नेर, दि. २२ – सरपंच पदाचा दुरपयोग करून ग्रामपंचायतमध्ये मुलाला नोकरीवर लावणाºया मंगरुळ येथील महिला सरपंचास पायउतार होण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले.
प्रेमिला चव्हाण असे महिला सरपंचाचे नाव आहे. तालुक्यातील मंगरुळ ग्रामपंचायत मध्ये त्या सरपंचपदावर विराजमान होत्या. या ग्रामपंचायतमध्ये सतत सदस्याचे वाद होत असल्याने चार सदस्यांनी राजीनामे दिले आहे. याच संधीचा फायदा घेत चव्हाण यानी पदाचा दुरपयोग घेऊन बापुराव मेश्राम, सदानंद मेश्राम हे ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असताना मुलगा रामचंद्र हरिदास चव्हाण यास रोजंदारी कर्मचारी म्हणून कामावर घेतले. या बाबत त्याने दरमहा १ हजार २०० रुपये पगाराची उचल केली आहे. यावरुन सरपंचाने आपल्या पदाचा फायदा घेऊन आर्थीक लाभ घेतल्याचे दिसून येते असा आरोप ग्रामपंचायत सदस्य गिरीष चव्हाडे यानी केला आहे. ग्रामपंचायतमध्ये कर्मचाºयाची आवश्यकता असल्यास गावात दवंडी देऊन किमी जाहीरात देऊन पदे भरण्यात येते. मात्र सरपंच चव्हाण यानी सर्व नियमाची पायमल्ली करून मुलाला कामावर ठेवले होते. या प्रकरणाची तक्रार ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली होती. दोन्हीकडील युक्तीवाद ऐकुण चव्हाण यांना पदावरून पायउतार व्हावे असे आदेश अप्पर जिल्हाधिकाºयांनी दिले. या आदेशाने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
Archive for December, 2014
महिला सरपंचास पायउतार होण्याचे आदेश, मुलाला नोकरीवर ठेवणे भोवले
0
काँग्रेसचे आंदोलन, लाठीचार्ज

नागपूर – शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत नागपूर विधान भवनासमोर आंदोलन केले. यावेळी आक्रमक आंदोलकांनी थेट बॅरिकेड्स तोडत विधान भवनाकडे धाव घेतली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला.
महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांच्या नेतृत्त्वाखालील हा मोर्चा काढण्यात आला. युवक काँग्रेसचे पदाधिकारी विधानसभा आवारातील बॅरिकेडस तोडून विधानसभेकडे पुढे सरकले. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र आक्रमक झालेले कार्यकर्ते पोलिसांच्या विनंतीला न जुमानता विधान भवनाच्या दिशेने धावत सुटले. अखेर कायदा-सुवस्थेसाठी पोलिसांना लाठीमार करणे भाग पडले.मात्र, लोकशाही मार्गाने काढलेल्या मोर्चावर पोलिसांना लाठीमार करायला भाग पाडून भाजप सरकारने आपल्या ताकदीने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप विश्वजित कदम यांनी केला आहे.
0
विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

बेळगाव – जमखाना धुण्यासाठी तळ्याकडे गेलेल्या दहावीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मार्कंडेय नगर येथे घडली आहे. तळ्यात बुडालेल्या दोन विद्यार्थ्यांची नावे यल्लाप्पा शटाप्पा नाईक(१५) आणि शानूर लगमाप्पा दंडावर (१६) अशी आहेत. उशिरापर्यंत तळ्यात त्यांचे मृतदेह शोधण्याचे कार्य सुरु होते. रात्र झाल्यावर शोध कार्य थांबविण्यात आले. आता मंगळवारी सकाळी तलाव फोडून त्यातील पाणी काढून मृतदेह शोधण्यात येणार आहेत.सरकारी हायस्कूलमधील विद्यार्थी सहलीहून परतले होते. सहलीहून आल्यावर आठ विद्यार्थी सोमवारी जमखाना धुण्यासाठी तळ्याकडे गेले होते. जमखाना धूत असताना चार विद्यार्थी तळ्यात पडले त्यापैकी दोन विद्यार्थ्यांना वाचविण्यात आले. दोन विद्यार्थी मात्र तळ्यात बुडले. सदर घटनेची नोंद ग्रामीण पोलिस स्थानकात झाली आहे.
0
अंतराळात भारताची गगनभरारी

