
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सामाजिक अंकेक्षण संचालनालयात कार्यालयीन सहाय्यक/ लिपीक टंकलेखन (1 जागा ), लघु-टंकलेखक (2 जागा ),विभागीय समन्वयक (6 जागा ) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 15 नोव्हेंबर 2014 च्या अंकात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.mahaegs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Archive for November, 2014
0
सामाजिक अंकेक्षण संचालनालयात 9 जागा
0
मुलानेच केला आईवर बलात्कार

पालघर – जिल्ह्यातील नालासोपारा येथे व्यसनाधीन तरुणाने नशेच्या स्थितीत स्वतःच्याच आईवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. घटनेनंतर तरुणाने स्वतःवर चाकूने वार करुन घेतले.
नालासोपारा येथे भाड्याच्या खोलीत विधवा महिला व तिचा २१ वर्षाचा मुलगा असे दोघे जण राहत होते. या महिलेच्या मुलाला अंमली पदार्थांचे व्यसन असून तो बेरोजगार होता. नशेच्या स्थितीत तो तरुण नेहमीच त्याच्या आईचा छळ करायचा. गुरुवारी संध्याकाळपासून संबंधीत मुलगा हा घरी परतला नव्हता. शुक्रवारी संध्याकाळी नशेच्या अवस्थेत तो घरी परतला. यानंतर त्याने स्वत:च्याच आईवर बलात्कार केला. पिडीतेने त्याला प्रतिकार केला असता तो आईला घरात कोंडून पळून गेला. सतर्क शेजा-यांनी या सर्व घटनेची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अटक करण्यापूर्वी त्या मुलाने स्वत:वर चाकूने वार करुन घेतले. पोलिसांनी या नराधम तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
0
शिवसेना – भाजपा युतीसाठी संघाची मध्यस्थी

नागपूर – भाजपा आणि शिवसेनेमध्ये युती व्हावी यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुढाकार घेतल्याचे वृत्त आहे. सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा टेकू घेण्यावरुन भाजपावर चोहोबाजूंनी टीका होत असतानाच आता मोहन भागवत मैदानात उतरल्याने भाजप – शिवसेनेमध्ये पुन्हा युती होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
सत्ता स्थापनेत शिवसेनेसोबतची चर्चा फिस्कटल्यावर भाजपाने आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकून सरकारला तारले आहे. भाजपाने उघडपणे राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्याची नाचक्की टाळली असली तरी भविष्यात राष्ट्रवादीच्या टेकूने सरकार चालवण्यास भाजपातील एक गट विरोधात आहे. तर शिवसेनेतील अनेक आमदारही सत्तेत सहभागी होण्यासाठी तयार आहेत. अखेरीस सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिवसेना – भाजपमध्ये पुन्हा युती व्हावी यासाठी प्रयत्न सुरु केल्याचे समजते. यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि भागवत यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलिया दौ-यावरुन परतल्यावर याविषयी सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासनही भागवत यांनी दिल्याचे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे. त्यामुळे भागवत शिवसेना – भाजपामध्ये समेट घडवण्याच यशस्वी होतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
सोन्यात या वर्षातील सर्वात मोठी वाढ

नवी दिल्ली- सोन्याच्या भावामध्ये शनिवारी येथील सराफा बाजारामध्ये या वर्षामध्ये दिवसभरातील सर्वात मोठय़ा वाढीची नोंद झाली. सोन्याचे भाव ७१५ रुपयांनी वधारून २६,८५० रुपये प्रति तोळा बंद झाले. लग्नसराईतील खरेदी आणि जागतिक बाजारातील भाववाढीने सोन्याला नवी झळाळी प्राप्त झाल्याचे बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले.
याबरोबरच डॉलरसमोर रुपयाचे सुरू असलेल्या अवमूलनामुळे सोन्याची आयातही महागली असून यामुळेही हा मूल्यवान धातू महागण्यास हातभार लागला. शुक्रवारी रुपया डॉलरसमोर ६१.७२ वर बंद झाला. ही रुपयाची महिनाभराची नीचांकी पातळी ठरली. चांदीची चमकही वाढली असून या धातूचे भाव २१०० रुपयांनी वधारले. दिवसअखेर हा भाव प्रतिकिलो ३६,७०० रुपयांवर गेला.
न्यूयॉर्कमध्ये सोन्याचा भाव ४० डॉलरने वधारून ११९३.३४ औंस या दोन आठवडयांच्या उच्चांकी पातळीवर झेपावला. ३१ ऑक्टोबरनंतरचा सर्वाधिक भाव ठरला. याबरोबरच डॉलरच्या कमजोरीमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचा भाव वधारल्याचे सराफा उद्योगातील तज्ज्ञांनी सांगितले. जागतिक स्तरावर चांदीचा भावही ४.४ टक्क्यांनी वधारून १६.३१ औंसवर झेपावला. १४ फेब्रुवारीनंतरचा हा सर्वोच्च भाव ठरला.
0
खासदार सचिनने घेतले आंध्रप्रदेशातील गाव दत्तक

