
जम्मू – अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतात दाखल होण्यापूर्वी पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
पाकिस्तानी रेंजर्सनी मध्यरात्रीच्या सुमारास आर.एस.पूरा सेक्टरमधील जोगवानमधील सीमा सुरक्षा दलाच्या चौकीवर गोळीबार केला. पाकिस्तानी रेंजर्सनी रात्रीच्या एकच्या सुमारास छोटया शस्त्रास्त्रामधून काही मिनिटे गोळीबार केला. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले.
या गोळीबारात भारताच्या बाजूला जीवितहानी झाली नाही. २२ जानेवारीलाही पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन, सांबा जिल्ह्यातील सीमा सुरक्षा दलाच्या चौकीवर गोळीबार केला होता.
२१ जानेवारीला बीएसएफने अर्णियामध्ये घुसखोरीचा कट उधळून लावला होता. बराक ओबामा यांच्या तीन दिवसीय भारत दौ-याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने पाकिस्तानला भारतात कुठेही दहशतवादी कृत्य करु नका असे बजावले आहे.
Archive for January, 2015
0
पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार
0
बराक ओबामा भारतात दाखल

नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतात दाखल झाले आहेत. सकाळी साडेनऊच्या सुमारास नवी दिल्लीच्या पालम विमानतळावर बराक ओबामांच्या एअरफोर्स-वन विमानाचे लँण्डीग झाले.
राजशिष्टाचार बाजूला ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विमानतळावर ओबामा पती-पत्नींचे स्वागत केले. बराक ओबामा यांच्या वाहनांचा ताफा हॉटेलच्या दिशेने रवाना झाला आहे. बराक ओबामा हॉटेलमध्ये थोडावेळ विश्रांती घेऊन, नंतर राष्ट्रपती भवनात जाणार आहेत. राष्ट्रपती भवनात बराक ओबामांना मानवंदना दिली जाईल. तेथे राष्ट्रपती प्रणव मुखर्जींशी ते चर्चा करतील.
त्यानंतर राजघाटावर जाऊन महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळावर आदरांजली वाहतील. त्यानंतर हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी व ओबामा यांच्यात चर्चा होईल. रात्री ओबामा यांच्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी खास मेजवानीचे आयोजन केले आहे.
ओबामा २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणारे ते अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत तसेच राष्ट्राध्यक्षपदाच्या कारर्कीदीत दुस-यांदा भारत दौ-यावर आलेले ते पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत.
ओबामा यांच्या तीन दिवसीय भारत दौ-याला सुरुवात झाली आहे. ओबामांच्या या दौ-याच्या निमित्ताने दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होतील. या दौ-यात अणू, संरक्षण, तंत्रज्ञान हस्तांतर, आर्थिक, पर्यावरण आदी करार होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ओबामा यांनी आग्रा येथील ताजमहाल भेटीचा कार्यक्रम रद्द केल्याबद्दल खेद व्यक्त केला.
0
डॉ. आंबेडकरांचे लंडनमधील निवासस्थान सरकार विकत घेणार


मुंबई – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील निवासस्थान राज्य सरकार विकत घेणार असून, त्याचे रूपांतर स्मारकामध्ये केले जाणार आहे. डॉ. आंबेडकर यांनी निवास केलेले हे घर मूळ मालकाने ३५ कोटी रुपयांना विक्रीस काढले होते. त्यानुसार हे घर विकत घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. डॉ. आंबेडकर यांच्या १४ एप्रिलच्या जयंतीला हे घर स्मारक म्हणून जनतेसाठी खुले केले जाणार आहे.
१९२१ ते २२ अशी दोन वर्ष डॉ. आंबेडकर यांचे वास्तव्य लंडन येथील या घरात होते. हे घर विक्रीस काढले होते. याबाबत बुद्धिस्ट फोरमच्या संतोष दास पाठपुरावा करत होत्या. जागतिक शिक्षणमंत्र्यांच्या परिषदेसाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे लंडन येथे गेले आहेत. यावेळी तावडे यांनी यासंदर्भात फोरमच्या अध्यक्षा दास यांच्याशी संपर्क साधून व्यवहाराची माहिती घेतली.
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हे घर विकत घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी तावडे यांनी बुद्धिस्ट फोरम आणि भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकारी यांच्यासमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाला भेट दिली.
त्यानंतर इंडिया हाऊसमध्ये ब्रिटिश उच्चायुक्त रंजन मथाई, बुद्धिस्ट फोरमच्या संतोष दास, तेथील उच्च अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या घर खरेदीसाठी कायदेशीर आणि परदेशातील खरेदीचे नियम पूर्ण करून २ महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
0
वाचन संस्कृती रूजविण्यासाठीच ग्रंथोत्सवाचे आयोजन – राजेश खवले