चेन्नई – २०१४ हे वर्षे भारताच्या अंतराळ मोहिमांसाठी अत्यंत चमकदार वर्ष ठरले. भारताची पहिलीच मंगळयान मोहीम यंदा यशस्वी झाली. पहिल्याच प्रयत्नात ही मोहीम यशस्वी करणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला. त्यामुळे जगभरातून भारताचे कौतुक झाले. केवळ या मोहिमेवरच न थांबता भारताने रॉकेट, उपग्रह अंतराळात सोडण्याबरोबरच तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत मोठी बाजी मारली.
भारत हा यापूर्वी अंतराळ मोहिमांसाठी अमेरिका, रशिया, फ्रान्सवर अवलंबून होता. त्यामुळे भारताने या मोहिमांसाठी स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान विकसित करण्यास प्रारंभ केला. या संशोधनाला २०१४ मध्ये मोठे यश मिळाले. आंतरध्रुवीय मोहीम, क्रायोजनिक इंजिनची चाचणी, अवजड रॉकेटची चाचणी आदी तांत्रिक आघाड्यांवर इस्रेने कमाल केली. भविष्यात भारतातर्फे मानवी मोहीम राबवण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष के. राधाकृष्णन यांनी दिली.
भारताने भावी अंतराळ मोहिमांसाठी मानवी कुपी तयार केली आहे. या कुपीमध्ये दोन ते तीन अंतराळवीरांची राहण्याची सोय आहे. या कुपीच्या चाचण्याही घेण्यात आल्या आहेत. तसेच क्रायोजेनिक इंजिनविरहित रॉकेटची चाचणीही झाली.
0
केरळमध्ये ३० ख्रिश्चन नागरिकांचे धर्मांतर

अलापुझा – देशात धर्मांतराच्या मुद्यावरुन कलह सुरु असताना विश्व हिंदू परिषदेकडून मात्र ‘घर वापसी’ मोहिम सुरुच आहे. विश्व हिंदू परिषदेकडून आयोजित कार्यक्रमात केरळमधील चेनगन्नूर येथे आठ कुंटुंबातील ३० ख्रिश्चन नागरिकांनी रविवारी धर्मांतर केले. चेप्पाडमधील कनिचनल्लोर येथील देवळात हा सोहळा पार पडला.
ज्या कुटुंबातील नागरिकांचे धर्मांतर करण्यात आले ते या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जबरदस्तीने अथवा आर्थिक मदतीचे आश्वासन देऊन त्यांचे धर्मांतर केले नसल्याचा दावा विश्व हिंदू परिषदेचे चेनगन्नू भागाचे अध्यक्ष प्रताप जी. पडिकल यांनी केला आहे.
तसेच या भागातील १५० कुटुंबांना हिंदू धर्मात समाविष्ट व्हायचे आहे. येत्या काही दिवसात राज्यातील अनेक भागांत ‘घर वापसी’ चा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे पड्डीकल म्हणाले.
0
आयसीसी २०१५ विश्वचषक अॅम्बेसिडरपदी सचिन तेंडुलकर