नेल्लोर(आंध्रप्रदेश) – भारताचा मास्टर ब्लास्टर आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरने आदर्श ग्राम योजनेंतर्गत आंध्रप्रदेशमधील एक गाव दत्तक घेतले आहे. आंध्रमधील पुत्तमराजूवरी कंद्रिका या दत्तक घेतलेल्या गावास सचिनने रविवारी भेट दिली.
आंध्रप्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात हे पत्तूमराजूवरी कंद्रिका गाव वसलेले आहे. सकाळी नऊ वाजता सचिनचे या गावात आगमन झाले. यावेळी मोठ्या उत्साहात गावातील नागरिकांनी सचिनचे स्वागत केले. गावात सचिनच्या स्वागतासाठी मोठी पोस्टर्स लावण्यात आली होती. तसेच गावातील नागरिकांसोबतच शेजारच्या गावातील महिला, मुलांनीही कंद्रिका गावात सचिनची छबी टिपण्यासाठी एकच गर्दी केली होती.
जगभरात सचिनचे मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत. त्याला पत्तूमराजूवरी कंद्रिका गावही कसे अपवाद असणार. तेथेही सचिनचे अनेक चाहते आहेत. तेथील वेंकटेश्वरलू या चाहत्याने सचिन येणार असल्याने त्याच्या चेह-याचे एक हजार मुखवटे त्याने वाटले होते. ‘पुत्तमराजूवरी कंद्रिका हे गाव सचिनमुळे प्रकाशझोतात आले आहे. याआधी शेजारच्या गावांनाही आमच्या गावाबद्दल माहिती नव्हती. मी याआधी कधीही सचिनला पाहिले नव्हते. मात्र आज मला ही संधी मिळाली. मी खूप खूश आहे.’ अशी प्रतिक्रिया सचिनचा चाहता वेंकटेश्वरलू याने दिली.
यावेळी सचिनने गावातील नागरिकांशीही मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. रस्त्यांची कमतरता, शौचालयांची स्थिती तसेच वीजपुरवठा यासांरख्या अनेक या समस्या गावातील नागरिकांना भेडसावत आहेत. यासाठी सचिनने खासदारासांठी असणा-या स्थानिक क्षेत्र विकास योजनेतून तीन कोटी रूपयांची तरतूद केली आहे.
0
खंडाळ्याजवळ अपघात; ८ ठार

सातारा -सातारा-पुणे मार्गावरील पारगाव-खंडाळा येथे आज दुपारी एका कंटेनरला भीषण अपघात झाला. या अपघातग्रस्त कंटेनरखाली चिरडून आठ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे.
अपघातग्रस्त कंटेनर साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने चालला होता. पारगाव-खंडाळा येथे समोरून वेगाने येणाऱ्या एका एसटीला साइट देताना हा कंटेनर उलटला. रस्त्यावर एसटीची वाट पाहत असलेले आठ प्रवासी या कंटेनरखाली चिरडले गेले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनरचालक फरार झाला. याप्रकरणी अद्याप कोणावरही गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नसल्याचे समजते.
0
सायनाची सरशी, जेतेपद पटकावलं