यवतमाळ दि. 24 : वाचनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येकाने वाचन ही आवड म्हणून विकसीत केली पाहिजे. त्याच अनुषंगाने सर्वसामान्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासोबतच
विविध प्रकारची पुस्तके सहजरित्या एकाच ठिकाणी वाचकांना उपलब्ध व्हावी म्हणून ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी दिली.
यवतमाळ येथे दिनांक 31 जानेवारी पासून तीन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून त्या निमित्त निवासी उपजिल्हाधिकारी खवले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा माहिती कार्यालय येथे बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस समितीचे सदस्य ज्येष्ठ कवी शंकर बडे, प्रा.देवेंद्र पुनसे, प्राचार्य डॅा.आशा देशमुख, प्राचार्य अविनाश शिर्के, ग्रंथालय संघटनेचे कार्यवाह विनोद देशपांडे, अंकुर साहित्य संघाचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक सुरेश गांजरे, बाबाराव मडावी, कवी आनंद गायकवाड, योगानंद टेभुर्णे, विनोद बुरबुरे, प्रा.निलेश भगत, आनंद कसंबे, प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, नपचे मुख्याधिकारी रविंद्र पांढरे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने तथा आयोजन समितीचे सदस्य सचिव प्र.जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यावेळी उपस्थित होते.
सुरुवातीस मंगेश वरकड यांनी ग्रंथोत्सव आयोजनाच्या तयारीची माहिती दिली. यावेळी खवले यांनी राज्यातील नामवंत पुस्तक प्रकाशकांसोबतच युवकांना उपयुक्त ठरणाऱ्या पुस्तकांची प्रदर्शनीही ठेवल्या जाईल, असे सांगितले. शासनाच्यावतीने वेळोवेळी प्रकाशीत होणारी परंतु वाचणीय पुस्तके आवर्जुण वाचकांना ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने उपलब्ध करुन देण्यात यावी, असे ते म्हणाले.ग्रंथोत्सवानिमित्त पुस्तक प्रदर्शन व विक्रीसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचेही आयोजन करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली. बैठकीला उपस्थित आयोजन समितीच्या सदस्यांनी मौलिक सूचना केल्या. शेवटी आभार अंकुर साहित्य संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश गांजरे यांनी मानले. सदर ग्रंथोत्सव दिनांक 31 जानेवारी ते 2 फेब्रूवारी दरम्यान नगर परिषदेच्या नगर भवन येथे होणार आहे.
0
लालकृष्ण आडवाणी, बाबा रामदेव, अमिताभ बच्चनना मिळणार ‘पद्म’ पुरस्कार


नवी दिल्ली, दि. २३ – भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, अभिनेते अमिताभ बच्चन, योगगुरू रामदेव बाबा आणि अध्यात्मिक गुरू श्री. श्री. रविशंकर यांचा ‘पद्म’ पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ सन्मान जाहीर केल्यानंतर आता मोदी सरकार भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी ‘पद्मविभूषण’ पुरस्कार देऊन सन्मान करणार आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘पद्म’ पुस्कारांची घोषणा करण्यात येते. यावेळी या यादीत एकूण १४८ जणांची नावे आहेत. लालकृष्ण आडवाणी व पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल या दोन राजकीय नेत्यांचा या यादीत समावेश आहे. तर अभिनेता अमिताभ बच्चन, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, अभिनेता सलमान खानचे वडील व लेखक सलीम खान तसेच गीतकार प्रसून जोशी यांचेही यादीत नाव आहे.
बॅटमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, हॉकी टीम कप्तान सरदारा सिंग, चेस ग्रँडमास्टर शशीकिरण कृष्णन, कुस्तीपटू सुशीलकुमार व त्याचे प्रशिक्षक सत्पाल आणि माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करणा-या अरुणिमा सिन्हा या क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनाही पुरस्काराने गौरवण्यात येईल.अर्थतज्ज्ञ विवेक देब्रॉय, पत्रकार रजत शर्मा, स्वप्न दासगुप्ता, हरीशंकर व्यास आणि अभिनेते प्राण ( मरणोत्तर) यांचाही पुरस्काराच्या यादीत समावेश आहे.
0
गृहकर्ज ८ टक्क्यांपर्यंत कमी