दुबई – भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची आयसीसी २०१५ विश्वचषकासाठी अॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सोमवारी ही घोषणा केली. आयसीसीच्या सर्वात मोठ्या स्पर्धेचा अॅम्बेसिडर होण्याची सचिनची ही दुसरी वेळ आहे. याआधी २०११ मध्ये झालेल्या विश्वचषकातही तो आयसीसीचा अॅम्बेसिडर होता. मात्र त्यावेळी तो क्रिकेटमध्ये सक्रिय होता. यावेळी सचिन माजी क्रिकेटपटू म्हणून ही भूमिका बजावणार आहे.
अॅम्बेसिडरपदी निवड झालेला सचिन आयसीसीने हाती घेतलेल्या विविध कार्यक्रमांचा प्रचार करणार आहे. येत्या १४ फेब्रुवारी ते २९ मार्च दरम्यान न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये विश्चचषक स्पर्धा होणार आहे.
आयसीसीने विश्वचषकाच्या अॅम्बेसिडरपदी दुस-यांदा निवड केल्याबद्दल मी खूप आनंदित आहे. सहा वेळा विश्चचषक स्पर्धेत भाग घेतल्यानंतर यावेळची स्पर्धा काही वेगळीच असणार आहे. कारण यावेळी मैदानाच्या बाहेर राहून मी या स्पर्धेचा आनंद घेणार आहे. विश्वचषक जिंकणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. २०११ मध्ये सुमारे २२ वर्षानंतर विश्वचषक जिंकण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले,असे सचिनने यावेळी सांगितले.२०१३ मध्ये सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. आपल्या २४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याने २०० कसोटी, ४३६ एकदिवसीय आणि एका टी२०मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये ३४ हजार ३५७ धावा केल्या आणि १०० शतके साकारली.
0
बोगस विद्यापीठाचा पर्दाफाश

नाशिक – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नता असल्याचे भासवत योग नॅचरोपॅथीचे दुकान मांडणाऱ्या बोगस विद्यापीठाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दशकभरापासून नाशिकरोडला बेमालूमपणे सुरू असणाऱ्या या विद्यापीठाच्या कारभाऱ्यांनी हजारो स्वप्नाळू तरुणांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त होऊ लागली आहे.
गेल्या आठ ते दहा वर्षांपासून इंडियन युनिव्हर्सिटी ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स अन्ड रिसर्च सेंटर या विद्यापीठाच्या नावाने योगा आणि नॅचरोपॅथीचे अभ्यासक्रम चालविले जात आहेत. नाशिकरोड येथील त्र्यंबक कॉम्प्लेक्समध्ये या विद्यापीठाचे कार्यालय होते. येथील अभ्याक्रमांना शासनाची तसेच, आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता असल्याचे सांगून, विद्यार्थ्याचा विश्वास संपादन केला जात होता. त्यामुळे विद्यार्थीही तेथे विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेत होते. विद्यापीठ तसेच, भारतीय पारंपरिक चिकित्सा योग नॅचरोपॅथी कॉलेजकडून फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतरही गुपचिळी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे या विद्यापीठाचे कारनामे आजवर उघडकीस आले नव्हते. मात्र, ही फसवणूक काही जणांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोग्य विद्यापीठाशी पत्रव्यहार करून संबंधित महाविद्यालयाच्या कारभाराबाबत संशय व्यक्त केला होता. या संस्थेशी आमचा कोणताही संबंध नसल्याची भूमिका आरोग्य विद्यापीठाने संबंधित पत्रव्यवहारकर्ते यांच्याकडे स्पष्ट केली. या संदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली. या संस्थेविषयी विद्यापीठाने घेतलेल्या अलिप्तपणाच्या भूमिकेनंतर पोलिसांनी संबंधित बोगस विद्यापीठ आणि महाविद्यालयाची माहिती घेतली. मान्यता नसतानाही योग अभ्यासाचे शिक्षण देणारे महाविद्यालय आठ ते दहा वर्षांपासून चालविले जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
बालसुधारगृहातून मुले पळाली

