
नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या जागी कुमार विश्वास यांची संयोजकपदी नेमणूक करावी अशी मागणी आपच्या काही कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. यासाठी रविवारी दिल्लीतील जंतर मंतर येथे आपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे.
आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ७० सदस्य आहेत. आपने त्यांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, ७० सदस्यांना पक्षाच्या संयोजकला पदावरुन हटवण्याचा अधिकार आहे. या बैठकीत यासंबधी चर्चा होण्याची शक्यता आहे.मात्र कुमार विश्वास या बैठकीला हजर राहणार नसल्याचे समजते. दरम्यान, केजरीवाल यांना हटवून संयोजकपदी कुमार विश्वास यांच्या नेमणूकीची मागणी करणा-या आपच्या नेता अश्विनी उपाध्याय यांची रविवारी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकऱणी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे
Archive for April, 2014
0
‘आप’च्या केजरीवाल हटाव मागणी
0
काँग्रेसचा विश्वास कर्तृत्वावर; ढोंगीपणावर नाही! – सोनिया गांधी
भंडारा, नागपुरात विशाल सभा; विदर्भात काँग्रेसमय वातावरण
नागपूर – काँग्रेसचा विश्वास केवळ कर्तृत्वावर आहे, ढोंगीपणावर नाही. काँग्रेसला विरोधी पक्षांसारखा न केलेल्या कामांचा ढोल वाजवता येत नाही आणि दिखावाही करता येत नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांनी केली आहे.
दि. 5 एप्रिल 2014 रोजी काँग्रेस अध्यक्षांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीरिपा-बीआरइएम आघाडीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल तसेच नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विलास मुत्तेमवार व रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुकूल वासनिक यांच्या प्रचारार्थ अनुक्रमे लाखनी व चिखली-कळमना येथे जाहीर सभांना संबोधित केले. या सभांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रफुल्ल पटेल, नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विलास मुत्तेमवार, रामटेक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुकूल वासनिक आदी नेते उपस्थित होते.
या दोन्ही सभांमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसने केलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या की, पंडित नेहरूंनी देशाच्या औद्योगिकरणाची बीजे रोवली. इंदिरा गांधींनी बॅंकांचे राष्ट्रीयकरण करून गावोगावी बॅंक उघडल्या. राजीव गांधींनी संगणक आणि संचार क्रांतीची मुहूर्तमेढ केली. भारत आज जगातील एक शक्तिशाली देश म्हणून ओळखला जातो, त्याचे मूळ काँग्रेसने केलेल्या अनेक कामांमध्ये दडले आहे. विरोधी पक्ष कितीही ढोल बडवत असला तरी त्यांच्याकडे कोणतेच धोरण नाही. काँग्रेस सामाजिक एकता व सद्भावनेवर विश्वास ठेवणारा पक्ष असून, विरोधी पक्षांनी समाजात फूट पाडण्याशिवाय दुसरे काहीच केलेले नाही. गोंधळ घालणे आणि काँग्रेसच्या क्रांतिकारी निर्णयांना विरोध करणे, हेच त्यांचे एकमेव काम आहे. अशा मानसिकतेपासून देशाला वाचविण्याची गरज असल्याचे काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी म्हणाल्या.
सट्टा बाजार : मोदींला १.३० पैसे तर राहुल गांधींसाठी ३ रूपये
![]()
नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकांसाठी मुंबई सट्टा बाजार आत्तापासूनच तापू लागला असल्याचे व आजच्या तारखेला ९० कोटी रूपयांचे बेटींग घेतले गेल्याचे वृत्त आहे. वास्तविक निवडणुक काळात मतदानाच्या तारखा जाहीर झाल्यानंतर बेटींगची सुरवात होत असते. मात्र भाजपने मोदींचे नांव पंतप्रधानपदासाठी जाहीर केले आहे आणि भाजप व काँग्रेस यांच्यातच थेट सामना होणार असल्याचे आता स्पष्ट झाल्याने सट्टेबाजांनी सट्टा लावण्यास सुरवात केली आहे. शुक्रवारी बेटींग ओपन करण्यात आले असल्याचेही समजते.
यात पंतपअधानपदी मोदींच्या नावाला रूपयाला १.३० पैसे असा दर निघाला आहे. हाच दर राहुल गांधींसाठी ३ रूपये, मनमोहनसिंग यांच्यासाठी १२ रूपये तर सोनिया गांधी यांच्यासाठी १३ रूपये असा आहे. मुंबई अहमदाबाद, जयपूर, इंदोर, कराची व दुबईतून या सट्टावर पैसे लावले जात असल्याचेही समजते. अर्थात निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील तेव्हा बेटींगचे दरही बदलतील असेही सांगितले जात आहे. सट्टा खेळणारे आणि सट्टा घेणारे दोघेही बारकाईने राजकीय प्रवाह, निवडणुक, राजकीय डावपेच यांवर बारकाईने नजर ठेवून असतात असे तज्ञ सांगतात.
लोकसभा निवडणुकांत भाजप २७२ जागा मिळवेल यासाठीचा दर सध्या रूपयाला दीड रूपया असा निघाला आहे. काँग्रेससाठी हा दर ५ रूपये आहे. देशात पाच राज्यात या वर्षात होत असलेल्या विधानसभेसाठी चार राज्यांतील निवडणुकांसाठी सटटा सुरू झाला आहे. सट्टेबाजांनी मिझोराममधील निवडणुकांत कांहीही रस दाखविलेला नाही. उर्वरित चार राज्यात दोन ठिकाणी भाजप तर दोन ठिकाणी काँग्रेस सत्तेवर आहे. शील दीक्षित यांच्या दिल्लीसाठी भाजपचा दर अडीच रूपये तर काँग्रेससाठी हाच दर ४.६० पैसे इतका आहे. मध्यप्रदेशात भाजपसाठी २ रूपये तर काँग्रेससाठी साडेचार रूपये, छत्तीसगढ मध्ये भाजपसाठी २.१० पैसे तर काँग्रेससाठी साडेचार रूपये व राजस्थानात हाच दर भाजपच्या वसुंधरा राजेंसाठी सव्वातीन रूपये तर काँग्रेससाठी ४.६० पैसे असा असल्याचेही सागितले जात आहे.
0
बदला घ्यायची हीच वेळ – अमित शहा