नवी दिल्ली – गृह उद्योगाला प्राधान्य क्षेत्राचा दर्जा देऊन गृहकर्जाचे व्याजदर ७ ते ८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकार आखत आहे. देशभरात स्मार्ट सिटी उभारण्याच्या पंतप्रधानांच्या ध्येयपूर्तीतील हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
देशभरात पायाभूत सुविधांनी सुसज्ज अशा १०० स्मार्ट सिटी उभारण्याचे उद्दीष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. २४ तास पाणी व वीज, दर्जेदार शिक्षण, शुद्ध वातावरण आणि कार्यक्षम शहरी वाहतूकसेवा ही या शहरांची वैशिष्ट्ये असतील. या शहरांच्या उभारणीसाठी बांधकाम क्षेत्राला उभारणी देण्याची आवश्यकता असल्याने तसेच नागरिकांना स्वस्त घरांचा पर्याय मिळवून देण्यासाठीच कर्जाची फेररचना करण्याचा सरकारचा मानस आहे.
केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनीच गुरुवारी सरकारच्या या प्रयत्नांची माहिती दिली. संपूर्ण गृहबांधणी क्षेत्रालाच प्राधान्य क्षेत्राचा दर्जा देण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. त्यासाठी बँकिंग आणि गृह विभागाच्या सचिवांशी पंतप्रधान लवकरच चर्चा करणार आहेत. सध्या दोनआकडी असणारे गृहकर्ज सात ते आठ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असेही नायडू यांनी स्पष्ट केले. ३० जानेवारीपासून नायडू सर्व राज्य सरकारांशी यासंदर्भात चर्चा करणार आहेत. स्मार्ट सिटी उभारणीच्या कामात अनुभव असलेल्या तसेच भारतात गुंतवणुकीसाठी इच्छुक असलेल्या काही देशांशीही चर्चा होणार आहे.
४० लाख कोटींचा खर्च
सरकारी-खासगी सहकार्य तत्त्वावर स्मार्ट सिटी उभारण्याचा सरकारचा मानस आहे. १०० शहरांच्या उभारणीसाठी प्राथमिक स्तरावरच ४० लाख कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. तर या शहरांच्या व्यवस्थापनासाठी आणखी १ कोटी ६० हजार कोटी मोजावे लागतील.
0
ताडोबाच्या जंगलात १०५ वाघ

नागपूर – देशात वाघांच्या संख्येत ५२० ने वाढ झाली असली तरी वाघांची कथित राजधानी म्हणून ओळखल्या जाणा-या विदर्भात वाघ विशेष वाढलेले नाहीत.
महाराष्ट्रात फक्त २१ वाघ वाढले आहेत. वन खात्याने व्याघ्र गणनेच्या जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात १९० वाघ आहेत. त्यातील १७० ते १७५ वाघ विदर्भात असतील. ताडोबा, पेंच आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पांमध्ये हे वाघ आहेत.
यातील सर्वाधिक १०५ वाघ ताडोबाच्या जंगलात आहेत. महाराष्ट्रातील वाघांच्या संख्येत इतर राज्यांच्या संख्येत फार कमी वाढ आणि टक्केवारीत सांगायचे तर फक्त १२ टक्के वाढ आहे. विदर्भातील वन्यप्रेमींनी चिंता करावी, अशी परिस्थिती विदर्भात आहे.
जंगल आणि वाघांच्या रक्षणावर कोटय़वधी रुपये खर्च झाले असताना ही कामगिरी निराशाजनक आहे, असे वन्यप्रेमींचे मत पडले. विदर्भात वाघांच्या शिकारीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या चार वर्षात २२ वाघांची शिकार झाली.
कर्नाटकात वाघ वाढले. विदर्भात वाढू शकले नाहीत याला हे बेकायदा शिकारी कारण असल्याचे सांगितले जाते. कर्नाटकात ४०८ वाघ आहेत. आठ वर्षापूर्वी तिथे २९० वाघ होते. मध्य प्रदेशात ३०८ वाघ झाले आहेत. चार वर्षापूर्वी २५७ वाघ होते.
0
बिहार न्यायालया परिसरात स्फोट, दोन ठार

