यामुळे नागरिकांनी त्या दोघांनाही चांगला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधिन केले. या प्रकरणी नेर पोलिसांनी प्रतीबंधात्मक कार्यवाही केली.
0
ताज हॉटेलजवळ १६ जिवंत काडतुसं

मुंबई- मुंबईतल्या ताज महाल हॉटेलजवळ आज दुपारी १६ जिवंत काडतुसं सापडल्यानं एकच खळबळ उडाली. ही काडतुसं नेमकी कुठून आली, हा घातपाताचा प्रयत्न होता का, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. गेट वे ऑफ इंडिया इथल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी पेव्हर ब्लॉकच्या खाली दुपारी १२च्या सुमारास १६ जिवंत काडतुसं सापडली. ती ०.३२ बोअरच्या परवानाधारक रिव्हॉल्वरची असल्याचं अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितलं. या काडतुसांची माहिती एका महिलेनं पोलिसांना दिली. ही काडतुसं कुलाबा पोलिसांनी जप्त केली असून ती कुणाच्या रिव्हॉल्वरची आहेत, याचा शोध सुरू आहे.
0
चिलीमध्ये भूकंप, पाच जणांचा मृत्यू
सॅंटिगो – दक्षिण अमेरिकेजवळ असणा-या उत्तर चिलीला मंगळवारी रात्री ८.२ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपानंतर चिलीच्या समुद्रात सौम्य स्वरुपाच्या त्सुनामीच्या लाटा उसळल्याने पॅसिफिक किनारपट्टीजवळ रहाणा-या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. या भूकंपामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून, काही प्रमाणात वित्तहानी झाली आहे. अनेक भागात वीज पुरवठा खंडीत झाला असून, दरडी कोसळल्याने रस्ते बंद झाले आहेत. विमानतळाचेही काही प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. या भूकंपाचा फायदा घेऊन, लिक्यूक्यू शहरातील तुरुंगातून ३०० महिला कैदी पळून गेल्या. पडझड झालेल्या भागात लुटमारीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांच्या मदतीला लष्कराच्या विशेष तुकडया पाठवण्यात आल्या आहेत. पेरु, बोलिव्हीया पर्यंत या भूकंपाचे हादरे जाणवले. येथील अनेक इमारती भूकंपाच्या धक्क्याने हादरल्या. भूकंपानंतर दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांसाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला होता. नंतर तो मागे घेण्यात आला. आता फक्त उत्तर चिलीसाठी त्सुनामीचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्रातही भूकंपाचे धक्के महाराष्ट्रातील कोयना आणि पाटण परिसर सकाळी साडेसातच्या सुमारास सौम्य भूकंपाच्या धक्क्याने हादरला. कोकणात चिपळूण, संगमेश्वर भागातही काही सेकंद भूकंपाने जमीन हादरत असल्याचे जाणवले.
0
नितीश कटारा हत्याकांड, दोषींची जन्मठेप कायम

नवी दिल्ली – संपूर्ण देशात गाजलेल्या नितीश कटारा हत्याकांड प्रकरणातील तिघा दोषींना सत्र न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवण्याचा निकाल बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाने दिला. ही हॉनर किलिंगमधुन झालेली हत्या असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
विकास यादव, विशाल आणि सुखदेव यादव यांच्या शिक्षेवर २५ एप्रिलला सुनावणी होणार आहे. उत्तर प्रदेशातील प्रभावशाली नेते डी.पी.यादव यांचा मुलगा विकास यादव, त्याचे भाऊ विशाल, आणि सुखदेव या तिघांनी नितीश कटाराचे अपहरण करुन त्याची हत्या केली होती.