बीजिंग -भारताची स्टार बँडमिंटनपटू सायना नेहवालने चायना ओपनचे जेतेपद पटकावून चीनमध्ये तिरंगा फडकवला. अंतिम सामन्यात सायनाने जपानच्या अकाने यामगुचीला पराभूत केले. सायनाने आपल्या आजवरच्या कारकिर्दित पहिल्यांदाच चायना ओपनचे जेतेपद पटकावले आहे.
चायना ओपनच्या अंतिम सामन्यात सायनाने जपानच्या अकाने यामागुचीवर २१-१२, २२-१० असा विजय मिळविला. पहिला सेट सायनाने सहज खिशात टाकाला. मात्र दुसऱ्या सेटमध्ये यामागुचीने तिला कडवी झुंज दिली. दुसरा आणि अंतिम सेटमध्ये विजय मिळविण्यासाठी यामागुचीने सायनाला चांगलेच तंगवले. मात्र आपल्या अनभुवाच्या जोरावर सायनाने यामागुचीला ‘स्मॅश’ देत विजयश्री खेचून आणली.
या हंगामातील सायनाचे हे तिसरे विजतेपद असून चायना ओपनचे पहिलेच विजेतेपद आहे. दुखापतीमुळे सायनाला अनेक स्पर्धांमधून माघार घ्यावी लागली होती. मात्र दुखापतींवर मात करीत सायनाने पुन्हा एकदा झोकात पुनरागमन केले आहे.
चायना ओपन पुरुष एकेरीत के. श्रीकांतनेही पटाकवले जेतेपद
सानिया नेहवाल पाठोपाठ भारताच्या के. श्रीकांतनेही पुरुष एकेरीमध्ये चायना ओपनचे जेतेपद पटकावले. या दोन्ही विजयामुळे चीनमध्ये भारतीय खेळाडूंचेच वचर्स्व दिसून आले. के. श्रीकांतने चीनच्या लीन डॅनवर मात करीत जेतेपदाला गवसणी घातली. उपांत्य सामन्यात श्रीकांतने जर्मनीच्या मार्क जेबलरला पराभूत करुन अंतिम सामन्यातील विजयाच्या आशा उंचवल्या होत्या.
0
आयएमए व एमओएच्या राज्य अध्यक्षपदी डॉ. राठोड व डॉ. फडके


यवतमाळ – क्रिटीकेअर रुग्णालयाचे संचालक डॉ. टी. सी. राठोड यांची इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य अध्यक्षपदी तर डॉ. अजित फडके यांची महाराष्ट्र आर्थोपेडिक असोसिएशनच्या राज्य अध्यक्षपदी निवड झाली. डॉ. फडके सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ असून, १९८३ मध्ये पुणे येथील बीजी रुग्णालयात त्यांनी एम.एस. केले. राज्य ते राष्टÑ पातळीवर अनेक वैद्यकीय उपक्रमांमध्ये सहभागी होऊन सन्मान मिळवले आहेत. तर डॉ. राठोड मधुमेह रोगतज्ज्ञ असून, १९७९ मध्ये नागपुरातून त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. जपान आणि जमर्नीमध्ये त्यांनी मधुमेह रोगावर भारताचे प्रतिनिधित्व केले. शिर्डीतील साईबाबा संस्थानचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी धुरा सांभाळली आहे. डॉ. राठोड आणि डॉ.फडके यांचा विविध सामाजिक कार्यामध्ये पुढाकार असतो. पुणे येथे २२ नोव्हेंबर रोजी आयोजीत कार्यालयात आपल्या अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळणार आहेत.
राज्याध्यक्ष ह्या महत्वाच्या पदावर काम करतांना वैद्यकीय व्यवसाय अधिकाअधिक लोकाभिमुख व्हावा यासाठी आणि मधुमेह या आजाराविषयी लोकजागरण करण्याचा मनोदय डॉ. राठोड यांनी व्यक्त केला. तर डॉ. फडके यांनी अस्थिव्यंगोपचारविषयक अद्यावत ज्ञान ग्रामीण भागातील वैद्यक व्यावसायीकापर्यंत पोहचविणे व त्याद्वारे तेथील सेवेत सुधारणा घडवून आणण्याचा मानस व्यक्त केला.
0
इंडोनेशियाला भूकंपाचा धक्का