नवी दिल्ली – उत्तरप्रदेशचे भाजप प्रभारी आणि नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अमित शहा यांनी मुजफ्फरनगर जवळच्या दंगल पिडीत जाट गावात जातीयवादी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचे समोर आले आहे.
मुजफ्फरनरपासून जवळच असलेल्या राजहार गावामध्ये घेतलेल्या निवडणूक प्रचारसभेमध्ये बोलताना शहा यांनी तुम्हाला बदला घ्यायचा असेल तर, भाजप उमेदवाराला मतदान करा. तुम्ही तलवारी किंवा अन्य अस्त्रांनी हा विषय सोडवू शकत नाही असे वादग्रस्त विधान केले होते. आज भाजपला मतदान करुन तुम्ही बदला घेऊ शकता. तुमच्या बरोबर न्याय झालेला नाही ही बदला घ्यायची वेळ आहे. मुघल शासनाच्या काळात तलवारी आणि अस्त्रांनी सूड उगवला जायचा पण आता तुम्ही मतदानाने बदला घेऊ शकता. त्यांची योग्य जागा दाखवण्यासाठी तुम्ही योग्य ठिकाणी बटण दाबा असे वादग्रस्त विधान शहा यांनी केले आहे. अमित शहा यांच्या विधानावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. काँग्रेस नेते सत्यव्रत चर्तुवेदी यांनी भाजपला काही प्रश्न विचारले आहेत. सोनिया गांधी यांनी शाही इमामांची भेट घेतली तर, भाजपने काँग्रेस जातीयवादाचे राजकरण करत असल्याचा आरोप केला. आता भाजपचे नेते भावना भडकविणारी विधाने करत आहेत. अमित शहा यांच्या विधानावर आता भाजपची काय भूमिका आहे असा सवाल चर्तुवेदी यांनी केला. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी निवडणूक प्रचारामध्ये स्वत:ला जातीयवादापासून दूर दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचेच निकटवर्तीय अमित शहा यांच्या या विधानामुळे नरेंद्र मोदी अडचणीच सापडले आहेत.
0
‘अब की बार मोदी सरकार’ अडचणीत