येरवडा – येरवडा येथील जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातून (बालसुधारगृह) २ डिसेंबर रोजी पाच मुले पळून जाण्याची घटना ताजी असतानाच शनिवारी (२०डिसेंबर) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास व्यायाम खोलीतून पुन्हा एकदा पाच मुले पळून गेली. त्यातील एकाला केअर टेकरने पाठलाग करून पकडले; तर चार जण पळून जाण्यात यशस्वी झाले. बालसुधारगृहातून मुले पळून जाण्याची चालू वर्षातील ही चौथी घटना आहे.
विविध गुन्ह्यातील अल्पयवीन मुले सातत्याने पळून जाण्याच्या घटना घडूनही केंद्र सरकारकडून सुरक्षेसाठी कुठलीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. केंद्रातून पळून गेलेल्या मुलांपैकी तीन मुले ही पुण्यातील असून एक जण पनवेलचा आहे. मुले पळून गेली ती त्या दिवशी शनिवारी केंद्रावर नऊ केअर टेकर, तीन परीविक्षा अधिकारी, एक समुपदेशक आणि २७ मुले केंद्रात होती. डिसेंबर महिन्याच्या दोन तारखेला पाणी भरण्याचे निमित्त साधून रात्री साडे अकरा वाजच्या सुमारास सहा मुले सीमा भिंतीवरून उडी मारून पळून गेली होते. एकाच्या पायाला उडी मारल्यामुळे दुखापत झाल्याने त्याला केंद्रातील केअर टेकरने पकडले होते. पाच दिवसानंतर त्यातील तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चिखली येथे पकडले; तर पंधरा दिवसांनी एकाला सोलापूर जिल्ह्यात पकडले होते. पळून गेलेल्यांपैकी अजूनही एक मुलगा पोलिसांना शोधता आलेला नाही.
शनिवारीही नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता ड्युटीवर असणारे केअरटेकर केंद्रातील काही मुलांना व्यायाम करण्यासाठी व्यायाम खोलीत घेऊन गेले. मुले खोलीत गेल्यावर केअर टेकरने दरवाजाला कडी लावून ते खोलीच्या मागे अंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी गेले. काही वेळातच पाच मुले व्यायाम खोलीच्या मुख्य प्रवेश दराने पळू लागली. हे पाहून तेथील महिलांनी आरडाओरडा केला असता एका मुलाला पाठलाग करून पकडले; मात्र त्यातील चार जण पळून गेले. चार मुलांची विविध ठिकाणी आणि त्यांच्या घरी शोध घेऊन सुद्धा सापडली नसल्याने रात्री पोलिसांकडे मुले हरविल्याची तक्रार दिली.
0
मोबाइलने घेतला तरुणाचा बळी

बुंदी (राजस्थान) – चार्जिंगला लावलेला मोबाइल तुम्ही तसाच उचलून कधी कानाला लावलाय? कधी-ना-कधी किंवा अनेकवेळा तुम्ही तो लावला असेल… यापैकी काहीही करत असाल तर सावधान! कारण त्यात तुमचा जीवही जाऊ शकतो.
चार्जिंगला लावलेल्या अशाच एका मोबाइलने राजस्थानमधील एका गावात २४ वर्षीय तरुणाचा बळी घेतलाय. राजूलाल गुर्जर असं या तरुणाचं नाव आहे. मोबाइल चार्जिंगला लावलेला असतानाच त्याला एक कॉल आला. कॉल येताच राजूलालने चार्जिंग सुरू असतानाच तो कानाला लावला. मोबाइलवर त्याचं बोलणं चालू असतानाच अचानक मोबाइलमधील बॅटरीचा स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की राजूलाल छाती आणि हात भाजून निघाले. तो तिथेच बेशुद्ध झाला. त्याच अवस्थेत त्याला जवळच्या आरोग्य केंद्रावर नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विजेचा तीव्र धक्का आणि भाजल्यामुळं राजूलालचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली आहे.
0
१० वर्षाच्या मुलाची आत्महत्या