जर्काता – पूर्व इंडोनेशियातील मलुकु बेट शनिवारी सकाळी ७.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूंकपाच्या धक्क्याने हादरले. या भूकंपामुळे कुठलीही जिवीतहानी झाली नसली तरी, त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
कोटा टर्नेटपासून १५४ कि.मी. अंतरावर उत्तरपश्चिमेला असलेल्या समुद्रात ४६ कि.मी. आत या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. केंद्रबिंदूपासून ३०० कि.मी. च्या किनारपट्टी भागात त्सुनामीच्या लाटा उसळण्याची शक्यता असल्याचा इशारा पॅसिफित त्सुनामी इशारा केंद्राने दिला आहे.
इंडोनेशिया, फिलिपाईन्स, जपान, तैवान आणि दक्षिण प्रशांत महासागारातील बेटांना त्सुनामीच्या लाटा धडकू शकतात असे पॅसिफिक त्सुनामी इशारा केंद्राने म्हटले आहे. तीस सेंटीमीटर ते एक मीटर उंचीच्या लाटा इंडोनेशियाच्या बेटांना धडकू शकतात तर, फिलिपाईन्समध्ये तीस सेंटीमीटर पेक्षा कमी उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
0
चीनकडून पाकिस्तानी सैन्याला प्रशिक्षण
नवी दिल्ली – भारत विरोधी कारवायांमध्ये नेहमी पाकिस्तानला मदत करणारा चीन पाकिस्तानचे नियंत्रण असलेल्या काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याला शस्त्रास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देत असल्याची माहिती समोर आली आहे.
सीमा सुरक्षा दलाला मिळालेल्या माहितीनुसार चीनी सैन्य पाकिस्तानचे नियंत्रण असलेल्या काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कराला शस्त्रास्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण देत आहे. ही नेमकी कुठली शस्त्रास्त्रे आहेत ते सीमा सुरक्षा दलाने स्पष्ट केलेले नाही.
सीमेवर पाकिस्तानने काही महत्वाचे बदल केल्याचेही निदर्शनास आले आहे. पाकिस्तानी लष्कराच्या विशेष पथकांनी पाकिस्तानी रेंजर्सकडून काही चौक्यांचा ताबा घेतला आहे. आबोहार आणि गुरदासपूर सेक्टरमध्ये पाकिस्तानने नव्या टेहळणी चौक्या उभारल्या आहेत. बीएसएफच्या गुप्तचर अहवालानुसार, सीमेवर पाकिस्तानचे जे दूरध्वनी इंटरसेप्ट केले आहेत त्यातील संभाषणावरुन भारतीय जवान आणि मालमत्तेचे जास्तीत जास्त नुकसान करण्यासाठी मोक्याच्या जागांवर अचूक नेमबाज तैनात करण्याची पाकिस्तानची योजना आहे. पाकिस्तानचे नियंत्रण असलेल्या काश्मीरमध्ये चीनी सैन्याच्या उपस्थितीचा मुद्दा भारताने अनेकदा चीनकडे व्दिपक्षीय चर्चे दरम्यान उपस्थित केला आहे. पण चीनने प्रत्येकवेळी पाकिस्तानातील पायाभूत प्रकल्पांमध्ये काम करणारे ते बांधकाम मजूर असल्याचा दावा केला.
0
छत्तीसगड सरकार लपवा छपवी करतेय – राहुल गांधी

बिलासपूर – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी छत्तीसगडला जाऊन नसबंदी शस्त्रक्रिय़ेनंतर मरण पावलेल्या महिलांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
राहुल गांधी यांनी या घटनेसाठी राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. राज्य सरकार आपल्यावरील जबाबदारी टाळत असून, रमण सिंह सरकार लपवाछपवी करत आहे. ही निव्वळ दुर्लक्षाने घडलेली घटना नाही. यात भ्रष्टाचार असून बनावट औषधांचा वापर झाल्याचा आरोप राहुल यांनी केला.
बिलासपूरमधील ज्या शिबिरात नसबंदी शस्त्रक्रिया झाल्या तेथे चांगली व्यवस्था नव्हती येथे आलेल्या अनेकांना इजा झाली होती. राज्य सरकार या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी टाळत असून, लपवा छपवी सुरु असल्याचे राहुल म्हणाले.
राहुल यांनी रुग्णालयालाही भेट देऊन तेथे उपचार घेत असलेल्या महिलांच्या प्रकृतीची विचारपूस केली. बिलासपूरमधील नसबंदी शिबिरात शस्त्रक्रिया करुन घेणा-या १३ महिलांचा मृत्यू झाला असून, १३८ महिला आजारी आहेत. आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली. या प्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी नसबंदी शस्त्रक्रिया पार पाडणारे डॉ. आर.के. गुप्ता यांना अटक केली आहे. डॉ. गुप्तांना मदत करणारे डॉक्टर आणि सहका-यांचा पोलिस शोध घेत आहेत.
0
नालासोपाऱ्यात भीषण स्फोट