अलहाबाद – दूरचित्रवाहिनी आणि सोशल मिडीयावर वारंवार दाखवली जाणारी ‘अब की बार मोदी सरकार’ ही जाहीरात अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. या जाहीरातीतील अब की बार मोदी सरकार या घोषवाक्यावर अभिनव यादव नावाच्या एका तरुणाने आक्षेप घेतला आहे.
मोदी ही गुजरातमधली एक जात असून भाजपच्या या घोषवाक्यातून फक्त त्या जातीचा प्रचार होत असल्याचा आक्षेप या तरुणाने घेतला आहे. अभिनवने या घोष वाक्याविरोधात निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार नोंदवली आहे. भारत एक धर्मनिरपेक्ष देश असून, जाहीरातीतील या घोषवाक्यामुळे जातीच्या राजकरणाला प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे या घोषवाक्यावर बंदी आणण्याची मागणी अभिनवने निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोगाने अभिनवच्या तक्रारीची दखल घेतली असून, त्याने नोंदवलेल्या आक्षेपांचा तपास सुरु केला आहे.
0
देवयानी खोब्रागडे यांच्या विरोधात आरोपपत्र?

नवी दिल्ली- आदर्श घोटाळ्याप्रकरणी भारतीय परदेशी सेवेत असलेल्या देवयानी खोब्रागडे आणि उत्तम खोब्रागडे यांच्यावर सीबीआय आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. आदर्श सोसायटीमध्ये खोटे प्रतिज्ञापत्र सादर करुन घर घेतल्याप्रकरणी त्याच्यावर आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार खोब्रागडे यांनी खोटी माहिती सादर करून घर मिळवल्याचे पुरावे सापडले आहेत. माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे हे म्हाडेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. याप्रकरणी चौकशी करणा-या सीबीआयने २५ जणांच्या विरोधात चौकशी सुरु केली आहे. आदर्श सोसायटीमध्ये या २५ जणांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करुन घर मिळवल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. आदर्श सोसायटीमधील १०२पैकी २५ घरे ही बेकायदेशीर असल्याचे या प्रकरणी नेमण्यात आलेल्या न्यायमूर्ती जे.ए.पाटील यांच्या समितीच्या अहवालात म्हटले आहे.
0
मध्यप्रदेशात भाजपने वाटले पैसे, निवडणूक आयोगाकडे तक्रार

भोपाळ – मध्यप्रदेशात एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष मतदारांना पैशांचे वाटप करत असल्याची तक्रार कॉंग्रेस पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केलीय. मध्यप्रदेशातील भिंड लोकसभा मतदारसंघात भाजपने मतदारांना पैसे वाटले असल्याचे सांगत मध्यप्रदेशचे विरोधी पक्षनेते सत्यमेव कटारे यांनी यासंबंधी आयोगाकडे पुरावे सादर केले. ‘गटजोड सुख समृद्धी वेल्फेअर सोसायटी’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मतदारांना पैसे वाटण्यात आल्याचा आरोप कटारे यांनी केला. रेवा येथील मतदारांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा केल्याचा आरोप त्यांनी केला. हे आचारसंहितेचे उल्लंघन असून, हा गंभीर गुन्हा असल्याचे कटारे म्हणाले. मागील विधानसभा निवडणुकांमध्येही भाजपने असेच पैसे वाटले होते’ असे कटारे यांनी सांगितले.
0
देशवासीयांना अधिकार देऊन परिवर्तन घडवायचे – गांधी