नितीश कटाराचे विकास यादवची बहिणी भारती यादव बरोबर प्रेम प्रकरण सुरु होते. या प्रेमाला यादव कुटुंबाचा विरोध होता. त्यामुळे १६ फेब्रवारी २००२ च्या रात्री नितीशचे अपहरण करुन त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. २००८ मध्ये सत्र न्यायालयाने या हत्ये प्रकरणी तिघांना दोषी धरुन जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या शिक्षेला तिघांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. दोषींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी नितीश कटाराची आई निलम कटारा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
0
हवाई सफर केवळ एक रुपयात
मुंबई- बजेट एअरलाइन्स असलेल्या स्पाइस जेटने हवाई क्षेत्रातील स्पर्धेला नवे वळण दिले आहे. कंपनीने मंगळवारी केवळ एक रुपयाच्या नाममात्र आधार भाडयावर (कर आणि इतर शुल्क वगळता) मर्यादित कालावधीसाठी तिकिटांची घोषणा केली. खास सुट्टीत चालवण्यात येणा-या नव्या मार्गावरील या तिकिटांवर एक जुलैपासून २८ मार्च या दरम्यान प्रवास करता येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. स्पाइस जेटच्या या आक्रमक सवलतीने देशांतर्गत विमान कंपन्यांमधील स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे. ऐन सुट्टीच्या हंगामात स्पाइसकडून अशी आकर्षक सवलत जाहीर केल्याने इतर कंपन्या काय प्रतिसाद देतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एक रुपयातील प्रवासाव्यतिरिक्त कंपनीने ७९९ रुपये आणि १४९९ रुपये भाडे असलेल्या दोन योजना आणल्या आहेत. या योजनेंतर्गत गुरुवापर्यंत प्रवाशांना तिकिटांचे बुकिंग करता येणार आहे. याआधीच्या दोन सवलत योजनांना प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. या सवलतीतूनही नवीन प्रवाशांना आकर्षित करण्यात यशस्वी होऊ असा विश्वास स्पाइस जेटचे मुख्य परिचालन अधिकारी संजीव कपूर यांनी व्यक्त केला
0
मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून आमंत्रण
नवी दिल्ली- प्रत्येक मतदाराने मतदान करावे यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाबरोबरच प्रत्येक राज्यातील आणि जिल्ह्यातील निवडणूक अधिकारी प्रयत्न करत आहेत. यासाठी मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम आयोगाने हाती घेतले आहेत. यामध्ये आता एका नाविन्य पूर्ण उपक्रमाची भर पडली आहे. मध्य प्रदेशमधील काही मतदारांना खुद्द निवडणूक अधिका-याने मतदानासाठीचे आमंत्रण पाठवले आहे.
मध्य प्रदेशमधील शिवनी जिल्ह्यात दहा एप्रिल रोजी मतदान होत आहे. यासाठी समीरा बेगम यांना मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून आमंत्रण आले आहे. या पत्रात मतदान करणे किती महत्त्वाचे आहे हे सांगण्यात आले आहे. याआधी मी कधीच मतदान केले नव्हते. मात्र यंदा मी नक्की मतदान करणार असल्याचे समीरा यांनी सांगितले.
शिवनी जिल्ह्याला स्वतःचा असा लोकसभा मतदारसंघ नाही. या जिल्ह्यातील विधानसभेचे चार मतदारसंघ मंडला आणि बालाघाट जिल्ह्यांत विभागले आहेत. जिल्ह्यातील अनेक मतदारांना अशा प्रकारचे आमंत्रण पाठवण्यात आले आहे. अर्थात हे आमंत्रण फक्त एक कागद नाही. ज्याप्रमाणे एखाद्याला लग्नपत्रिका पाठवली जाते त्याप्रमाणेच समीरा बेगम यांच्यासारख्या अनेक मतदारांना आमंत्रण पाठवण्यात आल्याचे जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियानका दास यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच जिल्हापातळीवर मतदान करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड एलेक्टोरल पार्टिसिपेशन(एसव्हिईईपी) अभियान सुरु केले आहे. यात प्रामुख्याने महिला, नवे मतदार आणि ग्रामिण भागातील मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अभियानाअंतर्गत मतदारांचे अधिकार, मतदार ज्या ठिकाणी राहतात तेथील जवळचे मतदान केंद्र, मतदानाची तारीख आणि वेळ आदींची माहिती दिली जाते. त्याचबरोबर मतदारांना त्यांचे ओळखपत्र देणे, ‘नोटा’ (उमेदवार नाकारण्याचा अधिकार) याची ओळख करुन दिली जाते. ‘एसव्हीईईपी’ हा उपक्रम २०१०च्या विधानसभा निडणुकीमध्ये सर्वप्रथम राबवण्यात आला होता. गेल्या तीन वर्षांमध्ये या उपक्रमाला मोठे यश मिळाल्याचे निवडणूक अधिका-यांनी सांगितले. यामुळे विधानसभा निवडणुकीत १० ते ३५ टक्क्यांपर्यंत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. विशेष म्हणजे यात महिला आणि युवकांचा अधिक समावेश असल्याचे अधिका-यांनी सांगितले. खुद्द शिवनी जिल्ह्यात २०१३मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी पाच टक्क्यांनी वाढली होती.
महिलांनो मॅचिंग टिकली, लिपस्टिक नको
कोलकाता – लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसे सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीत मोठ्या प्रमाणात व्यस्त झालेले दिसून येत आहेत. देशात सर्वत्र पक्षांच्या प्रचारसभा सुरु आहेत. या प्रचारसभेमध्ये एकमेकांवर आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. या दरम्यान नेत्यांच्या आक्षेपार्ह विधांनांमुळे अनेक पक्षांना अडचणींनाही सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी पक्षाकडून काय करावे आणि काय करु नये अशी एक सूचना यादी तयार करण्यात आली आहे.