आरा -बिहारमधील आरा जिल्ह्यातील सत्र न्यायालयाच्या परिसरात शुक्रवारी बॉम्बस्फोट झाला. यामध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल आणि महिला ठार झाली आहे तर १६ हून अधिक जण जखमी झाले आहेत.
आरोपींना न्यायालयात हजर केले जात असताना बॉम्बस्फोटाची घटना घडल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले.
न्यायालयात झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला होता का? याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झाले नसून याचा तपास सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक अमरेंद्र कुमार आंबेडकर यांनी सांगितले.
बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे.
0
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकास जागा देण्यास हाफकीनचा नकार

मुंबई – शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी परळ येथील हाफकीन संशोधन संस्थेची जागा घेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न निष्फळ ठरला आहे. ‘हाफकीनच्या विस्तारासाठी आम्हालाच आणखी जागा हवी आहे. त्यामुळं अन्य कोणत्याही कारणासाठी एक इंचही जागा देणार नाही,’ असं संस्थेच्या व्यवस्थापनानं स्पष्ट केलं आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी स्मारकाची घोषणा करण्याचा राज्य सरकारचा मानस होता. त्यासाठी राज्य सरकार व महापालिकेने सात जागांची यादी बनविली आहे. त्यात परळ येथील हाफकीन संस्थेच्या तीन एकर जागेचा समावेश आहे. ही जागा स्मारकासाठी मिळावी म्हणून कोकण विभागीय आयुक्त राधेश्याम मोपलवार, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व शिवसैनिकांनी मंगळवारी संस्थेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि तीन एकर जागेचा प्रस्ताव ठेवला. मात्र, व्यवस्थापनाने तो स्पष्ट शब्दांत धुडकावून लावला.
‘हाफकीनच्या कॅम्पसमध्ये थोडीफार मोकळी जागा आहे. मात्र, भविष्यात आम्हाला संस्थेचा विस्तार करायचा आहे. ही जागा गेल्यास आमच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना पाण्यात जातील. सरकारी पथकाला आम्ही हे सांगितल्याचं हाफकीनचे महाव्यवस्थापक सुभाष शंकर राव यांनी सांगितलं.
‘सध्या हाफकीन ४५ देशांना पोलिओ प्रतिबंधक लसींचा पुरवठा करते. हे प्रमाण वाढवून आणखी काही देशांना लसी पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळं जमिनीचा प्रत्येक तुकडा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे,’ असं राव यांनी सांगितलं.
संसर्गजन्य आजारांवर व त्यावरील उपायांवर संशोधन करणारी हाफकीन ही संस्था १८९९ मध्ये स्थापन झाली. सुरुवातीला संस्थेकडं २७ एकर जागा होती. मात्र, २०१२ साली राज्य सरकारनं यातील ५ एकर जागा टाटा कॅन्सर हॉस्पिटलला देऊन टाकली. त्यामुळं आता हाफकीनकडं २२ एकर जागा आहे. त्यातील काही जागा रिकामी आहे. या जागेवर टीबी, डायरिया, टिटॅनस आणि डीटीपीसह अन्य रोगप्रतिबंधक लसींसाठी संशोधन प्रकल्प सुरू करण्याची हाफकीनची योजना आहे.
0
कारची विद्युत खांबाला धडक, अर्ध्या शहराचा विद्युत पुवठा खंडीत

वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने जीवित हानी टळली
यवतमाळ , दि. २२ – जांब मार्गाकडून आर्णी बायपासकडे येणाºया कारने विद्युत खांबाला धडक दिल्याने जिवंत विद्युत तारा तुटून पडल्या. आज गुरुवारी रात्री ७ वाजता ही घटना घडली. यामध्ये चालक जखमी झाला असून वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने मोठी जीवित हानी टळली.
इंद्रनिवास शंकर गोरे (३५) रा. वडगाव रोड असे जखमीचे नाव आहे. भोकरे नामक व्यक्तीच्या कारने (एम.एच. २९ / ए.डी. ३९९९) चालक गोरे व अन्य दोन व्यक्ती जांब मार्गाकडून आर्णी बायपासने येत होते. अशातच रस्त्यावरील वीज खांबाला कारने धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, यामध्ये खांब पूर्णपणे वाकला असून, ३३ केव्ही विद्युत पुरवठा करणाºया जिवंत तारा तुटून रस्त्यावर लोंबकळत होत्या. या बाबतची माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस नायक सुरेंद्र वासनिक यांना मिळाली. त्यांनी लगेच घटनास्थळ गाठून वीज वितरणच्या मुख्य कार्यालयात दूरध्वनीवरून माहिती देऊन विद्युत पुरवठा खंडित करायला लावला. त्यामुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच वडगाव रोडचे सहा. पोलीस निरीक्षक गोमासे हे आपल्या पथकासह दाखल झाले होते. यामुळे वडगाव, जांब रोड, पृथ्वीराजनगर, बेले ले-आऊट, रामकृष्णनगर, दांडेकर ले-आऊट, गुरुकृपा नगरी, मुलकी यासह परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते. यावेळी पांढरकवडा, आर्णी या मार्गावरील वाहतूकही दोन ते तीन तास खोळंबली होती. जखमी चालक गोरे याच्यावर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
0
दुषित पाणीस्त्रोतांच्याठिकाणी जलशुध्दीकरणाची विशेष व्यवस्था