नालासोपारा -नालासोपाऱ्यातील एम. डी. नगर येथे एका इमारतीत आज (शनिवार) सकाळी एक भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात सात जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बी विंगमधील तळमजल्यावरील पांडे यांच्या घरातील लाईट सुरु करताच जोरदार स्फोट झाल्याने एकच खळबळ माजली. स्फोटाचे नेमके कारण समजलेले नसले तरीही घरात गॅस गळती झाल्यामुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. स्फोटाची तीव्रता जास्त असल्याने याचा फटका इतर विंगमधील घरांनादेखील बसला असून या घरांचेही काही प्रमाणात नुकसान झाले असल्याचे समजते आहे.
स्फोटामुळे घरातील अनेकांना गंभीर जखमा झाल्या आहेत. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अधिक चौकशी सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
0
काँग्रेसकडून राज्यपालांची माफी

मुंबई -विधानभवनात गाडी अडवण्याचा केलेला प्रकार आणि त्या गदारोळात झालेल्या धक्काबुक्कीबद्दल काँग्रेस आमदारांनी आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची क्षमा मागितली आहे. राज्यातील भाजप सरकारला पुन्हा बहुमत सिद्ध करायला सांगावं, या मागणीसाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली, तेव्हाच झाल्या प्रकाराबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
गेल्या बुधवारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं विधानसभेत ‘विश्वास’ जिंकला. परंतु, त्यांनी आवाजी मतदानानं बहुमत सिद्ध केल्यानं राजकारणात वादाची ठिणगी पडली आहे. भाजपनं नैतिकता गुंडाळून ठेवली, राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्याचा ठपका बसू नये म्हणून आवाजी मतदानाची खेळी केली, अशी टीका शिवसेना आणि काँग्रेसनं त्याच दिवशी केली. या विश्वासमताच्या विरोधात राज्यपालांकडे दाद मागून, सरकारला पुन्हा बहुमत सिद्ध करण्याची मागणी करणार असल्याचं काँग्रेसनं जाहीर केलं होतं. त्यानुसारच, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळ गटनेते राधाकृष्ण विखे-पाटील, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आमदारांच्या शिष्टमंडळानं राजभवनवर सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली.
देवेंद्र फडणवीस सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करता आलेलं नाही. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावावर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश आपण द्यावेत, अशा आशयाचं निवेदन काँग्रेसनं राज्यपालांना दिलंय. बहुमत सिद्ध होईपर्यंत कुठलाही धोरणात्मक निर्णय घेण्यास त्यांना संमती देऊ नये, अशी आग्रही सूचनाही त्यांनी केली आहे. त्याचवेळी, विधानभवन परिसरात केलेल्या गोंधळाबद्दल काँग्रेसनं राव यांची माफी मागितली. भाजपनं आवाजी मतदानानं बहुमत सिद्ध केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस आमदारांनी राज्यपालांची गाडी अडवली होती आणि त्यांना धक्काबुक्कीचाही प्रयत्न केला होता. या प्रकरणी पाच काँग्रेस आमदारांवर निलंबनाची कारवाईही करण्यात आली आहे.
0
व्यापाऱ्याची हत्या,तिघांना अटक