महिलांनी लिपस्टिक लावू नये तसेच त्यांनी साडीवर मॅचिंग टिकली लावू नये. त्याचबरोबर पुढील दोन महिन्यासांठी पुरुषांनी रात्री उशिरापर्यंत कॅरम खेळू नये, दारु पिऊ नये अशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. निवडणूकीत ममता बॅनर्जी पंतप्रधानपदाच्या प्रबळ उमेदवार मानल्या जात आहेत. त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होणार नाही यासाठी पक्षाकडून काळजी घेतली जात आहे. ममता यांच्या आदेशानंतरच कार्यकर्त्यांसाठी ही सूचनांची यादी तयार करण्यात आली. यात पक्षाने लोकांशी विन्रमतेने वागा, कोणत्याही गोष्टीबाबतचा दुराभिमान बाळगू नका तसेच उन्हाळ्यात सनग्लासेस घालू नका या आणि अशा ब-याच सूचना या यादीमध्ये देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर प्रचाराच्या वेळी महिलांनी मोठ्या प्रमाणात मेकअप करु नका, साधी रहाणी उच्च विचारसरणी असू द्या असेही यात सांगण्यात आले आहे
१६२ लोकांना अन्नातून विषबाधा
भंडारा – पवनी तालुक्यातील मोहरी येथे स्वागत समारंभादरम्यान गावातील १६२ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. सर्व रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र आसगाव व ग्रामीण रुग्णालय पवनी येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे.
मोहरी येथील माधव कोरे यांचा मुलगा नितेश कोरे याचे ३० मार्च रोजी नागभिड तालुक्यातील बोथली येथे लग्न होते. लग्नानंतर ३१ मार्च रोजी स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गावकऱ्यांसह कोरे यांच्या घरी असलेल्या पाहुण्यांनी रात्रीचे जेवण आटोपले. जेवण आटोपल्यानंतर गावातील लोक आपआपल्या घरी परतले. दरम्यान मंगळवारी पहाटे त्यांना हगवण, उलटीचा त्रास सुरू झाला. १६२ रुग्णांना तात्काळ आसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तर पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात लोकेश कोरे, लक्ष्मण कोरे, ताराचंद कोरे, नितेश कोरे, कल्पना कोरे, नुतन कोरे, सुरेखा कोरे, पंडीत कांबळे, चंद्रहास ब्राह्मणकर, सुनंदा ब्राह्मणकर, प्रणय ब्राह्मणकर, हिरामण कोरे, रसिका कोरे, दुर्योधन कोरे यांच्यासह १७ रुग्णांना दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक नसल्याचे सांगितले आहे. परंतु अद्यापही गावातील नागरिकांना हगवण व उलटी सुरूच असून रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राजीवजींच्या मारेकऱ्यांना जन्मठेपच
नवी दिल्ली, वृत्तसंस्था – माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या तीन मारेकऱ्यांची फाशी शिक्षा जन्मठेपेत परावर्तित करण्याच्या आदेशावर सुप्रीम कोर्ट ठाम राहिले आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने दाखल केलेली फेरविचार याचिका कोर्टाने फेटाळली आहे. खलिस्तानीवादी दहशतवादी देविंदरपालसिंग भुल्लरची फाशी रद्द करण्याच्या पाठोपाठ हा निर्णय आला आहे.
संथान, मुरुगन आणि पेरारीवलन या तीन मारेकऱ्यांच्या फाशीची शिक्षा सुप्रीम कोर्टाने १८ फेब्रुवारीला जन्मठेपेत परावर्तित केली आहे. राष्ट्रपतींकडे पाठविलेल्या दयेच्या अर्जावर योग्य वेळेत निर्णय न झाल्याने हा निकाल दिल्याचे कोर्टाने म्हटले होते. कोर्टाच्या या निकालानंतर राजकीय पटलावर विविध आरोप-प्रत्यारोप झाले. त्यानंतर केंद्र सरकारने फेरविचार याचिका केली होती. सरकारच्या याचिकेचा अभ्यास केल्यानंतर त्यात ठोस काहीही नसल्याचे स्पष्ट झाल्यानेच याचिका फेटाळल्याचे सरन्यायाधीश पी. सदाशिवम, न्या. रंजन गोगोई, न्या. एस. के. सिंग यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. दरम्यान, तीन न्यायाधीशांच्या पीठाने याचिकेतील मुद्द्यांचा नीट अभ्यास केला नसल्याची प्रतिक्रिया केंद्र सरकारने दिली आहे. या प्रकरणात कायद्यातील तरतुदी, त्यातील गुंतागुंत अधिक व्यापक होती. त्यामुळे, शिक्षा बदलण्याचा निकालही, तीनऐवजी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने घ्यायला हवा होता, असा युक्तिवादही याचिकेच्या सुनावणीदरम्यान सरकारने केला.