जिल्हा नियोजन समितीची बैठक, पुढील वर्षासाठी 399 कोटींचा आराखडा मंजूर
यवतमाळ, दि. 22 : दुषित पाण्यामुळे अनेक आजार संभवतात. जिल्ह्यात काही ठिकाणी फ्लोराईडयुक्त तर काही ठिकाणी अन्य दुषित घटक आढळून येतात. अशा ठिकाणचे पाणी आरोग्यास अपायकारक असल्याने अशा सर्व ठिकाणी जलशुध्दीकरणाची विशेष व्यवस्था करण्यात येणार असून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातील. याबाबतचा प्रस्ताव संबंधित विभागाने तातडीने तातडीने तयार करून शासनास सादर करावा, अशा सुचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या.पालकमंत्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक बचत भवन येथे पार
पडली. त्यावेळी त्यांनी या सुचना केल्या. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा डॅा.आरती फुफाटे, खा.भावना गवळी, खा.राजीव सातव, आ.मनोहर नाईक, आ.मदन येरावार, आ.डॅा.अशोक उईके, आ.संजीवरड्डी बोदकुरवार, आ.राजु नजरधने, आ.राजु तोडसाम, आ.हरिभाऊ राठोड, आ.ख्वाजा बेग, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल,मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मल्लिनाथ कलशेट्टी, अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्यासह नियोजन समितीचे सदस्य, विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पुढील वर्षाचा सन 2015-16 साठी एकूण 399 कोटी 85 लाख 91 हजार रुपयाच्या वार्षीक आराखड्यास मान्यता देण्यात आली. त्यात सर्वसाधारण योजनेअंतर्गत 177 कोटी 43 लाख, आदिवासी उपयोजना 157 कोटी 21 लाख, अनुसूचित जाती उपयोजना 64 कोटी 22 लाखांच्या आराखड्याचा समावेश आहे.
सदर आराखडा सर्वसंमतीने बैठकीत मंजुर करण्यात आला. तसेच चालु वर्षातील खर्चाचा पुर्नविनियोजन आराखड्यासही मान्यता देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्यावतीने दुषित पाणीस्त्रोतांच्या काही ठिकाणी जलशुध्दीकरण यंत्र (आरओ) लावण्यात आले होते. यापैकी काही यंत्र सुरू आहे. जिल्ह्यात अशा स्त्रोतांच्या ठिकाणी आरोग्याच्यादृष्टीने जलशुध्दीकरणाची कायम यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. त्यामुळे यासाठी प्रस्ताव सादर करण्यासोबतच निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. जिल्हा नियोजन समितीमधून स्मशानभूमीसारखी जनसुविधेची कामे केली जातात. परंतु यासाठी अपुरा निधी मिळत कामे चांगल्या पध्दतीने करता येत नाही. त्यामुळे दरवर्षी काही ठराविक गावांची निवड करून त्याठिकाणी शेड, रस्ता, बगीचा, झाडे, बसण्याची चांगली जागा आदी प्रकारच्या सुविधा करण्यावर भर देण्यात येईल. येत्या पाच वर्षात सर्वच स्मशानभूमिचा विकास करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. पुरसंरक्षक भिंतीसाठी निधी उपलब्ध आहे. परंतु या कामांना पाहिजे तशी गती नाही. त्यामुळे अशा भिंती उभारण्याचा कामासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी केल्या. जिल्ह्यात 48 भिंतींसाठी 12 कोटी रुपये उपलब्ध आहे. दुष्काळी स्थिती पाहता शेतकऱ्यांचे विज कनेक्शन कापल्या जावू नये. जुने कापलेले कनेक्शन कसे जोडता येईल यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू, असे ते म्हणाले. जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनेची अनेक कामे केवळ कंत्राटदारांचा हलगर्जीमुळे प्रलंबित आहे. त्यामुळे अर्धवट कामे सोडून जाणाऱ्या सर्व कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करा. तसेच शेतकऱ्यांना मदत वाटप करतांना त्यांच्याकडून
पैसे मागणाऱ्या तलाठ्यांना पाठीशी न घालता त्यांचावर निलंबनाची कार्यवाही करा, अशा सुचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या.यावेळी पालकमंत्र्यांनी पाणी वापर संस्था, अरुणावती प्रकल्पावरील मच्छ बिज केंद्र, मागील मदत वाटपाचा आढावा, क्रीडा संकुल बांधकामाची सद्यस्थिती, निम्न पैनगंगा प्रकल्पामुळे खरेदी विक्रीचे थांबलेले व्यवहार आदींबाबतही माहिती जाणून घेतली. यावेळी सर्व लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी वेगवेगळ्या विषयांवर मुद्दे उपस्थित करून बैठकीत चर्चा केली. सुरुवातीस जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी सर्व उपस्थितांचे रोपटे भेट देवून स्वागत केले. बैठक संपल्यानंतर उपस्थितांचे आभारही त्यांनीच मानले.
0
देशात मुस्लिमांच्या लोकसंख्येत २४ टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली – देशातील लोकसंख्या वाढीचा सरासरी दर १८ टक्के असला तरी २००१-२०११ या दशकात मुस्लिमांच्या लोकसंख्येत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळं देशातील मुस्लिमांची एकूण संख्या १३.४ टक्क्यांवरून वाढून १४.२ टक्के इतकी झाली आहे.
गेल्या दशकातील धर्मनिहाय जनगणनेचा अहवाल लवकरच प्रसिद्ध होणार आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मिळालेल्या या अहवालातील ताज्या आकडेवारीनुसार, मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचा दर आजही राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. मात्र, नव्वदच्या दशकातील आकडेवारीशी तुलना केल्यास मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचा दर पाच टक्क्यांनी घसरला आहे. १९९१-२००१ या काळात मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचा दर २९ टक्के होता. तो आता २४ टक्क्यांवर आला आहे.
0
आता कंप्युटरवरूनही वापरा व्हॉट्सअॅप