मुंबई -पाच महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे अपहरण आणि हत्या केल्याप्रकरणी प्रकरणात मुंबई पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सायन येथे राहणाऱ्या व्यापाराचे अपहरण करून त्याच्या सुटकेसाठी ३० लाखांची खंडणी मागण्यात आली होती. परंतु, खंडणी मागतिल्यानंतर लगेचच या अपहरणकर्त्यांनी व्यापाऱ्याची हत्या करून मृतदेह माळशेज घाटात फेकून दिला होता. सायन येथे राहणाऱ्या स्वामीनारायण सत्वानी (६५) या भंगार विक्रेत्याचे जून २०१३ मध्ये अपहरण करण्यात आले होते. त्यांच्या अपहरणाची तक्रार सायन पोलिस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली. क्राइम ब्रँचच्या युनिट चारनेही या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला होता. काही दिवसांनी अपहरणकर्त्यांनी सत्वानी यांच्या मोबाइलवरून जोधपूर येथे राहणाऱ्या सत्वानी यांच्या कुटुंबियांना फोन करून त्यांच्या सुटकेसाठी ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. सत्वानींच्या कुटुंबियांनी तातडीने याची तक्रार जोधपूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली. दरम्यान, अपहरणकर्ते सत्वानी यांना घेऊन सतत आपला ठावठिकाणा बदलत होते. ते दिल्लीलाही गेले आणि त्यानंतर माळशेज घाटात नेऊन अपहरणकर्त्यांनी सत्वानी यांची हत्या केली. अपहरकर्त्यांना पाहणाऱ्या एका साक्षीदाराने क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांना त्याविषयी माहिती दिली त्यावरून त्यांचे स्केच काढण्यात आले. स्केचच्याच आधारे पोलिसांनी बदलापूर-वांगणी येथून विशाल दुगाडे (२९), आबिद अन्वर महाबले (३६), मिथुन उन्नीकृष्णन पल्लिई (३३) यांना अटक केली. अन्वर सिद्दीकी हा चौथा आरोपी फरार आहे. दरम्यान, सत्वानी यांच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.
0
CPM कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकले

तंजावूर -तमिळनाडूतील तंजावूर येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तिंनी तीन पेट्रोल बॉम्ब फेकल्याची घटना घडली. या हल्ल्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून घटनास्थळावर क्रूड बॉम्बचे काही तुकडे सापडले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेत कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. कम्युनिस्ट पार्टीतर्फे या भागात वाळू माफियाविरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्याविरोधात काही राजकीय नेते अस्वस्थ होते, अशी माहिती सीपीएमच्या नेत्याने दिली.
0
आधारभूत योजनेअंतर्गत जिल्ह्यात कापूस खरेदी

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्यावतीने आज पासून जिल्ह्यातील काही केंद्रावर आधारभूत दरानुसार कापूस खरेदीस प्रारंभ करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आधारभूत योजनेअंतर्गत विक्री करीता आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आज महासंघाच्यावतीने 27 केंद्रावर खरेदीचा शुभारंभ करण्यात आला आहे. दुसऱ्या व तिसऱ्या टप्यात आणखी 73 केंद्र उघडणे प्रस्तावीत आहे. अशी एकूण 100 खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले आहे. कापसाची खरेदी शासनाच्या एफएक्यू नॉर्म्स प्रमाणे राहणार आहे. कापसाची आद्रता 12 टक्याच्या वर असल्यास कापूस स्विकारला जाणार नाही. शेतकऱ्यांना कापसाची रक्कम तिन दिवसांच्या आत अदा केली जाणार आहे. कापसाचे दर एलआरए 5166 जातीला 3850 रुपये, एच 4/एच6 जातीला 3950 तर बन्नी / ब्रम्हा जातीला 4050रु. इतका भाव केंद्र शासनाने जाहिर केल्या प्रमाणे देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणतेवेळी सातबारा सोबत आणावा. असे कापूस पणन महासंघाच्या विभागीय व्यवस्थापकांनी कळविले आहे.
0
दगडी प्रशासकीय ईमारत परिसरात स्वच्छता मोहिम
यवतमाळ : येथील तहसिल चौकातील दगडी प्रशासकीय ईमारत परिसरात आज स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ईमारतीच्या सातही शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. यवतमाळ नगर परिषदेच्या सहकार्याने ही मोहिम राबविण्यात आली. यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रविंद्र पांढरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अर्चना इंगोले, प्र. जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी वसंत मते, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रमोद रामशेट्टीवार, सहकार विभागाचे कार्यालय अधिक्षक गजानन वडेकर यांच्यासह सातही कार्यालयाचे सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वत: हातात झाडू घेवून संपूर्ण
ईमारत परिसराची साफसफाई केली. नगर परिषदच्यावतीने परिसरात जमा झालेला कचरा ट्रॅक्टरमध्ये टाकुन परिसरात साचलेला जाळण्यायोग्य कचरा यावेळी कर्मचाऱ्यांनी जमा करुन जाळून नष्ट केला. आज राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे परिसर स्वच्छ झाला असून यापुढे परिसर रोज स्वच्छ करण्याचा
संकल्प सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यावेळी केला. या अभियानात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, शासकीय जिल्हा ग्रंथालय, ॲन्टी करप्शन कार्यालय आदी कार्यालये सहभागी झाले होते.
0
दलित हत्याकांडविरोधात एनजीओंचे शनिवारी आंदोलन