यवतमाळ, – देशातील गरीब जनता, शेतकरी आणि महिलांना शाश्वत अधिकार देऊन आम्हाला व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणायचे आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे राष्टÑीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले.
यवतमाळ-वाशीमचे उमेदवार शिवाजीराव मोघे, चंद्रपूर-आर्णी संजय देवतळे व हिंगोलीचे राजीव सातव यांच्या प्रचारार्थ पोस्टल मैदानात आयोजीत सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे महाराष्टÑाचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, उमेदवार शिवाजीराव मोघे, संजय देवतळे राष्टÑवादीचे आ. संदीप बाजोरीया, जोगेंद्र कवाडे आदी मंचावर उपस्थित होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, काँग्रेस हा पक्ष नसून विचारधारा असल्याने ती मिटवायला निघालेलच मिटून जातील.ज्या गुजरात मॉडेलचा उदोउदो केला जात आहे, त्यापेक्षा महाराष्टÑ राज्य सर्वच बाबतीत कितीतरी पटीने आघाडीवर असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. मोदींनी भाजपाची सत्ता असलेल्या राज्याचा विकासदर बघावा आणि आत्मपरीक्षण करावे असे ते म्हणाले. देशातील शेतकºयांना ७० हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. महाराष्टÑाला त्यातील चार हजार कोटी नुकतेच मंजूर करण्यात आले. मात्र मोदी ज्या गुजरातची गोष्ट करतात, तेथील शेतकºयांची तब्बल तीन हजार एकर जमीन टाटांच्या प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आली. त्याचा मोबदलाही अनेक शेतकºयांना मिळाला नाही. काँग्रेसचे सरकार केंद्रात सत्तेत आल्यास जाहिरनाम्यात वचन दिल्याप्रमाणे नागरिकांना आरोग्याचा अधिकार, पेन्शनचा अधिकार लागू केला जाईल असे ते म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना दोन्ही राज्यांच्या तुलनात्मक विकासदराबाबतच समोरासमोर खुली चर्चा करण्याचे आव्हान दिले. प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे यांनी देशात पुन्हा काँग्रेसच सत्तेवर येईल आणि महाराष्टÑात काँग्रेस आघाडीला किमान ३० ते ३५ जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला. पिरीपाचे जोगेंद्र कवाडे यांनी नरेंद्र मोंदीवर हल्लाबोल करून, गुजरातमध्ये माणुसकीला काळीमा फासणारे देशात सत्तेत आल्यास भारत उध्वस्त होईल, अशी भीती व्यक्त केली. कार्यक्रमाचे निवेदन आ. वसंत पुरके यांनी केले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
तीन आरोपींना फाशी

मुंबई – शक्ती मिलच्या आवारात महिला पत्रकार तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या खटल्यातील तिघा आरोपींना अखेर या गुन्ह्याच्या पुनरावृत्तीसाठी सेशन्स कोर्टाने शक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली. तर चौथ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सेशन्स कोर्टाच्या प्रधान न्या. शालिनी फणसाळकर जोशी यांनी आयपीसी कायद्यातील नव्या कलम ३७६ (ई) या अंतर्गत विजय जाधव (१९), कासिम बंगाली (२१) व मोहम्मद सलीम अन्सारी (२८) या तिघा आरोपींना दोषी गुरुवारी दोषी ठरविले होते. आज या आरोपींचे म्हणणे ऐकल्यानंतर कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली आहे. ही त्यांची दुसरी शिक्षा ठरणार असून या अगोदर २१ मार्चला तिघांनाही कोर्टाने टेलिफोन ऑपरेटरवरील बलात्काराच्या खटल्यात दोषी ठरवून जन्मठेप दिली आहे. तसेच या प्रकरणातील चौथा आरोपी सिराज खान याला जन्मपेठेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
0
नऊ महिन्यांच्या बालकावर खुनाचा गुन्हा