पुणे – जर्किनचा हट्ट न पुरवल्याने एका १० वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. घरात कुणीही नसताना या मुलाने पंख्याला ओढणी बांधून गळफास घेत स्वत:चे जीवन संपवले. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे.
आदित्य पिसाळ असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. धनकवडी परिसरात राहणारे बांधकाम व्यावसायिक सुनील पिसाळ यांचा तो मुलगा होता. सुनील यांच्या बहिणीचा रविवारी वाढदिवस होता. त्यासाठी हॉटेलमध्ये ठेवलेल्या पार्टीला घरातील सगळेच जाणार होते. यावेळी आदित्यने आईकडे जर्किनसाठी हट्ट धरला. मला आत्ताच्या आत्ता जर्किन हवे नाहीतर मी तुमच्यासोबत येणार नाही, असे त्याने सांगितले. त्यावर आता तुला स्वेटर घेऊ, असे सांगून आईने त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, आदित्यने जर्किनचा हट्ट काही सोडला नाही. आईवर तो रागावलाही. आदित्य काही केल्या ऐकत नसल्याने शेवटी त्याला एकटेच घरी ठेऊन बाकी सगळेजण हॉटेलमध्ये गेले. त्याचवेळी आदित्यने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. रात्री सव्वा दहाच्या सुमारास कॉम्प्युटरच्या टेबलवर उभे राहून त्याने पंख्याला ओढणी बांधली आणि ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी आदित्यवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, अवघ्या १० वर्षाच्या मुलाने आत्महत्या करण्याची ही घटना सर्वांनाच धक्का दोणारी असून मुलांच्या हट्टीपणाचा मुद्दा अधिकच गडद बनला आहे.
0
इम्फाळमध्ये बॉम्बस्फोट; ३ ठार

इम्फाळ – मणिपूरची राजधानी इम्फाळ शहरातील खुयाथाँग भागात आज सकाळी दहशतवाद्यांनी घडविलेल्या बॉम्बस्फोटात तीन नागरिकांचा मृत्यू झाला. तर, चार जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुयाथाँग मार्केटजवळच्या रस्त्याच्या कडेला हा स्फोट झाला. अतितीव्र स्फोटकांच्या सहाय्याने हा स्फोट घडविण्यात आल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. या स्फोटानंतर परिसरात नाकेबंदी करण्यात आली असून पोलिसांनी छापासत्र सुरू केले आहे.
0
आमदारांचा रेल्वेत गोंधळ

नागपूर – साधेपणाचे उदाहरण देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः स्पेशल फ्लाइटने प्रवास करण्याचे टाळतात. मात्र, राज्याच्या पाच आमदारांनी रेल्वेच्या एसी डब्यातील प्रवासाकरिता शुक्रवारी रात्री नागपूर रेल्वे स्थानकावर गोंधळ घातला. इतकेच काय तर स्वतःच्या सोयीसाठी प्रवाशांना वेठीस धरत तब्बल दहावेळा चेन पुलिंग केली. या गोंधळात ही गाडी मुंबईला पोहोचण्यास तब्बल चार तास उशीर झाल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
सेवाग्राम एक्स्प्रेस नागपूर रेल्वे स्थानकावरून शुक्रवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास सुटण्यास सज्ज होती. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला दोन दिवस सुटी असल्याने अनेक आमदारांनी घरची वाट धरली. मात्र, पाच आमदारांना स्लीपर क्लासची तिकिटे मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. आपल्याकरिता रेल्वेने एसीचा वेगळा डबा जोडावा, असा आग्रह या आमदारांनी धरला. ‘रेल्वे प्रशासनाने हा आग्रह मान्य न केल्याने या आमदारांनी चक्क दहा वेळा चेन पुलिंग केली. त्यामुळे ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावरून सुटण्यास उशीर झाला. तसेच वर्धा रेल्वेस्थानकावरूनसुद्धा ही गाडी उशिरा सुटली. यामुळे पुढील वाहतुकीच्या वेळांमध्ये फरक पडल्याने ही गाडी मुंबईला चार तास उशिरा पोहोचली,’ अशी माहिती या गाडीतील प्रवासी नीलेश वाणी यांनी दिली. ‘या गाडीकरिता अनेक आमदारांनी एसी कोचमध्ये आरक्षण मागितले होते. परंतु नागपूर स्थानकाचा व्हीआयपी कोटा संपल्याने केवळ पाच आमदारांना एसी क्लासमध्ये आरक्षण न देता स्लीपर क्लासमध्ये देण्यात आले. त्यामुळे या आमदारांनी एसी डब्याची मागणी केली. परंतु, प्रत्येक गाडीची डबे खेचण्याची एक विशिष्ट क्षमता असते आणि या गाडीला नवा कोच जोडणे आम्हाला शक्य नसल्याने आमदारांच्या मागणीला नकार देण्यात आला. यादरम्यान चेन पुलिंगसुद्धा झाले. परंतु ते आमदारांनीच केले काय, हे सांगता येणार नाही. या गोंधळात गाडी नागपूर स्थानकाहून २० मिनिटे तर वर्धा स्थानकाहून १० मिनिटे उशिरा सुटली’, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी दिली.
0
उस्मानाबाद : दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