सॅन फ्रॅन्सीस्को – जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजींग अॅप्लिकेशन असणारे व्हॉट्सअॅपवर आता कंप्युटरवरुनही वापरता येणार आहे. व्हॉट्सअॅपने आपली वेबबेस सेवा सुरु केली असून त्यामुळे आता लहानश्या मोबाईल स्क्रीनवर बोटे चालवून थकलेल्यांना कंप्युटरच्या मोठ्या स्क्रीनवरुन व्हॉट्सअॅपचा आनंद घेता येणार आहे.
५०० दशलक्ष युझर्स असणा-या व्हॉट्सअॅपने आपल्या या वेब सेवेला फोनवरील व्हॉट्सअॅपची डेस्कटॉपवरील मिरर अवृत्ती असल्याचे म्हटले आहे. आमच्या वेब ब्राऊसरवरुन आता मोबाईलवरील व्हॉट्सअॅप कनेक्ट करुन थेट कंप्युटरवर व्हॉट्सअॅप वापरता येणार असल्याचे व्हॉट्सअॅपने आपल्या ब्लॉगमध्ये नमूद केले आहे. त्यामुळे एकाच वेळी युझर्सला वेब आणि मोबाईलवरुन व्हॉट्सअॅप वापरता येईल आणि कुठूनही केलेला संवाद दुस-या डिव्हाइसवर दिसेल.
व्हॉट्सअॅपची ही सेवा सध्या गुगल क्रोमच्या ब्राऊसरवर वापरता येणार आहे. तर अॅपल प्लॅटफॉर्मवरील मर्यादेमुळे आयफोन युझर्सला ही सेवा वापरता येणार नसल्याचे व्हॉट्सअॅपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.ऑक्टोबर महिन्यामध्ये २२ अब्ज डॉलरला फेसबुकने व्हॉट्सअॅपला विकत घेतले होते. त्यानंतर व्हॉट्सअॅपच्या युझर्सच्या संख्येत वाढ झाली असली तरी फेसबुकने व्हॉट्सअॅपसाठी मोजलेली किंमत योग्य आहे का याबाबत टेक जाणकारांमध्ये दुमत आहे. या वेबबेस सेवे व्यतिरीक्त लवकरच व्हॉट्सअॅपवर फ्री कॉलिंगची सेवा देण्यात येणार असल्याचेही वृत्त आहे.
0
मुंबईत हाय अलर्ट

मुंबई- मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने (आयबी) वर्तवली असून सतर्कतेचा इशारा दिला आहे. हा दहशतवादी हल्ला २८ जानेवारीपूर्वी होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली आहे.
मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. मंगळवारी सिद्धीविनायकाच्या दर्शनाला गर्दी असते, ती संधी साधूनच हा हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्व गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.जमात-ऊल-दावा, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या चार दहशतवादी संघटना देशात सक्रीय झाल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि ओदिशात आपले बस्तान मांडले आहे. मुंबईत हल्ला घडवून आणण्याची जबाबदारी अब्दुल्ला-अल-कुरेशी, नासीर अली, जावेद इक्बाल, मोबीद झेमन आणि समशेर या चार दहशतवाद्यांवर सोपवण्यात आली आहे.
0
‘मन की बात’मध्ये मोदींसोबत ओबामा

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा २७ जानेवारीला ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे भारतीय नागरिकांशी रेडियोवरुन एकत्रितपणे संवाद साधणार आहेत. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली.
बराक ओबामा २५ जानेवारीला भारत भेटीवर येत आहेत. ओबामा हे प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. नरेंद्र मोदी देशवासियांशी ‘मन की बात’द्वारे संवाद साधतात. यावेळी २७ जानेवारीला होणा-या ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व मी आमचे विचार एकत्रितरित्या मांडणार आहोत, असे मोदी यांनी म्हटले आहे.
0
जुन्या मुंबई-पुणे मार्गावर अपघातात, तीन ठार, पाच जखमी

पुणे- जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कान्हे फाट्याजवळ मोटारीवर टेम्पो धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर अन्य पाचजण जखमी झाले. गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींवर सोमाटने फाट्यावरील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कान्हे फाट्याजवळ मुंबईकडून पुण्याच्या दिशेने येणा-या टेम्पो चालकाचे कान्हे फाट्याजवळ गाडीवरील नियंत्रण सुटले. टेम्पो रस्ता दुभाजक ओलांडून रस्त्याच्या थेट विरुद्धबाजूला जाऊन मुंबईच्या दिशेने निघालेल्या एमएच ०४-इएक्स-१३४६ या मोटारीवर धडकला. या धडकेत मोटारतील तीनजण जागीच ठार झाले. तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, या अपघाताचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसून जुन्या व नव्या अशा दोन्ही मार्गांवरील वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
0
महिला पोलिसांची आत्महत्या