इस्लामाबाद – नऊ महिन्यांचा मुलगा आणि खुनाचा आरोपी! आश्चर्य वाटले ना, पण पाकिस्तानात हे घडले आहे. एका नऊ महिन्याच्या चिमुकल्यावर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवला आहे.
पाकिस्तानातील लाहोर शहरात ही अजब घटना घडली आहे. ज्या वयात मुलाला धड बसता येत नाही, त्या वयात मुसा नावाच्या एका चिमुकल्यावर पोलीस दलावर हल्ला केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. हे प्रकरण इथवरच संपले असे नाही. मुसावर खटलाही दाखल करण्यात आला असून त्याला सुनावणीसाठी एकदा न्यायालयातही हजर करण्यात आले आहे. कळस म्हणजे, जिल्हा न्यायालयाने मुसाचा जबाबही नोंदवला असून १२ एप्रिलपर्यंत जामिनही दिला आहे. मुसा आणि त्याचे वडील अहमद यांना लाहोरच्या मुस्लिम टाऊन भागातून अटक करण्यात आली होती. या प्रकरणात मुसाला पुन्हा एकदा न्यायालयात आणले जाऊ शकते, असे त्याच्या वकिलाने सांगितले. दरम्यान, गैरसमजातून मुसाला आरोपी ठरवण्यात आल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.
0
लोकसभा निवडणुकीच्या खर्चात ८४ पट वाढ

नवी दिल्ली- निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना खर्चाची मर्यादा वाढवण्यात आली आहे. उमेदवारांना निवडणुकीच्या प्रचारासाठी जशी अधिक रक्कम लागते. तीच बाब लोकसभा निवडणुकीच्या एकूण खर्चालाही लागू होते. देशातील पहिली म्हणजेच १९५२ ते २००९ या १५ निवडणुकींच्या खर्चाचा तपशील पाहिल्यास निवडणूक प्रक्रियेचा खर्च सातत्याने वाढतच चालल्याचे दिसून येते.
देशात झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीशी तुलना केल्यास २००९मध्ये निवडणुका घेण्याच्या खर्चात तब्बल ८४ पट वाढ झाली आहे. १९५२मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत आयोगाला दहा कोटी ४५ लाख रुपये खर्च झाला होता. हाच खर्च २००९मध्ये तब्बल ८४६ कोटी ६७ लाखांवर गेला आहे.
विशेष म्हणजे १९५२मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीसाठी दहा कोटी ४५ लाख रुपये खर्च झाला होता. त्यानंतरच्या दोन निवडणुकांमध्ये मात्र खर्च कमी झाला होता. ५२नंतर झालेल्या ५७सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाच कोटी नऊ लाख रुपये खर्च झाला होता. तर १९६२मध्ये म्हणजे सात कोटी ३२ लाख रुपये खर्च आला होता. मात्र त्यानंतर झालेल्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकांच्या खर्चात वाढच झाल्याचे दिसते. १९६७च्या निवडणुकीत दहा कोटी ७९ लाख तर १९७१च्या निवडणुकीत ११ कोटी ६१ लाख रुपये खर्च झाला होता. यानंतर म्हणजेच १९७७पासून प्रत्येक निवडणुकीचा खर्च दुप्पट झाला. ७७च्या लोकसभा निवडणुकीसाठी २३ कोटी चार लाख रुपये खर्च झाले. १९८०मध्ये झालेल्या निवडणुकीत हा खर्च ५४ कोटी ७७ लाखांवर पोहचला. तर ८४मधील निवडणुकीत खर्च ८१ कोटी ५१ लाखांवर गेला. देशाच्या इतिहासात ही शेवटीची निवडणूक होती ज्यात निवडणुकीचा खर्च १०० कोटींच्या आत होता. १९८९च्या लोकसभा निवडणुकीत खर्चाने १५४ कोटींचा टप्पा पार केला. त्यानंतर १९९१मध्ये ३५९ कोटी, १९९६मध्ये ५९७ कोटी आणि १९९८मध्ये ६६६ कोटी रुपयांचा खर्च झाला. १९९९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीचा खर्च एक हजार कोटींच्या जवळ पोहचला होता. या निवडणुकीसाठी ९४८ कोटींचा खर्च झाला. तर त्यानंतर २००४मध्ये झालेल्या निवडणुकीत एक हजार ११४ कोटींचा खर्च झाला.
0
विभागीय आयुक्तांकडून निवडणूक तयारीचा आढावा