उस्मानाबाद – सततचा दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस आणि कर्जबाजारीपणाला वैतागून उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी शनिवारी जीवनयात्रा संपविली. २० डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ६४ झाली आहे. त्यापैकी १६ शेतकऱ्यांच्या कुटुंबाना शासकीय मदत मिळाली आहे.
रूई (ता. परांडा) येथील शेतकरी नवनाथ लिमकर (वय ६५) याने बुधवारी १७ डिसेंबर रोजी विषप्राशन केले होते. शनिवारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. नागराळ (ता. लोहारा) येथील युवा शेतकरी रवी राजेंद्र गोरे (२२) याने शनिवारी नापिकी व कर्जबाजारपणाला कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. जानेवारी २०१४ ते २० डिसेंबर पर्यंत जिल्ह्यातील ६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी पॅकेजची घोषणा केल्यानंतरही आत्महत्याचे हे सत्र सुरूच आहे. या आत्महत्येमुळे जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती भयावह असल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्यात २०१४ मध्ये २० डिसेंबरपर्यंत झालेल्या ६४ आत्महत्यांपैकी केवळ १६ आत्महत्या शासकीय अर्थसहाय्यास पात्र ठरल्या आहेत. १३ आत्महत्यांचे प्रकरण निर्णयासाठी राखून ठेवण्यात आले आहेत.
0
जागतिक युद्धांमागे मुस्लिम व ख्रिश्चन