उत्तरप्रदेश/तामिळनाडू- उत्तरप्रदेशमधील महिला पोलिसाने गळफास घेऊन तर तामिळनाडूतील महिला पोलिसाने स्वत:च्या बंदुकीतून डोक्यात गोळी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
उत्तरप्रदेशमधील बारामांकी येथील कोतवाली परिसरात राहणा-या मोनी शर्मा (२८) यांनी सोमवारी त्यांच्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
तर तामिळनाडूतील नागैपुरम पोलीस स्थानकात रात्रीच्या कर्तव्यावर असलेल्या करूपाई (३१) या महिला पोलिसाने मंगळवारी रात्री स्वत:च्या बंदुकीतून डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
0
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स, निफ्टीचा उच्चांक

मुंबई- मुंबई शेअर बाजारात बुधवारी सकाळच्या सत्रातही तेजीचे वातावरण आहे. निर्देशांकाने २८ हजार ९०० अंकांची पातळी गाठली. तर निफ्टीनेही ८ हजार ७३०.४५ या नवीन उच्चांकी पातळीला स्पर्श केला.
शेअर बाजारात पैशांचा ओघ सुरू असून सलग पाचव्या दिवशी शेअर बाजार वधारला आहे.
गेल्या चार सत्रात निर्देशांकाने एक हजार ४३८ अंकांनी वधारला आहे. बुधवारी सलग पाचव्या दिवशी सेन्सेक्समध्ये १५५.२५ अंकांची वाढ होऊन २८ हजार ९३९.९२ हा नवीन उच्चांक गाठला. तर निफ्टीही २० अंकांनी वधारला असून ८,७१५ अंकावर पोहचला.
मंगळवारी, मुंबई शेअर बाजाराने ५२२.६६ अंकांची झेप घेत २८,७८४.६७, तर निफ्टी १४४.९० अंकांच्या वाढीसह ८,६९५.६० या शिखरावर बंद झाला. निफ्टीने मंगळवारी नवीन विक्रमी उच्चांक गाठला होता. निफ्टीने इतिहासात पहिल्यांदाच ८,७००ला स्पर्श केला.
0
‘पीके’ चित्रपटाची कथा चोरीचा आरोप, याचिका दाखल

नवी दिल्ली- ‘पीके’ चित्रपटाची कथा पुस्तकातून नक्कल केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून लेखकाने एक कोटींची मागणी केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने चित्रपट निर्माते व दिग्दर्शकाला नोटीस पाठवली आहे.
‘पीके’ चित्रपटाच्या कथेची पुस्तकातून नक्कल केल्याप्रकरणी कादंबरीकार कपिल इसापुरी यांनी ‘पीके’ विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. २०१३ मध्ये प्रकाशित झालेल्या आपल्या ‘फरिश्ता’ या कादंबरीतील काही भाग चित्रपटाच्या कथानकात वापरल्याचा आरोप कपिल इसापुरी यांनी केला आहे.
या कादंबरीत भोंदू, धर्मगुरु यांनी मांडलेला अंधश्रद्धेचा बाजार याविषयावर टिका केली आहे. हा मानवनिर्मित धंदा असून समूहात तुम्ही विशिष्ट व्यक्ती कोणत्या धर्माची आहे हे ओळखू शकत नाही, असेही या कादंबरीत म्हटले आहे. त्यामुळे इसापुरी यांनी त्यांच्या पुस्तकातून नक्कल केल्याप्रकरणी एक कोटी रुपयांची मागणी केली आहे.
या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने ‘पीके’ चित्रपटाच्या चित्रपटाच्या निर्मात्यांसह दिग्दर्शक राजकुमार हिरानी, पटकथालेखक अभिजात जोशी यांना नोटीस बजावली आहे.