मुंबई – अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी दलित हत्याकाडांच्या निषेधार्थ शहरातील स्वयंसेवी संस्था शनिवारी आंदोलन करणार आहेत.
शिवाजी पार्क येथे होणा-या या आंदोलनात अभिनेते नाना पाटेकर, अमोल पालेकर, दिग्दर्शक जब्बार पटेल, चित्रपट निर्माते एन. चंद्रा आणि गायिका फैय्याज हे कलाकारदेखील सहभागी होण्याची शक्यता आहे. दिवसेंदिवस दलित लोकांवरील अन्याय वाढतच आहे. त्यामुळे आजही लोक भितीच्या छायेत वावरत आहेत. आजही दलित, महिला आणि आदिवासी हे सांविधानिक अधिकारापासून वंचित आहेत. स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांनंतरही या लोकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. भारतीय समाज हा विविध सांस्कृतिक धाग्यांनी बनला आहे. त्यामुळे सर्व जातींना एकत्रित ठेवण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत असे स्वयंसेवी संस्था चालवणारे काँग्रेसचे खासदार हुसैन दलवाई यांनी सांगितले.तसेच या प्रकरणातील आरोपींविरोधात तात्काळ कारवाई केली जावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तसेच यांसारख्या प्रकरणांसाठी विशेष तपास समिती नेमण्यात यावी अशी मागणीही काँग्रेस नेत्यांनी केली आहे.
0
खासदाराचा तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न
कोलकाता – शारदा चिटफंड घोटाळ्यातील आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचे निलंबित खासदार कुणाल घोष यांनी गुरुवारी रात्री अलिपूर तुरुंगात झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गृहसुधार निरीक्षक, तुुरुंगातील डॉक्टर आणि या प्रकरणात हात असलेल्या तुरुंगातील कर्मचा-यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.कुणाल घोष यांनी आत्महत्या करण्यासाठी झोपेच्या गोळ्या घेतल्या. काही वेळाने त्यांनी हे डॉक्टरांना सांगितले. त्यानंतर त्यांना ताबडतोब एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पश्चिम बंगाल गृहसुधार मंत्री एच.के.स्वाफी यांनी सांगितले. १० नोव्हेंबर रोजी घोष यांनी स्थानिक न्यायालयात हजर करण्यापूर्वी येत्या तीन दिवसांत जर सीबीआयने या घोटाळ्यात सहभागी असलेल्या अन्य आरोपींवर योग्य कारवाई केली नाही तर मी आत्महत्या करेन अशी धमकी दिली होती. या घोटाळ्यात सहभागी असलेले इतर आरोपी स्वतंत्रपणे फिरत आहे आणि मी मात्र येथे तुरुंगात आहे. मी तीन दिवसांची मुदत देतो, जर या तीन दिवसांत घोटाळ्यातील इतर सहभागी लोकांवर योग्य कारवाई झाली नाही तर मी आत्महत्या करेन असे घोष यांनी न्यायदंडाधिकारी अरविंद मिश्रा यांना सांगितले होते.कुणाल घोष हे शारदा ग्रुपचे माजी सीईओ आहेत. कोट्यावधीच्या शारदा चिटफंड घोटाळ्यातील ते आरोपी आहेत. गेल्या एक वर्षांपासून ते तुरुंगात आहेत.