नवी दिल्ली , दि. २१ – धर्मांतराच्या मुद्द्यावरून देशात सुरू असलेल्या वाद-प्रतिवादाला विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी नवे वादग्रस्त वळण दिले आहे. सिंघल यांनी मुसलमान आणि ख्रिश्चनांवर थेट टीका केली असून हे दोन धर्मच जगातील युद्धांना कारणीभूत आहेत,’ असा आरोप केला आहे. सिंघल यांच्या या वक्तव्यामुळे देशातील धार्मिक वातावरण तापण्याची शक्यता आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सिंघल यांनी हिंदुत्ववादी संघटनांकडून सुरू असलेल्या धर्मांतराच्या ‘घर वापसी’ मोहिमेची पाठराखण केली आहे. ‘आम्ही धर्म परिवर्तन करण्यासाठी नाही तर मनं जिंकण्यासाठी निघालो आहोत,’ असं ते म्हणाले. ‘जगातील सध्याच्या परिस्थितीवरून जागतिक महायुद्ध अटळ असल्याचे दिसत आहे. या युद्धातील खरे ‘खिलाडी’ मुसलमान आणि ख्रिश्चन आहेत. हिंदू त्याच्यापेक्षा वेगळा आहे, असे सांगून, ‘सध्या जग इस्लामी दहशतवादाच्या सावटाखाली आहे,’ असे ते म्हणाले.
सिंघल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केंद्र सरकारचे कौतुक केले. ‘गेला काही काळ धर्म आणि संस्कृतीला गुलाम बनविण्यात आले होते. मात्र, आता तसं होणार नाही. सध्याचं सरकार हिंदूंचे संरक्षण करणारं आहे,’ असेही सिंघल म्हणाले.
0
१०९ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना मदतीचा हात, जि.प.कर्मचारी सहकारी पतसंस्थेचा पुढाकार
यवतमाळ, दि. २१ – जगाचा पोशिंदा सततच्या दुष्काळामुळे संकटात सापडला आहे. आर्थिक विवंचनेतून शेतकरी आत्महत्या करीत आहे. १०९ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुबांना ५ हजार रुपये व साडीचोळी असा आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. हा कार्यक्रम जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सर्व महोत्सवी वर्षानिमित्त सहकार भवन येथे रविवारी पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल मंत्री ना. संजय राठोड होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ. मदन येरावार, आ. ख्वॉजा बेग, आ. राजू तोडसाम, पतसंस्थेचे अध्यक्ष राजूदास जाधव, पवन आत्राम, राजेंद्र राऊत यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी ओळखून पतसंस्थेच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते ५ हजार व साडीचोळी अशी मदत करण्यात आली. कुटुंबप्रमुखाने जीवन संपविल्यामुळे शेतकºयांचे कुटुंबच उघड्यावर पडले आहे. शेतकरी विधवा, त्यांची मुलं, मुली यांच्या चेहºयावरून उद्याची काळजी स्पष्टपणे दिसत होती. कपाशीला जन्म देणाºया जिल्ह्यातच आत्महत्येचे पीक आले, शेतकरी जगला तरच देश जगेल, राज्य सरकार शेतकºयांप्रती संवेदनशील असल्याचे प्रतिपादन आ. मदन येरावार यांनी केले. शेतकºयांवर आत्महत्येची पाळी येणार नाही. यासाठी राज्य सरकारकडून दिघकालीन उपाययोजना करण्यात येणार आहे. शेतकºयांनी हिंमत सोडू नये. राज्यात कष्टकºयांचे सरकार आले आहे. एक दिवस शेतकरी ‘फिनिक्स’पक्षाप्रमाणे भरारी घेतील, असा आशावाद ना. संजय राठोड यांनी अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केला. यावेळी आ. ख्वॉजा बेग, आ.प्रा. राजू तोडसाम यांनी आम्ही शेतकºयांच्या पाठीशी आहो, जीवन संपवू नका, असे आवाहन केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दादाराव पवार, गौतम वानखेडे, सरला दाडे, अर्चना बेले, प्रियंका चौधरी, मिना भगत, सुनिता चव्हाण, मंगला कुमरे यांच्यासह आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यात आला. प्रास्ताविक राजूदास जाधव यांनी केले. यावेळी संजय गावंडे, सुमाला पुडके, शरद घाटोड, डॉ. दिलीप चौधरी, विजय डंभारे, संदीप श्रीरामे, शेख लुकमान, अनिल सरताबे, दीपक दोडके, रामराव टेकाळे, नंदेश चव्हाण, सुरेश घावडे, साहेबराव राठोड यांच्यासह शेतकरी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
विवाहीतेची आत्महत्या, दहाजणांवर गुन्हा