यवतमाळ: येत्या १० एप्रिल रेाजी यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा विभागीय आयुक्त डी.आर.बन्सोड यांनी गार्डन हॉल येथे आयोजित बैठकीत घेतला. यावेळी त्यांनी होणारी निवडणूक मुक्त व नि:पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करावे, असे आवाहन केले.
बैठकीला विभागीय आयुक्तांसह अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक बिपीन बिहारी, निवडणूक निरिक्षक के.डी.कपाडीया, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, महसूल उपायुक्त श्री.चिमाजी, अप्पर जिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकारे यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक प्रक्रीयेतील नोडल अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यावेळी बन्सोड यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रांचा आढावा घेतला. निवडणुकीत काही केंद्र उपद्रवी ठरतात, अशा केंद्रांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर निवडणूक आयोगाचा जोर आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. युवावर्गाचा सहभाग वाढविण्यासाठी निवडणुकीच्या अगोदर ठिकठिकाणी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात यावे.प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर अनावश्यक व्यक्तिंचा प्रवेश होण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने संबंधितांनी मतदान सुरु होताच अगदी सुरुवातीपासूनच सक्तीचे धोरण अवलंबिने आवश्यक आहे. केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही. यासाठी पोलीस विभागाने दक्ष राहीले पाहिजे. अनेक केंद्रांवर मतदारांच्या मतदानासाठी
रांगा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा ठिकाणी पुरेशा खोल्या उपलब्ध नसल्यास बाहेर शामियाना टाकण्याच्या सूचना बन्सोड यांनी केल्या. बिहारी यांनी पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना उपयुक्त सूचना केल्या. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी सुरुवातीस निवडणुकीच्या तयारीबाबत माहिती दिली. जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवश्यक सर्व तयारी पूर्ण केली असून चांगल्या पध्दतीने निवडणूक पार पडेल, असे सांगितले. पोलीस अधीक्षक शर्मा यांनी पोलीस विभागाच्या तयारीची तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आपआपल्या विधानसभा मतदारसंघातील तयारीची माहिती दिली. शेवटी आभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी मानले.
0
मतदानासाठी कामगारांना वेतनी सुट्टी देणे बंधनकारक

यवतमाळ : यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक १० एप्रिल रोजी निवडणूक होत आहे. या दिवशी खाजगी आस्थापनांवरील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता
यावा म्हणून या आस्थापनांवरील मतदारांना या दिवशी आस्थापना मालकांनी सुट्टी देणे आवश्यक आहे. सुट्टीसाठी कोणतीही कपात किंवा वजाती कामगाराच्या वेतनातून करता येणार मतदानाच्या दिवशी सवर्सामान्य नागरिक तथा विविध खाजगी आस्थापनामधील मतदारांना मतदान करता यावे म्हणून या दिवशी सुट्टी देण्याचे आदेश शासनाने काढले आहे.
त्यानुसार राज्यातील विविध आस्थापना, दुकाने, हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपींग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स आदी विविध आस्थापनांवर काम करणाºया कामगारांना मतदान करता यावे म्हणून ही सुट्टी जाहीर करण्यात आले आहे. कामगारांना सुट्टी देतांना ती वेतनी सुट्टी राहणार असून आस्थापना मालकांना कामगारांच्या वेतनातून कोणत्याही प्रकारची कपात करता येणार नाही, असे जिल्हाधिकाºयांनी कळविले आहे. जिल्हाधिकाºयांनी हे आदेश काढले आहे. संबंधित शासकीय कार्यालयांनी आपल्या अधिकारक्षेत्रात असलेल्या खाजगी आस्थापनांना कळवून मतदानासाठी पगारी रजा देण्याबाबत जिल्हाधिकºयांनी आदेशात नमुद केले आहे.
0
जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू

यवतमाळ : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियमातील तरतुदी अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशानुसार जिल्ह्यात १५ एप्रिल पर्यंत जमावास बंदी राहणार आहे.
या आदेशान्वये जिल्ह्यात जमाव करणे, शस्त्र बाळगणे, माणसांचे एकत्रिकरण व पुतळ्याचे प्रदर्शन करणे आदी प्रकारांवर बंदी घालण्यात आली आहे. या कलमाचे उल्लंघन करणाºयांविरुध्द मुंबई पोलीस कायदा १९५१ च्या कलम ३७(१) व ३७ (३)अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अप्पर जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी प्रसिध्दी पत्रकांद्वारे कळविले आहे. महावीर जयंती, हनुमान जयंती तसेच लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने हे आदेश लागू करण्यात आले आहे.
0
दादरवर लोकलच्या डब्ब्याला आग

मुंबई – मुंबई सीएसटीकडे येणाऱ्या फास्ट लोकलच्या डब्ब्याला दादर स्टेशनमध्ये आग लागल्याने मध्य रेल्वेची वाहतूक काही वेळासाठी खोळंबली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आल्यानंतर फास्ट मार्गावरील वाहतूक स्लो मार्गावर वळवण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या मागील शुक्लकाष्ठ कायम असून गुरुवारी संध्याकाळी दादर स्टेशनवर आलेल्या एका लोकलच्या डब्ब्याला आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेतली. या वेळात मध्य रेल्वेवरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानंतर अन्य मार्गांवरील वाहतूक सुरू करण्यात आली. तसेच फास्ट मार्गावरील वाहतूक स्लो मार्गावर वळवण्यात आली. यामुळे लोकल गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आणि घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी वाढत गेली. रेल्वे स्टेशनवर जमलेल्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. शेवटची माहिती हाती आली तोपर्यंत मध्य रेल्वेचे वेळापत्रक पूर्वपदावर आले नव्हते.
0
बटन दाबलं की मत भाजपलाच

गुवाहाटी – आसाममध्ये मतदान यंत्रातील तांत्रिक चुकीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. गुवाहाटीत निवडणुकीपूर्वी मतदानाची चाचणी घेण्यात आली. यावेळी मतदान यंत्राचं कोणतंही बटन दाबल्यावर ते मत भाजपलाच जात असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे मतदान यंत्रांच्या बिनचुकतेबाबत साशंकता निर्माण करण्यात येत आहे.
आसाममधील जोरहाट लोकसभा मतदारसंघात पाठवलेल्या मतदान यंत्रांमध्ये हा घोळ झाला आहे. ही मतदान यंत्र ( EVMs) हैदराबादमधील इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीने बनवली आहेत. ‘ जोरहाटमधील मतदान यंत्रांशी छेडछाड झाली आहे. ही मतदान यंत्र राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर उघडल्यानंतर त्यांची चाचणी घेण्यात आली. त्यात ही यंत्र सदोष आढळून आली. आता ही मतदान यंत्र मतदान केंद्रावर पाठवण्यात येणार नाही,’ असं मुख्य निवडणूक अधिकारी विजेंद्र यांनी स्पष्ट केलं. सदोष मतदान यंत्राबाबत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तसंच आसाममधील सर्व मतदान यंत्रांची फेरतपासणी करण्याची मागणीही केली आहे.जोरहाट मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय बिजॉय कृष्ण हांडीक आणि भाजपचे युवा नेते कामाख्या तासा यांच्यात मुख्य लढत आहे. हांडीक हे सातव्यांदा इथून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात ७ एप्रिलला मतदान होणार आहे.
0
हुक्का पार्टी पोलिसांनी उधळली

पुणे- दारू आणि हुक्क्याच्या नशेत धिंगाणा घालणा-या २० तरुणी आणि २६ तरुणांना लोणावळा शहर पोलिसांनी बुधवारी रात्री साडेबारा वाजता गोल्ड व्हॅली, तुंगार्ली परिसरातून ताब्यात घेतले. पार्टीवर अचानक पोलिसांचा छापा पडल्याने दारूच्या नशेत चूर होऊन अश्लिलपणे नृत्य करत असलेल्या युवक-युवतींची मोठी पळापळ झाली.
लोणावळ्यातील तुंगार्ली भागातील गोल्ड व्हॅली परिसरात एका बंगल्यात काही मुले व मुली डिजेच्या तालावर धांगडिधगा घालत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस, डिटेक्शन ब्रँच पथकाने या बंगल्यावर छापा टाकला. त्यावेळी त्यांना तेथे काही मुले आणि चेह-यावर मास्क लावून अतिशय कमी कपडयांमध्ये काही मुली अश्लिल चाळे करीत संगिताच्या तालावर धुंद होऊन नाचत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. हे सर्वजण मुंबईतील एका विधी महाविद्यालयातील शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी आहेत.
0
शिवसेना-मनसेमध्ये तुंबळ हाणामारी