यवतमाळ, दि. २१ – हुंड्याच्या कारणावरून मुलीच्या सासरच्यांनी अपमानस्पद वागणूक दिल्याने विवाहितेच्या वडीलाने आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी दहाजणाविरुद्व गुन्हा नोंदविला आहे. महादेव लंबे असे मृतकाचे नाव असून, मुकेश वानखडे, रवी वानखडे, शितल वानखडे, गुंफा वानखडे, अनिता धवने, वनिता नारमूदे, माया भगत, रमेश वानखडे, नितीन धवने, संध्या राऊत अशी आरोपींची नावे आहे. महादेव लंबे यांच्या मुलीचा विवाह काही महिन्यापूर्वी मुकेश वानखडे रा. किन्ही याचेशी झाला होता. सुरुवातीचे दिवस गुण्यागोंविदाने विवाहितेने सासरी घालविल्यानंतर पतीसह सासरच्यांनी विवाहितेचा छळ सुरू केला. माहेरवरून ५० हजार रुपये घेऊन ये म्हणून तगादा लावला. पती व सासू, सासरे पैशासाठी मारहाण करीत असल्याची बाब विवाहितेने वडील महादेव लंबे यांना सांगितली. त्यांनी मुलीच्या सासरी जाऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता, वरील आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून घरातून हाकलून लावले. मुलीच्या सासरकडून मिळालेली वागणूकीमुळे त्यांना मानसिक धक्का बसून, लंबे यांनी आत्महत्या केली. याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
0
पुलावरून पडल्याने इसमाचा मृत्यू

यवतमाळ, दि. २१- पुलावरून खाली पडल्याने इसमाचा मृत्यू झाल्याची घटना हिवरा संगम येथे शनिवारी रात्री घडली. वसंतरा कानु पवार (५०) रा. आनंदनगर असे मृतकाचे नाव आहे. हिवरा येथून अनंतवाडी येथे काल रात्री ते जात होते. अशातच वाटेत असलेल्या पुलावरून पडून त्याचा मृत्यू झाला. हिवरा ते फुलसावंगी या रस्तयावर हा पुल असून पाच वर्षापूर्वी पुरात कठडे वाहुन गेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरील कठडे बसवले असून आतापर्यत खाली पडून सहा जणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने बांधकाम विभागाप्रती रोष व्यक्त केला आहे. या घटनेची माहीती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला.
0
फेसबूकवर फोटो अपलोड करण्याची धमकी
यवतमाळ, दि. २१- अश्लील फोटो काढून फेसबूकवर अपलोड करण्याची धमकी देऊन पैशाची मागणी केल्याची घटना बोरी अरब येथे घडली. शुभम जाधव (२०) व अन्य एक अशी आरोपींची नावे आहे. दोन महिन्यापूर्वी या दोघांनी संगणमत करून फिर्यादीचे अश्लील फोटो काढले. तेव्हा पासून हे फोटो फेसबूकवर अपलोड करण्याची धमकी देत पैशाची मागणी करीत होते. याबाबत लाडखेड पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी याप्रकरणी दोघाविरुद्व गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
0
मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्यास दुधाचा अभिषेक
नगर – सरकारच्या शेतकरी धोरणाचा निषेध करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास नासलेल्या दुधाने अभिषेक घालण्याचे आंदोलन संभाजी ब्रिगेडने नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे केले. शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतमालास योग्य भाव जाहीर करावेत, जिल्ह्याच्या दक्षिण भागात दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी तीस हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, आदी मागण्यांबाबत तत्काळ निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.
शेतमालाला चांगला भाव मिळत नाही, पाऊसही अत्यल्प होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला असून कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहे. कर्ज व नापिकीला कंटाळून सहा ते सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दूध पावडरची निर्यात बंद झाल्याने दुधाचे दर पडले आहेत, कापसाचेही दर घसरले आहेत, कांद्याचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश केल्याने दोन हजारांच्या पुढे भाव मिळत नाही, अशी परिस्थिती असताना सरकार मात्र शेतकऱ्यांबाबत उदासीन असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, सुधीर भद्रे, अशोक कोकाटे, विजय खेडकर, दिलीप कांकरिया, शंकर पवार, मारुतराव ससे, प्रवीण कोकाटे, सचिन नालकुल, संदीप काळे, मयूर पवार आदी उपस्थित होते.