मुंबई – शिवसेनेचे अध्यक्ष उध्दव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये रंगलेल्या शाब्दीक व्दंदाची परिणीती आता रस्त्यावर कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीमध्ये झाली आहे.
गुरुवारी मुंबईतील ओल्ड कस्टम हाऊस येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने समोरासमोर आलेले दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते परस्परांना भिडले. दक्षिण मुंबईचे शिवसेना उमेदवार अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबईचे मनसे उमेदवार आदित्य शिरोडकर गुरुवारी सकाळी ओल्ड कस्टम हाऊस येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. त्यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आले.
घोषणाबाजीतून सुरु झालेला खुन्नस हाणामारीमध्ये बदलली. पोलिसांना न जुमानता दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते हातातील झेंडे घेऊन परस्परांवर तुटून पडले. यावेळी दोन्ही बाजूंकडून जोरदार दगडफेकही झाली. दोन्ही पक्षांचे अनेक कार्यकर्ते या हाणामारीत जखमी झाले आहेत. ओल्ड कस्टम हाऊसच्या बाहेरच्या परिसराला शिवसेना आणि मनसेने रणमैदान बनवून टाकले होते.दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. शिवसेना-मनसेच्या स्थानिक नेते-कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या हाणामारीतनंतर परिसरात मोठया प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.उमेदवारी अर्ज भरताना दोन्ही बाजूंनी शक्ती प्रदर्शन केल्याने मोठया संख्येने कार्यकर्ते जमले होते. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना रोखणे पोलिसांच्या हाताबाहेर गेले. उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये सध्या प्रश्न-उत्तराचा सिलसिला रंगला आहे. दोन्ही नेते परस्परांवर व्यक्तीगत स्तरावराचे आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यांच्या या आक्रमक भाषणांनी कार्यकर्त्यांमध्ये खुन्नसही वाढू लागला आहे.
0
अमेठीचे रहिवासी नसल्याने राहुल यांचा अर्ज रद्द

अमेठी- अमेठी मतदार संघातून निवडणुकीसाठी उभे राहिलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीचे तात्पुरते रहिवासी नसल्याचा धक्कादायक खुलासा अधिका-यांनी गुरुवारी केला. राहुल गांधी अमेठीचे तात्पुरते रहिवासीही नसल्याचे कारण सांगत त्यांना निवासी दाखला देण्यास जिल्हा प्रशासनाने मनाई केली आहे.
गेल्या दोन निवडणुकीत राहुल गांधी यांनी अमेठीमधून निवडणूक लढवली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जो उमेदवार निवडणुकीसाठी उभा राहतो त्याचे त्या विभागात बँकेचे खाते असणे गरजेचे असते. मात्र खाते उघडण्यासाठी रहिवासी पुराव्याची गरज असते. त्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज दाखल केला होता. मात्र राहुल गांधी अमेठीचे तात्पुरते रहिवासीही नसल्याने त्यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. त्याचबरोबर राहुल गांधींनी उमेदवारी अर्ज स्वत:हून जिल्हा उपविभागीय मॅजिस्ट्रेट अधिका-यांक़डे दिला नाही तर वकिलांतर्फे त्यांनी ही कागदपत्रे सादर केली. अर्ज दाखल करताना राहुल गांधींनी स्वत: यायला हवे होते. तसेच अर्जासोबत गरजेचे असलेले ओळखपत्रही त्यांनी सादर केले नाही त्यामुळेच त्यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याचे अधिका-यांनी सांगितले. येत्या निवडणुकीत राहुल गांधींच्या विरोधात आम आदमी पक्षाचे कुमार विश्वास निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर भाजपकडून अमेठीमधून राज्यसभा खासदार स्मृती इराणी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.













